Sunday 23 October 2016

वेगाशी संग.. प्राणाशी गाठ!

अरे संजू हळू.. किती तो वेग.. या वेगाचीच मला भीती वाटते राजा..
आई, एकतर तू मला संजू म्हणत जाऊ नकोस. माझं नाव आहे ना संजय. आधीच ते जुन्या जनरेशन मधलं नाव ठेवून माझी इमेज डाऊन केली आहे तुम्ही, त्यात संजू म्हणजे डायरेक्ट स्टोनएजच.. आणि ते वेगाचं मला काही सांगत जाऊ नकोस. ऍज लॉन्ग ऍज मी स्पीड हॅण्डल करू शकतो, तू कशाला घाबरतेस?
बिचारी सविता, गप्प बसली. तरुण तडफदार अशा संजयची आई म्हणून अभिमानाने मिरवताना तिला खूप छान वाटायचं. तरीही अचानक कधीतरी मुलं वयात येताना त्यांना स्वतंत्र होताना बघून एक द्विधा मनःस्थिती असते ना की 'आपली पिल्लं स्वतःच्या मार्गाने जायला निघणार, स्वावलंबी होणार याचा आनंद आणि त्याच वेळेस त्यांचं आपल्यावर अवलंबून असणं संपत जाणार, सारखं 'आई, कुठे होतीस तू मला तुझी गरज आहे' असं म्हणत भिरभिरणारी पोरं लांब जाणार याचं दुःख' तसंच काहीसं वाटायचं तिला हल्ली. कुठेतरी तरी काहीतरी तुटतंय, काहीतरी बिनसतंय असं वाटत राहायचं.

संजय नुकताच कमावता झाला होता. सगळ्या गोष्टी एकट्याने करायची एक नशाच चढली होती त्याला. परवा तो त्याच्या मित्रांशी बोलताना तिने ओझरतं ऐकलं होतं. संजय म्हणत होता, 'साल्या, घराबाहेर राहतोयस तू. तुला नाही कळणार व्हॉट ऑल वी नीड टू गो थ्रू. शिकत असताना घरी असणं सुख असतं   पण एकदा कामवायला लागलो आणि घरच्यांसोबत राहत असू ना तर कटकट असते आयुष्यात.'
आपण आत्तापासूनच याच्या आयुष्यात कटकट वाटायला लागलो आहोत हे ऐकल्यावर सविताला प्रचंड वाईट वाटलं.

सविताची पिढी म्हणजे दिवसभर नोकरी करून, सकाळ संध्याकाळ घरासाठी राबणाऱ्या, सणासुदीला घरचाच नैवेद्य बनवून शक्य तेवढ्या ताकदीने सगळ्या परंपरा सांभाळणाऱ्या पापभिरू बायकांची पिढी. सकाळी लवकर उठणारी, देवपूजा करणारी, आपला गाव बरा असं म्हणत जगणारी, समोरचा कॉम्प्युटर बघून 'याला चालू कसं करतात रे' म्हणून गोंधळून जाणारी, 'मला ते व्हाट्सअप वगैरे काही जमणार नाही' म्हणत काहीच दिवसात ते सफाईने वापरायला सुरुवात करणारी शांत आणि सुखी पिढी. याउलट संजयची पिढी, कामाच्या ओझ्याखाली दाबून जाणारी आणि मग वर्क हार्ड पार्टी हार्डर म्हणत रात्र रात्र पार्टी करणारी, सदासर्वकाळ फेस्टिव्ह मूड मध्ये असणारी, सगळीकडे काहीतरी हॅपनिंग शोधणारी, माणसांपेक्षा ग्याजेटसमध्ये रमणारी, बालपणाची सुरुवात शुभंकरोतीने करणारी आणि आता 'हफ्तेमे चार शनिवार होने चाहिये' म्हणणारी, वेगवान पिढी. मेळ जमणं अवघडच होत होतं पण म्हणून आपण त्याला कटकट वाटू शकतो असं सविताला चुकूनही वाटलं नव्हतं.

मग मात्र तिने संजयच्या आयुष्यात लक्ष घालणं थांबवलं, लवकर उठ; व्यायाम कर; बाहेरचं खाणं बंद कर असं म्हणणंही थांबवलं. आई म्हणून आपली इतिकर्तव्यता संपली आहे असं तिने स्वतःला पटवून द्यायला सुरुवात केली. आईचं असं तुटक वागणं संजयच्या लक्षात आलं होतं तो मनातून सुखावला होता. आईला काही विचारलं तर भाषण सुरु होईल म्हणून त्याने शिताफीने विषयही काढला नव्हता.

असेच दिवस जात होते संजयचं वेगवान आयुष्य सविताच्या समाधानी आयुष्याला वाकुल्या दाखवत पुढे जात होतं. दर सहा महिन्यांनी जुन्या वस्तू olx वर जात होत्या आणि अमझोनवरून नवीन वस्तूंना घरी आणलं जात होतं. वीकेंडला मजा करू म्हणून आनंदाला पुढे ढकललं जात होतं. कामाच्या रगाड्यात संजयचा व्यायाम थांबला होता, पोटाने पुढे येऊन व्यावसायिक अनुभव दाखवायला सुरुवात केली होती. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षीच संजय केसांनी जागा सोडल्याने पोक्त दिसू लागला होता. तरीही त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो सुखी होता.

एकेदिवशी सॅटर्डे नाईटआऊट साठी गेलेला संजय रविवारी दुपारपर्यंत घरीच आला नाही. जरावेळाने एक फोन मात्र आला, 'काकू हिरेमठ हॉस्पिटल मधून बोलतोय. संजयला ऍडमिट केलंय. माईल्ड ऍटॅक आला त्याला सकाळी. आता सगळं ठीक आहे, काळजीचं काही कारण नाहीये.' सविता लगेचच हिरेमठांकडे पोहोचली. संजय शुद्धीवर आला होता. शेजारी बसलेल्या आईकडे बघून त्याच्यातला संजू जागा झाला. आईच्या कुशीत तोंड लपवत, मुसमुसत तो म्हणाला, 'आई, कुठे होतीस तू मला तुझी गरज आहे गं, खरंच खूप गरज आहे' सविता त्याला कुरवाळत, शांत करत म्हणाली, 'मला या वेगाचीच मला भीती वाटत होती राजा. मी आहे ना, आता सगळं ठीक होईल.'
जाणत्या पिढीने पुन्हा एकदा वेगवान पिढीला आधार दिला होता. आणि आता तो आधार कधीच कटकट वाटणार नव्हता...

Wednesday 19 October 2016

थोडंसं नाजूक विषयाबद्दल!

या महिन्यात तुम्हाला मुली घोळक्याने गुलाबी शर्ट घालून किंवा गुलाबी रिबीन लावून फिरताना दिसत असतील तर कुठलीही उपरोधिक चर्चा करण्याआधी त्यामागचा उद्देश लक्षात घ्या. ऑक्टोबर महिना हा ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ‘ म्हणून मानला जातो. 2015 मध्ये भारतात ब्रेस्ट कॅन्सरने पीडित नवीन पेशंटची संख्या आहे- एक लाख पंचावन्न हजार. आणि मृत्यू झालेल्या महिलांची संख्या आहे जवळपास ऐंशी हजार. खेदाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे या कॅन्सरबद्दल म्हणावी तेवढी जागरूकता नाहीये. म्हणूनच आज हा लेखन प्रपंच.

मुळातच कॅन्सर हा असा प्रकार आहे ज्याला आपण बळी पडलो आहोत हे आपल्या खूप उशिरा लक्षात येतं. दुर्दैवाने त्याची विशेष लक्षणंही दिसून येत नाहीत. आणि जेव्हा कळतं तेव्हा मात्र उशीर झालेला असतो. कॅन्सर ही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे असं म्हणतात. त्यामुळं तो होऊच नये यासाठी स्वतःला जपणं अत्यंत गरजेचं आहे. स्वतःला जपताना, स्वतःच्याच शरीराची नीट ओळख असायला हवी. किमान ब्रेस्ट कॅन्सर ओळखता यावा म्हणून तरी. तो कसा ओळखायचा याबद्दल नीट माहिती घ्यायला हवी.

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नक्की काय?
सर्वात आधी, ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांचा आजार म्हणून ओळखला जात असला तरी काही वेळा पुरुषांमध्येसुद्धा हा विकार आढळून येतो. अर्थात त्याचे प्रकार वेगळे आहेत. आज स्त्रियांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दलच बोलूया.

स्त्रीच्या स्तनामध्ये चार मुख्य गोष्टी असतात. ‘फॅट‘, ‘कनेक्टिव्ह टिशू‘, ‘लोब्युल‘(दूध तयार करणाऱ्या ग्रंथी) आणि ‘डक्ट‘(तयार होणारं दूध स्तनाग्रापर्यंत पोहोचवणाऱ्या वाहिन्या). या सर्व गोष्टी पेशींपासून बनलेल्या असतात. कॅन्सर होतो म्हणजे या पेशींची अतोनात वाढ होते आणि गाठ निर्माण होते जी जीवघेणी असते.

ब्रेस्ट कॅन्सर दोन प्रकारचा असतो :
1. डक्टल(डक्ट मध्ये गाठ निर्माण होते)-  हा जास्त प्रमाणात आढळून येणारा प्रकार आहे
2. लोब्यूलर(लोब्युलमध्ये गाठ निर्माण होते)- दोन्ही प्रकारात गाठी स्तनामध्ये निर्माण होत असल्या तरी कालांतराने इतर अवयांवरदेखील त्याचा दुष्परिणाम होतो.

