Thursday 3 October 2019

गोऱ्या रंगाची काळी जादू!


लग्न झालं आणि पडद्यामागच्या अनेक गोष्टी ऐकू यायला लागल्या.
'हिने चांगला गोरागोमटा जावई पटकावलाय.'
'लव्ह मॅरेज होतं म्हणूनच तिला एवढा गोरा नवरा मिळाला.'
'एवढा गोरा आणि उंच जावई कुठे शोधलास गं, मला पण सांग, माझ्या भाची/पुतणीसाठी स्थळ बघणं सुरु आहे?'
त्या सगळ्यांचा होरा एकच होता, 'ती सावळी आणि बुटकी' असूनही तिला वरचढ(?) नवरा कसा काय मिळाला.
लग्नाच्याआधी दोन एक वर्षांपूर्वी आईला एकीने सांगितलं होतं, 'बघ हा, ती काळी आहे, बुटकी असल्याने आणखी जाड दिसते. लग्नाचं बघायला लाग. अशा मुलींचं लग्न ठरला वेळ लागतो.' शब्दाने शब्द वाढतो म्हणून आई काही बोलली नाही तेव्हा.
लग्नाच्या वेळेस अनेक जणींनी मला विचारलं 'ब्लिच कर. गोरी दिसशील.'
आईला सुद्धा तिच्या लग्नात नवरा किती गोरा, देखणा आहे आणि मुलगी त्याच्या मानाने डावीच आहे हे अनेकांनी ऐकवलं होतं..
मला प्रश्न पडतो 'रंग आणि उंची तथाकथित प्रमाणात नसेल तर व्यक्तीची गुणवत्ता कमी असत नाही.' ही एवढी साधी गोष्ट लोकांना का समजत नाही? अजूनही आपल्याला जी गोऱ्या रंगाची भूल चढलेली आहे ती का उतरत नाही? गोरं आणि उंच असणं म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता झाली ही समजूत अजूनही का जात नाही?
माझ्या लहानपणी एक गौळण लागायची रेडिओवर
'गोराही म्हणतो गोरी पाहिजे, काळाही म्हणतो गोरी.. आता तुमीच सांगा पाव्हणं कुठं जातील काळ्या पोरी....' आज इतकी वर्ष झाली तरी परिस्थिती तशीच आहे.
मध्ये एक नवीन प्रकार सुरु झालेला.
एखाद्या काळ्या रंगाच्या, फारशा सुबक नसणाऱ्या बाईच्या फोटोखाली 'शादी करुंगी तो अंकितसे. टॅग अंकित फॉर हर'
आणि एखादी गोरी गोमटी, आकर्षक बाई असेल तर 'राखी बांधुगी तो सुमितको, टॅग सुमित फॉर हर' हे उलट होत नाही. आपल्या डोक्यातून गोरं म्हणजे श्रेष्ठ, दुष्प्राप्य आणि काळं म्हणजे कनिष्ठ सहजसाध्य ही भावना जातच नाही.
माझी एक मैत्रीण आहे. सुंदर, निरोगी केस, प्रसन्न चेहरा आणि निरागस हसू यामुळं ती खरंच खूप छान दिसते. पण... हा पण येतो तो तिच्या रंगामुळे. आजवर अनेकदा गम्मत म्हणून असेल किंवा मुद्दाम असेल तिच्या रंगांची प्रचंड चेष्टा होत आलेली आहे. वाईट वाटतं तिला पण किती वेळा आणि मुख्य म्हणजे कोणाकोणाची तोंडं बंद करणार.
या पार्श्वभूमीवर मला माझे बाबा फार खमके वाटतात. मध्यंतरी कोणीतरी त्यांना आमच्यासमोर विचारलं, 'तुझ्या मुली सावळ्या आहेत. उठून दिसणार नाहीत त्या.' बाबांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, 'माझ्या मुली सुंदर आहेत. उठून दिसण्यासाठी त्यांना गोऱ्या रंगाची गरज नाही.' ही इतकी साधी गोष्ट समजायला इतकी कठीण आहे का? बाबा 'माझ्या मुली सुंदर आहेत' हे इतक्या ठामपणाने म्हणाले की समोरचा माणूस गप्पच झाला.
कोणी USA, UK किंवा तत्सम प्रदेशात जाऊन आला/आली की आपण कौतुकभरल्या नजरेने म्हणतो, 'वॉव, किती गोरा/गोरी झाला/झाली आहेस. मस्तच!!' आणि कोणी उष्ण प्रदेशात फिरून आला की, 'शी.. किती टॅन झाला/झाली आहेस..' गोरं म्हणजे वॉव आणि काळं म्हणजे शी.. कोणी ठरवलं हे. आणि अजूनही का पाळतो आपण ते??
