Tuesday 6 May 2014

आधुनिक वाल्मिकी -- गदिमा!!



आज जे आपल्याला भेटणार आहेत त्यांच्या कवितेने, भावगीताने स्वरांची लेणी लेऊन अनेक पिढ्यांचं आयुष्य सुमधुर केल आहे.. जन्मतःच गेयगद्याची सिद्धी घेऊन आलेला हा अजरामर कलावंत.. कवितेशी जीवाभावाचं नात सांगणारा
"ज्ञानियाचा व तुक्याचा| तोच माझा वंश आहे ||
माझिया रक्तात काही| ईश्वराचा अंश आहे||
अस म्हणून संत-परंपरेचा वारसा अभिमानाने मिरवणारा अत्यंत प्रतिभावान कवी, साक्षात आधुनिक वाल्मिकी "ग दि मा" अर्थात अण्णा माडगुळकर...
गडकरी गेल्यानंतर
"मायबोलीचा किल्ला आता द्यावा कोण करी,
तेवढे सांगा न गडकरी...
दिक्कालातुनी बघा शाहिरा, दिसतो का तो तरी,
आपुला वारस गादीवरी!!!"
असा प्रश्न विचारात व्याकूळ होणारे गदिमा स्वतःच्याही नकळत त्यांचे वारसदार बनले...
अतिशय सहजतेने त्यांनी त्या असीम कवित्वाच प्रतिनिधित्व केल...
माणदेशातील एका छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला.. आजुबाजूच वातावरण तसं निरक्षरच!! पण पोथ्या, कथा-कीर्तन, भजन यांमधून झालेले संस्कार.. आजूबाजूच्या निसर्गसौन्दर्याने आलेली रसिकता, आणि भाबड्या लोकांच्या संगतीमुळे आलेली निरागसता हे सगळ सगळ त्यांच्या कवितेमधून व्यक्त होत..
ते
"प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला !
दारी तव नामाचा चालला गजरू
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला !
दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला !
अस म्हणत प्रत्यक्ष विठ्ठलाला भूपाळी म्हणतात आणि त्याच वेळेस
" ये निद्रादेवी
तुझे सावळे हात प्रियाच्या पाठीवर ठेवी
घाव घेऊनी शोककथांचे
अंगावरती वण मुक्या व्यथांचे
वत्सलतेचे लेप मुलायम तूच हळू लावी
दु:खभागल्या या डोळ्यांवर
चंदनशीतल घालुन फुंकर
थकलेल्या या दिठिस उद्याची सुखस्वप्‍ने दावी
कृष्णे तुझिया मांडीवरती
लाभु देत या लव विश्रांती"
साद सुगंधित तुझा तूच या अंगाई गावी" अस म्हणत पालकत्व घेऊन अंगाई देखील म्हणतात...
छोटस गाव, रम्मीचा डाव, खेड्यातून लग्नानंतर होणारा 'गोंधळ', जागरण यासारखे साधे विषय सुद्धा त्यांच्या कवितेतून सुंदर होऊन येतात..
मुळातच सृजनशील असणारा पाऊस यांच्या लेखणीला नवे आयाम देतो..
वळीवाचा पाऊस आला कि गदिमा म्हणतात..
"माउलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार
भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार!!!"
पडणार्या पावसात सुद्धा त्यांना कविता दिसते, त्याला मल्हार रागाचा साज चढतो आणि एक अमीट गोडी असणार गीत तयार होत..
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा
कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा
वर्षाकालिन सायंकाळी लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा
कृष्णविरहिणी कोणी गवळण तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा"
असा हा पाऊस पडून गेला कि जमीन पेरणीसाठी तयार होते हा झाला आपला सरळ-साधा विचार.. पण गदिमा याची सुद्धा कविता करतात.. ते म्हणतात,
"स्नान झाले धरणीचे पडे सोन्याचा प्रकाश
आता बसेल माउली अन्नब्रह्माच्या पूजेस.." वाह !!!! उपमा अलंकार वापरावा तर गदिमांनीच...
एखादी कल्पना सुचावी आणि तिला सगुण रूप देणारे शब्द सहज समोर उभे राहावेत अशी हातोटी होती या माणसाची..असा कुठलाही गद्य-पद्य अविष्कार नाही ज्याला यांच्या लेखणीचा परिस स्पर्श झाला नाही...
