Wednesday 30 July 2014

साहित्यसम्राट अर्थात "कुसुमाग्रज"



श्रावण सुरु झाला आणि यांची कविता आठवली नाही असा रसिक विरळाच...
हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला
तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला
लपत, छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला
लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला
सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला
अस म्हणताना श्रावण महिना न राहता आपला सखा होऊन जातो.. त्याच्या नुसत्या येण्याने आपण सुखावून जातो.. आणि हि फक्त श्रावणाची कमाल आहे अस नाही तर त्याला आपल्या शब्द कवेत घेऊन गोड, नाजूक बनवणार्या कवीची देखील आहे... हा कवी माणुसकीने ओतप्रोत भरला आहे.. याच्यामध्ये अन्यायाविरुद्ध बंड करण्याची तयारी आहे आणि त्याच्या लेखणी मध्ये ती क्षमता देखील आहे.. उदात्त प्रेमात नाहणारी यांची कविता खूप प्रेरणादायक, आश्वासक आणि सहज सुंदर आहे.. मला वाटत या माणसाची एवढी ओळख पुरेशी आहे.. हे आहेत विविध साहित्य प्रकार अतिशय सहजतेने हाताळणारे साहित्यसम्राट अर्थात "कुसुमाग्रज"
१९३० पासून स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंतचा काळ... क्रांतीचा जयजयकार करणारा... पारतंत्र्याची शृंखला तोडण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या उर्मीचा काळ... या उर्मीला कार्याची जोड देण्यासाठी यांच्या कवितेचा जन्म झाला होता..
"गर्जा जयजयकार क्रांतिचा, गर्जा जयजयकार
अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
खळखळु द्या या अदय श्रुंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश
पिचेल मनगट परि उरांतिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार?
कधीही तारांचा संभार?"
अस म्हणत त्यांनी क्रांतीचा जागर केला...
"कशास आई, भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार
आई, खळाखळा तुटणार"
अस सांगत एक सुरेख आशावाद निर्माण केला....
नंतर जेव्हा खरंच वाटल कि आपण मुक्त होणार तेव्हा जस हरवलेल्या बोटीला जेव्हा किनारा दिसू लागता नाविक हर्षविभोर होऊन गाऊ लागतो तसाच यांचं देखील झालं आणि ते गाऊ लागले...
"निनादे नभी नाविकांनो इशारा.. आला किनारा ..
प्रकाशे दिव्यांची पहा माळ ती.. शलाका लाल निळ्या हिंदोळती
तमाला जणू ये अग्नीचा फुलोरा आला किनारा आला किनारा!!!!
स्वातंत्र्य तर मिळाल पण विषमता, पिळवणूक, अन्याय यांचा विळखा पुरता सुटला नव्हता..
सावकारी, स्त्रीची विटंबना हे प्रकार सुरूच होते.. या गोष्टींचा त्यांनी धिक्कार केला नसता तरच नवल..
गरीब बिचारा शेतकरी, सावकारीच्या दुष्टचक्रात अडकलेला.. सर्व वस्तूंचा लिलाव झाल्यानंतर एक बायकोच काय ती उरलेली..
"ऊर तिचे ते न्याहाळूनी
थोर थैलीतील वाजवीत नाणी
'आणि ही रे' पुसतसे सावकार..
उडे हास्याचा चहूकडे विखार" अस म्हणणारा तो नतद्रष्ट आपल्या मनात चीड निर्माण करतो.. हा सगळा प्रकार थांबायला हवा असा त्वेष निर्माण करतो..
" बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहांत आज या एक मनीषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते"
अशी प्रतिज्ञा करणारे कुसुमाग्रज भारतमातेची होणारी विटंबना, तिच्यावर होणारी आक्रमण यांमुळ नुसते व्यथित होत नाहीत तर "कृतीशील बना" असा संदेश देखील देतात...
