Wednesday, 31 August 2016

रेखा मावशी... !!!

साडेचार पाच फुट उंची.. डोळ्यांवर जाड काड्या असणारा चोकलेटी रंगाचा चष्मा.. फिक्कट रंगांच्या साड्या, सकाळच्या गडबडीत हाताला मिळेल तो ब्लाउज घातलेला.. तोंडात मिश्री, अगदी कायम.. आणि अत्यंत चौकस नजर.. गेली अनेक वर्ष ही बाई अशीच आहे...
माझी आणि यांची भेट कधी झाली हे मला आठवणं शक्यच नाही.. माझ्या जन्माच्या आधीपासून या आमच्या घरात येत आहेत.. तसं पाहायला गेलं तर घरात केरवारे आणि भांड्याची कामं करायला येणाऱ्या मावशी अशी त्यांची ओळख.. पण आम्हा बहिणींना न्हाऊ-माखू घालण्यापासून सगळं यांनी केलं.. घरात आज्जी-आजोबा नव्हतेच कधी.. त्यामुळं बाळंतपणानंतर आईची काळजी घेणाऱ्यासुद्धा याच होत्या.. कामं करून झाली कि आम्हाला त्यांच्या गावाकडच्या गोष्टी सांगणाऱ्यासुद्धा याच होत्या.. आणि "काय सुसरींसारखं पसरलाय ग पोरींनो, उठा, मला केर काढायचाय असं म्हणून दरडावणाऱ्यासुद्धा याच होत्या..
मला आठवतं आमच्या शाळेची वेळ झाली असेल आणि तेवढ्यात आईकडे पेशंट आला तर त्यांनी आम्हाला मऊ-मऊ पोळ्यादेखील करून वाढल्या आहेत.. लहान असताना आमचे डबे भरून दिले आहेत.. आणि हे सगळं एका नव्या पैशाची अपेक्षा न करता..
मावशींनी तशी बऱ्याच घरांत कामं केली.. काही ठिकाणी त्यांचं घरातल्या लोकांशी जमलं नाही तर काही घरांचं त्यांच्याशी जमलं नाही.. याला एकच कारण होतं.. त्यांचा फटकळ स्वभाव आणि भाषा.. बोलताना चार-पाच शिव्या आल्या नाहीत तर त्यांना बोलल्याचं समाधान मिळायचं नाही.. त्यांच्या नादाने आम्ही "आयला, मायला" च्या वाटेवर जाऊ नये म्हणून आईने अनेकदा त्यांना समजावलं होतं.. सुदैवाने त्यांनी ते ऐकलं..
आईचं आणि त्यांचं मात्र फार सख्य.. त्यांच्या घरात खुट्ट जरी झालं कि "तनुची आई, ते असं हून ऱ्हायल शनी" असं म्हणत स्वारी हजर.. मग एकातून एक विषय निघत जायचा आणि त्या काम करत असलेल्या सगळ्या घरांबद्दल आम्हाला वृतांत सादर व्हायचा.. असं सगळं असलं तरी बाई कामाला एकदम चोख आणि प्रामाणिक.. त्यासाठी आम्हीही त्यांच्या गप्पांना दाद द्यायचो.. त्यांच्यामुळं आम्हाला या लोकांच्या विश्वाबद्दल कळत गेलं.. रोज नवऱ्याचा मार खाणाऱ्या या बाया.. फक्त 'कुकवाचा धनी' म्हणून त्याच्यासोबत नांदतात.. त्याचे दारूचे शौक पुरवतात.. आणि या सगळ्यांतून आपल्या पोरांना नीट वाढवतात.. सुदैवाने मावशींचा नवरा बराच बरा होता.. मोठ्या आजारातून उठल्यानंतर भरपूर शहाणा झालेला होता.. त्या दोघांचं आम्हा चौघांवर खूप प्रेम होतं.. फारशी मिळकत नसताना त्यांनी प्रत्येक अधिक महिन्यांत आई-बाबांना छोटंसं का होईना काहीतरी वाण दिलं.. आमच्या मोठ्या परीक्षांच्या निकालानंतर बक्षीस दिलं.. भरपूर मायेने पाठीवरून हात फिरवत आशीर्वाद दिले.. अगदी नेहमी..
पाच वर्षांपूर्वी आम्ही घर बदललं.. नव्या ठिकाणी त्यांना येणं शक्य नव्हतं.. आईचा दवाखाना मात्र त्याच घरी सुरु राहणार होता.. याचा त्यांना काय तो आनंद.. "तनुची आई, तुमी जा तिकडं, म्या मात्र हिथ रोज येन्हार.. न्हाई म्हणलात तरी येन्हार" असं म्हणून त्या आजही रोज तिथे येतात.. झाडू फिरवून जातात...
नवरा गेल्यानंतर मात्र मावशींचा स्वभाव कडक झाला.. कारणही तसंच होतं म्हणा.. यांचे आणि नवऱ्याचे जे काही थोडेफार पैसे होते ते सगळे नातेवाईकांनी परस्पर लाटले.. तरीही न बिथरता बाईंनी शून्यातून सुरुवात केली.. बँकेत FDs काढून पैसे साठवले.. आजच्या घडीला कामं न करता पुढचं आयुष्य जगता येईल एवढे पैसे त्यांच्या गाठीला आहेत.. मुलीचा सुखी संसार आहे... अत्यंत गोड अशी नात आहे.. तिचं आज्जीवर खूप प्रेम आहे.. आता कायमसाठी मुलीकडे जाऊन राहायचा त्यांचं ठरत आहे.. परवा अगदी डोळ्यांत पाणी आणून आईला म्हणत होत्या,"तनुची आई, पोरींच्या लग्नात मला विसरू नगा.. जिथ असन तिथन बिगी यीन बगा.. पोरींना बी सांगा.. मन्हाव, मावशी जीत्ती हाय त्यांची तवर कसलीबी फिकीर करू नगा"