आता महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सगळं ओळखायचं कसं?
1. प्रामुख्याने आढळून येणारी गोष्ट म्हणजे हाताला जाणवू शकते अशा प्रकारची गाठ निर्माण होते. अनेकवेळा ही गाठ चरबीचीसुद्धा असते, जी त्रासदायक नसते.
2. मासिक पाळीच्या वेळेस काहीजणींना स्तन जड वाटतात, दुखतात. याची काळजी करायची गरज नाही. पण मासिक पाळी जवळ नसतानासुद्धा वारंवार तशा प्रकारचं दुखायला लागतं, काखेमध्ये जडपणा जाणवतो. हे मात्र कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
3. स्तनाचा आकार बदलतो, टोक आतल्या बाजूला झुकतं.
4. स्तनाग्राचा रंग बदलतो. टोकदारपणा कमी होतो(वयानुसार होणारा बदल नव्हे).
5. स्तनाग्रामधून स्त्राव होतो. (पांढराद्रव किंवा रक्त)

बायकांनी स्वतःच हे ओळखणं गरजेचं आहे. कारण हा असा कॅन्सर आहे जो त्यांना स्वतःला बायोप्सीशिवाय ओळखता येऊ शकतो. आणि लवकर लक्षात आला तर शरीराची विशेष हानी न होता बरा देखील होऊ शकतो. त्यामुळं स्वतःला आरशात नीट निरखून बघा.. कसलीही शंका अली तर लगेच डॉक्टरांना भेटा.. ‘मी तरुण आहे मला काय होणार‘ असं म्हणू नका. तिशीनंतर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढत जातो.
डॉक्टर्स जर त्यांना काही संशयास्पद वाटलं मेमोग्राम, एक्स-रे करायला सांगतात. ज्यात कुठीलीही कापाकापी नसते. दिसलेली गाठ धोकादायक आहे कि नाही हे ठरवण्यासाठी बायोप्सी करतात आणि मग आलेल्या निदानानुसार उपचार पद्धती ठरवली जाते. (उपचारांबद्दल जास्त सांगत नाही कारण ते प्रत्येक व्यक्तीच्या निदानावर अवलंबून असतात. एक गोष्ट मात्र आहे विकाराची सुरुवात असेल तर फक्त गाठ काढली जाते नाहीतर संपूर्ण स्तन काढला जातो.)
ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे ठराविक असं एकच कारण नाही. बरेच डॉक्टर म्हणतात हा जीवन शैली बिघडल्यामुळे होणारा विकार आहे. (लाईफस्टाईल डिसऑर्डर) तरीदेखील काही कारणं सांगता येतील.

1. वयानुसार शरीरात होणारे बदल
2. जनुकांचा प्रभाव
3. अनुवांशिक. ब्रेस्ट कॅन्सर आणि अंडाशयचा कॅन्सर हे अनुवांशिक असू शकतात असं डॉक्टर म्हणतात
4. हार्मोनल ट्रीटमेंटस
5. ज्यांची मासिक पाळी नेहमीच्या वयापेक्षा खूप लवकर सुरू होते ( 12 व्या वर्षाआधी) किंवा ज्यांची पाळी उशिरा थांबते (55 व्या वर्षानंतर) त्यांच्या शरीरात इस्ट्रोजेन जास्त काळ असतं आणि ‘इस्ट्रोजेन एक्सपोजर’ हे देखील ब्रेस्ट कॅन्सरचं एक कारण आहे.
6. बाळाला योग्य प्रमाणात स्तनपान केलं नाही तरीदेखील ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतो
7. लाईफस्टाईल डिसऑर्डर होण्यामागे जी कारणं आहेत ती म्हणजे स्थूलपणा, अति प्रमाणात जागरण, मद्यपान, मानसिक ताण-तणाव
8. काही लोक म्हणतात कि चुकीची अंतर्वस्त्र वापरल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो. अजून तरी असं सिद्ध झालेलं नाहीये

हे सगळं टाळायचं असेल तर या काही गोष्टी करायला हव्या-
1. नियमितपणे व्यायाम - याला अजिबात पर्याय नाही
2. अतिमद्यपान टाळायलाच हवं. मद्यपानामुळे वंध्यत्वदेखील येऊ शकतं
3. कुठलीही हार्मोनल थेरपी शक्यतो टाळायला हवी
4. स्तनामध्ये कुठे गाठ नाही ना हे नियमितपणे बघायला हवं

तर मैत्रिणींनो, या महिन्यात ब्रेस्ट कॅन्सरबद्दल नक्की माहिती करून घ्या. आयुष्याचा गांभीर्याने याचा विचार करा. स्वतःला जपा...

Sunday 25 September 2016

पुरुषामधल्या माणसाला सलाम!


पिंक पाहिल्यानंतर नंतर मनात खूप विचार आलेले, बरेचसे वाईटच विचार. 'त्या' विषयावर लिहायचं असं बरेच दिवस वाटत होतं. सिनेमामुळे मुहूर्त लागला. संपूर्ण आठवडा तोच विषय डोक्यात होता. किती सहन करायचं, का करायचं वगैरे वगैरे.. अशावेळेस मग अचानक आयुष्यात 'माणूस' म्हणून भेटलेले अनेक पुरुष आठवले आणि आपोआप शांत वाटायला लागलं..

आजची ही पोस्ट अशाच सगळ्या परिचित, अपरिचित पुरुषांना ज्यांनी, कळत-नकळत आम्हांला मदत केली आहे आणि स्वतःमधील माणूसपण जिवंत ठेवलं आहे..
खूप लहान होते मी, नुकतीच शाळेत जायला लागले होते. घराला लागूनच शाळा होती आमची. त्यामुळे शाळेतून न्यायला-आणायला सहसा कोणी यायचं नाही.. शिपाई काका मात्र शाळेच्या गेटजवळ उभे राहायचे. मी वाड्यातून आत गेलेली दिसले कि मग शाळेत परत जायचे.

वालचंदमध्ये मेसचं खाताना ज्या दिवशी फीस्ट असायची तो दिवस खास असायचा. मेसचे काका आम्हा चार-पाच मुलींसाठी त्या दिवशीचा स्पेशल पदार्थ वेगळा काढून ठेवायचे, उन्हाळ्यात तर आईस्क्रिमचे दोन स्कुप जास्त मिळायचे.

मुंबईत तर अनेक चांगली माणसं भेटली. सगळ्यांत पहिल्यांदा तिथे गेले तेव्हा सायन कुठे? भांडुप कुठे? काsssही माहित नव्हतं.. वाशी गेल्यावर मी कंडक्टर काकांना विचारलं, 'मला भांडुपला जायचंय, कुठे उतरू?' त्यांनाही फारसं माहित नव्हतं.. तेव्हा एक जण म्हणाला, 'काळजी करू नका. मी सांगतो. मीही तिकडेच जाणारे.' त्यानंर त्याने आम्ही बस मधून उतरून, तिकीट काढून, प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत सगळी मदत केली.. 'कसलीही' अपेक्षा न करता..

पुढे ठाण्यात असताना एकदा साधारणतः पहाटे साडेपाच-सहाला पोहोचणारी बस साडेचारलाच पोहोचली.. बाहेर तुफान पाऊस.. आसपास रिक्षा, टॅक्सी काहीच नव्हतं. तसं स्टॉपपासून घर जवळच होतं पण माझ्याकडे सामान बरंच होतं.. ते सगळं सावरत हळू हळू मी जात होते.. तेवढ्यात एक रिक्षा थांबली, चालक पचकन थुंकला.. नाही म्हणलं तरी मला भीती वाटली. त्याने विचारलं, 'कुठे जायचंय?' मी सांगितल्यावर 'बसा' म्हणाला.. घराजवळ आणून सोडलं.. 'किती पैसे झाले असं विचारलं तेव्हा म्हणाला,'ताई, मी घरीच जात होतो आत्ता.. तुम्ही दिसलात.. एकटीने असं जाणं धोक्याचं वाटलं.. माझी बहीण असती तर मी तिच्याकडून पैसे घेतले असते का!!' फार छान
वाटलं ते ऐकून..

बसमधून जाताना वारा लागला कि झोपणं हा माझा लाडका छंद आहे.. माझं घर म्हणजे ऑफिसच्या बसचा शेवटचा स्टॉप होता.. तिथे सगळे उतरले कि दोन किलोमीटर पुढे एका मैदानात बसेस लावल्या जायच्या.. एक दोन वेळा माझ्या झोपेच्या नादात मी स्टोपवर उतरायची विसरूनच गेले, बस थांबली आणि गरम व्हायला लागलं तशी मला जाग आली.. ड्रायव्हर काका, उतरून निघतच होते.. त्यांनी मला पाहिलं, परत गाडी सुरु केली आणि मला घरी आणून सोडलं..

नंतर आत्ता अगदी परवाची गोष्ट.. एका गार्डन मध्ये गेलेले.. तिथे एक आजोबा आले.. माझी चौकशी केली आणि जाताना, 'You're a brave girl, God bless you my child' असा आशीर्वाद देऊन गेले..

आम्ही लहान असताना आई एक गोष्ट सांगयची.. त्याचा अर्थ काहीसा असा होता कि जगात 36 प्रकारची चांगली माणसं आहेत.. आणि त्यांच्या पुण्याईमुळेच जग चालू आहे.. ती 36 प्रकारची माणसं दीर्घायू व्हावीत हीच बाप्पाकडे प्रार्थना.. __/\__ 

No means No!!

पिंक-- कायम मुलींशी निगडित असणारा रंग.. कदाचित म्हणूनच सिनेमाचं नावही पिंक!! यात असा एक विषय आहे जो प्रत्येक मुलीने आयुष्यात एकदातरी बघितला खरंतर अनुभवला आहे.. शारीरिक, मानसिक, वाचिक किंवा केवळ नजरेने केलेला लैंगिक अत्याचार.....

जी अजूनही यातून वाचली आहे ती प्रचंड भाग्यवान आहे किंवा या प्रकाराला लैंगिक अत्याचार म्हणतात हे तिला माहितच नाहीये.. भाग्यवान मुलगी अशीच भाग्यवान राहूदे.. मात्र जी अज्ञानी आहे तिने ते अज्ञान दूर करून घेतलं पाहिजे.. कारण आज घराबाहेर पाऊल टाकलं कि स्वत्व जपायचं कि स्वतःला जपायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे..

