Friday 9 September 2016

नांदा सौख्यभरे!!

असाच अनेक रविवार सारखा एक रविवार. पुण्यातली दुपारची वेळ. सगळी कामं व्यवस्थित आवरून रेवा आपल्या 2BHK flat मध्ये आरामशीर पडली होती. नीरज नेहमीप्रमाणे office च्या कामासाठी जपानला गेला होता. तो परत येईपर्यंत तिच्या हक्काच्या निवांतपणाला कोणी त्रास देणार नव्हतं. सकाळच्या कामातून आत्ता जरा मोकळं झाल्यावर तिने Times उघडला. ती आधी काम करत असलेल्या कंपनीने एका competitor company ला takeover केलं होतं. तिला कंपनीमधले जुने दिवस आठवले. एकदम up to date असणारी रेवा सुरुवातीपासूनच smart Performer होती. तिचा स्मार्टनेस फक्त कपडे आणि looks पुरताच नव्हता. त्यामुळं संपूर्ण team मध्ये रेवा उठून दिसायची. काहींच्या विशेष नजरेत भरायची. तिच्या गुणांवर, रूपावर भाळलेला नीरज तिला विशेष निरखत असायचा. तिचं फक्त “असणं” त्याच्यासाठी Job motivation असायचं. रेवासुद्धा हे सगळं जाणून होती. सुरुवातीला team सोबत lunch ला जाणारे दोघं काही काळाने lunch time झाला की कामाचे बहाणे शोधायला लागले होते. दोघांनाच breakfast, lunch साठी जाता यावं म्हणून गनिमी कावा करायला लागले होते. ऑफिस संपल्यानंतर कधी CCD तर कधी Barista च्या फेऱ्या वाढू लागल्या होत्या. सगळ्यांना हे कळत होतं.
अथर्वला मात्र हे पचवणं थोड जड जात होतं. तो आणि रेवा college मध्ये असल्यापासून एकमेकांचे मित्र होते. त्यांचं चांगल जमायचंदेखील. आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी एकमेकांना सांगितल्या होत्या. ऑफिसमध्ये आल्यावर अथर्व आणि नीरजसुद्धा एकमेकांचे चांगले मित्र बनले होते. रेवा मैत्रीपलीकडे जाऊन अथर्वचा विचार करत नव्हती परंतु अथर्वला मात्र रेवा आवडायला लागली होती. अशा परिस्थितीमध्ये त्याला नीरज आणि रेवाला सोबत बघणं जड जात होतं. असे बरेच महिने गेले. अथर्वची मुंबईला बदली झाली. साहजिकच त्याचा आणि रेवाचा contact कमी झाला. रेवा आणि नीरज भावी आयुष्याची स्वप्नं रंगवण्यात दंग होते. दोघंही सुशिक्षित, सुसंस्कृत आणि मनमिळाऊ असल्याने दोन्ही घरांनी लग्नाला संमती दिली. “Neeraj weds Reva” चा समारंभ थाटामाटात पार पडला आणि ते सुखाने नांदू लागले.
जसा जसा काळ पुढे सरकत होता तसा दोघांच्याही कामाचा ताण वाढत होता. रेवाने कंपनी बदलली होती. नवीन ठिकाणी ती business development manager होती. नीरजनेदेखील जुनी कंपनी सोडून स्वतःचा business सुरु केला होता. त्यात बरकत होत होती. बँक account फुगत होतं. meetings च्या निमित्ताने नवनवीन देशांना भेटी देता येत होत्या. अधेमध्ये सुट्टी घेऊन long vacation ला जाता येत होतं. या सगळ्याची एक मोठी किंमत मात्र त्यांना मोजावी लागत होती. लग्नाआधी आणि नंतरच्या गुलाबी दिवसात एकमेकांशिवाय चैन न पडणारे ते दोघं आता एकमेकांना फक्त “reporting” करत होते. “आज यायला उशीर होईल गं, वाट बघू नको, जेवून घे, उद्या ६:०५ ची flight आहे, हे आणि ते. रेवाला हे सगळं खूप त्रासदायक वाटत होतं. तिने एकदोनदा नीरजशी बोलण्याचा प्रयत्नही केला आणि तिच्या लक्षात आलं कि नीरजला फारसा फरक पडत नाहीये. त्याची कंपनी स्वतःचं valuation वाढवत होती आणि नीरजला तेच जास्त महत्वाचं वाटत होतं.
एवढ्यात तिचा मोबाईल वाजला आणि ती वर्तमानात आली. तिला फेसबुकवर एक मेसेज आला होता. त्यात हाय हेल्लो काहीच नाही. फक्त एवढंच, “काय ग मुली, प्रेमात पडलीस, लग्न केलंस आणि जवळच्या मित्राला मात्र विसरून गेलीस ना.” जवळपास वर्षभराने अथर्वचा मेसेज आला होता. अशा मेसेजेसची रेवाला आताशा सवय झालेली होती. सेंटी सुरुवात करून काहीतरी काम सांगणारे मेसेजेस तिला नवीन नव्हते. पण अथर्व जुना मित्र आहे, बघू तरी काय म्हणतो म्हणून तिने बोलायला सुरुवात केली. मग फेसबुकवरून बदललेल्या नंबरची देवाण-घेवाण झाली. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी भेटायचं ठरवलं. रेवाने हे सगळं अतिशय उत्साहाने नीरजला सांगितलं. त्यावर त्याचं दोन शब्दांत उत्तर आलं, “अरे वाह!” नाही म्हणलं तरी ती थोडी हिरमुसली.