हे लिहिलेलं त्यांना वाचता येईलच असं नाही.. पण आमच्या भावना मात्र नक्की पोहोचतील.. मावशी, जशा आहात तशाच राहा.. आणि एक लक्षात असुद्या.. "तुमच्या या पुरी तुम्हास्नी कंदी बी इसारणार न्हाईत.."

आताशा असे हे मला काय होते...!!

'बघितलंत कशी वागली ही सकाळी. आजकाल तिला काही सांगायची चोरीच झाली आहे. हल्ली माझं डोकं दुखतं, म्हणजे जरा जास्तच दुखतं. तिला सांगितलं तर म्हणाली, 'आई, तुझ्या मनाचे खेळ आहेत हे. सगळे रिपोर्ट्स ठीक आहेत तुझे. काही झालं नाहीये तुला..' म्हणजे मी काय खोटं बोलते का? तुम्ही गेलात आणि नंतर स्वतःकडे लक्ष न देता मी पोरीला वाढवलं. काय कमी खस्ता खाल्ल्या का मी.. आणि आज एवढी मॅनेजर झाली तरी आईशी चार शब्द प्रेमाने बोलावेत हे समजत नाही तुमच्या मुलीला..' शुभांगी हार घातलेल्या फोटोसमोर पदराला डोळे पुसत बोलत होती.. 'परवा मी बाथरूममध्ये होते. कपडे विसरले म्हणून खूप हाका मारल्या तिला. आलीच नाही. कसा कोण जाणे पाय घसरला माझा आणि पडले मी. तो आवाज ऐकू आला तिला. मग आली. आल्या आल्या 'लागलंय का तुला वगैरे नाहीच लगेच अशी कशी गं आई तू' म्हणून चिडली माझ्यावर. मी काय मुद्दाम करते का? पण नाही तुमच्या मुलीला आईचं प्रेम समजेल तर ना...' एवढ्यात 'शुभांगी काकू, मी आलेय ग.. पटकन काहीतरी खायला दे' अशी हाक आली आणि शुभांगी उठली.

'वाह मीना, आलीस तू... बरं झालं गं. आमच्या विभाला आईची काही काळजीच नाही. तू येतेस, चार शब्द प्रेमाने बोलतेस. बरं वाटतं' असं म्हणत शुभांगी किचनमध्ये पोहे करायच्या तयारीला लागली. नंतर दोघींच्या भरपूर गप्पा झाल्या. शुभांगीने मन भरेपर्यंत विभाच्या तक्रारी केल्या. शेवटी रात्रीचे साडेआठ होऊन गेले, विभाच्या येण्याची चाहूल लागली तशी मीना उठली. विभा यायला आणि मीना जायला एकच गाठ पडली.. विभाकडे 'एवढी प्रेमळ आई असून किंमत नाही तुला असा कटाक्ष टाकून मीना निघून गेली. काय झालं असावं याचा विभाला अंदाज आला. ती काही न बोलता रूममध्ये निघून गेली आणि किचनमधून भांडी आपटण्याचे आवाज यायला लागले...
त्या आवाजांकडे दुर्लक्ष करत विभा तशीच पडून राहिली. खरंतर आज तिला बोनस मिळाला होता. बऱ्याच दिवसांनी ती खुश होती. पण घरी आल्यावर जे झालं त्यामुळे तिचा मूडच गेला. बऱ्याच वेळाने आई झोपल्याची खात्री पटल्यावर ती बाहेर आली. दहा वाजून गेलेले. आईने आमटी भात काढून ठेवलेला. तो ओव्हन मध्येच गरम करून ती बाबांच्या फोटोसमोर जाऊन बसली. बाबांकडे बघितलं आणि तिचे डोळे भरून आले. 'असं का हो वागते तुमची बायको. तिच्यासाठी कितीही करा, तिला आनंद नाहीच. मध्ये एकदा मला सहज म्हणाली होती, 'तुझे बाबा अकाली गेले, माझी हॉटेल वगैरेची ऐश कधी झालीच नाही.' म्हणून हौसेने तिला तिच्या वाढदिवशी मस्त रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेले. तर सगळ्यांसमोर 'मला कशाला आणलंस इथे, त्यापेक्षा घरी मस्त वरणभात खाल्ला असता. इथे यांच्या डोक्यावर एवढे पैसे ओतायची काय गरज आहे तुला. माझ्याकडे नव्हते पण तुझ्याकडे रग्गड पैसे आहेत माहित आहे मला. पण म्हणून असं दाखवून द्यायची काय गरज होती' हे आणि ते.. नको नको ते... कसंबसं खाल्लं आणि निघालो तिथून. आजकाल तिला वाटतं मला तिची काळजीच नाही. मग मुद्दाम पडायचं, सारखं डोकं दुखतंय म्हणायचं. डॉक्टरकाका सुद्धा म्हणाले की हे सगळं मानसिक आहे. बाबा, मला नाही जमत हो हे आता. तिकडे कोर्टात तारखांवर तारखा पडत आहेत. पाच वर्षांचा संसार मोडतोय माझा. ती पाच वर्षं कशी गेली माझं मला माहित. सुरुवातीला बरं होतं. नंतर मात्र रोज शिव्या आणि मारहाण. मी तरी किती सहन करू. आईने जमवलेली सोयरीक ती. तिला वाईट वाटत राहील, लोकही तिलाच दोष देतील म्हणून सहन करत राहिले मी. जेव्हा असह्य झालं तेव्हा आले निघून. आता इकडे येऊन हे असं. माझ्यात ताकद उरली नाहीये आता. अशातच ती मीना येते, आईला काय काय सांगते. आईचाही पोटच्या मुलीपेक्षा तिच्यावर जास्त विश्वास. कायम माझी आणि मीनाची तुलना. त्रास होतो हो. बरोबरीच्या सगळ्या आपापल्या संसारात आहेत, त्यांना माझी दुखरी कहाणी सांगायला आणि त्यांची खरी/खोटी सहानुभूती मिळवायला नको वाटतं. अशात आई नाहीतर कोणाकडे मन मोकळं करू. आता तीही जागा हक्काची राहिली नाही. तुम्ही एवढ्या लवकर का गेलात बाबा, निदान आज, अशा हळव्या वेळेस तरी तुम्ही हवे होतात.." विभा हमसून हमसून रडत होती..
आणि दूरवर कुठेतरी हळुवार आवाजात गाणं वाजत होतं..
"कशी ही अवस्था कुणाला कळावे ?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे ?"..............