वीर रसाने भरलेली त्यांची कविता प्रेमाची नजाकत पेश करण्यात देखील तेवढीच आघाडीवर आहे..
"चांद भरली रात आहे, प्रियकराची साथ आहे
मोगर्‍याच्या पाकळ्यांची मखमली बरसात आहे
मंद वाहे गंध वारा दूर चंदेरी किनारा
अमृताच्या सागरातून जीव-नौका जात आहे
ना तमा आता तमाची वादळाची वा धुक्याची
आजला हातात माझ्या साजणाचा हात आहे"
हे वाचताना संपूर्ण चित्र उभ राहत.. कवितेला जिवंत करण्याची यांची किमया वादातीत आहे!! यांची कविता इतकी आखीव रेखीव आहे कि बस!!!
आपण सामान्य जन.. प्रेम म्हणजे मानवी जीवनापर्यंत सीमित अशी आपली समजूत.. पण या महान कवीने साक्षात पृथ्वीला आणि सूर्याला या नाजूक नात्यात चित्रित केल.. आणि पृथ्वीच प्रेमगीत तयार झाल.. किती विशाल आणि भव्य कल्पना आहे ही!!!!
"युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतिची याचना"
तुझी प्रतीक्षा करून आता मी थकले रे.. अस म्हणणारी ती सालांकित होऊन बसली आहे.. पण तिचा शृंगार त्याच्यावाचुन व्यर्थ आहे.. त्याच्याशिवाय तिचं आयुष्य म्हणजे फक्त अंधार आहे...
"दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकिती दिव्य उल्का-फुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचूनी देवा, मला वाटते विश्व अंधारलेले!"
दोन उत्तुंग जीवनच मिलन म्हणजे खरतर एक सोहळाच.. तो तसाच उत्तुंग असायला हवा.. तसा तो होणार नसेल तर दुरावाच बरा अस म्हणत ती गाते...
"परि भव्य ते तेज पाहून पूजून  घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे!
गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा!"
आणि सर्वात शेवटी या मिलनाची शक्यता धुसर होताना दिसू लागता तिला त्याची थोरवी आणखी स्पष्ट दिसू लागते.. आणि त्याला सर्वस्वाच दान देता देता ती म्हणते...
अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्‌  मला ज्ञात मी एक धूलीकण
अलंकारण्याला परि पाय तुझे  धुलीचेच आहे मला भूषण!"
प्रेमाला वैश्विक बनवण्याचं श्रेय बहुतांशी यांचं आहे.. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण प्रेम करू शकतो मग त्या भौतिक गोष्टी असोत वा नसोत...
" प्रेम - कुणावर करावं ? कुणावरही करावं...
प्रेम - योगावर करावं, भोगावर करावं..
आणि त्यातूनही त्यागावर करावं... " वाह!! काय कल्पना आहे!!
सुरांना आळवताना ते म्हणतात माझ मन दूर कुठेतरी हरवलं आहे.. समोर सारा अंधार आहे.. तेव्हा हे सुरांनो फक्त तुम्हीच चंद्र होऊन मला अमृतामध्ये नाहवा!!!!
"हे सुरांनो चंद्र व्हा!
चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा! "
कुसुमाग्रजांच्या कवितांचा संक्षेपाने वेध घेण खूप कठीण काम आहे.. अनेक मोती यातून निसटून जातात..  यांची कविता वाचताना आपण आपले राहत नाही...  तसाच कविता लिहिताना खुद्द ते सुद्धा स्वतःचे राहत नाहीत... सृजनाची अवस्था मांडताना ते म्हणतात,
"मी जेव्हा कवी असतो तेव्हा मी कोणाचाच नसतो!
गगनयानापारी  होतो स्फोटाने विलग मी..."
कवितेच्या प्रांतात अधिराज्य गाजवणारे कुसुमाग्रज पद्य लिहिण्यात हि अग्रेसर होते..