एखाद्या मुलीला पाहिलं कि काही लोकांचे हात त्यांच्या पँटकडे जातात, नको तिथे खाज सुटते त्यांना, अगदी तेव्हाच.. मग ती मुलगी जवळून जाऊ लागली कि कोपरं बाहेर काढली जातात, मुद्दाम धक्का मारला जातो.. त्या मुलीला नको तिथे हात लावला जातो.. अगदीच हलकट आणि प्रचंड घाणेरड्या वृत्तीची ती जनावरं चेन उघडून आपलं तथाकथित पौरुषत्व दाखवतात.. बसमधून जाताना अशा कोनात उभे राहतात हे लोक कि स्पर्श झालाच पाहिजे.. किळसवाणा स्पर्श.. शेजारी येऊन बसणं, कोपर रुतवणं हे तर अगदीच सर्रास चालू असतं..
रात्रीच्या वेळी चालत किंवा गाडीवरून जाणारी मुलगी म्हणजे 'आज रात्रीची सोय झाली' असं वाटतं यांना.. मग गाडीच्या काचा खाली करून ' काय म्याडम येणार का?' असं गलिच्छ ऐकायला मिळतं.. तिला बघताना आपापसात ते नीच लोक 'ती बघ कलिंगडं..'असं म्हणत तिला न्याहाळतात.. शिट्टी वगैरे प्रकार फार जुने झाले म्हणे आता.. एकटी मुलगी बाहेर दिसली कि 'तुम्ही असं इथे एकटं राहणं सुरक्षित नाही, माझ्याबरोबर चला.. तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात' असं म्हणणाऱ्या तोंडातून वासना टपकते.. बहीण-भावाच्या नात्याची लक्तरं वेशीवर टांगली जातात..

आणि हे सगळं फक्त घराबाहेरच होतं असंही नाही.. ज्या मुलींना स्वतःच्या घरात हे असलं सहन करावं लागतं त्यांच्यासारख्या बिचाऱ्या त्याच..

एखादा चांगला मित्र आजकाल स्वतःहून सांगतो.. 'तुला सांगायला काही हरकत नाही.. बऱ्याचदा मुलींशी बोलताना काही मुलांच्या डोक्यात कुठे ना कुठे तरी हिच्या सोबत शय्यासोबत करायला मिळावी असाच विचार असतो.. त्यामुळं जपून..' अशावेळेस सगळ्या पुरुषजातीबद्दलच घृणा वाटायला लागते.. अशा लोकांमुळे जे पुरुष खरंच खूप चांगले आहेत.. आयुष्यभर चांगलंच वागत आले आहेत अशांवरही संशय घेतला जातो किंवा पटकन विश्वास टाकता येत नाही.. तेव्हा मात्र मुलींबद्दल वाईट तर वाटतच पण या चांगल्या पुरुषांबद्दलसुद्धा खूप वाईट वाटतं..

हे सगळं उघडपणे लिहावंसं वाटलं कारण एक चांगला मित्र, काका, आजोबा, बॉस, शेजारी असणं किती महत्वाचं आहे हे माहित असूनसुद्धा अशा काही चिंधी लोकांमुळे माणुसकीवरचा विश्वास उडत चाललाय.. आणि एक गोष्ट वारंवार अधोरेखित होत चालली आहे, ‘We are not safe out here'.. 'My girls, my ladies, we are not safe out here!!'

P.S. - माझेही खूप चांगले मित्र आहेत, अगदी सगळ्या वयोगटामधले.. त्यांच्यासोबत असताना मी मुलगी असल्याची मला भीती वाटत नाही.. किंवा कमीपणाही वाटत नाही!!
ही पोस्ट अशा काही नराधमांबद्दल आहे ज्यांना अजूनही मुलगी, स्त्री केवळ उपभोग्य वस्तू वाटते.. बाकी, कोणत्याही सुज्ञ, विचारी, विवेकी पुरुषाने मनाला लावून घेऊ नये.. या बाबतीत 'All men are not same' हे आम्हांला नक्की माहित आहे!!! 

Sunday 11 September 2016

एक संवाद रोजचाच!!

फोन वाजतो..
(तिकडून)आई : हेल्ल्लो... कशी आहेस??
मी: मस्त, तू कशी आहेस..
आई: मी व मजेत.. काय जेवलीस?
मी: नेहमीचंच. पोळी भाजी आणि कोशिंबीर.. तुम्ही?
आई: भाकरी, आमटी, कोबीची भाजी आणि वरण भात..
मी: वाह.. बाकी बरी आहेस ना..
आई: हो.. तू ठीक आहेस ना..
मी: हो.. चल, झोप तू आता..
आई: हो, तू पण.. गुड नाईट..
मी: गुड नाईट..

आता यात वेगळं असं काहीच नाही. बऱ्यापैकी सगळ्या घरात होणार संवाद आहे.. तरीही हा खूप अर्थपूर्ण संवाद आहे.. कारण यातलं खरं संभाषण काहीसं असं असतं..
फोन वाजतो..

(तिकडून)आई : हेल्ल्लो... कशी आहेस??
(तिचा आवाज ऐकून मला कळावं कि ती आनंदात आहे(कधी कधी नसली तरीसुद्धा), म्हणून ती अतिशय उत्साहाने हॅल्लो म्हणते.. आम्हाला 'कशी आहेस' हे विचारणं म्हणजे एक बहाणा असतो आमचा आवाज ऐकण्याचा.. दिवसभर दोघींच्या कामाच्या व्यापातून बोलायला सवड झालेली नसते.. म्हणून हा रात्रीचा कॉल..)

मी: मस्त, तू कशी आहेस..
(आमचा मूड किंचितही ठीक नसेल तर तिला कसं काय कळतं देवच जाणे, त्यामुळं आजकाल आम्हीसुद्धा गरज पडल्यास खोटं अवसान आणून हे आनंदाने बोलतो.. बऱ्याचदा म्हणायचं असतं, "आई, खूप आठवण येते ग तुझी.. सगळं एकटीने करताना दमायला होतं." पण मग आमच्याएवढी असताना अख्खा संसार सांभाळलास तू हे आठवून आम्ही 'मस्त'च आहोत असं सांगतो..)

आई: मी पण मजेत..
(मुली बाहेर असतात मग काय, दोघांचा राजाराणीचा संसार असं वाटतं लोकांना. पण पोरींनो, दिवसरात्र काळजी वाटते. कशा राहत असाल, काय खात असाल, कोणाकोणाच्या नजरा झेलत असाल असं वाटत राहतं दिवसभर.. काम नसेल तर दिवस खायला उठतो. आजकाल पेशंट्स जास्त आहेत तेच बरंय. टाच दुखते सतत उभं राहून. पण कामात असलेलंच बरं.. नसते विचार नकोतच..)

काय जेवलीस?
(जेवलीस तरी का गं नीट. बाहेरचं खाऊ नकोस बाळा जास्त. पर्याय नसतो माहित आहे मला पण तब्येतीला जप.. तुमची पिढी सगळ्यांत जास्त दुर्लक्ष करते शरीराकडे.. असं नाही चालत.. नीट खात पीत जा.. दुधा-तुपाने वजन वाढत नाही. ते गरजेचं असतं आपल्याला..)

मी: नेहमीचंच. पोळी भाजी आणि कोशिंबीर.. तुम्ही?
(आजसुद्धा उशीरच झाला घरी यायला. आल्यावरसुद्धा काम होतं.. आवरेपर्यंत दहा वाजले.. मग पटकन जे सुचलं ते केलं. जवळपास 30 वर्ष स्वतःचे सगळे व्याप सांभाळून इतका सुग्रास स्वयंपाक कसा केलास तुझं तुलाच माहित.. आम्हाला कधी जमेल का गं असं???)

आई: भाकरी, आमटी, कोबीची भाजी आणि वरण भात..
(आजकाल फार होत नाही गं.. आणि दोघांसाठी काय काय करणार.. त्यात आम्ही खाणार चिमणीएवढं.. पिठलं करून काळ लोटला.. तू नसतेस ना खायला आता. आणि बाबांना आवडत नाही.. तू आलीस कि मस्त दही-भेंडी, पिठलं, घुटं असं खाऊ आपण..)

मी: वाह.. बाकी बरी आहेस ना..
(एवढ्या लांबून फक्त हेच विचारू शकतो आम्ही.. काल बाबा सांगत होते, तुला दम लागतो अधून मधून.. तू काही हे सांगणार नाही मला स्वतःहून.. आणि मी ही तुला विचारणार नाही.. काळजी घे फक्त.. चहा कमी पी.. तेल-चुरमुरे खाऊ नको..)

आई: हो.. तू ठीक आहेस ना..
(मी ठीकच.. पूर्वी-इतका उत्साह नाहीये आता.. तुम्हीसुद्धा दमून येता.. तुम्हाला काय कमी व्याप आहेत. आमच्या कथा सांगून उगाच आणखी टेन्शन द्यायला नको वाटतं.. एकेकट्या राहता.. काळजी घ्या.. जग तितकंसं चांगलं राहिलं नाहीये..)

मी: हो.. चल, झोप तू आता.. गुड नाईट..
(ज्याचे त्याचे टेन्शन्स..तुम्हाला सांगून एवढ्या लांबून तुम्ही तरी काय करू शकणार आहात.. त्यापेक्षा नाहीच बोलत मी.. आठवण येतेय खूप.. रडायला यायच्या आधी गुड नाईट..)

आई: हो, तू पण.. गुड नाईट..
(काम करून दमताय तर फेसबुक कमी करा जरा.. जीवाला शांत झोप मिळूदे.. आमची काळजी करू नका.. तुम्ही ठीक असलात कि आम्ही मजेत असतो..)

तमाम आई-बाबांना या पोस्टद्वारे a big thank you !!

*असा हा संवाद मांडायची मूळ कल्पना माझी नाही.. कोरावर या प्रकारची एक पोस्ट होती.. मी मराठीत लिहिली.. थोडा स्वतःकडचा मसाला टाकून...

Friday 9 September 2016

नांदा सौख्यभरे!!