आईचं रक्षाबंधन....!!

"तसे मला सगळे सण आवडतात. एक रक्षाबंधन सोडला तर.." समोर दिसलेल्या राख्यांच्या माळा बघून ती स्वतःशीच पुटपुटली. 'आता सगळ्या मैत्रिणी राख्या घेतील, कुठल्या कुठल्या भावांना पाठवतील. भावांकडून मिळालेल्या भेटी आनंदाने मिरवतील. आणि मी. राखी बांधायला हक्काचं मनगटच नाहीये माझ्याकडे... असो..' विचारांना आवर घालत ती घरात आली. बाईसाहेबांचा मूड जागेवर नाही हे आईच्या लक्षात आलं. आईच ती! तिच्यापासून काही लपून राहू शकतं का! समोरच्या दुकानात राख्या पाहिल्यावर आईला काय झालं असेल याचा अंदाज आलाच. पण उगाच विषय काढला तर खपली निघायची म्हणून आई शांत बसली.

दिवसभराच्या सगळ्या गोष्टी आईला सांगून झाल्यावर तीच म्हणाली, 'आई, किती गं लकी आहेस तू. तुला भाऊ आहे. म्हणजे रक्षण करायला भाऊ हवा असं मला वाटत नाही. तरीही हक्काने बोलायला, मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायला, मित्रांच्या तक्रारी करायला आणि त्याच्याकडे बोट दाखवून 'तो आहे ना तो 'माझा' दादा' असं अभिमानाने म्हणायला कोणीतरी हवं होतं गं! दादा असता तर मस्त बाईक वरून फिरले असते, त्याच्या खास मैत्रिणींना भेटले असते. भरपूर भटकले असते. तो सोबत असताना कुठल्याही कोंडाळ्यातून जाताना कोणाची काही बोलायची हिम्मत झाली नसती. एक भाऊ हवाच होता मला.

'तो मुलगा चांगला नाहीये, त्याच्या नादाला लागू नकोस असं सांगणारा.. 'अगं, तू सासरी गेलीस कि परत तुला या घरात घेतच नाही बघ' म्हणून चिडवणारा पण मी जाणार या कल्पनेने हळवा होणारा.. मी रडले,पडले कि चेष्टा करायला पण भक्कमपणे आधार देणारा.. एक दादा हवाच होता मला आई!

बिचारी आई! हळव्या झालेल्या आपल्या पोरीला बघून तिलाच गलबलून आलं. तिला शांत करून झाल्यावर आईने एक नंबर फिरवला. पण फोनवर बोलायला जमेल कि नाही असं वाटून कट केला आणि व्हाट्सअपवर मेसेज केला.. 'परवा फारच तोडून बोलले मी तुला. अगदी आयुष्यात परत माझ्याशी बोलू नको वगैरे म्हणलं. आज सॉरी म्हणायला मेसेज केलाय. वहिनीचा जरा राग आलेला, तो तुझ्यावर निघाला. पण तुझं असणं किती महत्वाचं असतं हे आज जाणवलं. आजवर फारवेळा गृहीत धरलं तुला. तू नसतास तर मला काय काय मिळालं नसतं हे आज लक्षात आलं. बघ जमलं तर माफ कर.'