दुसऱ्या दिवशी रेवा मस्त आवरून अथर्वला भेटली. दोन एक तास बोलले दोघंजण. सुरुवातीला जरा अवघडलेपण होतं. पण जशा जशा जुनी आठवणी निघाल्या, कॉलेजचे दिवस आठवले तसं दोघंही मोकळेपणाने बोलू लागले. आणि मग वेळ कसा गेला कळलचं नाही. उशीर व्हायला लागल्यावर रेवा जायला निघाली. गप्पा मारून पोट भरलं होतं. बऱ्याच महिन्यांनी ती कोणाशीतरी एवढ्या मोकळेपणाने बोलली होती. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
असेच काही दिवस गेले. रेवा आणि अथर्वची पुन्हा एकदा घट्ट मैत्री झाली. एकटेपणाला कंटाळलेली रेवा आता मात्र खुश होती. तिला हवं तेव्हा तिच्याशी बोलणारं कोणीतरी तिला मिळालं होतं. तिच्यातला हा बदल अथर्वनेसुद्धा ओळखला होता. मात्र या सगळ्या गोष्टी घडत असताना नीरज फक्त आणि फक्त काम करत होता. तो कधीही रेवाबरोबर अथर्वला भेटायला आला नाही कि रेवाकडे त्याची चौकशी केली नाही. नीरज संपूर्ण नीरस होऊन जगत होता. या पार्श्वभूमीवर अथर्वचा जिवंतपणा, त्याचा जगण्याचा दृष्टीकोन, work-life balance याचं रेवाला खूप कौतुक वाटायचं. तिने कधी बोलून नाही दाखवलं पण अथर्वला तिच्या नजरेत हे दिसायचं.
एकेदिवशी whats app वर गप्पा मारता मारता रेवा पटकन बोलून गेली, “अथर्व, कुठे होतास रे इतके दिवस. थोडं आधी भेटायला हवा होतास बघ” त्या बोलण्यामागे जी व्याकुळता होती ती अथर्वला समजली. तो रेवाला सहानुभूती देऊ लागला. साहजिकच रेवाचा अथर्वकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला लागला. आणि हे सगळं नीरजच्या गावीही नव्हतं.
एका रात्री नीरज उशिरा घरी आला, त्याने packing केलं, दुसऱ्यादिवशीच्या flightचं timing सांगून तो झोपला. सकाळी रेवाला न सांगताच तो निघून गेला. रेवा उठली, नीरज गेलेला लक्षात आल्यावर, “रोबो झालाय याचा, लग्नाचा पहिला वाढदिवससुद्धा लक्षात असू नये माणसाच्या.. याच्यापेक्षा अथर्व किती lively आहे... असो!” असं म्हणत एक उसासा टाकून तिने आवरायला घेतलं. एवढ्यात बेल वाजली. कपडे सावरत, केस ठीक करत ती hall मध्ये आली. दार उघडलं आणि आश्चर्याचा धक्का बसून दोन पावलं मागे आली. हातात गुलाब, आणि तिची लाडकी Cadbury silk घेऊन तो दारात उभा होता.
“तू??? तू इथे काय करत आहेस? तुझी तर मीटिंग होती ना. सकाळीच गेलास न तू. नक्की काय झालंय? तू परत का आला आहेस? सगळं ठीक आहे ना?”
“अगं राणी हो हो.. किती प्रश्न विचारशील? नवऱ्याला घरात तरी घेशील की नाही.” असं म्हणत तिला मिठीत घेतच नीरज घरात आला. तिच्या चेहऱ्यावरचे असंख्य प्रश्न बघून त्याला मजा येत होती. तिची आणखी मजा न घेता त्याने बोलायला सुरुवात केली, “रेवा, सगळ्यांत आधी मला माफ कर. कंपनीच्या कामात मी एवढा गुंतून गेलो कि मला कशाचंच भान राहिलं नाही. तुझ्या तक्रारींकडेसुद्धा ‘झालं हिचं सुरु परत’ म्हणत मी दुर्लक्ष केलं. पण एका मेसेजने माझे डोळे उघडले. मागच्या आठवड्यात मला अथर्वचा मेसेज आलेला. “काय रे, ***! तुझी बायको नकोय का तुला. बघ, माझं अजून लग्न व्हायचंय.” खरं सांगायचं तर मला त्याचा प्रचंड राग आलेला. त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता मी त्याला भेटायला बोलावलं आणि काय सांगू तुला, गड्याने मला पूर्णपणे जिंकलं. तुमचं रोज बोलणं होतं हे सांगितलं. तू एकटी पडत चालली आहेस याची अतिशय “प्रेमळ” शब्दांत जाणीव करून दिली. माझी चूक दाखवून दिली. मी भेटायला बोलवावं म्हणूनच ‘तसा’ मेसेज केल्याचं कबूल केलं. तू समोर असूनही मला जे दिसत नव्हतं ते त्याच्या त्या मेसेजने आणि बोलण्याने समजलं. तुझं असणं कायम गृहीत धरत गेलो मी. पण त्याच्या त्या मेसेजने मला जाणवून दिलं की तुला कोणी माझ्यापासून हिरावून नेलेलं मला चालणार नाही. सहन होणार नाही. तेव्हाच ठरवलं तुला सॉरी म्हणायचं. मग सरळ सरळ येऊन बोलण्यापेक्षा जरासं नाटक! असो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राणीसरकार.”
आता रेवाकडे बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. घट्ट मैत्रीने एक संसार परत सावरला होता. एका नव्या सहजीवनाची सुरुवात झाली होती...

15 comments: