Sunday 10 January 2016

लोकलच्या मनातलं!

मुंबई आणि तिची लोकल..
.
मुंबईकराला तिच्या लोकलचा तितकाच अभिमान आहे जेवढा एखाद्या पुणेकराला त्याच्या दगडूशेठचा, एखाद्या कोल्हापूरकराला त्याच्या रंकाळ्याचा किंवा एखाद्या सातारकराला त्याच्या कंदी पेढ्यांचा!! अर्थात कधी कधी तिच्या उशिरा येण्याचा, दोन स्टेशन मध्ये थांबण्याचा राग येतो.. पण मला सांगा.. जवळपास ४६५ किलोमीटर मध्ये पसरलेली ही जेव्हा दररोज सुमारे ७५ लाख लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते तेव्हा तिला थोडीशी चूकभूल माफ असायलाच हवी ना..
.
हिचं स्वतःचंच एक विश्व आहे.. स्टेशन मध्ये येताना ही एखाद्या राणीसारखी येते.. काही भाबड्या लोकांचा नमस्कार स्वीकारते.. अवघे १५-२० सेकंद थांबते आणि मग भोंगा वाजवत दिमाखात चालू लागते.. तिचा तो आवाज लोकांच्या कानात इतका बसतो कि आयुष्यभर लोकलने प्रवास केलेल्या चाकरमान्यांना निवृत्त झाल्यावर तो आवाज, ती धडधड ऐकली/अनुभवली नाही तर सुखाची झोप येत नाही..
.
या लोकल मधून तुम्ही जर रोज प्रवास केलात तर आपली पर्स, ओढणी/स्कार्फ, छत्री, गळ्यातील चेन/मंगळसूत्र, चप्पल आणि छोटी छोटी बछडी यांना घेऊन जगाच्या पाठीवर कुठेही प्रवास कसा करावा याचे क्लासेस घेऊ शकाल.. आठवा महिना असताना सुद्धा दादरच्या गर्दीत कर्जत पकडण्याची हिम्मत सुद्धा ही लोकल तुम्हाला मिळवून देते.. एक सल्ला मात्र आहे कुठे समारंभाला जायचं म्हणून सुंदर केशभूषा करून गर्दीच्या वेळेला लोकल मध्ये घुसू नका.. "शृंगाराचा" “अवतार” कधी होईल समजणार देखील नाही..
.
हिच्या पोटात एक वेगळंच जग असतं.. इथे तुम्हाला "१० मिनिटात बातम्या" असा talk show ऐकायला मिळेल.. सुगरणीचा सल्ला मिळेल.. "अग, तिथे नको जाऊ.. जेवण अगदीच सुमार आहे" किंवा "तिथे जात असाल ना तर या वेळेतच जा नाहीतर उगाच खूप वेळ जातो" अशा टिप्स ऐकायला मिळतील.. वर फुकटात सामान्यज्ञान वाढेल ते वेगळंच.. परवा याकुबला फाशी दिली गेली तेव्हा "मरेपर्यंत फाशी देणे" या कायद्यातील सुधारणेची कथादेखील मला ऐकायला मिळाली..
.
अगदी सुरुवातीला तुम्ही बिथरून जाल.. 'गाडीत जागा नाही मग कस घुसायचं' असं वाटून गाड्या सोडून द्याल.. पण एकदा का सराव झाला कि मग काय.. "चलो चलो अंदर चलो.. बहुत जगह है" म्हणत गर्दीला न जुमानता, दरवाज्यात विशिष्ट कोनात उभ राहून वारा खायची कला आपोआप साधू शकाल.. फूट बोर्ड वर असताना देखील bag मधून headphones काढून गाणी ऐकायला तुम्हाला अगदी सहज जमू शकेल.. चौथ्या सीट वर बसून सुद्धा एखादी कादंबरी वाचू शकाल.. शेजारच्या डब्यात चालू असलेला भजन enjoy करू शकाल.. आणि उभ्याउभ्या झोपूही शकाल..
.
या लोकलला जाती धर्माची बांधिलकी नाही.. रोज एकाच वेळेला प्रवास करणाऱ्या महिला एकमेकींच्या सख्या कधी होऊन जातात कळतदेखील नाही.. गणपतीला मोदकांची, ईदला शिरखुर्म्याची, ख्रिसमसला केक्सची देवाणघेवाण होऊ लागते.. वाढदिवसांपासून डोहाळेजेवणापर्यंत सगळं साजरं केलं जातं.. मनातली कित्येक गुपितं सांगितली जातात.. आणि तितक्याच तन्मयतेने ऐकलीही जातात..
.
विरार पासून चर्चगेट पर्यंत ८२ किलोमीटर फक्त दीड तासात पोहोचवणारी ही life-line.. जगात टिकून राहायचं असेल तर सतत धावत राहा असे संस्कार करणारी अशी ही मुंबईची सर्वव्यापी लोकल..

