Friday, 24 October 2014

वपुर्झाकार - व.पु. काळे



" एक मनुष्यजन्म!! सगळे म्हणतात तस ८४ लक्ष फेर्यानंतर मिळालेला... अर्थात मला याच्याशी कर्तव्य नाही.. मला दिसतो तो जिताजागता माणूस.." अस म्हणून कायम माणसाभोवती साहित्य निर्माण करणारे लेखक आज आपल्याला भेटणार आहेत..  त्यांच्या कथांचा, कादंबरीचा विषय एकच - "माणूस"! कधी तो उच्चवर्गीय तर कधी मध्यम! कधी बाईलवेडा तर कधी संन्यस्त! कधी मनातली गरळ ओकून टाकणारा बडबड्या तर कधी सगळ मनात साठवून कुढत राहणारा एकलकोंडा! कधी पुरुष तर कधी स्त्री! प्रसंग साधा, सरळ, छोटासा! पण त्याची कथा करण्याच कसब यांना लाभल होत.. माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदुःख, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्न हे सगळ तर आपणही रोज बघत असतो, जगत असतो. पण आपल्याला ते सगळ शब्दबद्ध करण जमतच अस नाही.. जमलच तर ते वाचणार्याला आपलस वाटतच अस नाही.. पण यांच्या लेखणी मध्ये ती जादू आहे... वाचकाला तो जे वाचतोय ते प्रत्यक्ष जगतोय अस वाटायला लावणार कसब आहे.. आणि म्हणूनच यांच्या कथा मनाला भिडतात, आपल्याशा वाटतात.. हे आहेत कथाबीजाला फुलवत त्याच हळुवार, भावस्पर्शी कथेत रुपांतर करणारे, सहज सध्या शब्दांतून आयुष्याच तत्वज्ञान सांगणारे व.पु,!!!!
" माणसाच्या तारुण्याचा काळ... जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ... संततीच्या रूपाने माणूस परत एकदा बालपण अनुभवू शकतो.. पण वार्धक्यात तारुण्य अनुभवू शकत नाही क्वचित अनुभवत आल तरी उपभोगू शकत नाही.. जाणीव जाग्या झाल्यापासून माणूस वाट बघतो ती तारुण्याची.. " किती साधे शब्द आहेत पण त्यात किती सच्चाई आहे.. व.पुं.च्या लेखनात कधीही स्वतःबद्दल, स्वतःच्या साहित्याबद्दल अहंकार डोकावत नाही.. त्यात असतो तो मानवी भावभावनांचा कल्लोळ.. एका भावनेचा दुसर्या भावनेशी चाललेला निरंतर खेळ... आपल्याला वाटत आपण शांत आहोत.. कसलाही विचार करत नाही.. ज्यांना हि अवस्था लाभली ते भाग्यवान!! बाकी सगळे कायम एकतर भूतकाळात नाहीतर भविष्यात रमलेले.. आपल्याला कळत असत कि "सौख्याचा कुठलाही क्षण चिरंजीवी नाही.. त्याचं अमरत्व फक्त आठवणींच्या राज्यात!! आणि आठवणी कधीच सुखद नसतात.. दुःखाच्या असतील तर त्यापायी वाया गेलेला भूतकाळ आठवतो आणि आनंदाच्या असतील तर गेले ते क्षण म्हणून काहीतरी निसटून गेल्याच्या त्रासाचा असतो... " पण तरीही आपण वर्तमानात जगायचं टाळतोच...!!
