Wednesday 17 December 2014

निसर्गाची बोली जपणारा रानकवी - ना.धों महानोर!



निसर्गाची बोली जपणारा, अवघ्या रानाच्या सुख- दुःखाशी जोडलेला असणारा एक रानकवी...  शेतीत शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा "शेतकवी".. आपल्या गावरान साहित्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा, साहित्य अकादमी ते पद्मर्शी पुरस्काराचा मानकरी कविवर्य ना.धों महानोर!!! लोकगीताचे संस्कार घेउन आलेली त्यांची कविता वाचकाला खिळवून ठेवते.. त्याच्याशी संवाद साधते.. माणसाशीच नव्हे तर रंगीन निसर्गाशी तितक्याच रंगीनपणे बोलणारा हळुवार मनाचा रांगडा कवी!!!
“ह्या शेताने लळा लावला असा असा की
सुखदु:खाला परस्परांशी इसरलो
आता तर हा जीवच असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो
ना.धों. महानोरांच्या शब्दांनी मराठी रसिकांना लळा लावला. काळ्या मातीवर, शेतीवर, गावावर जिवापाड प्रेम करणार्या या कवीने अवघ्या देशाला मोहिनी घातली. हि कविता म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या निसर्गासोबत असणार्या नाजूक नात्याचे जणू शब्दरूपच आहे!!
अजिंठा लेण्यांच्या जवळपास असणार्या लहानशा खेड्यात शेतकरी म्हणून जीवन व्यतीत करणारे महानोर!! निसर्ग जणू त्यांच्या अंगात भिनलेला!!! आकाश, जमीन, वारा, पाउस, नदी, पाखरं हे त्यांच्या आयुष्याच अविभाज्य अंग आहे!!! म्हणूनच त्याचं शेत त्यांना फक्त प्रेमच देतं अस नाही तर लळा लावतं.. आणि त्यांच्या शब्दांमधून आपल्याशी बोलतं... हेच शेत त्यांच्या त्यांच्याही नकळत रान होऊन त्यांचे प्राण गुंतवून टाकत.. तेव्हा मग त्यांना नभ आणि भुई यांचा भावबंध जाणवू लागतो आणि ते लिहून जातात...
"गुंतले प्राण ह्या रानात माझे
फाटकी हि झोपडी काळीज माझे..
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बहुत घ्यावे!!" काय सुरेख विचार आहे.. कल्पना तर सुचण आणि ती साकारण्यासाठी शब्द सुचण या दोन्ही गोष्टींसाठी प्रतिभा गरजेची आहे... हि प्रतिभा खचितच महानोरांकडे आहे...
केशवसुतांनी निसर्गकवितांचं बीज लावलं.. बालकवींनी त्याला रुजायला, फुलायला मदत केली आणि महानोरांच्या काळात हे बीज बहरून आलं..
"झाडे झाली हिरवीशी  शीळ घुमे रानात..
ओळ जांभळ्या मेघांची, वाहे नदीच्या पाण्यात..
वाट झुंजूमुंजू होते पीक मावेना शेतात..
लक्ष पाखरांचे थवे, खेळ मांडती पाण्यात..!!!"
चित्रकार कुंचल्यातून निसर्गचित्र निर्माण करतो तर कवी कवितेतून.. या कवितेतून हे अगदी स्पष्ट जाणवत... एखादा छोटासा गाव.. शेताने वेढलेला.. सुगीचा काळ जवळ आलेला.. अशा वेळेस स्वच्छ नितळ पाण्यात मेघांच पडणार मनोहारी प्रतिबिंब.. झुंजूमुंजू होताना पक्ष्यांच्या थव्याने आकाशाला घातलेली माळ.. सगळ कस सुंदर, चैतन्यदायी!!! या सगळ्या निसर्गचक्राचा कर्ताधर्ता असणारा सुर्य... त्याला वंदन करताना ते म्हणतात..
"सूर्यनारायणा नित्नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा
ओंजळीनं भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सावली मायेची
आबादानी होवो शेत भरू दे दाण्याचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे"
हे सूर्या, तुझ्या तेजाने आमच्या जीवनामाध्ला सगळा अंधार नाहीसा होउदे.. चराचरात सुखसमृद्धी नांदू दे.. मग आम्हाला बाकी काही नको...
पाऊस पडतो, बियाण रुजतं, ज्वारी पिकते आणि दाणे फुलून येतात.. किती अरसिक वाटत हे वाचताना!!! तेच जर आपण अस वाचलं
“ ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे..