दुसऱ्याच मिनिटाला आईचा मोबाईल वाजला. 'मन्यादादा Calling ' तिने कॉल घेतल्यावर आवाज आला, 'काय गं भवाने, एवढी मोठी कधी झालीस तू.. दादाशी एवढं फॉर्मल होऊन बोलायला लागलीस..' तेवढ्या एका वाक्याने आई मधली छोटी बहीण पुन्हा एकदा आपल्या दादाच्या प्रेमात पडली!!  

एक नजर....!!

नजर...

एक नजर.. नुकत्याच जन्मलेल्या बाळाकडे मन भरून बघणारी.. सोज्वळ... सात्विक.. मायेने भरलेली..

एक नजर.. डोळ्यात बघून 'हे करू नकोस' सांगणारी.. सजग पालकत्व जगणारी...

एक नजर.. तिच्या वाढदिवसादिवशी 'ही इतकी मोट्ठी कधी झाली' असा विचार करत तिला न्याहाळणारी.. अतीव कौतुकाने भरलेली..

एक नजर.. 'चुकलास तू.. असं करायला नको होतंस' सांगणारी.. निखळ मैत्रीची.. आयुष्यभर साथ देणारी..

एक नजर.. 'मी पूर्णपणे प्रेमात आहे गं तुझ्या.. कधी हो म्हणशील मला??' विचारणारी.. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने अनुभवलेली..

एक नजर.. 'तो माझा आहे, चुकूनही त्याच्याकडे पाहायचं नाही' सुचवणारी.. काहीशी चिडलेली.. काहीशी मालकी सांगणारी..

एक नजर.. 'नको जाऊस ना मला सोडून.. तू नसताना माझं कसं होईल.." म्हणणारी.. व्याकुळ.. दुःखाने ओलेती झालेली..

एक नजर.. 'क्या चीज है ये.. एक बार मिल जाये..' म्हणत वरपासून खालपर्यंत न्याहाळणारी.. अत्यंत किळसवाणी.. वासनेने भरलेली..

एक नजर.. 'बाळा, घाबरू नकोस.. मी आहे तुझ्याबरोबर.. सगळं ठीक होईल..' सांगणारी.. भक्कम आधार देणारी..

एक नजर.. 'मला जगायचंय.. इतक्यात नाही जायचं' म्हणणारी.. खूप आर्त.. बघणाऱ्याच्या काळजाला घरं पडणारी..

एक नजर.. बस्स एक नजर!!!  

Monday, 25 July 2016

एक अनोखी प्रेमकहाणी!