आठवणी हा जसा जगण्याचा अविभाज्य भाग तसाच एकाकीपणादेखील.. व.पु. म्हणतात, "एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण. एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्या वर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल."  खरय!!! भरलेल्या मैफिलीमध्ये अचानक डोळे झरू लागतात.. तेव्हाचा एकाकीपणा हा आजूबाजूला असणार्या माणसांवर अवलंबून नसतोच.. कदाचित तो एकटेपणा हवा तो माणूस सोबत नसल्याच्या जाणीवेतून आलेला असतो.. असे डोळे झरू देण्याला मोठ धैर्य लागत.. बर्याचदा गळा भरून येतो पण डोळे वाहत नाहीत.. "मी कणखर आहे" या जाणीवेचा बांध ते पाणी अडवत असतो.. पण खरतर जेव्हा हा बांध नाहीसा होतो, तेव्हाच आपण मोकळे होतो, हलके होतो... मला स्वतःला मनमोकळेपणाने हसणारी माणस जेवढी आवडतात त्याहीपेक्षा मनापसून रडणारी (पण अर्थात रडकी नव्हे) माणस काकणभर जास्त आवडतात!!! एखाद पुस्तक वाचताना, सिनेमा बघताना तल्लीन झाल्यावर, पात्राशी एकरूप झाल्यावर एखाद्या हळुवार क्षणी डोळ्यातून पाणी येण हे अतिशय संवेदनशील असल्याच लक्षण आहे..
वपुंची "दोस्त" वाचली तेव्हा जाणवलं कि माणसाच्या मनात शिरण्यासाठी भव्य दिव्य अस काही लिहाव लागत नाही.. "कर्त्या पुरुषाचा नाकर्तेपणा, जगाला दाखवण्यासाठी आणलेला उसना मोठेपणा इथपासून ते अगदी घरात धाकट पिल्लू येणार या एका बातमीने तो, ती आणि त्याच पहिलं पिल्लू या सगळ्यांच्या मनावर होणारे परिणाम असा कुठलाही विषय चालतो"!! गरज आहे ती सजग वाचकाची! मोठ्या मानाने नाही तर मोकळ्या मनाने वाचणार्या संवेदनांची!!
"महोत्सव" देखील अशीच!! याच सौम्य पठडीमाधली... वडिलांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे चालणारी सद्गुणी मुलगी.. लग्न झाल्यावर सासर मिळत ते अगदी विरुद्ध चालीच!! तिच्या लवकर उठण्याची, नीटनेटकेपणाची अवहेलना करणार... अशा वेळेस जेव्हा आईवडील देखील म्हणतात, " बेटा, आता तेच तुझ घर आहे" या प्रसंगी तिचं तुटणार मन व्यक्त करायला व.पुं.चीच लेखणी हवी...
वयाने आणि अकलेने जरा शहाणे झालो तेव्हा त्याचं पार्टनर वाचल, "पार्टनर म्हणजे नक्की कोण हे समजेपर्यंत पुस्तक कळलचं नाही.. आपलाच आपल्याशी चालत असलेल्या संवादाच मूर्त रूप किंवा शब्द रूप म्हणजे पार्टनर.. त्यातली काही वाक्य म्हणजे अजरामर म्हणावीत अशी आहे..
" तुला मी कशी हक मारू? पार्टनर ह्याच नावाने.. आपल्याला खरतर नावच नसत, बारशाला नाव ठेवतात ते देहच..." हा जो पार्टनर आहे ना अगदी सहज खूप गहिरं बोलून जातो..   "आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाण हाच नरक.."                                                                   
आपल्या सगळ्या गोष्टी नाही म्हणाल तरी आत्मकेंद्रित असतात म्हणूनच हा पार्टनर म्हणतो, "लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस.." हे अस बरच काही भन्नाट बोलून वेड लावणारा पार्टनर...!!!
आयुष्याला नाहीतर अनुभवला क्षणभंगुरता असते अस सांगून ते म्हणतात,
"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते.  कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं.  म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत." म्हणूनच जगण्याचा महोत्सव करायला आपण शिकायला हव..
जीवनविषयक तत्वज्ञान हा जसा त्यांचा लाडका विषय तसाच स्त्री आणि तिचं भावविश्व हा देखील.. पुरुषाच्या नजरेतून ती - "पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही." पण त्याला तिच्या पहिल्या हास्याची, नजरेची भीती वाटते.. कारण, त्या दोन्ही गोष्टीत त्या समोरच्या व्यक्तीला ओळखतात हे कळून येत.." स्त्रीच पाहिलं हास्य, पहिली नजर लोहचुम्बकाने लोखंडाचे कण वेचून घ्यावेत त्याप्रमाणे स्त्रिया पुरूषाच मन वाचतात... आणि मग त्याच क्षणी आपल्यातल अंतर किती ठेवायचं ह्याच गणित मांडतात.. मग त्या दिलखुलास हसतात तरी किंवा 'राखून' तरी!!! किती सुंदर मांडलं आहे!!! यातला एक आणि एक शब्द खरा आहे!!!! "सखी" हाही एक गाजलेला कथासंग्रह!! स्त्रीला जवळून पारखून जन्माला घातलेल्या कथा आहेत यात!!!