आपल अख्ख आयुष्य त्यांनी गाण्यात मांडलं 'झुक झुक आगीनगाडी' म्हणत येणार बालपण असो, किंवा 'गोरी गोरी पान फुलासारखी छान' म्हणून दादाला चिडवण..
 'हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !'म्हणणारा प्रियकर असो
किंवा 'धुंद मधुमती रात रे, नाथ रे' म्हणणारी विवाहिता..
'चला सख्यांनो हलक्या हाते नखांनखांवर रंग भरा ग, नखांनखांवर रंग भरा म्हणणारी' सौभाग्याकांक्षीणी असो
किंवा 'आठव येतो मज तातांचा मम मातेच्या मृदू हातांचा' अस म्हणून हळवी होणारी माहेरवाशीण.. आणि शेवटी 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे' म्हणत येणारी तिन्हीसांज!!
अस एकदाही झाल नाही कि 'पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक त्याचेच त्या कळले तो राजहंस एक' ऐकताना अंगावर काटा आला नाही!!! याचं नाट्यगीत ऐकताना सुरावटीबरोबरच शब्द किती प्रभावी असतात हे कळत..
अनेक बोलकी शब्दचित्रे रेखाटणाऱ्या अण्णांनी फक्त मधुर रसातच रचना केल्या अस नाही तर
"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे" यासारखी अनेक स्फूर्ती गीते लिहिली..
राष्ट्रप्रेमाची प्रेमाची शिकवण देत असतानाच त्यांनी श्रमाची महती देखील सांगितली.. "तुझ कल्याण तूच करू शकतोस, मी रिक्त हस्त होण्यासाठी तयार आहे तू फक्त कष्ट कर, तुझी झोळी मोठी कर" अस म्हणत जणू श्रम-देवताच त्यांच्या तोंडून आपल्याला सांगते,
"मज नकोत अश्रू घाम हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा !
अपार लक्ष्मी माझ्या पोटी का फिरसी मग माझ्या पाठी
एक मूठभर अन्नासाठी जगतोस तरी का भ्याड जीवा ?
मोल श्रमाचे तुला कळू दे हात मळू दे, घाम गळू दे
सुखासिनता पूर्ण जळू दे दैन्यास तुझ्या हा एक दवा !"
आणि अस करत असतानाच अहोरात्र कष्ट करणाऱ्या थकल्या भागल्या जीवांना जरा विसावा घेण्यासही सांगते,
"चला जाउ द्या पुढे काफिला
अजुनी नाही मार्ग संपला
इथेच टाका तंबू !
जाताजाता जरा विसावा
एक रात्र थांबू-
इथेच टाका तंबू !"
प्रत्यक्ष पु.ल. म्हणून गेले आहेत, "अण्णा कविता लिहायला लागले कि प्रत्यक्ष वाल्मिकी त्यांना सांगत जातात आणि हा 'गजानन' त्या आपल्यासाठी उतरत जातो..
कवितेची नक्कल करताना सुद्धा तिला अस्सल बनवण्याचं कसब गदिमांकडे होत..
म्हणूनच मीराबाईंच "माई मैने गोविंद लीनो मोल" हे भजन " बाई मी विकत घेतला श्याम " मध्ये रुपांतरीत होत 
तर "झुमका गिरा रे" च्या वळणावर "बुगडी माझी सांडली ग" तयार होत...
या सगळ्यांतून त्यांचा अफाट व्यासंग, शब्दप्रभुत्व, मात्रा आणि वृत्त बद्ध रचनेवरील हुकुमत दिसून येते.. बालगीत म्हणू नका कि प्रेमगीत, लावणी म्हणू नका कि भजन आणि सगळ्याचा कळसाध्याय म्हणजे 'गीतरामायण'.. सारे रस येथे आकळले!!!
त्यांच्या विपुल लेखनाबद्दल थोडक्यात लिहिण म्हणजे कसरतच आहे खर.. कारण या महान विभूती बद्दल लिहाव तेवढ कमीच!!!!
पण शेवटी काय हो,
'मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे !
या वस्त्रा ते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्याचे!'
हा असा ग.दि. माडगुळकर नावाचा अविष्कार निर्माण करणाऱ्या त्या असीम विणकर्याला माझ त्रिवार वंदन.. ____/\____

**या लेखाची प्रेरणा म्हणजे आजवर वाचलेली ग. दि. मांची, ग. दि. मांवर लिहिलेली असंख्य पुस्तकं आणि लेख.. आणि अर्थातच इंटरनेट!!

2 comments: