Thursday 26 March 2015

तो एक राजहंस - मधुसूदन कालेलकर

आज आपलेल्या जे भेटणार आहेत त्यांना लौकिक अर्थाने फक्त कवी अस म्हणता येणार नाही.. कारण त्यांनी लिहिलेल्या कवितेच कायम गीत झाल आहे.. आपण त्यांना ओळखतो ते एक कवी म्हणून नव्हे तर एक चित्रपटगीतकार म्हणून.. अगदी लहान असल्यापासून आपण त्यांच्या गीतांचा आस्वाद घेत आलेलो आहोत.. कधी त्यांनी आई बनून
"निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला बाई
आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या जाईजुई
मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप् एक उधळून गेले माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता गाऊ कशी मी अंगाई'"
अस म्हणत आपल्याला अंगाई गायली आहे.. तर कधी
" आई, मका
मी तुझा मामा दे मला मुका" अस म्हणत बाराखडी शिकवली आहे..
असे हे हरहुन्नरी कलाकार - मधुसूदन कालेलकर... नुकतीच त्यांची जयंती झाली.. २२ मार्च १९२४ रोजी जन्मलेल्या कालेलकरांच मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले. एकंदर तीसच्या वर त्यांची नाटकं प्रदर्शीत झाली. त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत.. कौटुंबिक, गंभीर, विनोदी आणि सामाजिक सुद्धा... अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, आसावरी, ही वाट दूर जाते, अबोल झालीस कां, कल्पवृक्ष कन्येसाठी, चांदणे शिपीत जा, या घर आपलंच आहे, नाथ हा माझा, डार्लिंग डार्लिंग, हे फुल चंदनाचे, अमृतवेल, शिकार, आणि माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित ही श्रींची इच्छा ही सर्व त्यांची लोकप्रिय अशी नाटकं. नाटककार, गीतकार ,कथाकार आणि पटकथाकार अशा अनेक रूपांत समर्थपणे वावरणाऱ्या कालेलकरांची आपल्या मनातली छबी ही मात्र एक प्रथितयश गीतकार म्हणून जास्त उल्लेखनीय आहे.. जवळपास प्रत्येक सणासाठी त्यांनी गीते लिहिली आहेत.. आणि ती इतकी लोकप्रिय आहेत कि तो सण आला आणि ते गण ऐकल नाही तर सण साजरा झाला अस वाटतच नाही.. मग ते गाणं
"आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन आली
नक्षत्रांचा साज लेऊनी  रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली
संगे होता हरी, जाहले बावरी मी अभिसारीका ही निराळी
आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन आली"
हे असो किंवा
"तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता
मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया
देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा"
हे असो!!!
चित्रपट गीत म्हणलं आणि त्यात प्रेमाची भावना नाही अस होतच नाही.. प्रेम खूप सहज सुंदर आहे त्यामध्ये कळीला फुलांत रुपांतर करण्याची शक्ती आहे.. असंच पाकळी पाकळी उमलत खुलून आलेलं प्रेम अतिशय निरलस असत.. एक आगळाच छंद लाऊन जात.. हेच सगळ सांगताना ते म्हणतात,
"कळी कळी उमलते पाकळी फुलून ये आनंद
आनंदाच्या लहरी वरती जीव नाचतो धुंद
एक अनोखी आली चाहूल, भूमिवरचे सुटले पाऊल
स्वैर भरारे प्राण अंबरे तोडुन सारे बंध
उरी जागते नव संवेदन, कंप सुखाचे अंगाअंगातुन
हृदयाचे राजीव उमलले टपटपतो मकरंद
उगीच लाजते उगीच रुसते, मी माझ्याशी उगीच हसते
कळे बाई काय खुळा हा मला लागला छंद"
असा छंद लागला असताना एकच ध्यास असतो.. माझी भावना त्याला कधी कळणार... जेव्हा कळेल तेव्हा आपली लाडकी व्यक्ती कशी प्रतिक्रिया देईल.. प्रेमाचा स्वीकार होईल कि नाही.. आणि मग तेव्हा कालेलकर मदतीला धावून येतात आणि ती गाऊ लागते..
"सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणार्या फुलातला ?
जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला"
आणि जेव्हा त्याला ही वेडी प्रीत समजते.. त्याच्याही मनात तरंग उमटू लागतात.. प्रेमाची अदलाबदल होते आणि मग तोही तिला कवेत घेऊन गाऊ लागतो..