पत्नी गेल्यानंतर एखदा आधार जावा तसा तो विधुर काहीसा खचून जातो.. त्यातूनच मग काहीसा हळवा, काहीसा गंभीर होऊन जातो.. तारुण्यात रोमांटीक वाटणारा चंद्र आता मात्र वेगळाच वाटू लागतो.. ". चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो! माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.  ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती? उपवास करणार्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल. पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार? त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे. समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात."!!!
त्यांच्या तात्विक कादंबर्यांपैकी माझी आवडती कादंबरी म्हणजे तू भ्रमत आहासी वाया... बरीचशी अनाकलनीय तरीही मनाच्या अंतरमनाचा ठाव घेणारी..  आपण सारे अर्जुन हि तशीच..  आपण सारे कुरुक्षेत्रातल्या अर्जुनासारखे आहोत.. ज्यांना कृष्ण भेटतो ते पैलतीरी जातात बाकीचे असतात तसेच संघर्ष करत आजचा दिवस उद्यावर ढकलणारे.. संसार चालू ठेवणारे... याच पुस्तकात ते म्हणतात,
         "संसार खरंच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवंय? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? एखाद्या मैफिलीसारखं रंगवता येणार नाही का? आपल्या जन्मापूर्वी हे जग होतंच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार हा असाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली 'एंट्री' मध्येच केव्हातरी होते आणि 'एक्झिट'ही. हे नाटक किती वर्षांचं, ते माहित नाही. चाळीशी, पन्नाशी, साठी, सत्तरी.... सगळं अज्ञात. घडधाकट भूमिका मिळणार, की जन्मांधळेपणा, अपंगत्व; बुद्धीचं वरदान लाभणार की मतिमंद? भूमिकाही माहित नाही. तरी माणसाचा गर्व, दंभ, लालसा ... किती सांगावं? कृष्णानं बासरीसहित आपल्याला पाठवलं; पण ह्या सहा छिद्रांतून संगीत बाहेर येत नाही. षड्रिपूंचेच अवतार प्रकट होतात. स्वत:ला काही कमी नाही. स्वास्थ्याला धक्का लागलेला नाही. तरी माणसं संसार समजू शकत नाहीत. "आपण सारे अर्जुनच."
जसा संसार आपल्याला नवखा, तसाच मृत्यू देखील.. या दोन्ही गोष्टी एकदाच आपल्या आयुष्यात येतात.. मृत्यू बद्दलच त्याचं मत आपल्याला थक्क करून सोडत.. ते म्हणतात, " दुःख-आनंद, जय-पराजय, हसू-आसू, विरह-मिलन सगळ तसंच असत.. प्रत्येक क्षणी मांसाच मन नवा जन्म घेतं एवढाच काय ते नवीन.. पुनःपुन्हा जन्म घेण्याची हि क्रिया थांबण हेच मरण!!किती उदात्त कल्पना आहे!!
"वपुर्झा" हे असाच उदात्त पुस्तक.. कधीही, कुठलाही पण काढून वाचा.. काही घरात अत्तराच्या बाटल्या टेबलावर मांडून ठेवलेल्या असतात.. ज्याच्या त्याच्या मूड प्रमाणे जो तो अत्तर काढून लावत असतो.. तसंच काहीस या पुस्तकाचं आहे.. आणि म्हणूनच त्याला अनुक्रमणिका, संदर्भ, क्रमांक अस काहीही नाही!!!
वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही व भावनाप्रधान आहेत पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आद्रतेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातली माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्‍या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौदर्य आहे, तोरा आहे.. म्हणूनच हे लेखन कागदांपेक्षा मनात जास्त वेळ जतन करून ठेवलं जात आहे.. आणि जात राहील....

Tuesday, 23 September 2014

कोटि-सम्राट पु.ल. अर्थात भाई!!!

आनंदयात्री मध्ये आज वर आपण कवी कवयित्रींना भेटलो.. पण आज आपण भेटणार आहोत अशा एका माणसाला ज्याच्या उल्लेखाशिवाय मराठी साहित्य अपुरं आहे हे सातासमुद्रापार असणार्या लोकांना देखील माहित आहे.. हा माणूस तुफान विनोदी होता.. जातिवंत कलाकार होता.. जितक्या शिताफीने त्यांच्या बोटांनी लेखणी चालवली त्याच्या कैक पटीने जास्त कौशल्याने त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर केला.. यांनी स्वतःला कधीच पुस्तकांमध्ये अडकवून ठेवलं नाही.. चित्रपट, संगीत, नानाविध सफरी, समाजसेवा यांच्या मदतीने स्वतःला सतत समृद्ध केल आणि आपल्यासाठी अक्षय आनंदाचा ठेवा निर्माण केला..असे हे म्हणजे एक अत्यंत खळाळत आणि चैतन्यदायी व्यक्तित्व- अर्थात पु.ल. देशपांडे, आपले लाडके भाई.. सहवासात येणर्या प्रत्येकाला भारून टाकण्याची दैवी कला असलेलं असामान्यत्व घेऊन जन्माला आलेला एक परिस...
पु.लं बद्दल काय आणि किती लिहायचं हा खरचं खूप मोठा प्रश्न आहे..
"आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल." अस हे गुपित त्यांनी फक्त आपल्याला सांगितल नाही तर आयुष्यभर त्यांनी या तत्वाशी इमान राखलं..
हा माणूस लेखक तर होताच त्याच बरोबर सिनेमावाला होता, नाटकवाला होता, तानसेन होता, कानसेन होता,  त्यांच्याच भाषेत सांगायचं तर एक "सफरचंद" देखील होता.. आणि सर्वात महत्वाच म्हणजे एक जिंदादिल माणूस होता... पार्किन्सन झालेला असताना बाबांच्या आनंदवनात जाऊन राहून त्यांना हवी ती मदत करणाऱ्या या माणसाकडे अशी कुठली दिव्य शक्ती होती हे त्या विधात्यालाच माहित...
त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी माणस आजही त्यांना विसरू शकत नाहीत.. म्हणूनच जेव्हा रेल्वेमधून जाताना नजर पेस्तन काकांना शोधते, पुस्तकी बोलणारा प्रत्येक जण गटणे वाटतो, मलबारहिलवर नंदा दिसतो, हिरव्या डोळ्यांचा मास्तर म्हणजे दामलेच वाटतात आणि वर्गातल्या गोर्या आणि घार्या डोळ्यांच्या मुलीमध्ये गोदाक्का दिसते तेव्हा लक्षात येत कि या माणसाने किती सहजतेने आपल्या रोजच्या आयुष्याला लेखणीबंद केल आहे आणि जाणवत किती अफाट माणूस आहे हा...