'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे स्वागत केले त्याला तोडच नाही. अत्यंत नाजूक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले
'मराठी माती', 'स्वागत', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्‍या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली 'वैष्णव' ही कांदबरी व 'दूरचे दिवे' हे प्रसिध्द झाले.
 ज्ञानपीठ पुरस्काराला गौरवणारे हे कायम स्वतःची वाट चालत राहिले.. जेव्हा अशी वाट मिळाली नाही तेव्हा स्वतःची वाट बनवीत राहिले सगळ्यांना मार्गदर्शन करीत राहिले... आशीर्वाद देत राहिले..
आणि म्हणत राहिले,
"असे हजारोसंगे आहे जडलेले माझे नाते "
अनेक मनांना प्रेरणा देणारे, जीवन ध्येयाचा साक्षात्कार घडवणारे कवी क्वचितच परत जन्म घेतात.. सर्वसमावेशकता असणारी त्यांची कविता मराठी साहित्याला एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवते...अशा या कवीला माझा त्यांच्याच शब्दात सलाम..
"आदित्य या तिमिरात व्हा ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता अनुदारिता दुरिता हरा
सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणाकरा ॥"

Thursday 17 July 2014

निसर्ग उपासक कवी - बालकवी!

कधी कधी अस होत न.. एखादी कविता वाचताना मन अगदी भरून जात.. कुठल्या-कुठल्या आठवणींच्या गावाला भेट देऊन येत.. अचानक डोळ्यात पाणी आणत तर अचानक खुदकन हसायला लावत... या सगळ्या उत्फुल्ल भावना जिवंत होतात जेव्हा त्या निसर्ग-कविते मधून आपल्या समोर येतात.. कवितांना मूर्त रूप मिळत.. यासाठी कवितेला रंग, रूप, नाद देणारा कवी अत्यंत तरल मनाचा असावा लागतो.. असेच अतिशय हळुवार मनाचे, अनेक कविता जिवंत करणारे, निसर्गाशी तादात्म्य पावलेले माझे लाडके कवी म्हणजे "बालकवी"
१९०७ सालची गोष्ट.. कविसम्मेलनामध्ये एक किशोरवयीन मुलगा व्यासपीठावर चढला आणि
" अल्पमती मी बालक, नेणे काव्यशास्त्रव्युत्पत्ती..
कविवर्यांनो, मदीय बोबडे बोल धरा परी चित्ती.. "
अस म्हणत त्याने अगदी नम्रपणे पण दिमाखात आपल्या कविता सादर केल्या..
अध्यक्षांनी मुलाला बालकवी काय म्हणाल, तेच बिरुद कायमच त्याला चिकटून बसल...
त्यांच्या कवितेमधून कायम आनंद वाहत असतो..
"आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे"
अस म्हणत म्हणत आपोआप आपण आनंदी होत जातो... त्यांच्या कवितेला एक लय आहे.. एक नाद आहे... आणि तो नाद अत्यंत मोहवणारा आहे... श्रावणात उन पावसाच्या खेळच वर्णन करताना अस वाटत आपल्या समोर तो ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे.
"श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे.."
त्यांचा औदुंबर वाचताना तर वाटत.. एखादा सन्यस्त समाधी अवस्थेत बसला आहे.. सारी सृष्टी त्याला साथ देत आहे.. बेटातून वाहणारा झरा वातावरण निर्मिती करत आहे.. काळिमा सुद्धा कसा तर गोड काळिमा... घाबरवणारा नव्हे तर मनाला शांत करणारा...
"ऐल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळयांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळया डोहाकडे
झाकळूनी जल गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकु नी जलात बसला असला औदुंबर"
अनेक उपमा, उत्प्रेक्षा अलंकारांनी नटलेली हि कविता अगदी आपलीशी वाटते..
'निर्झरास', 'तृण-पुष्प', 'हिरवी-कुरणे' हे सगळ काव्य-भांडार म्हणजे सृष्टीच्या मनाचे रंग दाखवतात..
'बालविहग' या कवितेत संध्याकाळच वर्णन करताना ते म्हणतात,
" सांज खुले सोन्यहुनि पिवळे हे पडले ऊन..
चोहीकडे लसलशीत बहरल्या हिरवळी छान..
पांघरली जरतार जांभळी वनमाला शाल...
सांध्यतेज गिरीशिखरी विखरी सम्मोहनजाल.."
हि सगळी नुसती वर्णन नाहीत तर त्यांची अभिव्यक्ती आहे.. चैतन्यदायी अस्तित्व आहे.. कवितेच्या कुन्चल्यामधून निसर्गचित्र अस काही साकारल जात कि वाचणारा थक्क होतो...
द्विरुक्ती साधून ते कवितेला गेयता प्राप्त करून देतात... लय मिळवून देतात...
"गिरिशिखरे वनमालाही दरी दरी घुमवित येई..
कड्यावरुनी घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या !!
घे लोळण खडकावरती फिर गरगर अंगाभवती..
जा हळू हळू वळसे घेत लपत लपत हिरवाळीत!!!
एक अत्यंत अल्लद प्रेमकथा अल्लड नव्हे.. ती कुमारिका! अगदी लहान, अवखळ.. आणि तो अतिशय राजबिंडा देखणा तरुण.. त्यांच्या नाजूक प्रेमाची हि गोष्ट.. ती तिच्या आई सोबत आनंदाच्या झोक्यावर झुलत आहे.. खाणाखुणांच्या प्रदेशापासून खूप लांब विहरत आहे...
"हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?"
मग असाच कधीतरी हास्य विनोद करता करता..रेशीम गाठी जुळतात.. वचनांचे आदान-प्रदान होत... आणि नंतर ती मंगल घडी येते.. दोन मने एकरूप होतात...
"गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !"
अहाहा!! किती सुंदर वर्णन आहे हे..  एका कळीच सुर्यविकासी फुलामध्ये होणार रुपांतर इतकासा गाभा.. पण त्याला काय अप्रतिमपणे गुंफल आहे... वाह!! काही तोडच नाही.. हे झाल निर्व्याज, निरलस प्रेम.. पण जेव्हा एखादा राजकुमार वनात जातो.. तिथे विहरणाऱ्या रमणीला भुलतो.. तेव्हा त्यांच्या प्रेमाचा अविष्कार वेगळ्या स्वरूपाचा असतो..
"गर्द सभोंती रान साजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी ?
ती वनमाला म्हणे, "नृपाळा हे तर माझे घर.
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर."
रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी, तुला
तू वनराणी, दिसे भुवनी ना तुझिया रूपा तुला
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी
भुलले तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरी"
हे सगळ वाचताना कायम जाणवत.. बालकवींची कविता सौन्दार्यासाक्त आहे..इथे सौंदर्य हे फक्त स्त्रीच सौंदर्य एवढ संकुचित नाही तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ज्या काही मनोहारी गोष्टी होतात त्या सगळ्याचं सौंदर्य!!!
झरा हा त्याचा लाडका विषय.. त्याला ते कवीश्वर म्हणतात.. त्या झर्यालाच ते विनंती करतात,
"शिकवी रे शिकवी माते
दिव्य तुझी असली गीते!!"
त्यांना तारकांच संगीत ऐकू येत.. आकाशाची शोभा स्पर्शता येते.. एकूणच काय तर माणूस आणि निसर्ग यांचा भावबंध जोडता येतो... आणि म्हणूनच त्यांना मनाची शांतता अनुभवता येते.. कुठल्याही परिस्थिती मध्ये स्वतःच गाण गाता येत..  आणि ते गात असतानाच संपूर्ण विश्वात मांगल्य नांदावं, ऐक्य रहाव.. अशी मनःपूर्वक प्रार्थना देखील करता येते!!!
"माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे
सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले
ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला.