बायका गर्भवती राहिल्या की आईकडे येतात. 'गर्भसंस्कारांमुळे माझं बाळ गोरं कसं होईल ते सांगा' हे विचारायला. वास्तविक बाळ निरोगी, सुदृढ, तजेलदार त्वचेचं असणं जास्त महत्वाचं आहे. पण हे त्या कुटुंबियांच्या खिजगणतीत नसतं. त्यांना गोरं बाळ त्यातही मुलगा हवा असतो.
फेअर अँड लव्हली नंतर फेअर अँड हँडसम आलं, तशीच असंख्य क्रीम्स आली. त्यांचा खप प्रचंड आहे. त्याने काहीही फरक पडत नाही हे माहित असूनही.
आम्हाला विचारी व्हायचं नाहीये, आम्हाला फक्त गोरं व्हायचंय. आपल्या त्वचेचा रंग आपल्याच फायद्यासाठी आहे ही गोष्ट अनेकांनी अनेकवेळा सांगूनही आम्हाला कळत नाही. आम्ही उघडपणे वर्णद्वेष दाखवणाऱ्या परदेशी लोकांना नावं ठेवतो. पण प्रत्यक्षात मात्र तेच करत असतो आणि त्याची आम्हाला जराही लाज वाटत नाही. अर्थार्थी गुलामगिरी गेली आहे फक्त. वैचारिक गुलामगिरी कधी जाणार काय माहित...
P.S. - मला माझ्या रंगामुळे अज्जिबात न्यूनगंड वाटत नाही. वाटणरही नाही. मानसिकतेची चीड़ आली म्हणून पोस्ट लिहिली!!

आईचं माहेरपण!


मी माझ्या आईला तिच्या माहेरी जाऊन निवांत राहिलेलं कधी पाहिलंच नाही. ती गेलीच नाही कधी. त्यामुळं आपण मोठं झालो कि आईला जरा विश्रांती द्यायची हे खूप आधीपासून मनात होतं. पण... आम्ही मोठे झालो आणि घराबाहेर पडलो. कधी काळी सुट्टीसाठी घरी गेलो कि तिला विश्रांती मिळण्याऐवजी दुप्पट काम लागायचं. आमच्या आवडीचे पदार्थ खायला घालणं, सामानाची उस्तवार करणं, चटणी, लोणची आणि असाच सटरफटर काहीतरी बांधून देणं यातच तिचा वेळ निघून जायचा. नंतर जेव्हा स्वयंपाक करायला लागले तेव्हा मी घरी पोहोचायच्या आधी 'तिकडे नेताना दाण्याचं कूट, मसाले, मेतकूट, वेगवेगळी पीठं हवी आहेत' म्हणून लिस्ट आईकडे पोहोचती झालेली असायची. आमच्या तेव्हाच्या लुटुपुटुच्या संसाराची चालिका होऊन तिने हे सगळं केलं. आता लग्न झाल्यावर तरी आईला जरा विश्रांती मिळेल असं काहीतरी करायला हवं असं वाटलं आणि मग 'आईचं माहेरपण' करायचं ठरवलं..
'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते' असंच ऐकत मोठे झालो आपण. त्यामुळं 'आईचं माहेरपण' हे ऐकायला जरा विचित्र वाटतं. पण आपल्याकडे म्हणजे सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात, बाईची आई होते आणि माहेरची ओढ तितकीच तीव्र असूनही तिकडे जाणं होत नाही. आज काय मुलांचं आजारपण, उद्या काय परीक्षा आणि हे काहीच नसेल तर 'मी गेले तर घरातल्या लोकांच्या खायचं प्यायचं काय?' हा विचार हळू हळू तिच्यापासून तिच्या हक्काची 'माहेरची विश्रांती हिरावून घ्यायला लागतो..' मुलं मोठी होतात आणि मग एकूणच एक अलिप्तपणा येतो. कदाचित ज्या मायेच्या माणसांमुळे माहेर हे 'माहेर' असतं ती माणसं काळाच्या पडद्याआड गेलेली असतात आणि मग माहेर पूर्वीसारखं वाटत नाही. एकूणच काय तर 'माहेरी जाणं' थांबून जातं किंवा पाहुण्यासारखं भोज्याला शिवून येण्याइतपत उरतं. माहेराकडून तिच्या काही फार अपेक्षा नसतात. चार घास मायेने आयते मिळावेत, कोणीतरी केसाला तेल लावून चंपी करून द्यावी, खूप गप्पा मारता याव्यात, लहानपणी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपता यायचं तसं कोणीतरी असावं आणि 'खूप दमलीस तू सगळ्यांचं करून. आता बस जरा. मी आहे..' असं म्हणणारं कोणीतरी असावं. एवढंच तिला वाटत असतं..