त्याचं लेखन आपण नुसत वाचत नाही तर जगतो.. त्यांचा प्रत्येक साहित्य प्रकार वाचताना अस वाटत हा माणूस स्वतः आपल्यासमोर बसून हे सगळ वाचून दाखवत आहे... म्हणून ते लिखाण फक्त लिखित न राहता उच्चारी होऊन जात आणि चिरकाल आपल्या मनात स्थान मिळवून जात.. विनोद हि परमेश्वराची देणगी असते... तो करता येण हे जितकं महत्वाच तितकंच तो समजण हे देखील...  पु.लं चा विनोद समजायला एक विशिष्ट मानसिकता लागते.. मध्यम वर्गीत मानसिकता... त्यासाठी "फोर्ट मधुन फिरताना, विंडो शॉपिंग करताना एखाद आवडलेलं घड्याळ त्याच्या अवास्तव किमतीमुळ घेता न आल्याची चुटपूट असावी लागते.. मलबार हिलवरचा प्रासाद बघताना 'हम्म, इथे घर हव होत.. ते असेल तर बाकी काही नको'..." अस वाटाव लागत, पण त्याच वेळेस "अलिशान प्रासाद असूनही एखाद्या हळव्या क्षणी खांद्यावर डोक ठेवाव अस कोणीच नाही, हा पैसा कुचकामाचा आहे त्याऐवजी एखादा सुहृद पुष्कळ आहे" असा साक्षात्कार व्हावा लागतो..  तरच त्यांचा नंदा प्रधान आणि त्या नंदाचा जिवलग मित्र आपल्याला भिडतो... कोकणची भौगोलिक, सामाजिक , सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी माहित असेल तरच "तिरकस विनोद करणारा, जन्मजात तैलबुद्धी असणारा, सानुनासिक आवाजात बोलणारा, तरीही प्रवासाला जाताना मनापासून शुभेच्छा देणारा, आंब्याला पाड आला नाही तर बायकोच्या आठवणीने गहिवरणारा अंतू बर्वा आपल्याला समजू शकतो...
हजरजबाबीपणा आणि पु.ल हे दोन समानार्थी शब्द आहेत.. त्यांचा हा गुण प्रत्येक ठिकाणी दिसून येतो.. त्यामुळ समोरच्याला गुदगुल्या होतात.. बोचणारे ओरखडे ओढण्याचा हिंसकपणा यांच्या विनोदात नाही.. उदाहरणच घ्यायचं झाल तर..
"माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका. एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते. हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?" लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या." एखादा असता तर काहीतरी आचरट वाक्य बोलून मोकळा झाला असता पण आपले पु.ल. तसे नव्हते.. ते मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"..
कोटि करण्यात तर यांचा हात कोणी धरण्याची सुतराम शक्यता नाही.. आता हेच बघा ना...
"एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच
व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!".. मला सांगा आपल्यापैकी कोणाला हे अस लिहिण सुचलं असत..??
व्यक्तिचित्रण हा पु.लंचा लाडका प्रांत होता.. नाथ कामात घ्या किंवा नारायण घ्या.. चितळे मास्तर घ्या किंवा माझ्या शत्रुपक्षातला कुलकर्णी घ्या... नाक,कान, डोळे हे जितके सहज दिसतात तितक्याच सहजतेने भाई हि सगळी मंडळी आपल्यासमोर उभी करतात.. नंदा मधल्या इंदूचच वर्णन घ्या हव तर... आपण तिला काकू बाई म्हणून मोकळे झालो असतो पण भाई कस सांगता बघा..
" इंग्लिश च्या वर्गात आम्ही सात-आठ जण होतो.. त्यात संपूर्ण देशी असा मी आणि इंदू वेलणकर नावाची एक मुलगी होती.. अर्धमागधीला जायची हि मुलगी फॉर्म भरण्यात चूक झाली आणि इंग्रजीच्या वर्गात अल्ली अस वाटावी अशी.. नऊवारी साडी, अंबाडा, हातात पुरुषांनी बांधव अस लट्ठ घड्याळ, हातावर भाराभर पुस्तकांचा ढिगारा आणि मंगळागौरीच जागरण करून आल्यासारखा चेहरा.. अशी हि वेंधळी मुलगी.." साक्षात काकूबाईपणा डोळ्यांसमोर उभा राहिलाच पाहिजे....
त्यांच्या या अलौकिक व्यक्तिचित्रणामागे दैवदत्त देणगी तर आहेच परंतु त्याचबरोबर प्रचंड निरीक्षण शक्ती आहे.. एखादी गोष्ट पहिली कि तिला योग्य ठिकाणी वापरायची हातोटी आहे..
या माणसाचा व्यासंग अलौकिक आहे.. "गुण गाईन आवडी" वाचताना वाटत एखाद्या माणसाला आयुष्याच सार्थक झाल अस कधी वाटेल जेव्हा यांची लेखणी चार कौतुकाचे शब्द लिहील.. मंगेशकर घराण्याबद्दल हे लिहितात,"परमेश्वराला जेव्हा गात व्हावस वाटल तेव्हा त्यान हे घराणं निर्माण केल.." अहाहा!! क्या बात है!