असाच अनेक रविवार सारखा एक रविवार. पुण्यातली दुपारची वेळ. सगळी कामं व्यवस्थित आवरून रेवा आपल्या 2BHK flat मध्ये आरामशीर पडली होती. नीरज नेहमीप्रमाणे office च्या कामासाठी जपानला गेला होता. तो परत येईपर्यंत तिच्या हक्काच्या निवांतपणाला कोणी त्रास देणार नव्हतं. सकाळच्या कामातून आत्ता जरा मोकळं झाल्यावर तिने Times उघडला. ती आधी काम करत असलेल्या कंपनीने एका competitor company ला takeover केलं होतं. तिला कंपनीमधले जुने दिवस आठवले. एकदम up to date असणारी रेवा सुरुवातीपासूनच smart Performer होती. तिचा स्मार्टनेस फक्त कपडे आणि looks पुरताच नव्हता. त्यामुळं संपूर्ण team मध्ये रेवा उठून दिसायची. काहींच्या विशेष नजरेत भरायची. तिच्या गुणांवर, रूपावर भाळलेला नीरज तिला विशेष निरखत असायचा. तिचं फक्त “असणं” त्याच्यासाठी Job motivation असायचं. रेवासुद्धा हे सगळं जाणून होती. सुरुवातीला team सोबत lunch ला जाणारे दोघं काही काळाने lunch time झाला की कामाचे बहाणे शोधायला लागले होते. दोघांनाच breakfast, lunch साठी जाता यावं म्हणून गनिमी कावा करायला लागले होते. ऑफिस संपल्यानंतर कधी CCD तर कधी Barista च्या फेऱ्या वाढू लागल्या होत्या. सगळ्यांना हे कळत होतं.
अथर्वला मात्र हे पचवणं थोड जड जात होतं. तो आणि रेवा college मध्ये असल्यापासून एकमेकांचे मित्र होते. त्यांचं चांगल जमायचंदेखील. आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी एकमेकांना सांगितल्या होत्या. ऑफिसमध्ये आल्यावर अथर्व आणि नीरजसुद्धा एकमेकांचे चांगले मित्र बनले होते. रेवा मैत्रीपलीकडे जाऊन अथर्वचा विचार करत नव्हती परंतु अथर्वला मात्र रेवा आवडायला लागली होती. अशा परिस्थितीमध्ये त्याला नीरज आणि रेवाला सोबत बघणं जड जात होतं. असे बरेच महिने गेले. अथर्वची मुंबईला बदली झाली. साहजिकच त्याचा आणि रेवाचा contact कमी झाला. रेवा आणि नीरज भावी आयुष्याची स्वप्नं रंगवण्यात दंग होते. दोघंही सुशिक्षित, सुसंस्कृत आणि मनमिळाऊ असल्याने दोन्ही घरांनी लग्नाला संमती दिली. “Neeraj weds Reva” चा समारंभ थाटामाटात पार पडला आणि ते सुखाने नांदू लागले.
जसा जसा काळ पुढे सरकत होता तसा दोघांच्याही कामाचा ताण वाढत होता. रेवाने कंपनी बदलली होती. नवीन ठिकाणी ती business development manager होती. नीरजनेदेखील जुनी कंपनी सोडून स्वतःचा business सुरु केला होता. त्यात बरकत होत होती. बँक account फुगत होतं. meetings च्या निमित्ताने नवनवीन देशांना भेटी देता येत होत्या. अधेमध्ये सुट्टी घेऊन long vacation ला जाता येत होतं. या सगळ्याची एक मोठी किंमत मात्र त्यांना मोजावी लागत होती. लग्नाआधी आणि नंतरच्या गुलाबी दिवसात एकमेकांशिवाय चैन न पडणारे ते दोघं आता एकमेकांना फक्त “reporting” करत होते. “आज यायला उशीर होईल गं, वाट बघू नको, जेवून घे, उद्या ६:०५ ची flight आहे, हे आणि ते. रेवाला हे सगळं खूप त्रासदायक वाटत होतं. तिने एकदोनदा नीरजशी बोलण्याचा प्रयत्नही केला आणि तिच्या लक्षात आलं कि नीरजला फारसा फरक पडत नाहीये. त्याची कंपनी स्वतःचं valuation वाढवत होती आणि नीरजला तेच जास्त महत्वाचं वाटत होतं.
एवढ्यात तिचा मोबाईल वाजला आणि ती वर्तमानात आली. तिला फेसबुकवर एक मेसेज आला होता. त्यात हाय हेल्लो काहीच नाही. फक्त एवढंच, “काय ग मुली, प्रेमात पडलीस, लग्न केलंस आणि जवळच्या मित्राला मात्र विसरून गेलीस ना.” जवळपास वर्षभराने अथर्वचा मेसेज आला होता. अशा मेसेजेसची रेवाला आताशा सवय झालेली होती. सेंटी सुरुवात करून काहीतरी काम सांगणारे मेसेजेस तिला नवीन नव्हते. पण अथर्व जुना मित्र आहे, बघू तरी काय म्हणतो म्हणून तिने बोलायला सुरुवात केली. मग फेसबुकवरून बदललेल्या नंबरची देवाण-घेवाण झाली. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी भेटायचं ठरवलं. रेवाने हे सगळं अतिशय उत्साहाने नीरजला सांगितलं. त्यावर त्याचं दोन शब्दांत उत्तर आलं, “अरे वाह!” नाही म्हणलं तरी ती थोडी हिरमुसली.
दुसऱ्या दिवशी रेवा मस्त आवरून अथर्वला भेटली. दोन एक तास बोलले दोघंजण. सुरुवातीला जरा अवघडलेपण होतं. पण जशा जशा जुनी आठवणी निघाल्या, कॉलेजचे दिवस आठवले तसं दोघंही मोकळेपणाने बोलू लागले. आणि मग वेळ कसा गेला कळलचं नाही. उशीर व्हायला लागल्यावर रेवा जायला निघाली. गप्पा मारून पोट भरलं होतं. बऱ्याच महिन्यांनी ती कोणाशीतरी एवढ्या मोकळेपणाने बोलली होती. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
असेच काही दिवस गेले. रेवा आणि अथर्वची पुन्हा एकदा घट्ट मैत्री झाली. एकटेपणाला कंटाळलेली रेवा आता मात्र खुश होती. तिला हवं तेव्हा तिच्याशी बोलणारं कोणीतरी तिला मिळालं होतं. तिच्यातला हा बदल अथर्वनेसुद्धा ओळखला होता. मात्र या सगळ्या गोष्टी घडत असताना नीरज फक्त आणि फक्त काम करत होता. तो कधीही रेवाबरोबर अथर्वला भेटायला आला नाही कि रेवाकडे त्याची चौकशी केली नाही. नीरज संपूर्ण नीरस होऊन जगत होता. या पार्श्वभूमीवर अथर्वचा जिवंतपणा, त्याचा जगण्याचा दृष्टीकोन, work-life balance याचं रेवाला खूप कौतुक वाटायचं. तिने कधी बोलून नाही दाखवलं पण अथर्वला तिच्या नजरेत हे दिसायचं.
एकेदिवशी whats app वर गप्पा मारता मारता रेवा पटकन बोलून गेली, “अथर्व, कुठे होतास रे इतके दिवस. थोडं आधी भेटायला हवा होतास बघ” त्या बोलण्यामागे जी व्याकुळता होती ती अथर्वला समजली. तो रेवाला सहानुभूती देऊ लागला. साहजिकच रेवाचा अथर्वकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला लागला. आणि हे सगळं नीरजच्या गावीही नव्हतं.
एका रात्री नीरज उशिरा घरी आला, त्याने packing केलं, दुसऱ्यादिवशीच्या flightचं timing सांगून तो झोपला. सकाळी रेवाला न सांगताच तो निघून गेला. रेवा उठली, नीरज गेलेला लक्षात आल्यावर, “रोबो झालाय याचा, लग्नाचा पहिला वाढदिवससुद्धा लक्षात असू नये माणसाच्या.. याच्यापेक्षा अथर्व किती lively आहे... असो!” असं म्हणत एक उसासा टाकून तिने आवरायला घेतलं. एवढ्यात बेल वाजली. कपडे सावरत, केस ठीक करत ती hall मध्ये आली. दार उघडलं आणि आश्चर्याचा धक्का बसून दोन पावलं मागे आली. हातात गुलाब, आणि तिची लाडकी Cadbury silk घेऊन तो दारात उभा होता.
“तू??? तू इथे काय करत आहेस? तुझी तर मीटिंग होती ना. सकाळीच गेलास न तू. नक्की काय झालंय? तू परत का आला आहेस? सगळं ठीक आहे ना?”
“अगं राणी हो हो.. किती प्रश्न विचारशील? नवऱ्याला घरात तरी घेशील की नाही.” असं म्हणत तिला मिठीत घेतच नीरज घरात आला. तिच्या चेहऱ्यावरचे असंख्य प्रश्न बघून त्याला मजा येत होती. तिची आणखी मजा न घेता त्याने बोलायला सुरुवात केली, “रेवा, सगळ्यांत आधी मला माफ कर. कंपनीच्या कामात मी एवढा गुंतून गेलो कि मला कशाचंच भान राहिलं नाही. तुझ्या तक्रारींकडेसुद्धा ‘झालं हिचं सुरु परत’ म्हणत मी दुर्लक्ष केलं. पण एका मेसेजने माझे डोळे उघडले. मागच्या आठवड्यात मला अथर्वचा मेसेज आलेला. “काय रे, ***! तुझी बायको नकोय का तुला. बघ, माझं अजून लग्न व्हायचंय.” खरं सांगायचं तर मला त्याचा प्रचंड राग आलेला. त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता मी त्याला भेटायला बोलावलं आणि काय सांगू तुला, गड्याने मला पूर्णपणे जिंकलं. तुमचं रोज बोलणं होतं हे सांगितलं. तू एकटी पडत चालली आहेस याची अतिशय “प्रेमळ” शब्दांत जाणीव करून दिली. माझी चूक दाखवून दिली. मी भेटायला बोलवावं म्हणूनच ‘तसा’ मेसेज केल्याचं कबूल केलं. तू समोर असूनही मला जे दिसत नव्हतं ते त्याच्या त्या मेसेजने आणि बोलण्याने समजलं. तुझं असणं कायम गृहीत धरत गेलो मी. पण त्याच्या त्या मेसेजने मला जाणवून दिलं की तुला कोणी माझ्यापासून हिरावून नेलेलं मला चालणार नाही. सहन होणार नाही. तेव्हाच ठरवलं तुला सॉरी म्हणायचं. मग सरळ सरळ येऊन बोलण्यापेक्षा जरासं नाटक! असो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राणीसरकार.”
आता रेवाकडे बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. घट्ट मैत्रीने एक संसार परत सावरला होता. एका नव्या सहजीवनाची सुरुवात झाली होती...