आयता चहा मिळाला तरी सुखी होणारी आई. तिच्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो आपण. आणि हे सगळं करायला मातृदिनच हवा असं काही नाही बरं का!!

मेरा वो सामान लौटा दो!!!


त्यांचं लग्न होऊन साधारण सहा महिने झाले असतील. लग्नाआधी दोघांच्या नोकऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी होत्या त्यामुळे ती जुळवाजुळव करून एका शहरात राहण्यासाठी त्यांना सहा महिने लागलेच. तरी कमीच म्हणायचे. तसं बघता लग्नाच्या आधीपासून ते दोघे ओळखायचे एकमेकांना, पण जोडीदार म्हणून राहताना कळू लागलेल्या एकमेकांच्या अनेक सवयींशी जुळवून घेणं नवीन होतं. 'तू असा/अशी आहेस' असे साक्षात्कार बऱ्याचदा होत होते.
आधी लग्न, मग हनीमून, नंतर ही उस्तवार या सगळ्यांत तिला माहेरी जायला जमलंच नव्हतं. असंच एकदिवस तिला एक लॉन्ग वीकएंड जवळ आलेला जाणवला. आजुबाजुचे लोक घरी जायचं प्लांनिंग करू लागले आणि तिने माहेरी जायचं ठरवलं. आधी जे घर होतं ते एका क्षणात माहेर झालेलं. 'मुलांचं हे असं होत नाही. लग्न झाल्यावर मुलांच्या आयुष्यात ज्या अनेक गोष्टी तशाच राहतात त्यातली ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट. असो.....' असा विचार करतच तिने घरी फोन लावला. 'आई, सोमवारी सुट्टी आहे. मी येऊ का गं घरी? एकटीच येईन. त्याला काम आहे त्यामुळं तो नाही येऊ शकणार'. आई म्हणाली, 'तुझंच घर आहे राणी. कधीही ये.' तेव्हढ्यानेसुद्धा हिचे डोळे पाणावले. आवाज जड झाला. आईच ती. तिला लगेच कळलं. लगेच विषय बदलत ती म्हणाली, 'आल्यावर गव्हाचा चीक करू हा.' पुढे मग गप्पांचे अनेक रूळ बदलत तो कॉल सुरूच राहिला.
एकदाचा तो लॉन्ग वीकएंड आला आणि ती घरी आली. माहेरवाशीण म्हणून नाही तर त्या घरची मुलगी म्हणून. लग्नाच्या धांदलीत आणि नंतरही आई-बाबांशी निवांत गप्पा झाल्याच नव्हत्या तिच्या. त्यामुळं गप्पांना, हसण्या-खिदळण्याला ऊत आलेला. दोन दिवस कसे गेले कोणालाच कळलं नाही. उद्या आता परत जायचं. परत मोठठं होऊन वागायचं त्याआधी आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिने स्वतःचे लाड करून घेतले. आणि झोपायला स्वतःच्या खोलीत आली. अजून घरात सून आली नसल्याने ती रूम तिचीच राहिली होती. अनेक आठवणींनी मनात पिंगा घालायला सुरुवात केलेलीच होती. रूमच्या भिंतींवरून ती हळुवारपणे हात फिरवत होती. उगाचच एखादं कपाट उघडून, जुना ड्रेस घालून बघत होती. कधी काळची प्रशस्तीपत्रकं घेऊन एकटीच हसत होती. पुस्तकांच्या कपाटावरून तर तिची नजर हटता हटेना. बऱ्याच वेळाने ती पलंगावर येऊन पडली. पुढे तिची उशी कधी भिजली, कधी डोळा लागला हे तिचं तिलाच कळलं नाही. दुसऱ्यादिवशी जायची वेळ आली तशी आई-बाबांना नमस्कार करून ती निघाली. भावाच्या पाठीत गुद्दा घालताना उगाचच तिचे डोळे पाणावले.
ती स्वतःच्या घरी आली आणि दोन घटकेचं माहेरपण विसरूनही गेली. काही दिवसांनी तिला भावाचा फोन आला. 'ताई, तुझी रूम रिकामी करायची आहे. तुझं काय हवं नको ते सामान घेऊन जाशील? हवं तर मी पाठवून देतो. तुझ्याकडे राहिलं तर नीट राहील..' दोन मिनिटं तिला काय बोलावं सुचेनाच..
भरल्या आवाजात ती 'हो' म्हणाली. तिच्या डोक्यात मात्र आशाताई गात होत्या.......
'गीला मन शायद बिस्तरके पास पडा हो.. वो भिजवादो.....