मुंबईची लाईफलाईन - लोकल!

मुंबई!! ही सदैव धावणारी.. सकाळी सहा असो किंवा रात्री दहा.. कायम तितक्याच निष्ठेने पळणारी.. आणि तिच्या या सततच्या धावपळीमध्ये अनेक दशकांहून अधिक काळ तिला साथ देणारी तिची lifeline - "लोकल"!!! आता, जरासा पाऊस झाला कि थोडा बोजवारा उडतो.. पण एक मात्र आहे ही लोकल दररोज लाख्खो लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्या-आणण्याचं काम अविरतपणे करत असते..
या लोकलचं स्वतःचं एक विश्व आहे.. आणि अर्थातच हे विश्व platform पुरतं मर्यादित नाही.. तर स्टेशनच्या दोन्ही बाजूला साधारण अर्धा किलोमीटर अंतरामध्ये पसरलेलं आहे.. कधी कधी त्याचा विस्तार जास्तदेखील असतो.. मुंबईमध्ये असं एकही स्टेशन नाही कि ज्याच्या बाहेर तुम्हाला खाण्या-पिण्याचे, पान-बिडीचे, कधी कपड्यांचे, पेनाचे, रुमाल-सॉक्सचे, किचेनचे, Headphonesचे छोटे छोटे stalls दिसणार नाहीत.. इथे seasonal गोष्टी सुद्धा असतात.. दिवाळीत फटके येतात, रक्षाबंधन आलं कि राख्या येतात... पावसाळा आला कि छत्र्या येतात.. तसं पाहिलं तर जरी इथे पाऊस पडत असला तरी उकाडा हा असतोच त्यामुळं स्टेशनच्या बाहेर लिंबू-सरबताचा stall हवा म्हणजे हवाच!!
या stall वाल्यांचं सुद्धा ना एक समीकरण असतं.. सकाळच्या वेळी जिथे वडा-चटणी मिळते तिथेच संध्याकाळी पर्सेस मिळतात.. मला सांगा resource management म्हणतात ते आणखी वेगळं काय असतं..
सामान्य माणूस सकाळी या विश्वात घुसतो.. नेहमी प्रवास करणारा असेल तर पास-धारक असल्याने तिकिटाच्या रांगेतल्या माणसांना मनातल्या मनात वाकुल्या दाखवत किती सेकंदांनी ट्रेन येणार आहे याचं गणित मांडत जिन्यावरून खाली येतो.. आपल्या platform वर पळतो.. इथेपर्यंत बायका आणि पुरुष बऱ्यापैकी समान वागतात परंतु एकदा platform वर आलं कि त्यांच्या वागण्यात बदल होतो.. पुरुष मंडळी बऱ्याचदा प्रेक्षणीय स्थळांच्या शोधात किंवा ट्रेन कधी येणार हे वाकून वाकून बघण्यात गुंतून जातात.. आणि बायका "अग, ८:४३ ची मिळेल ग मला.. ४ मिनिट लेट आहे.. निघाली कि सांगते" अशा संभाषणामध्ये व्यग्र होतात.. जर बायका नेहमीच्याच, एकाच वेळेला, एकाच ट्रेनमध्ये चढणाऱ्या असतील तर मग सिरिअलच्या story मध्ये, सासूच्या/नवऱ्याच्या/मुलांच्या गोष्टींमध्ये मग्न होतात.. display board वर गाडीला यायला १ मिनिट आहे हे दिसायला लागलं कि महिलावर्गात चलबिचल दिसायला लागते.. कोणी मोकळ्या केसांचा अंबाडा बांधायला लागते.. कोणी पाठीवर अडकवलेली sack पोटावर घेते.. कोणी ओढणीची गाठ मारते.. आणि सगळी गर्दी compress होऊ लागते.. मग ट्रेन येते आणि जमेल तितक्या लोकांना पोटात घेऊन पुढे जाते.. थोडावेळ स्टेशन 'नुकतीच मुलगी सासरी गेलेल्या लग्नघरासारखं' दिसतं आणि परत हेच चक्र सुरु होत.. सकाळी VT कडे जाणारे platforms गर्दीने तुडुंब भरतात तर संध्याकाळी उलट बाजूचे.. तीनही lines वर थोड्याफार फरकाने हेच चलतचित्र सुरु असत..
संध्यकाळ संपून रात्र सुरु व्हायला लागते तसं स्टेशन सुद्धा थकून जातं.. सगळ्या सामानाची सारवासारव करायला लागतं.. आजूबाजूचे stalls गाशा गुंडाळू लागतात.. आणि येणाऱ्या रात्रीमध्ये दुसऱ्या दिवशीसाठी लागणारी ताकद गोळा करण्यासाठी मुंबई स्वतःचा वेग कमी करू लागते..