पिंक पाहिल्यानंतर नंतर मनात खूप विचार आलेले, बरेचसे वाईटच विचार. 'त्या' विषयावर लिहायचं असं बरेच दिवस वाटत होतं. सिनेमामुळे मुहूर्त लागला. संपूर्ण आठवडा तोच विषय डोक्यात होता. किती सहन करायचं, का करायचं वगैरे वगैरे.. अशावेळेस मग अचानक आयुष्यात 'माणूस' म्हणून भेटलेले अनेक पुरुष आठवले आणि आपोआप शांत वाटायला लागलं..
आजची ही पोस्ट अशाच सगळ्या परिचित, अपरिचित पुरुषांना ज्यांनी, कळत-नकळत आम्हांला मदत केली आहे आणि स्वतःमधील माणूसपण जिवंत ठेवलं आहे..
खूप लहान होते मी, नुकतीच शाळेत जायला लागले होते. घराला लागूनच शाळा होती आमची. त्यामुळे शाळेतून न्यायला-आणायला सहसा कोणी यायचं नाही.. शिपाई काका मात्र शाळेच्या गेटजवळ उभे राहायचे. मी वाड्यातून आत गेलेली दिसले कि मग शाळेत परत जायचे.
वालचंदमध्ये मेसचं खाताना ज्या दिवशी फीस्ट असायची तो दिवस खास असायचा. मेसचे काका आम्हा चार-पाच मुलींसाठी त्या दिवशीचा स्पेशल पदार्थ वेगळा काढून ठेवायचे, उन्हाळ्यात तर आईस्क्रिमचे दोन स्कुप जास्त मिळायचे.
मुंबईत तर अनेक चांगली माणसं भेटली. सगळ्यांत पहिल्यांदा तिथे गेले तेव्हा सायन कुठे? भांडुप कुठे? काsssही माहित नव्हतं.. वाशी गेल्यावर मी कंडक्टर काकांना विचारलं, 'मला भांडुपला जायचंय, कुठे उतरू?' त्यांनाही फारसं माहित नव्हतं.. तेव्हा एक जण म्हणाला, 'काळजी करू नका. मी सांगतो. मीही तिकडेच जाणारे.' त्यानंर त्याने आम्ही बस मधून उतरून, तिकीट काढून, प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत सगळी मदत केली.. 'कसलीही' अपेक्षा न करता..
पुढे ठाण्यात असताना एकदा साधारणतः पहाटे साडेपाच-सहाला पोहोचणारी बस साडेचारलाच पोहोचली.. बाहेर तुफान पाऊस.. आसपास रिक्षा, टॅक्सी काहीच नव्हतं. तसं स्टॉपपासून घर जवळच होतं पण माझ्याकडे सामान बरंच होतं.. ते सगळं सावरत हळू हळू मी जात होते.. तेवढ्यात एक रिक्षा थांबली, चालक पचकन थुंकला.. नाही म्हणलं तरी मला भीती वाटली. त्याने विचारलं, 'कुठे जायचंय?' मी सांगितल्यावर 'बसा' म्हणाला.. घराजवळ आणून सोडलं.. 'किती पैसे झाले असं विचारलं तेव्हा म्हणाला,'ताई, मी घरीच जात होतो आत्ता.. तुम्ही दिसलात.. एकटीने असं जाणं धोक्याचं वाटलं.. माझी बहीण असती तर मी तिच्याकडून पैसे घेतले असते का!!' फार छान
वाटलं ते ऐकून..
बसमधून जाताना वारा लागला कि झोपणं हा माझा लाडका छंद आहे.. माझं घर म्हणजे ऑफिसच्या बसचा शेवटचा स्टॉप होता.. तिथे सगळे उतरले कि दोन किलोमीटर पुढे एका मैदानात बसेस लावल्या जायच्या.. एक दोन वेळा माझ्या झोपेच्या नादात मी स्टोपवर उतरायची विसरूनच गेले, बस थांबली आणि गरम व्हायला लागलं तशी मला जाग आली.. ड्रायव्हर काका, उतरून निघतच होते.. त्यांनी मला पाहिलं, परत गाडी सुरु केली आणि मला घरी आणून सोडलं..
नंतर आत्ता अगदी परवाची गोष्ट.. एका गार्डन मध्ये गेलेले.. तिथे एक आजोबा आले.. माझी चौकशी केली आणि जाताना, 'You're a brave girl, God bless you my child' असा आशीर्वाद देऊन गेले..
आम्ही लहान असताना आई एक गोष्ट सांगयची.. त्याचा अर्थ काहीसा असा होता कि जगात 36 प्रकारची चांगली माणसं आहेत.. आणि त्यांच्या पुण्याईमुळेच जग चालू आहे.. ती 36 प्रकारची माणसं दीर्घायू व्हावीत हीच बाप्पाकडे प्रार्थना.. __/\__
No comments:
Post a Comment