Saturday 3 September 2016

एका गणेशोत्सवाची गोष्ट!!

तो शेवटचा स्वतःच्या घरात राहिला त्याला आता बरेच महिने उलटले होते. जगभरात फिरत, मिटींग्समध्ये कंपनीचं प्रतिनिधित्व करत, डील्स खिशात घालत त्याने या half year चं टार्गेट वेळेआधीच पूर्ण केलं होतं. लीड मिटींग्स मध्ये मि. अवधूत घाणेकर हे नाव star performers च्या यादीत बरेच महिने स्थान टिकवून होतं.

नुकताच जुलै संपला आणि दरवर्षीप्रमाणे अवधूतला गणेश चतुर्थीची आठवण आली. नोयडामधल्या त्या कंपनीने दिलेल्या घरात कालनिर्णय किंवा महालक्ष्मी वगैरे असायचं काही कारण नव्हतं. त्यामुळे त्याने गूगलला विचारलं, ' Ganesh Chaturthi 2016 ' त्यानेही तत्परतेने सगळी माहिती पुरवली. ते 'mantra', 'shloka' वगैरे वाचताना उगाचच काहीतरी चुकतंय असंही त्याला वाटून गेलं पण ते तेवढ्यापुरतंच. अचानक त्याला आठवलं 'काही वर्षांपूर्वी पुण्यात असताना सगळं कसं हौसेने व्हायचं. छोट्या गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची, 'दास रामाचा वाट पाहे सदना' म्हणत आरत्या व्हायच्या, चतुर्थीला अथर्वशीर्षाची आवर्तनंदेखील व्हायची. अनुजासुद्धा सगळं अतिशय भक्तिभावाने करायची. स्वतःचा जॉब सांभाळत तिने सगळं केलं. अनुजाची आठवण त्याला आणखी जुन्या काळात घेऊन गेली. लग्नाचा डाव मांडून चार वर्षं झाली होती. दोघंही आता तिशी पार करून बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेले होते. जबाबदाऱ्या वाढल्या होत्या, त्या पेलण्याची ताकदही आलेली होती. दोघंही आता आई-बाबा व्हायला मानसिक दृष्ट्या तयार झाले होते. वाढत्या स्पर्धेला त्यांनी यशस्वीरितीने तोंड दिलं खरं पण वाढत्या वयाकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष झालं होतं. अनुजाचं शरीर आता आई होण्यासाठी साथ देणार नव्हतं. मग बरेच उपाय झाले, सगळ्या पॅथीज आजमावून झाल्या, शेवटी IVF करायचं ठरलं आणि सुदैवाने तो प्रयत्न यशस्वी झाला. आता नऊ महिने वाट बघायची मग घरात एक छोटा जीव येणार होता. बघता बघता सहा महिने संपले आणि अनुजाची रजा सुरु झाली. बऱ्याच गुंतागुंतींनंतर घरात बाळ येणार म्हणून अनुजाची विशेष काळजी घेणं सुरु होतं. अवधूत आणि अनुजा दोघांचे आई बाबा घरी आले होते. बाळ आल्यावर काय काय करायचं याच्या प्लॅनिंगमध्ये काळ पुढे जात होता. आठवा संपला आणि अनुजाला खूप त्रास होऊ लागला. सी-सेक्शन करायचं ठरलं. पण दैव कसं विचित्र बघा. बाळाच्या जन्माची बातमी सांगणाऱ्या नर्सना अनुजा आणि बाळ दोन्ही गेल्याची बातमी सांगावी लागली. अवधूत पूर्णपणे हादरून गेला. त्याच्या आणि अनुजाच्या आई बाबांनी त्याला सावरलं. काही दिवस गेल्यानंतर मात्र त्याने स्वतःला पूर्णपणे कामात गाडून घेतलं. पुणे सुटलं, घर तर शिकायला बाहेर पडला तेव्हाच सुटलं होतं. तीन चार वेळा परदेशवारी झाली, हळूहळू स्वतःच्या घरी राहणं कमी होऊ लागलं. आई बाबांना फोनही होईनासे झाले. एवढ्या कष्टांचा परिणाम म्हणून प्रत्येक ‘perforance cycle’ च्या वेळेस अवधुतचं प्रोमोशन ठरलेलं होतं. मागच्या वर्षी अनुजा जाऊन दहा वर्षं होऊन गेली होती. ती गेल्यानंतर त्याने दुसऱ्या कोणाचा विचारही केला नव्हता, त्याला तसा वेळही मिळाला नव्हता म्हणा. कायम फिरतीवर राहणारा अवधूत किमान सणावारी तरी घरी असावा ही त्याच्या आई बाबांची इच्छा आता एक स्वप्न बनून राहिलं होतं. एवढ्यात इ-मेल नोटिफिकेशनची टिंग वाजली आणि अवधूत वर्तमानात आला. समोर स्क्रीनवर 'Ganesh Chaturthi - 5 September 2016' दिसत होतं. त्याने काहीतरी विचार आणि निर्णय घेतला..

2 सप्टेंबरला सकाळी गुहागरच्या व्याडेश्वराच्या मंदिरात एक डिरेक्टर चपलांबरोबर आपल्या सगळ्या व्यावसायिक जबाबदाऱ्या बाहेर सोडून प्रवेश करत होता. गाभाऱ्यात जाऊन त्याने मनोभावे दर्शन घेतलं आणि तो वरच्या पाटाकडे निघाला. तो घाणेकर वाड्याजवळ आला तेव्हा ओसरीवर विनायकराव झोका घेत सामना वाचत होते. 'याही वर्षी अवधूत नाही. शेजारी मेहेंदळेंकडे गोकुळ नांदतंय कालपासून आणि आमचा कान्हा आम्हाला भेटून युगं लोटली असा विचार करत उमाबाई भिजवून वाळवलेले तांदूळ डब्यात भरत होत्या. नैवेद्यासाठी मोदकांच्या पिठीची तयारी सुरु होती. एवढ्यात अंगणामधलं दार वाजलं आणि चष्म्यावरून बघत विनायकरावांनी विचारलं 'कोण आलंय??' साध्या टी-शर्ट आणि पॅन्ट मधला अवधूत समोर उभा आहे हे समजायला त्यांना जरा वेळच लागला. जेव्हा ते समजलं तेव्हा मात्र घाणेकरांचं अंगण प्रेम, आनंद, खूप वर्षांच्या विरहानंतरच्या भेटीच्या सुखाने भरून गेलं. भेटीचा पहिला बहर ओसरला. आणि गप्पांना सुरुवात झाली. दिवस कसा संपला कोणालाही कळलं नाही. खूप वर्षांनी अवधूतला त्या खाली घातलेल्या गादीवर आणि अंगावर घेतलेल्या गोधडीमध्ये शांत झोप लागली.

यावर्षी बाप्पा येताना खूप काही घेऊन आले होते. डिरेक्टर मि. घाणेकर मधला अव्या पुन्हा एकदा जिवंत झाला होता. विनायकराव आणि उमाबाईचा अवि खूप वर्षांनी घरी आला होता. झोपलेल्या अविच्या डोक्यावरून हात फिरवताना उमाबाईंच्या आणि त्या माऊलीच्या कृतार्थ चेहऱ्याकडे बघताना विनायकरावांच्या डोळ्यांना मात्र आनंदाच्या धारा लागल्या होत्या....

Wednesday 31 August 2016

रेखा मावशी... !!!