मेरा वो सामान लौटा दो.. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...'
-
तन्मया (२१/०६/१७)


Generalizing things - एक विकृत मानसिकता!


अलीकडचीच गोष्ट. एक काकू मला म्हणत होत्या, 'तू आयटी मध्ये ना गं. मग काय बाहेरचंच खात असाल ना. आज वडापाव, उद्या भेळ. आणि नंतर नवऱ्याकडे बघून 'काय रे, बायको करते का काही घरी का तुलाच करावं लागतं सगळं..?'
वयाचा मान ठेवून म्हणा किंवा कुठे नादाला लागायचं म्हणून म्हणा मी बोलणं टाळलं. पण तेव्हापासून हा विचार आहे मनात. आयटी मधली सून म्हणजे तिला कशाचंच काही सोयर सुतक नसणार हे गृहीतच धरलंय लोकांनी. आणि हा आय टी मध्ये असणाऱ्या सुनांचा नवीन प्रॉब्लेम आहे. तस पाहिलं तर त्यांचे १२ तास ऑफिस आणि प्रवासात जातात. ७ तासांची झोप. सकाळी दोन तास स्वयंपाक करणं, नाश्ता बनवणं, खाणं आणि स्वतःचं आवरणं यात जातात. मुलं असतील तर आणखी जास्त वेळ. संध्याकाळी दीड तास स्वयंपाक आणि जेवण. सणवार असतील तर मग झालंच. हातात असणारा वेळ कसा, कुठं जातो ते कळतही नाही. त्यात सुद्धा दोन घरी बोलायचं असतं, स्वतःसाठी निदान अर्धा तास तरी हवा असतो. पण हे समजूनच घेतलं जात नाही.. [घरांत वरच्या कामांना बाई आहे आणि घरात सासूसासरे नाहीत हे गृहीत धरून हे वेळापत्रक सांगितलं आहे. तशी मदत नसेल तर मग २४ तास पण अपुरे पडतात..]
सून आहे ना मग तिने घरचं सगळं करून मगच बाहेर पडायला हवं. नवऱ्याला काय हवं नको ते बघायला हवं अशा अपेक्षा असतात. [हो. अजूनही बऱ्याच घरात आहेत] घरचे समजूतदार असतील तरी आजूबाजूच्या मंडळींना सुनेनं केलं'' पाहिजे असं वाटत असतं. ते चूक आहे असं म्हणत नाही मी. पण कालानुरूप त्यात बदल व्हायला हवा ना. सोमवार ते शुक्रवार वेळेशी जुळवून घेताना त्रेधा तिरपीट उडते. अशावेळेस मग 'आम्ही केलंच ना..' असा सूर असतो या मंडळींचा. माझा एक मित्र यावर म्हणाला होता, 'पूर्वीचे बरेचसे जॉब्स क्लेरिकल होते. जॉब जाण्याची तितकीशी भीती नव्हती, कामाच्या वेळा अशा विचित्र नव्हत्या, आजच्या एवढी जीवघेणी स्पर्धाही नव्हती..' पटलं मला त्याचं. पण हे जर एखादी सून म्हणाली असती तर ती उद्धट ठरली असती..
माझी एक मैत्रीण आहे. अगदी वर सांगितलं तसंच वेळापत्रक असणारी. फक्त सासू-सासरे सोबत असतात तिच्या. तिने एकदिवस [एकच दिवस] ऑफिसला जायला उशीर होत होता म्हणून नवऱ्याला धुवून झालेले कपडे वळत घालशील का म्हणून विचारलं तर सासूबाई म्हणाल्या, 'नवऱ्याला कामं सांगू नयेत. आणि पुरुषांनी बायकांचे कपडे बघायचे नसतात.. [येस, एकविसावं शतक आहे हे..]' आणि हे फक्त प्रातिनिधिक आहे. अशी अनेक मजेशीर उदाहरणं आहेत आजूबाजूला.
सगळ्या गोष्टी जनरलाईझ करतात ही आजूबाजूची मंडळी. आयटी मधली सून आहे ना म्हणजे रोज बाहेरचं खात असणार, अधून मधून दारू-सिगारेट यांतसुद्धा रमत असणार. तिला स्वयंपाक म्हणजे काय हे माहित नसणार. मग काय, अंडा भुर्जी करताना ती 'दोन अख्खी अंडी, एक टोमॅटो आणि एक कांदा तव्यावर परतत आहे' असे व्हिडीओज बनवून सगळीकडे पसरवले जातात.. वाईट गोष्ट म्हणजे हे चुकीचं आहे असं कोणालाच वाटत नाही. 'चेष्टा केली गं..' म्हणत सगळंच हसण्यावारी नेलं जातं. 'आजकालच्या मुली' या सदरात याही गोष्टी येत आहेत हल्ली. अशामुळे होतंय काय ना, माझ्या वयाच्या अनेक अविवाहित मुलींना वाटतं, 'हे एवढं सगळं ऐकून घ्यायचं असेल, स्वतःसाठी जगायला वेळच मिळणार नसेल तर लग्नच कशाला करायचं.' तर्कशुद्ध उत्तर देता येत नाही या आजूबाजूच्या मंडळींना. मग ते काय करतात तर आजकालच्या मुलींमुळे लग्नसंस्था मोडीत निघत आहे वगैरे भाषणं ठोकतात. पण बदललेल्या युगात आपण आपले विचारही बदलायला हवेत हे काही त्यांना समजत नाही..