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली !
मंगल मंगल मद्‌गानाची गति ही शेवटली."
पण शेवटी कितीही झाल तरी हा माणूसच न.. मनाला येणारी अस्वस्थता, अशांतता त्यांना थोडीच चुकणार आहे.. फरक इतकाच आपण त्याचा गवगवा करतो आणि यांच्या सारखे महान लोक त्यांना शब्दात बांधून स्वतःपासून वेगळ करून टाकतात.. आणि म्हणूनच सृजनशील राहू शकतात..
"कोठुनी येते मला कळेना उदासीनता या हृदयाला
काय बोचते ते समजेना हृदयाच्या अन्तःहृदयाला.."
अशा कविता वाचल्या कि आपण देखील व्याकूळ होतो..
बालकवींना कुठेतरी काहीतरी खुपत होत.. आणि तेच त्याच्या काही कवितांमधून व्यक्त होत होत..
"शुन्य मनाच्या घुमटात कसले तरी घुमले गीत..
अर्थ कळेना कसलाही विश्रांती परी त्या नाही.."
या व्याकूळ करणाऱ्या गोष्टी कधीही एकेकट्या येत नाही.. आपल्यासोबत सगळे सगे सोयरे घेऊन येतात.. आणि मग आपल्या विचारांची चक्र सुरूच राहतात.. अव्याहत..!!!
अशाच काहीशा विचारचक्रात अडकले असताना, रेल्वे रूळ पार करताना त्यांचा अपघाती अंत झाला.. माणूस स्वतःच्या जीवनाची रूपरेषा आखतो.. इथे बालकवींनी मरण तर येणारच पण ते कस यायला हव ते सुद्धा सांगितल..
"सत्याची स्वप्ने व्हावी | सत्याला स्वप्ने यावी |
स्वप्नीही स्वप्ने बघत | स्वप्नातच व्हावा अंत ||
मरण्याचे स्वप्नही गोड | जगण्याचे स्वप्नही गोड |
येणेपरी सर्वही भास | अमृताचे व्हावे कोश ||
असा हा आमरण बाल्याच वरदान मिळालेला कवी! तुमच्या आमच्या पाहण्यात क्वचितच असायचा!!
बालकवींच्या कविता सार्या मराठी भाषेचा अमुल्य ठेवा आहे.. सार्या महाराष्ट्राचा मानबिंदू आहे.. त्यांचा कवितेमधील निरागस पणाचा वारसा आपल्या सर्वांना मिळावा हीच प्रार्थना..

Thursday 3 July 2014

माणुसकीचा ताल जपणारा कवी विं. दा.करंदीकर.....



कविता समजण्यापेक्षा ती आपली एका दमात वाचून काढायची अस वाटायचं ते वय... तेव्हा यांची "घेता" वाचली होती...
"देणार्याने देत जावे  घेणार्याने घेत जावे
हिरव्या-पिवळ्या माळाकडून
हिरवी-पिवळी शाल घ्यावी
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.." नंतर उसळलेल्या दर्याकडून प्रेरणा, भीमेकडून शांती घेता घेता ते म्हणाले
"देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे!!!
त्या बाळबोध वयात मला वाटायचं काय कवी आहे, "देणारा देत आहे तर निदान त्याचे हात तरी त्याला राहूदे ते कशाला घ्यायचे.. " जेव्हा नंतर थोडी प्रगल्भता आली तेव्हा अचानक साक्षात्कार झाला.. देणार्याचे हात घ्यावे म्हणजे त्याची दानत घ्यावी.. आणि खर सांगते त्यानंतर या माणसाबद्दल असणारा आदर अनेक पटीने वाढला.. आता हा माणूस कोण हे काही वेगळ सांगायची गरजच नाही... हा म्हणजे माणुसकीला काव्याच्या कोंदणात बसवून त्याची सर्वत्र उधळण करणारा राजा माणूस "गोविंद विनायक अर्थात विं. दा.करंदीकर..."