तिचं B.A. झालं आणि आई-बापाविना पोर किती दिवस आपल्या घरी ठेवायची म्हणून काकाने तिच्या लग्नाचं बघायला सुरुवात केली. आईच्या वळणावर गेलेली शामल दिसायला अगदी सुरेख होती. लांबसडक रेशमी केस, गोबरे-गोबरे गुलाबी गाल, डाळींबी रंगाचे नाजुक ओठ आणि पाहताक्षणी भुरळ पडावी असे विलक्षण बोलके डोळे. अशा या सर्वांगसुंदर शामलला कोणीही पटकन हो म्हणालं असतं. पण का कोण जाणे तिचं लग्न काही ठरेना. सगळ्या गोष्टी मनासारख्या आहेत म्हणून दोन्हीकडची मंडळी आनंदाने बोलणी करायला बसली कि शामल अचानक मलूल होऊन जायची. तिला खूप अस्वस्थ वाटायचं आणि ती रडायला लागायची. अर्थातच अशामुळे बोलणी तिथेच थांबायची. जो मुलगा बघायला यायचा तो म्हणायचा, ”मुलगी सुंदर आहे हो पण......” या “पण.....”मध्ये “आम्हांला वाटतंय तिला इतक्यात लग्न करायचं नाहीये” इथपासून “तुम्हाला माहित नसेल पण तिची बाहेर कुठेतरी भानगड सुरु असणार” इथेपर्यंत सगळे भाव असायचे. पाच सहा वेळा असं झालं. शेवटी काकाने कंटाळून तिच्या लग्नाचा नाद सोडला. बरं तिला कोणी याचं कारण विचारलं तर शामलकडे काही उत्तर नसायचं.
हा विषय सोडला तर बाकी सगळं सुरळीत सुरु होतं. दुःख नाही आणि विशेष आनंदही नाही अशा स्थितप्रज्ञपणे आयुष्य सुरु होतं. पण फार काळ स्थिर राहणं आयुष्याच्या प्रकृतीला मानवत नाही. काहीतरी बदल हवाच असतो त्याला आणि म्हणूनच कि काय शामलच्या आयुष्यात सौरव आला. तिच्याच ऑफिसमध्ये नवीन ऑफिसर म्हणून. फार काही मोठ्ठा नव्हता तो वयाने. पण प्रगल्भ होता. बारा गावचं पाणी पिऊन त्याचे कान आणि डोळे तीक्ष्ण झालेले होते. अफाट निरीक्षण शक्ती असलेला हा सौरव शामलचा बॉस म्हणून रुजू झाला होता. सुरुवातीला कामापुरतं बोलणारा तो आता मुद्दाम शामलकडे काहीतरी काम काढू लागला. त्याला ती आवडली होती म्हणून नव्हे तर तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यांत काहीतरी दडलंय आणि आपण त्याचा छडा लावायचाच या भावनेने. अशावेळेस आधीच अबोल असलेली शामल आणखीनच शांत होऊन जायची. सौरव काही ना काही कारण काढून तिला बोलतं करायचा प्रयत्न करायचा परंतु त्याला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. असं हे बरेच दिवस सुरु होतं. शामल स्वतः काही बोलत नाही म्हणल्यावर मग त्याने बाकीच्यांकडून तिच्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. एवढ्याशा त्या गावात एका सुंदर मुलीची माहिती मिळणं त्याला काही अवघड गेलं नाही.
“शामल लहान असतानाची गोष्ट आहे बघ.” शामलच्या शेजारच्या आज्जीबाई सांगत होत्या. “तिचा बाप, रघुनाथराव, दूर कुठल्यातरी गावात नोकरीसाठी होता आणि त्या दिवशी तिचा वाढदिवस म्हणून खास तिला भेटायला येणार होता. ही छोटी पोर फार आनंदात होती. संध्याकाळ उलटून रात्र व्हायला लागली तरी रघु आला नाही तशी मात्र सगळ्यांना काळजी वाटू लागली. कोणाचाच डोळा लागेना. अतिशय धाकधुकीतच सकाळ झाली आणि पलीकडच्या गावातून सांगावा आला. रघुनाथरावांना घेऊन येणारी बस नदीत उलटली होती. एकाही माणसाच्या देहाचा पत्ता नव्हता. सगळा गाव दुःखात बुडाला. शामल तर शांतच झाली. कोवळी पोर होती रे शामल तेव्हा. बापाचं जाणं त्या बिचाऱ्या जीवाला सहन नाही झालं. तिने तेव्हाच ठरवून टाकलं, “आता इथून पुढे वाढदिवस साजरा करणे बंद”. नंतर काही दिवसातच ऐन दिवाळीत तिची आई वडलांना साथ द्यायला निघून गेली. अचानक पोरकी झाली ती. काकानं लाडानं वाढवली तिला. हवं