या सगळ्या पार्श्वभूमीवर मी फार फार भाग्यवान आहे. मुलगी म्हणून आणि सून म्हणून सुद्धा.. ऑफिसमधून खूप उशिरा आल्यावर 'कशाला स्वयंपाक करत बसलीस, खिचडी टाकायची पटकन किंवा मागवायचं' असं म्हणणारी घरची मंडळी आहेत. 'या आपल्या परंपरा आहेत आणि त्या पाळायलाच सगळं करायलाच पाहिजे' म्हणणारं सासर नाही आणि तू केलं नाहीस तर लोक आम्हाला नावं ठेवतील म्हणणारं माहेर नाही. 'तुला जमेल तसं कर, फक्त मनापासून कर.' एवढीच त्यांची अपेक्षा आहे. आणि तेवढं करणं मला काही जड जात नाही.
त्यामुळं वर सांगितलं तसं माझ्या घरात होत असेल असा विचार करून कोणीही सहानुभूती वगैरे दाखवू नये..
-तन्मया

Generation Gap - Positive vibes only!!

रात्री साडेआठची वेळ. आम्ही, म्हणजे मी आणि माझी भाच्ची, आमच्याच घरासमोर उभे होतो. आमचे हे दार उघडायची वाट बघत होतो. तेवढ्यात ती आली. एका हातात भाजीची पिशवी आणि एका हातात दूध. फार दमलेली दिसत होती. तशी कपड्यांवरून वगैरे बरी वाटली म्हणा. बोलावं की नाही असा विचार करत होते. आजकालच्या मुलींचं काही सांगता येत नाही हो.परकं माणूस बोललेलं आवडेल, न आवडेल. त्यात ती हिंदीभाषिक असेल तर, आमची हिंदी म्हणजे 'तेरा नाव क्या है?' टाईपची. ओळख व्हायच्या आधीच 'काय खोचक म्हातारी आहे! ' असं वाटायचं तिला. हे असे सगळे विचार सुरु असतानाच ती म्हणाली,
'काय म्हणताय काकू?'
आवाज गोड होता पोरीचा. आणि मला आजी न म्हणता काकू म्हणाली म्हणून आवडलीच मला ती पटकन.
'तू इथे राहतेस? '
'हो ना, सहा सात महिने झाले.'
'दिसली नाहीस कधी. एक कोणीतरी दिसतो घरात अधून मधून. मला वाटलं कोणी बाप्या एकटाच राहतो की काय.'
'तो नवरा माझा.'
नवरा आहे म्हणल्यावर जरा बरं वाटलं मला. नाहीतर काही सांगता येत नाही हो. सुलु म्हणत होती परवा, 'अगं नीट, हल्ली गळ्यांत मंगळसूत्र असतं पण लग्न झालेलं असेलंच असं नाही. फक्त फॅमिलीला जागा देतात ना, मग जागेसाठी हे असं चालतं.'
'अच्छा.. इतके दिवस राहताय इथे. खरं आज दिसलीस तू. ये ना चहा प्यायला..'
'नको काकू, परत येईन कधीतरी.' असं म्हणून ती गेली.
अहोंनी दार उघडलं होतं. मीही आत गेले. थोडक्यात काय, तिची आणि माझी अशी भेट झाली. आणि नंतर होतच राहिली.