"सूर तेच छेडीता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे
अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली वेदना सुखावली हासली तुझ्यासवे
एकटा तरी स्मृती तुझ्याच या सभोवती बोललो कसे किती, शब्द शब्द आठवे"
आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून ती गाऊ लागते..
"हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली"
अशी परिपक्व आणि आगळीवेगळी प्रीती बहरल्यानंतर त्याचा सोहळा होणं अतिशय साहजिक आहे.. एकमेकांची भूल पडणं आपल्याला अव्यवहारी वाटल तरी अतिशय सुखावह आहे.. त्यात शत जन्माची नाती जुळली असण्याचा विश्वास आहे.. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याच वचन आहे... हे सगळ जेव्हा कालेलकर शैलीमध्ये शब्दरूप घेऊन येत तेव्हा आणखीनच रोमांचक होऊन जात..
क्षणात कळली, क्षणात जुळली, भूल कशी पडली ?
"तुझीमाझी प्रीत जगावेगळी
शतजन्माची नाती अपुली बघताबघता अवचित जडली
किमया ही कसली प्रेमिक आपण युगायुगांचे
प्रेमा या ना बंध कुणाचे गाठ तिथे बसली
नाही ठावूक कुठे जायचे तुझ्याच मागून मला यायचे
वाट आता ठरली"
सगळ सुरळीत चालू राहणं नियतीला मान्य नसतं.. आणि म्हणूनच अशा नजर लागू नये अस वाटणाऱ्या प्रेमामध्ये विरह खोडा घालतो.. कळीला तीच फुलांत रुपांतर करणाऱ्या जादूगारापासून दूर घेऊन जातो... आणि मग राहत ते फक्त निर्माल्य...तिच्या आठवणी मध्ये मग तो गाऊ लागतो...
"रसिका गाऊ कोणते गीत ? तीही जाता रुसुनी मजवर, रुसले रे संगीत !
जुळल्या तारा पहिल्या भेटी  राग रंगले जुळता प्रीती
झरे मेघमल्हार लोचनी आठवता ती प्रीत ! तुटल्या तारा, रुसली वीणा
सूर संपले कुठल्या ताना आज बैसलो निर्माल्याला तुजसाठी फुलवीत !"
प्रेमाबद्दल इतक सारं लिहिणाऱ्या कालेलकरांनी आपल्या गीतांमधून जीवनविषयक तत्त्वज्ञानही सांगितल  आहे.. आपण ज्याकरिता संपूर्ण आयुष्य खर्च करत असतो तो अक्षय्य आनंदाचा ठेवा आपल्यामधेच असतो.. अस सांगताना ते म्हणतात...
"तुझे असून तुजपाशी तू जागा चुकलासी
कल्पतरू तो असता दारी वणवण फिरशी का बाजारी
स्वर्ग तुझा तो तव संसारी सुख त्याचे अविनाशी
कस्तुरीमृग तू, तुला कळले सुगंध शोधीत जीवन सरले
घे चाहूल सुख कोठे दडले ? ते तुझिया कर-पाशी"

अशाप्रकारे चित्रपट, नाटक, गीतलेखन या सर्वच आघाडय़ांवर आजही ज्यांच्या कलाकृती कलाप्रेमींच्या मनात अवीट ठसा ज्यांनी उमटवला ते नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. कालेलकरांचे हे कर्तृत्व पुढील अनेक पिढय़ांनी चिरकाल आठवावे आणि मनामनामध्ये जागवावे, अशीच त्यांची अभिनंदनीय कामगिरी आहे.. आपल्याला निरंतर अनाद देत राहणाऱ्या कालेलकरांना मनाचा मुजरा!!

प्रतिभावान साहित्यिक - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर

मराठी साहित्यामध्ये असे खूपच कमी कादंबरीकार आहेत ज्यांनी ललित लेखन केलं, प्रवास वर्णनं लिहिली, दुर्ग भ्रमंती केली आणि त्यावर विपुल प्रमाणात लेखनही केलं.. त्यांच्या छायाचित्रांमुळे अनेक गड-किल्ले लोकांपर्यंत पोहोचले... असे हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर अर्थात आप्पा दांडेकर... मराठी रसिकांचे लाडके गोनीदा!!
गोनीदांनी १९४७ मध्ये लेखन रसिकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली... आणि तो प्रवास चालू राहिला १९८२ पर्यंत.. म्हणजे ३५ वर्षांचा सृजनकाळ..!! `बिन्दूची कथाते `तांबडफुटीया त्यांच्या लेखनाच्या प्रदीर्घ प्रवासात मराठी कादंबरीचे क्षेत्र संपन्न आणि समृद्ध होण्यासाठी गोनीदांनी अविरत परिश्रम घेतले..
