Friday, 24 April 2015

मुशाफिर - अच्युत गोडबोले



आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांना लौकिक अर्थाने कदाचित साहित्यिक म्हणता येणार नाही. परंतु त्यांनी लेखन केलेल्या विषयांचा आवाका एवढा प्रचंड आहे कि "आनंदयात्री" या सदरात त्यांचा उल्लेख व्हायलाच हवा.. सोलापूरमधील शाळेपासून आयआयटीपर्यंत प्रवास केलेल्या एका मुशाफिराशी आज आपली गाठ पडणार आहे.. त्यांनी आयुष्याने घेतलेल्या सर्व परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवलं.. अनेक मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर काम करून महत्वाच योगदान दिलं! गणित,  मानस-शास्त्र, व्यवस्थापन, संगीत, संगणक, अद्ययावत तंत्रज्ञान, साहित्य अशा अनेक विषयांमध्ये लेखन करून त्यांनी खर्या अर्थाने "आनंदयात्री" या विशेषणाला न्याय दिला आहे.. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अच्युत गोडबोले!!!
मी त्यांचं वाचलेलं पाहिलं पुस्तक म्हणजे "किमयागार". आपल्याकडे संशोधन हा विषय फार गंभीर आणि जगावेगळा मानला जातो.. आणि म्हणून त्यावर बोलताना किंवा लिहिताना तो विषय बर्याचदा रसहीन होऊन जातो.. मात्र या "किमयागार" मध्ये गोडबोलेंनी जग बदलून टाकणारे अनेक शोध कसे लागले त्यामागे त्या संशोधकाचे किती अथक परिश्रम होते हे सगळ अगदी सहज सध्या पद्धतीने सांगितल आहे.. पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळया विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील ते सारं यांनीन एकहाती लिहील आहे.. हे पुस्तक म्हणजे अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ आहे!!! या पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधून काढण्यामागची ऊर्मी, संशोधनातील निर्मितीचा आनंद या वैचारिक साहसातील थरार! तो लेखकाला स्वत:ला भिडलेला असल्यामुळे ते लेखन जिवंतपणे वाचकांपर्यंत पोचते... आणि कायमस्वरूपी लक्षात राहत!!
संशोधनानंतर ज्या विषयाचा बागुलबुवा करण्यात आलेला आहे तो म्हणजे गणित!! मुलांना गणित म्हणजे जणूकाही राक्षस वाटावा असा त्या विषयाचा लौकिक आहे.. हेच दूर करण्यासाठी म्हणून कि काय गोडबोलेंनी "गणिती" लिहील.. या मध्ये त्यांनी या विषयाची भीती घालवून त्याची गोडी वाढविली आहे, त्याची मूलतत्त्वं आणि इतिहास अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावून सांगितला आहे..  या पुस्तकात प्राचीन संस्कृतीपासून गणिताचा वापर कसा सुरू झाला हे तर आहेच, पण त्याचबरोबर आर्यभट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, पायथागोरस, युक्लिड, आर्किमिडीज, न्यूटन, गाऊस, रीमान, ऑयलर, रामानुजन यांच्यासारखे अनेक महान गणितज्ञ देखील आहेत.. या सगळ्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्यातल्या वादविवादांबद्दल, चढाओढीबद्दल आणि आशा-निराशेबद्दल हे पुस्तक एक अनोखं भावविश् उभं करतं. एवढंच नाही, तर अंकगणित, भूमिती, बीजगणित, कॅल्क्युलस, ग्राफ थिअरी, वक्र स्पेस, टोपॉलॉजी, चौथी मिती, नॉन-युक्लिडियन जॉमेट्री, सेट थिअरी, ग्रुप थिअरी, मॅट्रिक्स, तर्कशास्त्र, संभाव्यताशास्त्र, शून्य आणि अनंत अशा अनेक कल्पना हे पुस्तक सोप्या भाषेत समजावूनही सांगतं..