कधी 'काकू, माझं एक पार्सल येणार आहे. इथल्या पत्त्यावर. पण आम्ही तर नसतो घरी. ठेवून घ्याल?' म्हणत. किंवा
'काकू, सुरळीच्या वड्या केल्यात. आईला करताना पाहिलं होतं. स्वतःहून पहिल्यांदा केल्या. जरा चव बघता??' म्हणत
तर कधी 'एकतारी पाक करायचा आहे. साखर आणि पाणी ठेवलाय गॅसवर. जरा सांगायला येता? असं म्हणत
पोर लाघवी आहे. कधी त्यांच्या घरातून काय ते 'बद्रीकी दुल्हनिया' ऐकू येतं तर कधी 'अवघा रंग एक झाला'. नवल वाटतं या पोरांचं. एक मात्र आहे कायम हसतमुख असतात दोघं. एकंदरीत सुखी चालू आहे संसार. आमची नेत्रा ऑस्ट्रेलियाला गेली आहे तेव्हापासून घरात माणसांचं येणं जाणं कमीच झालंय. उत्साहाचा झरा आहे माझी नेत्रा. हिला पाहिलं कि नेत्राचीच आठवण येते मला. तशीच आहे ही. बरं झालं शेजारी आहेत. मध्ये ती काय बातमी वाचली ना 'आईच्या हाडांचा सापळा झाल्याचासुद्धा पोराला पत्ता नाही..' तेव्हापासून जरा अस्वस्थच वाटतंय. असो.. तुमच्याशी काय बोलत बसले. खालील गेलेले हे येतील एवढ्यात. चहा टाकते. येते बरं का!!!
---------------------------------------------------------
सहा सात महिन्यांपूर्वी शेजारी कधी नव्हे ते लवकर आले तेव्हा शेजारच्या दारात एक काकू दिसल्या. इथे राहायला आल्यापासून पहिल्यांदा कोणीतरी हसून बघितलं. तशी बरीच दमलेले मी. पण ओळख करून घ्यावी म्हणून म्हणलं,
'काय म्हणताय काकू?'
त्यांनी मग त्यांची जरा माहिती वगैरे सांगितली. निषाद एकटाच राहतो की वाटलं होतं त्यांना. त्यांची काय चूक म्हणा. जिथं एका घरात राहून आम्ही दोघं एकमेकांना वीकएंडशिवाय भेटत नाही तिथं त्यांना भेटायला कधी वेळ मिळणार? तर, असंच टाईमपास काहीतरी बोलून मी तेव्हा बाय म्हणलं. नंतर भेटत राहिलो म्हणा आम्ही तसं.
कधी त्यांच्याकडचा गॅससिलेंडर संपला तो बदलून द्यायला तर कधी त्यांच्या चष्म्याची काच तुटली ती दुरुस्त करून आणायला तर कधी झोपाळ्याच्या गजांना तेल पाणी करायला..
मस्त आहेत काका काकू. साठीचे असतील. पण एकदम टुकटुकीत आहेत. काकांना डायबेटीस आहे जरा. तेवढं चालायचंच.
मध्ये मी पुरण घातलं होतं. युट्युब वर 'अशी कन्सिस्टन्सी हवी.' म्हणून सांगत होती ती शेफ. तेव्हाच काकू आल्या. एकीकडे कढई, एकीकडे युट्युब असं बघून म्हणाल्या. ' बंद कर ते आधी. अगं सोपं असतं पुरण घालणं. डाव हा अस्सा उभा राहिला न की समजायचं पुरण झालं.' आईची फार आठवण आली तेव्हा. इतके वर्ष झाली घराबाहेर आहोत. आता दोन घरं आहेत पण जायला वेळ नाही. सणांचीसुद्धा कुठल्या घरी कधी अशी विभागणी झालेली आहे. या काका-काकूंना पाहिलं की आई-बाबांची आठवण येते. माझ्या आणि निषादच्यासुद्धा. शेजार चांगलं आहे दोन्हीकडे म्हणून बरं. नाहीतर कायम आम्हाला काळजी. वयं झालीत चौघांची. BP मागं लागलंय. जरा कुठे दुखलं खुपलं की आमचा जीव वर खाली होतो. जाताही येत नाही आणि राहवतही नाही असं सगळं विचित्र झालंय. बरं झालं निदान हे काका-काकू तरी आहेत. आमच्यापरीने आम्ही त्यांची काळजी घेतो. आमच्याही आई-बाबांची कोणीतरी काळजी घेतच असतं ना. झालीच त्याची परतफेड तर बरं.....
असो... गप्पा मारण्यात कसा वेळ गेला कळलंच नाही. माझ्या झुंबा क्लासची वेळ झाली. निघते मी. बाय!!!!!

आधुनिक दुर्गा - उर्मिला!!


उर्मिलेचा जन्म झाला तो एका अत्यंत कर्मठ घरात. तीन मुलींवर झालेली ती चौथी मुलगी. अर्थातच तिच्या जन्माचा आनंद वगैरे साजरा झालाच नाही. त्यांचे वडील व्यापारी होते. पैशामागून पैसा येत असतो एवढंच त्यांना माहित होतं. त्यामुळं ते सतत कामात असायचे. इतर घरात जसं कुटुंब एकत्र बांधलेलं असतं तसं त्यांच्या घरात कधी झालंच नाही. त्यांचा बायकोशी संबंध फक्त रात्रीपुरता. तेसुद्धा त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल तसा. अगदी सर्वसामान्य खेड्यांत जसं असतं तसं वातावरण होतं तिच्या घरी.