संस्कारक्षम कथा म्हणाल कि डोळ्यांसमोर येतात ते सानेगुरुजी.. परंतु आपल्या गोनीदांनी देखील त्यांच्या समर्थ लेखणीतून अनेक संस्कारकथा लिहिल्या.. त्याचं संकलन म्हणजे "आईची देणगी" लहान मुला-मुलींबरोबरच मोठ्यांनीही वाचाव्यात अशा या कथा. आईने मुलाला सांगाव्यात किंवा वाचून दाखवाव्यात अशा. आपल्या देशात राम, कृष्णाबरोबरच शिवरायांसारखे पराक्रमी राजे, तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्यासारखे संत, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे थोर सेनानी होऊन गेले. या थोर व्यक्तींच्या गोष्टी गोनीदांनी रसाळ, ओघवत्या भाषेत सांगितल्या आहेत. या एकूण ४२ कथांमध्ये साहस, पराक्रम, धैर्य, उदात्तता, चातुर्यम गुरुभक्ती, मातृ-पितृभक्ती, कर्तव्यपरायणता आदी गुणांचा समुच्चय दिसून येतो. सुबोध, सुलभ भाषा हे या कथांचं वैशिष्ट्य!! हा उपदेश नाही, तर संवाद आहे!! बोधप्रद प्रेरणा देणाऱ्या या कथा मोठ्यांनाही गुंतवून ठेवतात...
गोनीदांनी विपुल प्रमाणात लेखन केलं!! त्यांच्या प्रतिमेचा आविष्कार जरी साहित्याच्या सर्व प्रकारांत स्वतःचा ठसा उमटविणारा असला तरी ते प्राधान्याने कादंबरीकारच आहेत.. आम्ही शाळेत असताना त्यांची "शितू" वाचलेली.. बेदरकार वृत्तीचा, पण प्रेमळ अंत:करण असलेला विसू.. आणि त्याने बंदुकीतून मारलेली गोळी स्वतःच्या पंज्यातून जाऊनदेखील तक्रार करणारी शितू.. सात्विक वृत्तीची बालविधवा'!! या दोघांच्या विफल प्रीतीची ही करुणोदात्त शोककथा. दोघांचे प्रेममय आंतरजीवन, त्यांचं भावविश्व हाच या कादंबरीचा गाभा आहे. त्यांच्या आर्त, व्याकूळ मनोवस्थांच भावोत्कट चित्र म्हणजे 'ही कादंबरी.. गोनीदांच्या हळुवार लेखणीचा उत्कट प्रत्यय!! ओघवती भाषा.. असीम निरागसता आणि ग्रामीण जीवनाचा रसरसता अविष्कार म्हणजे शितू!! शेवट सुखद कि दुखःद असा विचार वाचावी अशी..  शेवटचा विचार करत बसलो तर तिथे पर्यंत नेण्यासाठी गोनीदांनी जी सुंदर वाट निवडली आहे त्याचं सौंदर्य आपण लुटू शकत नाही... जेव्हा ही कादंबरी देव कुटुंबीयांनी रसिकांसमोर कथाकथनाच्या रूपातून मांडला तेव्हा शितू आणखीनच अर्थगर्भ आणि श्रवणसुंदर अनुभव देणारी ठरली... अशीच अजरामर कथा म्हणजे "जैत रे जैत" नाग्या आणि चिंधी ची गोष्ट!! ठाकर लोकांच्या आयुष्याची गोष्ट.. एकूणच गोनिदांना ग्रामीण जीवनाची ओघ असावी अस वाटत म्हणूनच त्यांनी "रानभुली" लिहिली.. "पवनाकाठचा धोंडी" लिहिली..बदलत्या परिस्थितीच्या पुराबरोबर वाहत जावयाचे नाकारणाऱ्या एका झुंजार माणसाची ही कथा. आपल्या देशात असे अनेक धोंडी इतस्तत: विखुरले आहेत... त्याचं कौतुक करण्यासाठी लिहिलेली ही कथा..