मराठी मध्ये आणखी एक दुर्लक्ष केलेला विषय म्हणजे मानस शास्त्र!! आपल्या इतिहासामध्ये याचा अभ्यास केला गेल्याची नोंद जरूर आहे.. पण जशा अनेक गोष्टी कालौघात लुप्त झाल्या तशीच बर्याच विषयांमधील आपली रुची देखील कमी होऊन गेली.. रामदासांनी आपल्या मनाने कसं वागायला हवं हे त्यालाच सांगत मानस शास्त्राला पुन्हा एकदा रुजवण्याचा प्रयत्न केला.. त्याच मनाच्या श्लोकांमधून प्रेरणा घेऊन गोडबोलेंनी एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहील.. त्याच नावच आहे - "मनात".. मन म्हणजे काय, मनाचा शोध घेताना प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला आहे. मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत - एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या पुस्तकात आहे. सोपी, सुलभ, सुटसुटीत वाक्यरचना आणि सर्व प्रकारच्या वाचकांना कळेल अशी ओघवती, खुसखुशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. वाचायला सुरवात करताच आपण त्यात पूर्ण बुडून जातो. पुस्तक हातावेगळं केल्याशिवाय चैन पडत नाही...  मन एक शोध, मेंदू : शोध आणि रचना, फ्रॉईडपर्यंतची वाटचाल, फ्रॉईड आणि युंग, एक्सपरिमेंटल सायकॉलॉजी, बिहेविअरिझम, गेस्टाल्ट सायकॉलॉजी, डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी, बुद्धी, व्यक्तिमत्त्व, भावना-प्रेरणा, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, पर्सेप्शन सायकॉलॉजी, तसंच मनोविकार आणि मानसोपचार अशा 17 भागांतून आणि जवळपास 600 पृष्ठांतून हा खजिना वाचकांसमोर गोडबोले यांनी रिता केला आहे. जवळपास 87 संदर्भग्रंथांच्या संदर्भानं "मनात' हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.. त्यात केवळ वरवरची आणि साधी सोपी माहिती नाही तर तिच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेण्याचा अतिशय गंभीरपणे केलेला यशस्वी प्रवास आहे,ती उत्कटता जाणवल्याशिवाय राहत नाही...
आपल्या आयुष्यात तसं पाहायला गेल तर अर्थ नसेल तर अर्थ नाही!! तरीदेखील अर्थशास्त्र म्हणाल कि लोक जांभया देतात!! शाळेत नागरिक शास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय झोप आणण्यासाठीच शिकवले जातात!! अशी ख्याती असणारा हा विषय यांनी मात्र अगदी हसत खेळत मांडला आहे.. "अर्थात" मध्ये अर्थशास्त्राच्या उगमापासून ते वर्तमानकाळपर्यंतचा हा इतिहास आहे. हे पुस्तक अर्थशास्त्राकडे सर्वसमावेशक दृष्टीनं पाहायला शिकवतं. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांमधून त्यांनी उलगडल्या आहेत. संकल्पना, तात्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वांचा सखोल अभ्यास पुस्तकातून केला आहे.. अर्थशास्त्राचं जगाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी आणि जीवनाशी असलेलं नातंही त्यातून उलगडलं आहे.. सखोल आणि वैचारिक ठेवा वाचकांसमोर रंजक पद्धतीनं खुला करण्याची लेखकाची हातोटी याही पुस्तकामधून पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे... 
त्याचं मला आवडलेलं आणखी एक अत्यंत सुंदर पुस्तक म्हणजे "नादवेध"!! अमूर्तातून मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. अभिजात संगीत असाच अमूर्त आनंद मिळवून देते. या आनंदाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न सुलभ पिशवीकर आणि अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकात केला आहे. या नादवेड्या लेखकद्वयीने संगीतात स्वच्छंद मुशाफिरी केली आहे. संगीताच्या मैफली ऐकताना रागाच्या मांडणीतील आणि सुरांचे सौंदर्य त्यांनी शब्दांत पकडले आहे. तरीही रागाच्या तांत्रिक आणि शास्त्रीय बाजूवर भर देता ख्याल, भावगीत, नाट्यगीत, सिनेगीत या सर्वांमधून रागाची कशी ओळख होते, हे सांगण्याचा प्रयत्न पुस्तकात केला गेला आहे..
व्यापास्थापन शास्त्रावर लिहिलेलं बोर्डरूम, इंग्रजी साहित्यिकांच्या खाजगी आणि साहित्यिक आयुष्यावर लिहिलेलं झपूर्झा.. संगणकाच्या नांदीपासून आज जे त्याचं महाकाय(शब्दशः नव्हे तर व्याप्तीनुसार) रूप झाल आहे त्याबद्दल माहिती सांगणार "संगणक युग" किंवा राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जगणाऱ्या स्टीव जॉब्स बद्दल असणार "स्टीव जॉब्स" ही सगळी पुस्तक आपल्याला शब्दांनी बांधून घालतात.. गोडबोले स्वतः आपल्याशी समोरासमोर बसून बोलत आहेत अस वाटायला भाग पडतात.. कधीही किंचित सुद्धा 'तोच तो' पणा येत नाही!! सगळ कायम उत्कंठावर्धक आणि नाविन्यपूर्ण असत!!