साडेचार पाच फुट उंची.. डोळ्यांवर जाड काड्या असणारा चोकलेटी रंगाचा चष्मा.. फिक्कट रंगांच्या साड्या, सकाळच्या गडबडीत हाताला मिळेल तो ब्लाउज घातलेला.. तोंडात मिश्री, अगदी कायम.. आणि अत्यंत चौकस नजर.. गेली अनेक वर्ष ही बाई अशीच आहे...
माझी आणि यांची भेट कधी झाली हे मला आठवणं शक्यच नाही.. माझ्या जन्माच्या आधीपासून या आमच्या घरात येत आहेत.. तसं पाहायला गेलं तर घरात केरवारे आणि भांड्याची कामं करायला येणाऱ्या मावशी अशी त्यांची ओळख.. पण आम्हा बहिणींना न्हाऊ-माखू घालण्यापासून सगळं यांनी केलं.. घरात आज्जी-आजोबा नव्हतेच कधी.. त्यामुळं बाळंतपणानंतर आईची काळजी घेणाऱ्यासुद्धा याच होत्या.. कामं करून झाली कि आम्हाला त्यांच्या गावाकडच्या गोष्टी सांगणाऱ्यासुद्धा याच होत्या.. आणि "काय सुसरींसारखं पसरलाय ग पोरींनो, उठा, मला केर काढायचाय असं म्हणून दरडावणाऱ्यासुद्धा याच होत्या..
मला आठवतं आमच्या शाळेची वेळ झाली असेल आणि तेवढ्यात आईकडे पेशंट आला तर त्यांनी आम्हाला मऊ-मऊ पोळ्यादेखील करून वाढल्या आहेत.. लहान असताना आमचे डबे भरून दिले आहेत.. आणि हे सगळं एका नव्या पैशाची अपेक्षा न करता..
मावशींनी तशी बऱ्याच घरांत कामं केली.. काही ठिकाणी त्यांचं घरातल्या लोकांशी जमलं नाही तर काही घरांचं त्यांच्याशी जमलं नाही.. याला एकच कारण होतं.. त्यांचा फटकळ स्वभाव आणि भाषा.. बोलताना चार-पाच शिव्या आल्या नाहीत तर त्यांना बोलल्याचं समाधान मिळायचं नाही.. त्यांच्या नादाने आम्ही "आयला, मायला" च्या वाटेवर जाऊ नये म्हणून आईने अनेकदा त्यांना समजावलं होतं.. सुदैवाने त्यांनी ते ऐकलं..
आईचं आणि त्यांचं मात्र फार सख्य.. त्यांच्या घरात खुट्ट जरी झालं कि "तनुची आई, ते असं हून ऱ्हायल शनी" असं म्हणत स्वारी हजर.. मग एकातून एक विषय निघत जायचा आणि त्या काम करत असलेल्या सगळ्या घरांबद्दल आम्हाला वृतांत सादर व्हायचा.. असं सगळं असलं तरी बाई कामाला एकदम चोख आणि प्रामाणिक.. त्यासाठी आम्हीही त्यांच्या गप्पांना दाद द्यायचो.. त्यांच्यामुळं आम्हाला या लोकांच्या विश्वाबद्दल कळत गेलं.. रोज नवऱ्याचा मार खाणाऱ्या या बाया.. फक्त 'कुकवाचा धनी' म्हणून त्याच्यासोबत नांदतात.. त्याचे दारूचे शौक पुरवतात.. आणि या सगळ्यांतून आपल्या पोरांना नीट वाढवतात.. सुदैवाने मावशींचा नवरा बराच बरा होता.. मोठ्या आजारातून उठल्यानंतर भरपूर शहाणा झालेला होता.. त्या दोघांचं आम्हा चौघांवर खूप प्रेम होतं.. फारशी मिळकत नसताना त्यांनी प्रत्येक अधिक महिन्यांत आई-बाबांना छोटंसं का होईना काहीतरी वाण दिलं.. आमच्या मोठ्या परीक्षांच्या निकालानंतर बक्षीस दिलं.. भरपूर मायेने पाठीवरून हात फिरवत आशीर्वाद दिले.. अगदी नेहमी..
पाच वर्षांपूर्वी आम्ही घर बदललं.. नव्या ठिकाणी त्यांना येणं शक्य नव्हतं.. आईचा दवाखाना मात्र त्याच घरी सुरु राहणार होता.. याचा त्यांना काय तो आनंद.. "तनुची आई, तुमी जा तिकडं, म्या मात्र हिथ रोज येन्हार.. न्हाई म्हणलात तरी येन्हार" असं म्हणून त्या आजही रोज तिथे येतात.. झाडू फिरवून जातात...
नवरा गेल्यानंतर मात्र मावशींचा स्वभाव कडक झाला.. कारणही तसंच होतं म्हणा.. यांचे आणि नवऱ्याचे जे काही थोडेफार पैसे होते ते सगळे नातेवाईकांनी परस्पर लाटले.. तरीही न बिथरता बाईंनी शून्यातून सुरुवात केली.. बँकेत FDs काढून पैसे साठवले.. आजच्या घडीला कामं न करता पुढचं आयुष्य जगता येईल एवढे पैसे त्यांच्या गाठीला आहेत.. मुलीचा सुखी संसार आहे... अत्यंत गोड अशी नात आहे.. तिचं आज्जीवर खूप प्रेम आहे.. आता कायमसाठी मुलीकडे जाऊन राहायचा त्यांचं ठरत आहे.. परवा अगदी डोळ्यांत पाणी आणून आईला म्हणत होत्या,"तनुची आई, पोरींच्या लग्नात मला विसरू नगा.. जिथ असन तिथन बिगी यीन बगा.. पोरींना बी सांगा.. मन्हाव, मावशी जीत्ती हाय त्यांची तवर कसलीबी फिकीर करू नगा"

हे लिहिलेलं त्यांना वाचता येईलच असं नाही.. पण आमच्या भावना मात्र नक्की पोहोचतील.. मावशी, जशा आहात तशाच राहा.. आणि एक लक्षात असुद्या.. "तुमच्या या पुरी तुम्हास्नी कंदी बी इसारणार न्हाईत.."

आताशा असे हे मला काय होते...!!

'बघितलंत कशी वागली ही सकाळी. आजकाल तिला काही सांगायची चोरीच झाली आहे. हल्ली माझं डोकं दुखतं, म्हणजे जरा जास्तच दुखतं. तिला सांगितलं तर म्हणाली, 'आई, तुझ्या मनाचे खेळ आहेत हे. सगळे रिपोर्ट्स ठीक आहेत तुझे. काही झालं नाहीये तुला..' म्हणजे मी काय खोटं बोलते का? तुम्ही गेलात आणि नंतर स्वतःकडे लक्ष न देता मी पोरीला वाढवलं. काय कमी खस्ता खाल्ल्या का मी.. आणि आज एवढी मॅनेजर झाली तरी आईशी चार शब्द प्रेमाने बोलावेत हे समजत नाही तुमच्या मुलीला..' शुभांगी हार घातलेल्या फोटोसमोर पदराला डोळे पुसत बोलत होती.. 'परवा मी बाथरूममध्ये होते. कपडे विसरले म्हणून खूप हाका मारल्या तिला. आलीच नाही. कसा कोण जाणे पाय घसरला माझा आणि पडले मी. तो आवाज ऐकू आला तिला. मग आली. आल्या आल्या 'लागलंय का तुला वगैरे नाहीच लगेच अशी कशी गं आई तू' म्हणून चिडली माझ्यावर. मी काय मुद्दाम करते का? पण नाही तुमच्या मुलीला आईचं प्रेम समजेल तर ना...' एवढ्यात 'शुभांगी काकू, मी आलेय ग.. पटकन काहीतरी खायला दे' अशी हाक आली आणि शुभांगी उठली.

'वाह मीना, आलीस तू... बरं झालं गं. आमच्या विभाला आईची काही काळजीच नाही. तू येतेस, चार शब्द प्रेमाने बोलतेस. बरं वाटतं' असं म्हणत शुभांगी किचनमध्ये पोहे करायच्या तयारीला लागली. नंतर दोघींच्या भरपूर गप्पा झाल्या. शुभांगीने मन भरेपर्यंत विभाच्या तक्रारी केल्या. शेवटी रात्रीचे साडेआठ होऊन गेले, विभाच्या येण्याची चाहूल लागली तशी मीना उठली. विभा यायला आणि मीना जायला एकच गाठ पडली.. विभाकडे 'एवढी प्रेमळ आई असून किंमत नाही तुला असा कटाक्ष टाकून मीना निघून गेली. काय झालं असावं याचा विभाला अंदाज आला. ती काही न बोलता रूममध्ये निघून गेली आणि किचनमधून भांडी आपटण्याचे आवाज यायला लागले...
त्या आवाजांकडे दुर्लक्ष करत विभा तशीच पडून राहिली. खरंतर आज तिला बोनस मिळाला होता. बऱ्याच दिवसांनी ती खुश होती. पण घरी आल्यावर जे झालं त्यामुळे तिचा मूडच गेला. बऱ्याच वेळाने आई झोपल्याची खात्री पटल्यावर ती बाहेर आली. दहा वाजून गेलेले. आईने आमटी भात काढून ठेवलेला. तो ओव्हन मध्येच गरम करून ती बाबांच्या फोटोसमोर जाऊन बसली. बाबांकडे बघितलं आणि तिचे डोळे भरून आले. 'असं का हो वागते तुमची बायको. तिच्यासाठी कितीही करा, तिला आनंद नाहीच. मध्ये एकदा मला सहज म्हणाली होती, 'तुझे बाबा अकाली गेले, माझी हॉटेल वगैरेची ऐश कधी झालीच नाही.' म्हणून हौसेने तिला तिच्या वाढदिवशी मस्त रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेले. तर सगळ्यांसमोर 'मला कशाला आणलंस इथे, त्यापेक्षा घरी मस्त वरणभात खाल्ला असता. इथे यांच्या डोक्यावर एवढे पैसे ओतायची काय गरज आहे तुला. माझ्याकडे नव्हते पण तुझ्याकडे रग्गड पैसे आहेत माहित आहे मला. पण म्हणून असं दाखवून द्यायची काय गरज होती' हे आणि ते.. नको नको ते... कसंबसं खाल्लं आणि निघालो तिथून. आजकाल तिला वाटतं मला तिची काळजीच नाही. मग मुद्दाम पडायचं, सारखं डोकं दुखतंय म्हणायचं. डॉक्टरकाका सुद्धा म्हणाले की हे सगळं मानसिक आहे. बाबा, मला नाही जमत हो हे आता. तिकडे कोर्टात तारखांवर तारखा पडत आहेत. पाच वर्षांचा संसार मोडतोय माझा. ती पाच वर्षं कशी गेली माझं मला माहित. सुरुवातीला बरं होतं. नंतर मात्र रोज शिव्या आणि मारहाण. मी तरी किती सहन करू. आईने जमवलेली सोयरीक ती. तिला वाईट वाटत राहील, लोकही तिलाच दोष देतील म्हणून सहन करत राहिले मी. जेव्हा असह्य झालं तेव्हा आले निघून. आता इकडे येऊन हे असं. माझ्यात ताकद उरली नाहीये आता. अशातच ती मीना येते, आईला काय काय सांगते. आईचाही पोटच्या मुलीपेक्षा तिच्यावर जास्त विश्वास. कायम माझी आणि मीनाची तुलना. त्रास होतो हो. बरोबरीच्या सगळ्या आपापल्या संसारात आहेत, त्यांना माझी दुखरी कहाणी सांगायला आणि त्यांची खरी/खोटी सहानुभूती मिळवायला नको वाटतं. अशात आई नाहीतर कोणाकडे मन मोकळं करू. आता तीही जागा हक्काची राहिली नाही. तुम्ही एवढ्या लवकर का गेलात बाबा, निदान आज, अशा हळव्या वेळेस तरी तुम्ही हवे होतात.." विभा हमसून हमसून रडत होती..
आणि दूरवर कुठेतरी हळुवार आवाजात गाणं वाजत होतं..
"कशी ही अवस्था कुणाला कळावे ?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे ?"..............

आईचं रक्षाबंधन....!!

"तसे मला सगळे सण आवडतात. एक रक्षाबंधन सोडला तर.." समोर दिसलेल्या राख्यांच्या माळा बघून ती स्वतःशीच पुटपुटली. 'आता सगळ्या मैत्रिणी राख्या घेतील, कुठल्या कुठल्या भावांना पाठवतील. भावांकडून मिळालेल्या भेटी आनंदाने मिरवतील. आणि मी. राखी बांधायला हक्काचं मनगटच नाहीये माझ्याकडे... असो..' विचारांना आवर घालत ती घरात आली. बाईसाहेबांचा मूड जागेवर नाही हे आईच्या लक्षात आलं. आईच ती! तिच्यापासून काही लपून राहू शकतं का! समोरच्या दुकानात राख्या पाहिल्यावर आईला काय झालं असेल याचा अंदाज आलाच. पण उगाच विषय काढला तर खपली निघायची म्हणून आई शांत बसली.