नको ते सगळं केलं. पण पोरीच्या डोळ्यांतली चमक काही परत आली नाही. दुःखावर खपली बसली होती एवढ्यातच तिच्या धाकट्या भावाला काळ घेऊन गेला. तिच्या दहावीच्या निकालादिवाशीच पेढे आणायला म्हणून गेलेला तो, ट्रकखाली सापडला आणि आईबाबांना निकाल सांगायला निघून गेला. तेव्हापासून शामलला खळखळून हसताना कोणी पाहिलंच नाही. काकाने हरतऱ्हेने तिची समजूत काढून पहिली पण सगळं व्यर्थ. तिला शेवटचं आनंदात असताना मी कधी पाहिलं हे काही मला आठवत नाही बघ.”
मानसशास्त्राचा थोडाफार अभ्यास असणाऱ्या सौरवच्या सगळं लक्षात आलं. शामल cherophobic होती. म्हणजेच ती आनंदाला घाबरत होती. आपल्यापाशी येणारा आनंद सोबत भलंमोठ्ठ दुःख घेऊन येतो हे तिच्या मनात पक्कं बसलं होतं. ती कायमची मानसिक रुग्ण होण्याआधी काहीतरी हालचाल करणं गरजेचं होतं. तो एकटा हे काम करू शकत नव्हता म्हणून त्याने शामलच्या काकांना विश्वासात घेतलं. सगळी परिस्थिती समजावून सांगितली. काकांना सुरुवातीला काही पटेचना. पण मग नंतर त्यांना आठवत गेलं जेव्हा जेव्हा घरात आनंदी वातावरण असायचं तेव्हा तेव्हा शामल आजारी पडायची. तिचा श्वास अडकायचा, तिला अस्वस्थ वाटायचं. पण त्यामागे असं मानसशास्त्रीय काही कारण असेल असं काही त्यांना वाटलं नव्हतं. आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत्या. काका-काकूंना फक्त एक काम करायचं होतं. शामलला या सगळ्या प्रकारची कल्पना द्यायची. बाकी सगळं काम सौरव करणार होता. पुतणीच्या काळजीने काकांनी ते काम करायचं धाडस केलं. शामलला धक्का बसला. काका-काकूंनी मात्र तिला सावरलं. सौरवच्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट होती. कारण या सगळ्या प्रकारांत माणसाला स्वतःच्या स्थितीची कल्पना असणं आणि त्याने ती स्वीकारणं खूप महत्वाचं असतं. ते झालं कि मग पुढच्या गोष्टी सोप्या होतात.
काही दिवस असेच गेले. आता सौरव आणि शामल कामाव्यतिरिक्त बोलायला लागले होते. दिसायला सुंदर असणारी शामल मनानेसुद्धा सुंदर आहे हे सौरवला समजलं आणि हा माणूस आपल्याला समजून घेत आहे, आपल्याशी बॉसच्या नव्हे तर मित्राच्या नात्याने बोलत आहे हे तिच्याही लक्षात आलं. आता ते निव्वळ सहकारी राहिले नव्हते. हळूहळू ऑफिस झालं कि एखाद्या कॅफेत भेटी होऊ लागल्या. सौरव बोलघेवडा होताच. शामलला आवडेल अशा गोष्टी बोलून तिला बोलतं करणं त्याला जमू लागलं होतं. शामलही मोकळी होऊ लागली. आपणही हसू शकतो, आनंदी होऊ शकतो याच्यावर तिचा विश्वास बसायला लागला. अनोळखी-सहकारी-मित्र-खास मित्र या प्रेमाच्या राजरस्त्यावरून त्यांची गाडी पुढे जात होती. आताशा शामल मनापासून हसायला लागली होती, तिच्या डोळ्यांतली चमक परत आली होती. तिच्याभोवतीचं ते गूढ वलय नाहीसं होत होतं. आणि या मागे सौरवची अफाट मेहनत होती. यथावकाश सौरवने तिला मागणी घातली. आपल्याला नैराश्यातून बाहेर काढणारा माणूसच आपला जोडीदार होणार या कल्पनेने शामल मोहरली. दोघांच्या घरूनही होकार आले आणि कु. शामलची सौ शामल झाली.
आज त्यांच्या लग्नाला तीन वर्षं पूर्ण झाली. लग्नानंतर आजतागायत शामल आनंदाला घाबरलेली नाही. काका-काकूंचे आशीर्वाद आणि सौरवचं प्रेम यांच्या आधारावर एक नवीन शामल खंबीरपणे आयुष्याला तोंड द्यायला तयार आहे. तिच्या या नवीन आयुष्यात आता मात्र कुठल्याही भीतीला जागा नाही. आणि पुन्हा एकदा निर्व्याज प्रेमाने cherophobiaला हरवलं आहे....
-तन्मया (१५/७/१६)

Tuesday, 3 May 2016

गोष्ट एका विकासची!



प्रत्येक गावात असे काही अवलिया असतात ज्यांना विशेष कर्तृत्व नसूनही अख्खा गाव ओळखत असतो.. अशाच काही अवलीयांपैकी एक म्हणजे विकास ऊर्फ विक्या.. नावाच्या अर्थाच्या अगदी उलट जगत आलेला.. वडील, काका, आत्या आणि बाकीची भावंडं एकाच शाळेत शिकून मोठ्ठी होण्याच्या काळातला एक सर्वसामान्य मुलगा.. शाळेतले शिक्षक सगळ्या घराण्याला ओळखतात म्हणूनच, नापास होता एक एक इयत्ता वर चढवलेला हा विक्या.. जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा, "काय मग शेठ, कसं चाललंय आयुष्य?" असं विचारून बोलायला सुरुवात करणारा.. वास्तविक पाहता तो राहतो ती पेठ आणि पाय एका दिवसात नेउन आणतील इतक्या लांबचा प्रदेश हेच याचं जग.. त्यात नाविन्य असं कितीसं असणार.. परंतु तोरा मात्र असा कि मागच्या जन्मी हा जणू सिकंदरच होता..
अशा या विक्याचे वडील लहानपणीच गेले त्यामुळं कोणाचा धाक म्हणून नाही.. पोटच्या दोन आगाऊ पोरांना सांभाळताना आई खंगून गेलेली, त्यांची उस्तवार करून दमेकरी झालेली.. एकत्र कुटुंब पद्धतीचा आशीर्वाद म्हणून विक्याच्या काकाच्याच घरी राहणारी ती तिघं, एक दिवस विकी शेठने घरातच चोरी केल्यामुळे काकापासून वेगळी झाली.. तसं पाहिलं तर विक्याने आयुष्यात खूप उद्योग केले, दारू झाली, सिगारेटी झाल्या, विडिओ गेम्सचा नाद झाला, त्यापायी काकासाठी कर्जही करून झालं.. मात्र कशाचा पश्चात्ताप म्हणून नाही.. पोटापाण्यासाठीही त्याने विशेष काही केलेलं कोणाच्या स्मरणात नाही.. संध्याकाळी कट्ट्यावर बसून पोरी टापताना मात्र अनेकांनी पाहिलंय त्याला.. कधी तरी धोब्याच्या दुकानाच्या आसपास दिसायचा तो.. कारण एकच, कोणाच्या खिशातून आलेले पैसे लाटता आले तर बरं.. धोब्याला जेव्हा हे कळलं तेव्हा विक्याची झाली हकालपट्टी.. मग कुठे सलोन मध्ये काम कर, दुकानात काम कर असं सुरु झालं.. तरीही धरसोड मात्र कायमचीच..
पोराचं लग्न झालं म्हणजेतरी तो सुधारेल अशा भाबड्या आशेपायी एका गरिबाघरची पोर विक्याच्या गळ्यात मारली गेली.. बिच्चारी ती.. रोजचे अत्याचार सहन करून एक दिवस कंटाळून निघून गेली कायमचीच आणि मग विक्याची गाडी आणखी खड्ड्यात गेली.. सुनेचं वाटोळं केल्याचं शल्य मनात धरून त्याच्या आईने राम म्हणला.. असला अतरंगी माणूस आपला भाऊ आहे असं सांगायची लाज वाटून भावानेही संबंध तोडून टाकले.. विक्या अगदी एकटा पडला..
मध्यंतरी कोणाच्यातरी आशीर्वादाने तो दुचाकी चालवायला शिकला..एके दिवशी मित्राची गाडी घेऊन, दारूच्या नशेत बेभान होऊन high way वर गेला.. एका क्षणी तोल गेला आणि त्याला जोरदार अपघात झाला.. जुनं सगळं विसरून काकाने प्रचंड मदत केली.. त्याच्या ऑपरेशनचा सगळा खर्च केला.. बरा होईपर्यंत जातीने त्याची काळजी घेतली.. विक्या शरीराने तर बरा झाला पण त्याच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला.. आजारपणात काकाच्या घरी असताना स्वतःच्याच बहिणीला त्रास देताना काकूने पाहिलं आणि विक्याला काकाच्या घरचे दरवाजेही कायमसाठी बंद झाले..
नंतर मग काय सोबतीला रोज हातभट्टीची असायची, रस्तावरून शुद्ध नसलेल्या अवस्थेत विकी साहेब अर्वाच्य बरळत यायचे तेव्हा संपूर्ण पेठेला जाग यायची.. लहान मुलांच्या आया मुलं झोपत नसतील तर भीती दाखवायला म्हणायच्या, "चिंगे, झोप मुकाट्याने, विक्या येईल हा नाहीतर.." पण विक्याला मात्र या कशाचीच शुद्ध नसायची.. आईचे होते नव्हते तेवढे दागिने विकून खाईस्तोवर हे असंच सुरु राहिलं.. नंतर विक्याचा मुक्काम गावच्या मंडईमध्ये हालला.. काहीतरी कच्चं खात त्याचे दिवस जाऊ लागले.. दिवसाउजेडी रस्तावर फिरून चार आणे मिळवून दारूची सोय होत होती.. विक्या जिवंत होता.. काकाच्या कानावर हे सगळं येत होतं पण आता विक्यासाठी काहीही करायची इच्छा आणि ताकद उरली नव्हती..
मागच्या रविवारी नगरपालिकेच्या कार्यालयातला फोन वाजला.. "साहेब, मंडईमध्ये फार घाण सुटली आहे.. कोणीतरी मरून पडलंय.. आमच्या धंद्याचे बारा वाजत आहेत.. लवकर वासलात लावा बरं.." साहेबांनी शववाहिकेला फोन केला, प्रेताची व्यवस्था केली आणि डोळे पुसत आकाशाकडे हात जोडून म्हणाले,"दादा, पोरगा सुटला एकदाचा.. स्वतःच्या कर्माने मेला रे.."

Friday, 29 April 2016

"चौघीजणी"