१९४० च्या दरम्यान रसिकांना रिझवण्यासाठी आलेली त्यांची कविता वयाचे, सामाजिक, राजकीय,
सगळे सगळे पाश तोडून रसिकांच्या अन्तःकरणाला जाऊन भिडली... नव्या गोष्टींचा पुरस्कार करताना तिने कधीच संस्कृतीशी असणार नात तोडलं नाही.. बाल-गीत, प्रेम-कविता, गझल, सुनीत अशा नानाविध प्रकारातून विहरताना कायम वास्तवाशी असणारी नाळ जपून ठेवली..
बालगीत म्हणजे पाऊस, शाळा, आईचे लाड, बाबांचा मार एवढच नसत तर त्या लहान मुलाचं स्वतःच एक छानस विश्व असत त्यात उडणारी घर असतात..तिथे परीक्षा लहान मुल नाही तर म्हातारी माणस देतात.



"तिबेटाच्या जरा खाली हिमालयाच्या जरा वर!
एटू लोकांचा अद्भूत देश प्रत्येकाजवळ उडते घर!
'टींग' म्हणता येते खाली 'टंग' म्हणता जाते वर!
एटूच्या देशात सक्तीचे खेळ मुलांना नसतो शिकायला वेळ
म्हातारे देतात परीक्षा शंभर मेल्यानंतर कळतो नंबर"
सगळच कस सरळ सोप्प बालसुलभ..पण त्यांच्या काही बालकविता मात्र मनात घर करून बसतात..
मोठ्ठ झाल्यावर मी जादुगार होणार अस म्हणताना चिमुरडा म्हणतो..
"खरेच आई, तुला नवी, धडकी लुगडी दोन हवी
कमळीचा परकर सगळा, अगदी बघ फाटून गेला
भाऊला बघ लंगोटी, नकोच का याहून मोठी
बाबांना पंचाबदली, हवी धोतरे लांब भली
पडला पुढती ढीग पुरा, काय कमी जादूगारा??."
असा अगदी निरागस प्रश्न तो आपल्या आईला विचारतो.. बिच्चारी आई काय उत्तर देणार.. जे काय उत्तर द्यायचं ते नंतर परिस्थिती देतेच..
एकूणच काय तर वास्तव आणि काल्पनिकता याचं अद्भुत मिश्रण, लहानग्यांच्या विश्वाशी तादात्म्य पावण्याची कला या सगळ्यांमुळे त्यांची कविता समृध्द झाली आहे..
जसे जसे आपण मोठे होतो तसं कष्टांच महत्व कळत जात...तेव्हा जर यांची कविता सोबत असेल तर
घामाच्या धारांची स्वेद गंगा होते.. जी खर्या-खुर्या गंगेहुनही पवित्र आहे..
"कांचनगंगेहुनही जी सुंदर
भागीरथीहूनही जी पावनतर
परमेशाहून जीवनतत्पर
त्या गंगेतील स्वेद्बिंदुनो
प्रणाम माझा तुम्हा निरंतर....!!!!
असेच कष्ट करत असताना कधी कधी मात्र जगण्यातला तोच तो पण उबग आणतो तेव्हा ते म्हणतात,
"सकाळ पासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !
माकडछाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन..
तीच गाणी तेच तराणे तेच मूर्ख तेच शहाणे..
"सकाळ पासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !" आणि मग त्याच वेळी मनाला उभारी देताना म्हणतात,
"घामामध्ये भिजव माती दगडासंगे झुंजव छाती..
आकाशावर मार मुठ उबग-बिबग सर्व झूट.."
यांची कविता नुसतीच वास्तववादी नाही तर दूरदर्शी देखील आहे. येणाऱ्या काळात यंत्र हाच जीवनाचा पाया होणार आहे हे त्यांनी कधीच ओळखल होत.. आणि म्हणून एका नादबद्धतेने यंत्राला आवाहन करताना ते म्हणतात,
ये यंत्रा!! ये यंत्रा!!