दिवसभराच्या सगळ्या गोष्टी आईला सांगून झाल्यावर तीच म्हणाली, 'आई, किती गं लकी आहेस तू. तुला भाऊ आहे. म्हणजे रक्षण करायला भाऊ हवा असं मला वाटत नाही. तरीही हक्काने बोलायला, मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायला, मित्रांच्या तक्रारी करायला आणि त्याच्याकडे बोट दाखवून 'तो आहे ना तो 'माझा' दादा' असं अभिमानाने म्हणायला कोणीतरी हवं होतं गं! दादा असता तर मस्त बाईक वरून फिरले असते, त्याच्या खास मैत्रिणींना भेटले असते. भरपूर भटकले असते. तो सोबत असताना कुठल्याही कोंडाळ्यातून जाताना कोणाची काही बोलायची हिम्मत झाली नसती. एक भाऊ हवाच होता मला.

'तो मुलगा चांगला नाहीये, त्याच्या नादाला लागू नकोस असं सांगणारा.. 'अगं, तू सासरी गेलीस कि परत तुला या घरात घेतच नाही बघ' म्हणून चिडवणारा पण मी जाणार या कल्पनेने हळवा होणारा.. मी रडले,पडले कि चेष्टा करायला पण भक्कमपणे आधार देणारा.. एक दादा हवाच होता मला आई!

बिचारी आई! हळव्या झालेल्या आपल्या पोरीला बघून तिलाच गलबलून आलं. तिला शांत करून झाल्यावर आईने एक नंबर फिरवला. पण फोनवर बोलायला जमेल कि नाही असं वाटून कट केला आणि व्हाट्सअपवर मेसेज केला.. 'परवा फारच तोडून बोलले मी तुला. अगदी आयुष्यात परत माझ्याशी बोलू नको वगैरे म्हणलं. आज सॉरी म्हणायला मेसेज केलाय. वहिनीचा जरा राग आलेला, तो तुझ्यावर निघाला. पण तुझं असणं किती महत्वाचं असतं हे आज जाणवलं. आजवर फारवेळा गृहीत धरलं तुला. तू नसतास तर मला काय काय मिळालं नसतं हे आज लक्षात आलं. बघ जमलं तर माफ कर.'

दुसऱ्याच मिनिटाला आईचा मोबाईल वाजला. 'मन्यादादा Calling ' तिने कॉल घेतल्यावर आवाज आला, 'काय गं भवाने, एवढी मोठी कधी झालीस तू.. दादाशी एवढं फॉर्मल होऊन बोलायला लागलीस..' तेवढ्या एका वाक्याने आई मधली छोटी बहीण पुन्हा एकदा आपल्या दादाच्या प्रेमात पडली!!  

एक नजर....!!

नजर...

एक नजर.. नुकत्याच जन्मलेल्या बाळाकडे मन भरून बघणारी.. सोज्वळ... सात्विक.. मायेने भरलेली..

एक नजर.. डोळ्यात बघून 'हे करू नकोस' सांगणारी.. सजग पालकत्व जगणारी...

एक नजर.. तिच्या वाढदिवसादिवशी 'ही इतकी मोट्ठी कधी झाली' असा विचार करत तिला न्याहाळणारी.. अतीव कौतुकाने भरलेली..

एक नजर.. 'चुकलास तू.. असं करायला नको होतंस' सांगणारी.. निखळ मैत्रीची.. आयुष्यभर साथ देणारी..

एक नजर.. 'मी पूर्णपणे प्रेमात आहे गं तुझ्या.. कधी हो म्हणशील मला??' विचारणारी.. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने अनुभवलेली..

एक नजर.. 'तो माझा आहे, चुकूनही त्याच्याकडे पाहायचं नाही' सुचवणारी.. काहीशी चिडलेली.. काहीशी मालकी सांगणारी..

एक नजर.. 'नको जाऊस ना मला सोडून.. तू नसताना माझं कसं होईल.." म्हणणारी.. व्याकुळ.. दुःखाने ओलेती झालेली..

एक नजर.. 'क्या चीज है ये.. एक बार मिल जाये..' म्हणत वरपासून खालपर्यंत न्याहाळणारी.. अत्यंत किळसवाणी.. वासनेने भरलेली..

एक नजर.. 'बाळा, घाबरू नकोस.. मी आहे तुझ्याबरोबर.. सगळं ठीक होईल..' सांगणारी.. भक्कम आधार देणारी..

एक नजर.. 'मला जगायचंय.. इतक्यात नाही जायचं' म्हणणारी.. खूप आर्त.. बघणाऱ्याच्या काळजाला घरं पडणारी..

एक नजर.. बस्स एक नजर!!!  

Monday 25 July 2016

एक अनोखी प्रेमकहाणी!

तिचं B.A. झालं आणि आई-बापाविना पोर किती दिवस आपल्या घरी ठेवायची म्हणून काकाने तिच्या लग्नाचं बघायला सुरुवात केली. आईच्या वळणावर गेलेली शामल दिसायला अगदी सुरेख होती. लांबसडक रेशमी केस, गोबरे-गोबरे गुलाबी गाल, डाळींबी रंगाचे नाजुक ओठ आणि पाहताक्षणी भुरळ पडावी असे विलक्षण बोलके डोळे. अशा या सर्वांगसुंदर शामलला कोणीही पटकन हो म्हणालं असतं. पण का कोण जाणे तिचं लग्न काही ठरेना. सगळ्या गोष्टी मनासारख्या आहेत म्हणून दोन्हीकडची मंडळी आनंदाने बोलणी करायला बसली कि शामल अचानक मलूल होऊन जायची. तिला खूप अस्वस्थ वाटायचं आणि ती रडायला लागायची. अर्थातच अशामुळे बोलणी तिथेच थांबायची. जो मुलगा बघायला यायचा तो म्हणायचा, ”मुलगी सुंदर आहे हो पण......” या “पण.....”मध्ये “आम्हांला वाटतंय तिला इतक्यात लग्न करायचं नाहीये” इथपासून “तुम्हाला माहित नसेल पण तिची बाहेर कुठेतरी भानगड सुरु असणार” इथेपर्यंत सगळे भाव असायचे. पाच सहा वेळा असं झालं. शेवटी काकाने कंटाळून तिच्या लग्नाचा नाद सोडला. बरं तिला कोणी याचं कारण विचारलं तर शामलकडे काही उत्तर नसायचं.
हा विषय सोडला तर बाकी सगळं सुरळीत सुरु होतं. दुःख नाही आणि विशेष आनंदही नाही अशा स्थितप्रज्ञपणे आयुष्य सुरु होतं. पण फार काळ स्थिर राहणं आयुष्याच्या प्रकृतीला मानवत नाही. काहीतरी बदल हवाच असतो त्याला आणि म्हणूनच कि काय शामलच्या आयुष्यात सौरव आला. तिच्याच ऑफिसमध्ये नवीन ऑफिसर म्हणून. फार काही मोठ्ठा नव्हता तो वयाने. पण प्रगल्भ होता. बारा गावचं पाणी पिऊन त्याचे कान आणि डोळे तीक्ष्ण झालेले होते. अफाट निरीक्षण शक्ती असलेला हा सौरव शामलचा बॉस म्हणून रुजू झाला होता. सुरुवातीला कामापुरतं बोलणारा तो आता मुद्दाम शामलकडे काहीतरी काम काढू लागला. त्याला ती आवडली होती म्हणून नव्हे तर तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यांत काहीतरी दडलंय आणि आपण त्याचा छडा लावायचाच या भावनेने. अशावेळेस आधीच अबोल असलेली शामल आणखीनच शांत होऊन जायची. सौरव काही ना काही कारण काढून तिला बोलतं करायचा प्रयत्न करायचा परंतु त्याला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. असं हे बरेच दिवस सुरु होतं. शामल स्वतः काही बोलत नाही म्हणल्यावर मग त्याने बाकीच्यांकडून तिच्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. एवढ्याशा त्या गावात एका सुंदर मुलीची माहिती मिळणं त्याला काही अवघड गेलं नाही.
“शामल लहान असतानाची गोष्ट आहे बघ.” शामलच्या शेजारच्या आज्जीबाई सांगत होत्या. “तिचा बाप, रघुनाथराव, दूर कुठल्यातरी गावात नोकरीसाठी होता आणि त्या दिवशी तिचा वाढदिवस म्हणून खास तिला भेटायला येणार होता. ही छोटी पोर फार आनंदात होती. संध्याकाळ उलटून रात्र व्हायला लागली तरी रघु आला नाही तशी मात्र सगळ्यांना काळजी वाटू लागली. कोणाचाच डोळा लागेना. अतिशय धाकधुकीतच सकाळ झाली आणि पलीकडच्या गावातून सांगावा आला. रघुनाथरावांना घेऊन येणारी बस नदीत उलटली होती. एकाही माणसाच्या देहाचा पत्ता नव्हता. सगळा गाव दुःखात बुडाला. शामल तर शांतच झाली. कोवळी पोर होती रे शामल तेव्हा. बापाचं जाणं त्या बिचाऱ्या जीवाला सहन नाही झालं. तिने तेव्हाच ठरवून टाकलं, “आता इथून पुढे वाढदिवस साजरा करणे बंद”. नंतर काही दिवसातच ऐन दिवाळीत तिची आई वडलांना साथ द्यायला निघून गेली. अचानक पोरकी झाली ती. काकानं लाडानं वाढवली तिला. हवं नको ते सगळं केलं. पण पोरीच्या डोळ्यांतली चमक काही परत आली नाही. दुःखावर खपली बसली होती एवढ्यातच तिच्या धाकट्या भावाला काळ घेऊन गेला. तिच्या दहावीच्या निकालादिवाशीच पेढे आणायला म्हणून गेलेला तो, ट्रकखाली सापडला आणि आईबाबांना निकाल सांगायला निघून गेला. तेव्हापासून शामलला खळखळून हसताना कोणी पाहिलंच नाही. काकाने हरतऱ्हेने तिची समजूत काढून पहिली पण सगळं व्यर्थ. तिला शेवटचं आनंदात असताना मी कधी पाहिलं हे काही मला आठवत नाही बघ.”
मानसशास्त्राचा थोडाफार अभ्यास असणाऱ्या सौरवच्या सगळं लक्षात आलं. शामल cherophobic होती. म्हणजेच ती आनंदाला घाबरत होती. आपल्यापाशी येणारा आनंद सोबत भलंमोठ्ठ दुःख घेऊन येतो हे तिच्या मनात पक्कं बसलं होतं. ती कायमची मानसिक रुग्ण होण्याआधी काहीतरी हालचाल करणं गरजेचं होतं. तो एकटा हे काम करू शकत नव्हता म्हणून त्याने शामलच्या काकांना विश्वासात घेतलं. सगळी परिस्थिती समजावून सांगितली. काकांना सुरुवातीला काही पटेचना. पण मग नंतर त्यांना आठवत गेलं जेव्हा जेव्हा घरात आनंदी वातावरण असायचं तेव्हा तेव्हा शामल आजारी पडायची. तिचा श्वास अडकायचा, तिला अस्वस्थ वाटायचं. पण त्यामागे असं मानसशास्त्रीय काही कारण असेल असं काही त्यांना वाटलं नव्हतं. आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत्या. काका-काकूंना फक्त एक काम करायचं होतं. शामलला या सगळ्या प्रकारची कल्पना द्यायची. बाकी सगळं काम सौरव करणार होता. पुतणीच्या काळजीने काकांनी ते काम करायचं धाडस केलं. शामलला धक्का बसला. काका-काकूंनी मात्र तिला सावरलं. सौरवच्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट होती. कारण या सगळ्या प्रकारांत माणसाला स्वतःच्या स्थितीची कल्पना असणं आणि त्याने ती स्वीकारणं खूप महत्वाचं असतं. ते झालं कि मग पुढच्या गोष्टी सोप्या होतात.
काही दिवस असेच गेले. आता सौरव आणि शामल कामाव्यतिरिक्त बोलायला लागले होते. दिसायला सुंदर असणारी शामल मनानेसुद्धा सुंदर आहे हे सौरवला समजलं आणि हा माणूस आपल्याला समजून घेत आहे, आपल्याशी बॉसच्या नव्हे तर मित्राच्या नात्याने बोलत आहे हे तिच्याही लक्षात आलं. आता ते निव्वळ सहकारी राहिले नव्हते. हळूहळू ऑफिस झालं कि एखाद्या कॅफेत भेटी होऊ लागल्या. सौरव बोलघेवडा होताच. शामलला आवडेल अशा गोष्टी बोलून तिला बोलतं करणं त्याला जमू लागलं होतं. शामलही मोकळी होऊ लागली. आपणही हसू शकतो, आनंदी होऊ शकतो याच्यावर तिचा विश्वास बसायला लागला. अनोळखी-सहकारी-मित्र-खास मित्र या प्रेमाच्या राजरस्त्यावरून त्यांची गाडी पुढे जात होती. आताशा शामल मनापासून हसायला लागली होती, तिच्या डोळ्यांतली चमक परत आली होती. तिच्याभोवतीचं ते गूढ वलय नाहीसं होत होतं. आणि या मागे सौरवची अफाट मेहनत होती. यथावकाश सौरवने तिला मागणी घातली. आपल्याला नैराश्यातून बाहेर काढणारा माणूसच आपला जोडीदार होणार या कल्पनेने शामल मोहरली. दोघांच्या घरूनही होकार आले आणि कु. शामलची सौ शामल झाली.
आज त्यांच्या लग्नाला तीन वर्षं पूर्ण झाली. लग्नानंतर आजतागायत शामल आनंदाला घाबरलेली नाही. काका-काकूंचे आशीर्वाद आणि सौरवचं प्रेम यांच्या आधारावर एक नवीन शामल खंबीरपणे आयुष्याला तोंड द्यायला तयार आहे. तिच्या या नवीन आयुष्यात आता मात्र कुठल्याही भीतीला जागा नाही. आणि पुन्हा एकदा निर्व्याज प्रेमाने cherophobiaला हरवलं आहे....
-तन्मया (१५/७/१६)