एकीकडे  बेकारी, गरिबी,जातीव्यवस्था, कॉ. डांगे, चळवळ, झोपडपट्टी तर दुसरीकडे आयबीएम, पटणी, सिंटेल, अमेरिका, चीनी व्यावसायिक अशा अनेक प्रांतांमधून फिरून आलेला हा "मुशाफिर" त्याच्या विचार, बुद्धिमत्ता, उर्जा आणि चिंतनाने सकारात्मक जगण्याचे मंत्र देतो.. आणि सतत काहीतरी नवनवीन वाचायचं बळ देतो!!
*** त्यांच्या लेखनाचे रसग्रहण करणे हा लेखाचा उद्देश नाही तर त्यांच्या साहित्याचा वाचकांना परिचय करून देणे हा आहे..

Thursday, 26 March 2015

तो एक राजहंस - मधुसूदन कालेलकर

आज आपलेल्या जे भेटणार आहेत त्यांना लौकिक अर्थाने फक्त कवी अस म्हणता येणार नाही.. कारण त्यांनी लिहिलेल्या कवितेच कायम गीत झाल आहे.. आपण त्यांना ओळखतो ते एक कवी म्हणून नव्हे तर एक चित्रपटगीतकार म्हणून.. अगदी लहान असल्यापासून आपण त्यांच्या गीतांचा आस्वाद घेत आलेलो आहोत.. कधी त्यांनी आई बनून
"निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला बाई
आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या जाईजुई
मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप् एक उधळून गेले माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता गाऊ कशी मी अंगाई'"
अस म्हणत आपल्याला अंगाई गायली आहे.. तर कधी
" आई, मका
मी तुझा मामा दे मला मुका" अस म्हणत बाराखडी शिकवली आहे..
असे हे हरहुन्नरी कलाकार - मधुसूदन कालेलकर... नुकतीच त्यांची जयंती झाली.. २२ मार्च १९२४ रोजी जन्मलेल्या कालेलकरांच मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले. एकंदर तीसच्या वर त्यांची नाटकं प्रदर्शीत झाली. त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत.. कौटुंबिक, गंभीर, विनोदी आणि सामाजिक सुद्धा... अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, आसावरी, ही वाट दूर जाते, अबोल झालीस कां, कल्पवृक्ष कन्येसाठी, चांदणे शिपीत जा, या घर आपलंच आहे, नाथ हा माझा, डार्लिंग डार्लिंग, हे फुल चंदनाचे, अमृतवेल, शिकार, आणि माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित ही श्रींची इच्छा ही सर्व त्यांची लोकप्रिय अशी नाटकं. नाटककार, गीतकार ,कथाकार आणि पटकथाकार अशा अनेक रूपांत समर्थपणे वावरणाऱ्या कालेलकरांची आपल्या मनातली छबी ही मात्र एक प्रथितयश गीतकार म्हणून जास्त उल्लेखनीय आहे.. जवळपास प्रत्येक सणासाठी त्यांनी गीते लिहिली आहेत.. आणि ती इतकी लोकप्रिय आहेत कि तो सण आला आणि ते गण ऐकल नाही तर सण साजरा झाला अस वाटतच नाही.. मग ते गाणं
"आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन आली
नक्षत्रांचा साज लेऊनी  रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली
संगे होता हरी, जाहले बावरी मी अभिसारीका ही निराळी
आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन आली"
हे असो किंवा
"तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता
मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया
देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा"
हे असो!!!
चित्रपट गीत म्हणलं आणि त्यात प्रेमाची भावना नाही अस होतच नाही.. प्रेम खूप सहज सुंदर आहे त्यामध्ये कळीला फुलांत रुपांतर करण्याची शक्ती आहे.. असंच पाकळी पाकळी उमलत खुलून आलेलं प्रेम अतिशय निरलस असत.. एक आगळाच छंद लाऊन जात.. हेच सगळ सांगताना ते म्हणतात,
"कळी कळी उमलते पाकळी फुलून ये आनंद
आनंदाच्या लहरी वरती जीव नाचतो धुंद
एक अनोखी आली चाहूल, भूमिवरचे सुटले पाऊल
स्वैर भरारे प्राण अंबरे तोडुन सारे बंध
उरी जागते नव संवेदन, कंप सुखाचे अंगाअंगातुन
हृदयाचे राजीव उमलले टपटपतो मकरंद
उगीच लाजते उगीच रुसते, मी माझ्याशी उगीच हसते
कळे बाई काय खुळा हा मला लागला छंद"
असा छंद लागला असताना एकच ध्यास असतो.. माझी भावना त्याला कधी कळणार... जेव्हा कळेल तेव्हा आपली लाडकी व्यक्ती कशी प्रतिक्रिया देईल.. प्रेमाचा स्वीकार होईल कि नाही.. आणि मग तेव्हा कालेलकर मदतीला धावून येतात आणि ती गाऊ लागते..
"सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणार्या फुलातला ?
जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला"
आणि जेव्हा त्याला ही वेडी प्रीत समजते.. त्याच्याही मनात तरंग उमटू लागतात.. प्रेमाची अदलाबदल होते आणि मग तोही तिला कवेत घेऊन गाऊ लागतो..
"सूर तेच छेडीता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे
अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली वेदना सुखावली हासली तुझ्यासवे
एकटा तरी स्मृती तुझ्याच या सभोवती बोललो कसे किती, शब्द शब्द आठवे"
आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून ती गाऊ लागते..
"हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली"
अशी परिपक्व आणि आगळीवेगळी प्रीती बहरल्यानंतर त्याचा सोहळा होणं अतिशय साहजिक आहे.. एकमेकांची भूल पडणं आपल्याला अव्यवहारी वाटल तरी अतिशय सुखावह आहे.. त्यात शत जन्माची नाती जुळली असण्याचा विश्वास आहे.. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याच वचन आहे... हे सगळ जेव्हा कालेलकर शैलीमध्ये शब्दरूप घेऊन येत तेव्हा आणखीनच रोमांचक होऊन जात..
क्षणात कळली, क्षणात जुळली, भूल कशी पडली ?
"तुझीमाझी प्रीत जगावेगळी
शतजन्माची नाती अपुली बघताबघता अवचित जडली
किमया ही कसली प्रेमिक आपण युगायुगांचे
प्रेमा या ना बंध कुणाचे गाठ तिथे बसली
नाही ठावूक कुठे जायचे तुझ्याच मागून मला यायचे
वाट आता ठरली"
सगळ सुरळीत चालू राहणं नियतीला मान्य नसतं.. आणि म्हणूनच अशा नजर लागू नये अस वाटणाऱ्या प्रेमामध्ये विरह खोडा घालतो.. कळीला तीच फुलांत रुपांतर करणाऱ्या जादूगारापासून दूर घेऊन जातो... आणि मग राहत ते फक्त निर्माल्य...तिच्या आठवणी मध्ये मग तो गाऊ लागतो...
"रसिका गाऊ कोणते गीत ? तीही जाता रुसुनी मजवर, रुसले रे संगीत !
जुळल्या तारा पहिल्या भेटी  राग रंगले जुळता प्रीती
झरे मेघमल्हार लोचनी आठवता ती प्रीत ! तुटल्या तारा, रुसली वीणा
सूर संपले कुठल्या ताना आज बैसलो निर्माल्याला तुजसाठी फुलवीत !"
प्रेमाबद्दल इतक सारं लिहिणाऱ्या कालेलकरांनी आपल्या गीतांमधून जीवनविषयक तत्त्वज्ञानही सांगितल  आहे.. आपण ज्याकरिता संपूर्ण आयुष्य खर्च करत असतो तो अक्षय्य आनंदाचा ठेवा आपल्यामधेच असतो.. अस सांगताना ते म्हणतात...
"तुझे असून तुजपाशी तू जागा चुकलासी
कल्पतरू तो असता दारी वणवण फिरशी का बाजारी
स्वर्ग तुझा तो तव संसारी सुख त्याचे अविनाशी
कस्तुरीमृग तू, तुला कळले सुगंध शोधीत जीवन सरले
घे चाहूल सुख कोठे दडले ? ते तुझिया कर-पाशी"

अशाप्रकारे चित्रपट, नाटक, गीतलेखन या सर्वच आघाडय़ांवर आजही ज्यांच्या कलाकृती कलाप्रेमींच्या मनात अवीट ठसा ज्यांनी उमटवला ते नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. कालेलकरांचे हे कर्तृत्व पुढील अनेक पिढय़ांनी चिरकाल आठवावे आणि मनामनामध्ये जागवावे, अशीच त्यांची अभिनंदनीय कामगिरी आहे.. आपल्याला निरंतर अनाद देत राहणाऱ्या कालेलकरांना मनाचा मुजरा!!