मंत्रांना सार्थ करीत स्वप्नांना स्वीकारीत 
उच्चारीत, आकारीत ये यंत्रा!! ये यंत्रा!!
संहारीत नवदानव निर्मित ये नवमानव
उद्घोषित नवमुल्ये उद्घोषित क्रांतीपाठ
ये यंत्रा!! ये यंत्रा!!
वास्तवाच सुंदर वर्णन करणारा हा कवी प्रेम देखील तेवढ्याच ताकदीने मांडतो.. तो तिच्या आठवणींमध्ये झुरत आहे, तिच्या भेटीसाठी व्याकूळ होत आहे.. पण या जन्मी त्यांची भेट नाही.. तिला भेटायचं तर त्याला एक नवीन जन्म घ्यावा लागेल.. ही सगळी अगतिकता सांगताना ते म्हणतात,

"माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी.
तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी.
होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे,
ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.
लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी."
आणि इकडे ती देखील तिच्या स्वप्नात त्याला तीच सर्वस्व देऊन जाते.. स्वप्न असलं म्हणून काय झाल.. स्वप्नांना कायम पूर्ततेची आशा असते म्हणूनच पाहिलेली स्वप्न केवळ स्वप्न न राहता काही काळासाठी हकीकत होऊन जातात..
"मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्‍न होते स्वप्‍नात पाहिलेले !
स्वप्‍नातल्या करांनी, स्वप्‍नातल्या तुला मी
होते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले ?
स्वप्‍नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले
स्वप्‍नातल्या परीला स्वप्‍नात फक्त पंख
दिवसास पाय पंगू अन्‌ हात शापिलेले
स्वप्‍नात परीला स्वप्‍नात ठेवुनी जा
हे नेत्र घेऊनि जा स्वप्‍नात नाहलेले
जा नेत्र घेऊनि जा स्वप्‍नांध पांगळीचे
आता पहावयाचे काही न राहिलेले"
उत्कट प्रेमासारख त्यांनी कौटुंबिक जीवनातले हृद्य अनुभवही ते सांगून जातात,
"असशील का आता तू  बसलीस अंगणात ?
अन हात दोन चिमणे  असतील का गळ्यात ?
असशील का आता तू  अंगाई गीत गात
घेऊन लाडकीला त्या लाघवी कुशीत..." सगळ कस तंतोतंत डोळ्यांसमोर उभ राहत!!!
एकदा आई झाल कि कायम आई असणारी गृहिणी सगळ्याच जबाबदार्या लीलया पेलते... एकाच वेळेस सुवासिनी, आई आणि त्याच वेळेस बायकोसुद्धा.. तिच्या या सामार्थायची त्याला जाणीव होते आणि तो म्हणतो,
"तू घरभर भिरभिरत असतेस..
लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात..
स्वागतासाठी तू सुहासिनी असतेस..
वाढताना यक्षिणी असतेस.. भरविताना पक्षिणी असतेस...
संसाराच्या दहा फुटी खोलीत
दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया
मला अजूनही समजलेली नाही..." अस कौतुक झाल्यावर ती का खुश होणार नाही!!
त्यांच्या कवितेला सहजतेचा स्पर्श आहे.. अकृत्रिम जिव्हाळा आहे... म्हणूनच त्या आत कुठेतरी भिडतात.. हृदयाच्या तर छेडत राहतात.. कधी कधी अति वास्तवदर्शी होऊन रुक्ष सुद्धा वाटू शकतात.. माणसावरच्या, मानुसाकीवरच्या अपर प्रेमातून त्यांची कविता जन्म घेते.. सर्व रूढ संकेतांना भेदून टाकते.. तिच्या उत्कटतेने रसिकाला भारून टाकते.. हेच तीच वेगळेपण आहे!! आयुष्यभर जपून ठेवाव अस..