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडुनी जावे..!!”
 तर किती प्रसन्न वाटत!!! वाटतं कि पाउस म्हणजे नभाने भुईला दिलेलं दान आहे आणि त्याच चैतन्याला हि धरणी पिकांच्या रूपाने पुढे देत आहे!! आणि म्हणूनच जे खरे भूमिपुत्र आहेत ते कृतज्ञता दाखवतात आणि भोळ्या शंभूचे आभार मानत गाऊ लागतात..
" आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं
या जांभर्या गर्दीत मांडुन इवले घर
या पिकल्या शेतावर तुझ्या आभाळाचा जर
या डोंगर वस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार
आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर.."
जैत रे जैत मध्ये तर त्यांनी आपल्या गाण्यांनी रसिकांना पूर्णपणे वेड लावलं आहे.. मग ते गाण
"जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी
येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी
समिंदराचं भरलं गानं, उधानवारं आलं जी
येड्यापिश्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी
मोडुन गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी, दाणं उष्टं झालं जी
जांभुळीच्या झाडाखाली, कोयडं बोल बोलं जी
जांभळीचं बन थोडं, पिकून पिवळं झालं जी"
हे असो किंवा
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
अशा वलंस राती गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरात" हे असो... अशा रांगड्या तरीही नाजूक शृंगाराला जेव्हा मंगेशकर घराण्याच्या  गायन वादनाची साथ मिळते तेव्हा गाण्याचं सोनं होतं..
महानोरांनी निसर्गाचं वेल्हाळ रूप आपल्यासमोर मांडलं, शृंगाराला लाडिकपणे सादर केलं... तसंच  त्यांनी कातरवेळेला येणाऱ्या उदासीनतेला आणि त्यासोबत येणाऱ्या विरहाच्या जाणीवेला अधोरेखित केलं.. ते म्हणतात,
"आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या
काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी कसा शब्द ही बोलंना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा
चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आसमानी तळ्यांत लाख रूतल्या गवळणी
दूर लांबल्या वाटेला रूखी रूखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी"
अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या कवितेला स्त्री हा विषय देखील वर्ज्य नाही.. त्यात मग हळद खेळणाऱ्या मुली आहेत..घन ओथंबून आल्यावर पडणारा पाऊस जणू सख्याचा स्पर्श आहे अस वाटणारी नवयौवना आहे.. पाणी भरायला आलेली गौळणी आहेत..
"सरलं दळण
ओवी अडली जात्यात
उभ्या जन्माचा उमाळा
कळ सोसून डोळ्यात.." अस म्हणणारी पहिलटकरिण आहे आणि तिचा सोशिकपणा देखील आहे...
महानोरांच्या कवितेतून कायम कृतज्ञता भाव दिसून येतो... मग ते निसर्गामधल्या विविध शक्ती असो किंवा मानवी रूपं!!! स्वतःकडे असणार्या प्रतिभेबद्दल देखील ते ईश्वराचे ऋणी आहेत..ते म्हणतात.. "हे परमेश्वरा, तुझ्याच आशीर्वादाने हा शब्दांचा खेळ आम्ही मांडला आहे.. या शब्दांमध्ये इतकी ताकद आहे कि आम्ही त्यांची आयुष्यभर सेवा करण्यास देखील तयार आहोत.. आम्हाला फक्त तुझी साथ दे.. पाठीवर विश्वासाचा हात दे..." आणि मग त्या जगत्नियंत्याला  धन्यवाद देताना म्हणतात..
शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा
आम्हां शक्ती दे शब्द-शारदे गौरीतनया ईश्वरा
आम्ही जन्मभर भाट होऊनी शब्दांपाशी नांदतो
गंधर्वाच्या गोड गळ्याची आज प्रार्थना मागतो
तुझा शब्द दे आकाशाचा.. झांज डफावर, स्वर गहिरा
असा हा अलंकारांचा सोस नसणारा.. साधाभोळा तरी सशक्त कवितेचा जनक!!! नादमधुर शब्दांची आणि कवितांची लयलूट करणारा शब्द्शारदेचा साधक!! त्यांची कविता मराठी त्यातही ग्रामीण जीवनाशी नाळ जोडून असणारी आहे.. जुन्या परंपरांना कायम ठेवत नित्य नाविन्याचा वसा जपणारी आहे... म्हणूनच ती बर्याच काळ आपल्या मानत रुंजी घालत राहते...भोवतालच्या नितांतसुंदर निसर्गदर्शनाचा अनुभव देत राहते!!!