Tuesday 3 May 2016

गोष्ट एका विकासची!



प्रत्येक गावात असे काही अवलिया असतात ज्यांना विशेष कर्तृत्व नसूनही अख्खा गाव ओळखत असतो.. अशाच काही अवलीयांपैकी एक म्हणजे विकास ऊर्फ विक्या.. नावाच्या अर्थाच्या अगदी उलट जगत आलेला.. वडील, काका, आत्या आणि बाकीची भावंडं एकाच शाळेत शिकून मोठ्ठी होण्याच्या काळातला एक सर्वसामान्य मुलगा.. शाळेतले शिक्षक सगळ्या घराण्याला ओळखतात म्हणूनच, नापास होता एक एक इयत्ता वर चढवलेला हा विक्या.. जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा, "काय मग शेठ, कसं चाललंय आयुष्य?" असं विचारून बोलायला सुरुवात करणारा.. वास्तविक पाहता तो राहतो ती पेठ आणि पाय एका दिवसात नेउन आणतील इतक्या लांबचा प्रदेश हेच याचं जग.. त्यात नाविन्य असं कितीसं असणार.. परंतु तोरा मात्र असा कि मागच्या जन्मी हा जणू सिकंदरच होता..
अशा या विक्याचे वडील लहानपणीच गेले त्यामुळं कोणाचा धाक म्हणून नाही.. पोटच्या दोन आगाऊ पोरांना सांभाळताना आई खंगून गेलेली, त्यांची उस्तवार करून दमेकरी झालेली.. एकत्र कुटुंब पद्धतीचा आशीर्वाद म्हणून विक्याच्या काकाच्याच घरी राहणारी ती तिघं, एक दिवस विकी शेठने घरातच चोरी केल्यामुळे काकापासून वेगळी झाली.. तसं पाहिलं तर विक्याने आयुष्यात खूप उद्योग केले, दारू झाली, सिगारेटी झाल्या, विडिओ गेम्सचा नाद झाला, त्यापायी काकासाठी कर्जही करून झालं.. मात्र कशाचा पश्चात्ताप म्हणून नाही.. पोटापाण्यासाठीही त्याने विशेष काही केलेलं कोणाच्या स्मरणात नाही.. संध्याकाळी कट्ट्यावर बसून पोरी टापताना मात्र अनेकांनी पाहिलंय त्याला.. कधी तरी धोब्याच्या दुकानाच्या आसपास दिसायचा तो.. कारण एकच, कोणाच्या खिशातून आलेले पैसे लाटता आले तर बरं.. धोब्याला जेव्हा हे कळलं तेव्हा विक्याची झाली हकालपट्टी.. मग कुठे सलोन मध्ये काम कर, दुकानात काम कर असं सुरु झालं.. तरीही धरसोड मात्र कायमचीच..
पोराचं लग्न झालं म्हणजेतरी तो सुधारेल अशा भाबड्या आशेपायी एका गरिबाघरची पोर विक्याच्या गळ्यात मारली गेली.. बिच्चारी ती.. रोजचे अत्याचार सहन करून एक दिवस कंटाळून निघून गेली कायमचीच आणि मग विक्याची गाडी आणखी खड्ड्यात गेली.. सुनेचं वाटोळं केल्याचं शल्य मनात धरून त्याच्या आईने राम म्हणला.. असला अतरंगी माणूस आपला भाऊ आहे असं सांगायची लाज वाटून भावानेही संबंध तोडून टाकले.. विक्या अगदी एकटा पडला..
मध्यंतरी कोणाच्यातरी आशीर्वादाने तो दुचाकी चालवायला शिकला..एके दिवशी मित्राची गाडी घेऊन, दारूच्या नशेत बेभान होऊन high way वर गेला.. एका क्षणी तोल गेला आणि त्याला जोरदार अपघात झाला.. जुनं सगळं विसरून काकाने प्रचंड मदत केली.. त्याच्या ऑपरेशनचा सगळा खर्च केला.. बरा होईपर्यंत जातीने त्याची काळजी घेतली.. विक्या शरीराने तर बरा झाला पण त्याच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला.. आजारपणात काकाच्या घरी असताना स्वतःच्याच बहिणीला त्रास देताना काकूने पाहिलं आणि विक्याला काकाच्या घरचे दरवाजेही कायमसाठी बंद झाले..
नंतर मग काय सोबतीला रोज हातभट्टीची असायची, रस्तावरून शुद्ध नसलेल्या अवस्थेत विकी साहेब अर्वाच्य बरळत यायचे तेव्हा संपूर्ण पेठेला जाग यायची.. लहान मुलांच्या आया मुलं झोपत नसतील तर भीती दाखवायला म्हणायच्या, "चिंगे, झोप मुकाट्याने, विक्या येईल हा नाहीतर.." पण विक्याला मात्र या कशाचीच शुद्ध नसायची.. आईचे होते नव्हते तेवढे दागिने विकून खाईस्तोवर हे असंच सुरु राहिलं.. नंतर विक्याचा मुक्काम गावच्या मंडईमध्ये हालला.. काहीतरी कच्चं खात त्याचे दिवस जाऊ लागले.. दिवसाउजेडी रस्तावर फिरून चार आणे मिळवून दारूची सोय होत होती.. विक्या जिवंत होता.. काकाच्या कानावर हे सगळं येत होतं पण आता विक्यासाठी काहीही करायची इच्छा आणि ताकद उरली नव्हती..
मागच्या रविवारी नगरपालिकेच्या कार्यालयातला फोन वाजला.. "साहेब, मंडईमध्ये फार घाण सुटली आहे.. कोणीतरी मरून पडलंय.. आमच्या धंद्याचे बारा वाजत आहेत.. लवकर वासलात लावा बरं.." साहेबांनी शववाहिकेला फोन केला, प्रेताची व्यवस्था केली आणि डोळे पुसत आकाशाकडे हात जोडून म्हणाले,"दादा, पोरगा सुटला एकदाचा.. स्वतःच्या कर्माने मेला रे.."