Sunday 11 September 2016

एक संवाद रोजचाच!!

फोन वाजतो..
(तिकडून)आई : हेल्ल्लो... कशी आहेस??
मी: मस्त, तू कशी आहेस..
आई: मी व मजेत.. काय जेवलीस?
मी: नेहमीचंच. पोळी भाजी आणि कोशिंबीर.. तुम्ही?
आई: भाकरी, आमटी, कोबीची भाजी आणि वरण भात..
मी: वाह.. बाकी बरी आहेस ना..
आई: हो.. तू ठीक आहेस ना..
मी: हो.. चल, झोप तू आता..
आई: हो, तू पण.. गुड नाईट..
मी: गुड नाईट..

आता यात वेगळं असं काहीच नाही. बऱ्यापैकी सगळ्या घरात होणार संवाद आहे.. तरीही हा खूप अर्थपूर्ण संवाद आहे.. कारण यातलं खरं संभाषण काहीसं असं असतं..
फोन वाजतो..

(तिकडून)आई : हेल्ल्लो... कशी आहेस??
(तिचा आवाज ऐकून मला कळावं कि ती आनंदात आहे(कधी कधी नसली तरीसुद्धा), म्हणून ती अतिशय उत्साहाने हॅल्लो म्हणते.. आम्हाला 'कशी आहेस' हे विचारणं म्हणजे एक बहाणा असतो आमचा आवाज ऐकण्याचा.. दिवसभर दोघींच्या कामाच्या व्यापातून बोलायला सवड झालेली नसते.. म्हणून हा रात्रीचा कॉल..)

मी: मस्त, तू कशी आहेस..
(आमचा मूड किंचितही ठीक नसेल तर तिला कसं काय कळतं देवच जाणे, त्यामुळं आजकाल आम्हीसुद्धा गरज पडल्यास खोटं अवसान आणून हे आनंदाने बोलतो.. बऱ्याचदा म्हणायचं असतं, "आई, खूप आठवण येते ग तुझी.. सगळं एकटीने करताना दमायला होतं." पण मग आमच्याएवढी असताना अख्खा संसार सांभाळलास तू हे आठवून आम्ही 'मस्त'च आहोत असं सांगतो..)

आई: मी पण मजेत..
(मुली बाहेर असतात मग काय, दोघांचा राजाराणीचा संसार असं वाटतं लोकांना. पण पोरींनो, दिवसरात्र काळजी वाटते. कशा राहत असाल, काय खात असाल, कोणाकोणाच्या नजरा झेलत असाल असं वाटत राहतं दिवसभर.. काम नसेल तर दिवस खायला उठतो. आजकाल पेशंट्स जास्त आहेत तेच बरंय. टाच दुखते सतत उभं राहून. पण कामात असलेलंच बरं.. नसते विचार नकोतच..)

काय जेवलीस?
(जेवलीस तरी का गं नीट. बाहेरचं खाऊ नकोस बाळा जास्त. पर्याय नसतो माहित आहे मला पण तब्येतीला जप.. तुमची पिढी सगळ्यांत जास्त दुर्लक्ष करते शरीराकडे.. असं नाही चालत.. नीट खात पीत जा.. दुधा-तुपाने वजन वाढत नाही. ते गरजेचं असतं आपल्याला..)

मी: नेहमीचंच. पोळी भाजी आणि कोशिंबीर.. तुम्ही?
(आजसुद्धा उशीरच झाला घरी यायला. आल्यावरसुद्धा काम होतं.. आवरेपर्यंत दहा वाजले.. मग पटकन जे सुचलं ते केलं. जवळपास 30 वर्ष स्वतःचे सगळे व्याप सांभाळून इतका सुग्रास स्वयंपाक कसा केलास तुझं तुलाच माहित.. आम्हाला कधी जमेल का गं असं???)

आई: भाकरी, आमटी, कोबीची भाजी आणि वरण भात..
(आजकाल फार होत नाही गं.. आणि दोघांसाठी काय काय करणार.. त्यात आम्ही खाणार चिमणीएवढं.. पिठलं करून काळ लोटला.. तू नसतेस ना खायला आता. आणि बाबांना आवडत नाही.. तू आलीस कि मस्त दही-भेंडी, पिठलं, घुटं असं खाऊ आपण..)

मी: वाह.. बाकी बरी आहेस ना..
(एवढ्या लांबून फक्त हेच विचारू शकतो आम्ही.. काल बाबा सांगत होते, तुला दम लागतो अधून मधून.. तू काही हे सांगणार नाही मला स्वतःहून.. आणि मी ही तुला विचारणार नाही.. काळजी घे फक्त.. चहा कमी पी.. तेल-चुरमुरे खाऊ नको..)

आई: हो.. तू ठीक आहेस ना..
(मी ठीकच.. पूर्वी-इतका उत्साह नाहीये आता.. तुम्हीसुद्धा दमून येता.. तुम्हाला काय कमी व्याप आहेत. आमच्या कथा सांगून उगाच आणखी टेन्शन द्यायला नको वाटतं.. एकेकट्या राहता.. काळजी घ्या.. जग तितकंसं चांगलं राहिलं नाहीये..)

मी: हो.. चल, झोप तू आता.. गुड नाईट..
(ज्याचे त्याचे टेन्शन्स..तुम्हाला सांगून एवढ्या लांबून तुम्ही तरी काय करू शकणार आहात.. त्यापेक्षा नाहीच बोलत मी.. आठवण येतेय खूप.. रडायला यायच्या आधी गुड नाईट..)

आई: हो, तू पण.. गुड नाईट..
(काम करून दमताय तर फेसबुक कमी करा जरा.. जीवाला शांत झोप मिळूदे.. आमची काळजी करू नका.. तुम्ही ठीक असलात कि आम्ही मजेत असतो..)

तमाम आई-बाबांना या पोस्टद्वारे a big thank you !!

*असा हा संवाद मांडायची मूळ कल्पना माझी नाही.. कोरावर या प्रकारची एक पोस्ट होती.. मी मराठीत लिहिली.. थोडा स्वतःकडचा मसाला टाकून...

No comments:

Post a Comment