त्या चारही बहिणींवर प्रचंड बंधनं असायची. केस किती कापायचे, कपडे कुठले घालायचे इथपासून अगदी कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही इथपर्यंत. भरतपूरसारख्या छोट्या गावात पोरीची बदनामी झाली तर तिच्याशी लग्न कोण करणार हा विचार होता त्यामागे. पोरीला उजवलं म्हणजे आपली जबाबदारी संपली या अत्यंत दुर्दैवी विचारामुळे त्या सगळ्या बहिणी सज्ञान होण्याआधीच त्यांच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात झाली.
मिस्टर ननावरे बघायला आले तेव्हा उर्मिला अकरावीत होती. बँकेत बऱ्यापैकी कमावणारा मुलगा या एका निकषावर लगेच सगळं ठरलं. खरंतर खूप शिकायचं होतं तिला, छोट्या शहरात राहूनही काहीतरी करून दाखवायचं होतं. पण ती स्वप्नं पूर्ण होण्याआधीच तिचं लग्न झालं. खूप शिकणं राहिलं बाजूलाच, बारावीसुद्धा पूर्ण करू शकली नाही ती.
लग्न झालं आणि काही काहीच दिवसातच तिला दिवस गेले. स्वतःला कसं सांभाळायचं हे शिकायच्या आधीच आणखी एका जीवाची जबाबदारी अंगावर पडली. 'आता एकदा मुलं झाली की आपण आयुष्यात काहीच साध्य करू शकणार नाही' या विचाराने ती पूर्णपणे गळून गेली. मिस्टर ननावरे दिवस दिवस घरी नसायचे. बायकोला पैशाच्या बाबतीत फार कळू देऊ नये या विचारांचा तो नवरा असल्याने ते नक्की किती कमावतात, किती खर्च होतो याबद्दल तिला कधी काही कळलंच नाही. घरी सासूबाई नव्हत्या. त्यामुळं आला गेला, पै-पाहुणा सगळं तिलाच बघावं लागे. तरीही तो सगळं खर्च भागवून ती पै पै साठवत राहिली.
या सगळ्या परिस्थितीत एक दिलासा मात्र होता. तो म्हणजे उर्मिलेचे सासरे. त्यांना तिची घालमेल समजत होती. एकदिवस ती अतिशय अस्वस्थ असताना ते म्हणाले, 'बेटा, मुलं झाली म्हणजे सगळं संपत नसतं. मी बघतोय तुला. काहीतरी करून दाखवायची धमक आहे तुझ्यात. तू बारावी पूर्ण कर म्हणजे अनेक संधी मिळतील तुला पुढे आयुष्यात.' त्यांनी प्रेरणा दिल्यामुळंच तिने बारावीकरता प्रवेश घेतला. पण बाळंतपणामुळं तेव्हाही बारावी पूर्ण झाली नाही. आणि तिला नैराश्याने ग्रासलं.
दरम्यानच्या काळात तिची मुलगी, सावरी मोठी होत गेली आणि उर्मिलेचं जग मात्र छोटं होत गेलं. सावरी सहावीत वगैरे असेल तेव्हा मिस्टर ननावरेंची नोकरी गेली आणि ते तिघं मुंबईत आले. स्वप्ननगरी, इथे आल्यावर जे पाहिजे ते मिळतं अशी ख्याती असलेली मुंबई. इथं आल्यावर उर्मिलेला मात्र गुदमरायलाच झालं. एवढी गर्दी, सतत धावपळ, बोलायला कोणी नाही अशा सगळ्या परिस्थितीत तिच्या नैराश्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली. 'आपण आयुष्यात काहीच केलं नाहीये', 'आपली कोणालाच गरज नाहीये मग जगून तरी काय फायदा?' अशा विचारांनी तिचं काळीज पोखरून निघायचं. सावरीला ते जाणवायचं. पण ती काहीच करू शकायची नाही. मिस्टर ननावरेंना त्याच्या काळजीतून उर्मिलेकडे बघायला सवडच नसायची. इतर कोणाकडे मदत मागावी तर आजूबाजूला ओळखीचं कोणीच नव्हतं. शेवटी तिने ठरवलं, 'जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे.' मग पहिली पायरी म्हणून मग तिने बारावी पूर्ण करायची ठरवलं. डॉनबॉस्कोमध्ये प्रवेश घेतला आणि अखेरीस तिची बारावी पूर्ण झाली.