हा माणूस जितका शब्दप्रेमी होता तितकाच दुर्गप्रेमी होता..म्हणूनच दरदर झरत्या पावसांत काकडत्या थंडीत भाजणार्या उन्हांत रात्रीं, दिवसां, पाहाटेंस, सायंकाळी तो किल्ले चढला-उतरला... पांच तपे उलटून गेलीं किल्ल्यागडांचा वेध घेत तो त्यांच्या वाटा तुडवीत राहिला, कधीं आनंदाने थिरकला, कधीं प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेला.. गडकिल्यांवर त्याचं असणारं प्रेम त्यांच्या साहित्यात नुसत डोकावत नाही तर त्याचा एक अविभाज्य भाग बनून राहत! "दुर्गदर्शन" मध्ये , 'एका मनस्वी परीभ्रामकाच्या मनावर उठलेली प्रतिबिंबे दिसून येतात.. त्यांनी आणि त्यांच्या दुर्गप्रेमी मित्रांनी मित्रांनीउन्हापावसांचे घाव कसे सोसले याच्या नोंदी आढळतात.. पण म्हणून हे पुस्तक एक फक्त एक प्रवास वर्णन नाही तर त्यांनी केलेल्या दुर्गभ्रमणातील काही दिवसांची अतिशय सुंदर, लालित्यपूर्ण, नजाकतदार वर्णने असणारी ही दैनंदिनी आहे.. दुर्गप्रेमी माणसासाठी रायगड म्हणजे साक्षात गंगाघाट!! त्याबद्दल ते लिहिणार नाहीत अस कस होईल.. अत्यंत रसाळ भाषेत त्यांनी गडाधीराजाच वर्णन केलं आहे.. १९६५ मध्ये लिहिलेल्या या पुस्तकातून मिळणारा आनंद आजही टिकून आहे. रायगडच्या आणि गडावरील बारीक सारीक गोष्टी त्यांच्या लेखनातून दृश्यमान होतात. रायगडाकडे जाणारी वाट, परिसर, शिवपूर्वकालीन रायगड, घेरा आणि तटबंदी, बालेकिल्ला, समाधी, दारूची कोठारे यांच्या तपशीलामुळे रायगड जणू आपल्याशी बोलत आहे अस वाटू लागत.. गोनिदांच दुर्गप्रेम पहायचं असेल तर "दुर्ग भ्रमणगाथा" वाचायलाच हव..हे पुस्तक म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी किल्ल्यांसाठी गायलेली भैरवीच जणू!!
गोनीदा नर्मदेचे पुत्र!! नर्मदेवर त्यांची भक्ती होती.. परिक्रमा करण्याचा त्यांचा संकल्प देखील होता.. नर्मदेच्या विविध रूपांबद्दल त्यांना मनस्वी आकर्षण होत.. त्यांच्या "नर्मदेच्या तटाकीं आणि दक्षिणवारा" मध्ये ते दिसून येत.. नर्मदेच्या सान्निध्यात राहून लेखकाच्या मनात उमटलेल्या विचारतरंगाचे दर्शन पुस्तकातील नऊ लेखांमधून घडते.. दक्षिणेकडील राज्यांचे सांस्कृतिक दर्शन त्यात घडते. त्याला निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे.. लालित्यपूर्ण, ओघवती, चित्रमय भाषा हे पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे...
कधी त्यांनी "मृण्मयी" मधून मीरेची आरती गायली तर कधी "मोगरा फुलला" मधून ज्ञानेश्वरांना शब्द्वंदना दिली.. त्यांचा लेखनातील विविधता खरोकारच थक्क करणारी आहे!!

या माणसानं बालवयापासूनच प्रचंड जिद्द उरात घेऊन जीवनाच्या धकाधकीत उडी घेतली.. कडूगोड, भीषण भयानक, क्वचित जीवघेण्या अनुभवांच्या आगीत त्याच्या श्रद्धा तावूनसुलाखून निघाल्या. त्याच्यातला माणूस स्वातंत्र्यपूर्व भारतात इंचाइंचाने वाढतच गेला आणि त्यामुळे गोपाल नीलकण्ठ दांडेकर कधी कलंदर वाटला, कधी अवलिया वाटला!! तरीही मूलतः ज्याने स्वतःविषयी खूप काही सांगावे आणि ज्याच्याविषयी तुम्ही-आम्ही खूप काही ऐकावे, असा निखळ, हाडामासाचा, छाती आणि काळीज दोन्ही असलेला, असा माणूस राहिला.. `स्मरणगाथेच्या सहाशे पानांतून या माणसाचे संपन्न व्यक्तिमत्त्व संपूर्णपणे फुलून आलेले आहे... असे हे गोनीदा!! शरीररूपाने नाही परंतु अपर ग्रंथसंपदेच्या माध्यमातून कायम आपल्यासोबत राहणारे प्रतिभावान साहित्यिक!