मला आठवतं सर्वात आधी आम्ही ही कादंबरी वाचली ती म्हणजे "आज मी नंबर लावलाय, दिवसात होईल माझं वाचून.. पण मग हिचा नंबर आहे.. एकूण १२ जणींनी नंबर लावलेत.. तुला मिळेपर्यंत महिना-दीड महिना सहज जाईल" अशा वार लावायच्या पद्धतीने.. सुदैवाने आमचं लहानपण 'अवांतर अज्ञानाने व्यवहारात काही अडत नाही' अशा विचारांत खितपत पडलेलं नव्हतं.. मग यथावकाश ही कादंबरी वाचणं, त्यावर मन भरेपर्यंत चर्चा करणं, आणि मुसमुसून रडणं हे सगळे प्रकार झाले.. आणि ही कादंबरी अत्यंत लाडकी बनली.. कायमसाठी..
हिच्याबद्दल सांगायचं झालं तर १८६८ साली लिहिली गेलेली एक कादंबरी.. एक अमेरिकन कादंबरी जी प्रसिद्धीपासूनच लौकिक घेऊन आली.. आज इतक्या वर्षांनंतरही तिची भुरळ कमी झालेली नाही.. जगभरात या कादंबरीने आपले अपरिमित चाहते निर्माण करून ठेवले आहेत.. अजूनही करत आहे.. केवळ एकदा वाचून हातावेगळं केलं असं हिच्या बाबतीत होऊच शकत नाही.. आणि वाचून सोडून दिलं असं तर अजिबातच नाही.. आयुष्यभर ज्या पुस्तकांचा प्रभाव राहतो अशा अव्वल दर्जाच्या पुस्तकांमध्ये अग्रक्रम आहे हिचा.. तसं पाहिलं तर ही कादंबरी म्हणजे एका साध्या बाळबोध अमेरिकन कुटुंबाचं तितकंच साधं-बाधं चित्रण.. लेखिकेने स्वतःच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर निर्माण केलेल्या चार बहिणी त्यांचे अत्यंत सात्विक असे आई-बाबा.. कथानकात प्रेमाचे आणखी गहिरे रंग भरणारे शेजारी.. आणि हे चित्र एकूणच अधिक विलोभनीय बनवण्यासाठी निर्माण केलेली मोजकीच परंतु प्रभावी पात्र-रचना.. एकीचा स्वभाव दुसरीसारखा नाही, वागण्यात समानता नाही आणि तरीही उत्कट प्रेमाने आणि सदाचाराने त्यांना एकमेकींच्या आयुष्याशी कायम बांधून ठेवलं आहे.. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलत आहे.. ही अजरामर कादंबरी आहे "लुईसा मी अल्कोट" यांची "लिटल वुमेन".. मी जी वाचली ती शांताबाईंनी अनुवाद केलेली "चौघीजणी".. कादंबरी तर सुरेख आहेच पण आपल्या शांताबाईंनी ज्या मधाळपणे अनुवाद केला आहे , प्रेमातच पडतो आपण हिच्या.. यात बाल्य आहे, तारुण्य आहे, प्रेम आहे, प्रेमभंगही आहे.. आई-बाबा त्यांच्या चार मुलींचं सुखी भावविश्व आहे आणि त्यात एखादा स्वार्थाचा खडा टाकून ते ढवळून टाकणारा व्यवहारही आहे.. फक्त सगळं कसं एकदम प्रमाणात आहे. कुठे कमी नाही कि जास्त नाही.. म्हणूनच एकदा का आपण त्या सच्चेपणाने भारून गेलो कि अखेरपर्यंत खिळून राहतो..
मुग्ध शैशवातील चार बहिणी.. सगळ्यांत मोठी मेग, अतिशय सुंदर.. आपल्याच्या सौंदर्याच्या नादात गुंग.. त्याचा गर्व नाही पण सार्थ अभिमान असणारी.. बाईची आई झाल्यानंतरही तिचा हा अभिमान टिकून असतो.. तिचा नवरासुद्धा तिच्यावर, तिच्या सौंदर्यावर तिला आवडेल असं प्रेम करणारा.. कबुतरांचा संसार त्यांचा.. चोचीत चोच टाकली कि जगाचा विसर पडणारं गोग्गोड जोडपं..
दुसरी ज्यो.. आपल्या आई-वडिलांना मुलगा नाही तर ते पुरुषाचं कर्तव्य आपण पार पाडायला हवं अशा विचारांची थोडीशी आगाऊ वाटणारी पण अत्यंत तरल मनाची लेखिका.. आपण मुलगाच असायला हवे होतो म्हणजे आपल्या मार्मी आणि पप्पांना खूप मदत करता आली असती असा ग्रह मनात ठेवून बराच काळ जगणारी.. काही काळ गेल्यानंतर तिला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव होते.. आणि तिचं तिलाच कळतं आपलं बाईपणसुद्धा तेवढंच कणखर आणि सुंदर आहे.. मार्मी-पप्पांना अभिमान वाटेल असंच आहे..
तिसरी बहिण म्हणजे बेथ.. सोज्वळ, सात्विक.. एखादा छोटुसा संतच जणू.. आयुष्याकडून फार काही दिव्य भव्य अपेक्षा नाहीत.. "ठेविले अनंते"च्या चालीवर जगणारा अतिशय समाधानी, तितकाच लाजरा कोवळा जीव.. जांभळ्या तापाचं निमित्त होऊन बेथ जाते तेव्हा अक्खा रुमाल भिजवला आहे कित्येकांनी.. बेथच्या जाण्यानंतर एकूणच कादंबरी प्रौढ होते, अचानकच..
आणि चौथी, सगळ्यांत धाकटी बहिण म्हणजे एमी.. अतिशय सुंदर, त्या सौंदर्याचं महत्व जाणून असणारी.. जाणत्या वयात युरोप फिरून आलेली.. त्यामुळे साहजिकच अत्यंत नजाकतपूर्ण अशी रेखीव स्त्री.. लौरी, त्यांचा शेजारी, त्याच्या प्रेमात पडून राजा-राणीचा संसार मांडणारी सुरेख एमी ..
आपल्याला उगाचच एखादी बहिण जास्त जवळची वाटू लागते.. जसं जसं वय वाढतं तसं ती आवडणारी बहिणही बदलते..या चौघी बहिणींनी लहान असताना काही स्वप्न पाहिलेली असतात.. कलेशी, खेळाशी निगडीत.. त्यांची सगळीच स्वप्न पूर्ण होत नाहीत.. म्हणून त्या रडत बसत नाहीत..कोवळ्या सुख-दुःखांना कवटाळून बसत नाहीत.. पुढे जातात, आपापल्या परीने यशस्वी होतात.. या कादंबरीने नक्की काय दिलं हे सांगता येत नाही असं.. पण आज कधीही जेव्हा चौघीजणी हातात येतं तेव्हा खूप छान वाटतं.. कितीही वेळा वाचलं तरी दरवेळी नवीन काहीतरी भिडतं.. हा लेखनप्रपंच म्हणजे त्या कादंबरीविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त करायचा एक प्रांजळ प्रयत्न!!