मुंबईमध्ये राहून एव्हाना एक गोष्ट तिच्या लक्षात आलेली होती. इथे सगळं सेल्फ मेड आहे. सगळ्यांची आपापली स्वप्नं आहेत. लोक तुम्हाला जगायला मदत करतात, पण तुमची स्वप्नं तुमची तुम्हालाच पूर्ण करावी लागतात. तिची बारावी तर झाली होती. पण पुढे काय? हा प्रश्न मात्र कायम होता.
एकेदिवशी अशाच विमनस्क मनःस्थितीत करी रोड वरून घरी येताना तिने पाहिलं एका लहान मुलीला एक मवाली पोरांचा घोळका त्रास देत होता. सगळे दारू पिऊन तर्रर्र होते. कशाचंच भान नव्हतं त्यांना. त्या मुलीला प्रतिकार करायची संधीच नव्हती. आजूबाजूचे पुरुष नुसते बघत होते. काहींनी तर व्हिडीओदेखील काढायला सुरुवात केली. तिला प्रचंड राग आला, चालू असलेल्या प्रकारची तिडीक डोक्यात गेली आणि हातात असलेली पर्स गरागरा फिरवत ती त्या घोळक्यावर चालून गेली. तिचा तो आवेश बघून आजूबाजूच्या चार बायासुद्धा मदतीला आल्या. एवढ्या बायका अचानक अंगावर आलेल्या बघून तो घोळका पांगला आणि ती लहानगी वाचली.
तेव्हा अचानक उर्मिलेच्या लक्षात आलं. हे काहीतरी नवीन घडलंय आज. कुठलंही ट्रेनिंग नसताना, म्हणावा तेवढा आत्मविश्वास नसताना फक्त अन्यायाची चीड आली म्हणून ती करू शकत असेल तर थोडं ट्रेनिंग आणि काही साधनं हातात असतील तर आपल्या पोरी-बाळींना कुठलाही त्रास सहन करावा लागणार नाही. हा विचार मनात आला आणि दुसऱ्याच दिवशी तिने त्या अनुषंगाने माहिती गोळा करायला सुरुवात केली. सर्वांत आधी कराटे क्लास लावला, स्व-संरक्षणाची वर्कशॉप्स केली. इतके वर्ष पै पै साठवून ठेवलेला पैसा या कामात खर्ची घातला. कराटे शिकत असतानाच स्वतःच्या घरात आजूबाजूच्या मुलींना स्व-संरक्षणाच्या युक्त्या सांगायला लागली. त्यासाठी नाममात्र फी घ्यायला सुरुवात केली. हे सगळं मिस्टर ननावरेंना न सांगता सुरु होतं. न जाणो ते परवानगी देतील की नाही.
बघता बघता शिकायला येणाऱ्या मुलींची संख्या एवढी वाढली की तिचं घर पुरेनासं झालं. आणि तिचे हे उपद्व्याप मिस्टर ननावरेंना समजले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी उर्मिलेला पाठिंबा दिला. आर्थिक मदतही केली. स्वतःला मुलगी असल्यामुळं कदाचित बापाच्या जीवाची काळजी तिच्या मदतीला धावून आली.
मग काय, तिने घराजवळच एक हॉल भाड्याने घेतला आणि व्यावसायिकरित्या या शिकवणीला सुरुवात झाली. आज तिच्या 'स्त्री-शक्तीच्या' तीन शाखा आहेत. हजारो मुली स्व-संरक्षणात पारंगत झालेल्या आहेत. एकेकाळी शून्यात असणारी तिची नजर आता स्वप्नं पुरं होताना बघत आहे. कोणत्याही मुलीला स्वतःला अत्याचारापासून वाचवण्यासाठी आत्महत्या करावी लागू नये, चालत्या ट्रेन मधून उडी घ्यावी लागू नये, घरात कोंडून बसावं लागू नये हे उर्मिलेच्या संस्थेचं ध्येय आहे.
संस्थेत शिकणाऱ्या मुली जेव्हा त्यांना आलेल्या वाईट अनुभवांवर त्यांनी कशी मात केली हे सांगायला उर्मिलेकडे येतात तेव्हा तिला आठ-दहा वर्षांची परकरी उर्मिला आठवते, काही कळायच्या आत तिच्याभोवती पडलेला हातांचा विळखा आठवतो. नको नको तिथे झालेले स्पर्श आठवतात. तेव्हा आपण असहाय्य होतो पण आज या मुली तशा नाहीत हे जाणवतं, त्यांना कवेत घेते, कुरवाळते आणि मनापासून आशीर्वाद देते...
-तन्मया (२७ ऑक्टोबर १७)
**कथा आणि पात्रं काल्पनिक आहेत.