विनोद, लघुकथा याचं बरोबर नाटक हा देखील त्यांचा आवडता प्रांत... अस म्हणतात त्यांनी बरीच नाटक भाषांतरित केली... पण तसं करताना त्याला संपूर्णपणे मराठीच झबलं-टोपडं चढवल... दुसर्या भाषेचा किंचितही प्रभाव दिसू दिला नाही...त्यांनी  "सुंदर मी होणार"मधल्या बेबीचा झुंजार पणा ज्या ताकदीने मांडला त्याच ताकदीने दिदीची हळुवार प्रेमकथा मांडली.. आणि नावापुरते संस्थानिक असणार्या राजाची अगतिकता क्वचित दांभिकता देखील.. अतिशय सुरेख वाटत सगळ वाचताना.. नाटकाचा अंमल उतरत नाही लवकर... तशीच एक कलाकृती म्हणजे "ती फुलराणी"  "तुला शिकवीन चांगलाच धडा" हे जणू ब्रीदवाक्यच होऊन गेल नंतर...
गद्याबरोबरच पद्य देखील यांना भारी आवडायचं.. त्यांच्या काही खुमासदार ओळी फार प्रचलित आहेत... अत्यंत उथळ गीते लिहिणार्यांना शालजोडीतून मारताना ते अक्षरशः ज्ञानदेवांना म्हणतात..
"अहो ज्ञानियांच्या राजा, कशाला फुकाच्या गमजा..
एकेकाळी रचली ओवी.. व्हाल का हो नवकवी...
मारे बोलविला रेडा.. रेघ बी.ए.ची ओलांडा...
तुम्ही लिहावी विराणी... लिहा पाहू फिल्मी गाणी...
म्हणे अलन्दी गावात.. तुम्ही चालविली भिंत..
चालवून दावा झणी.. एक नाटक कंपनी...
बाप रखुमा देवी वर आमचे च्यालेंज स्वीकारा.."
कायम गुदगुली करणारीच रचना कशाला? कधीतरी अंतर्मुख देखील व्हायला हव... आज टाटा करताना उद्याची शाश्वती नसते हे समजून घ्यायला हवं..
"आताशा बुडणाऱ्या सूर्याला
'बरय उद्या भेटू अस म्हणालं'
कि तो म्हणतो, 'कशावरून?,
मधल्या रात्रीची तुला अजूनही इतकी खात्री आहे?
सूर्य आता म्हातारा झालाय' आणि जाता जाता सांगून जातात उद्यावर काही म्हणजे काही ठेवू नका... काय कल्पना आहे...!!!!
विनोदाचा अखंड वाहत झरा असणारे हे पु.ल.. त्यांचा विनोद सर्वश्रेष्ठ आहे.  कारण त्याला कारुण्याची झालर आहे... त्यांना ऐकताना अस कधीच होत नाही कि लेखाची शेवटची ओळ डोळ्यात पाणी आणत नाही.. मग ती "कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या" हि असो किंवा "कोकणातल्या फणसासारखी इथली माणस देखील.. खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात.." हि असो.. उगाचच आत मध्ये काहीतरी हलत.. हळवं बनवत..तरीही सगळ हवहवस वाटत.. हे झाल त्यांच्या विनोदच वेगळ रूप.. परंतु "एक शुन्य मी" मध्ये हे स्वतःच एक वेगळच रूप दाखवून जातात... समाजातल्या काही जाचक गोष्टी त्यांना अत्यंत अशांत बनवतात आणि ते लिहून जातात.. "मानवी इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? गायन, वादन, नर्तन वगैरे कला देवळांच्या परिसरात वाढल्या म्हणतात. कला आपोआप थोड्याच वाढतात? त्या वाढवणारी हाडामांसाची माणसे असतात. त्या गायिका, त्या गायिका, नर्तिका यांना न गाण्याचे किंवा न नाचण्याचे स्वातंत्र्य होते का? एखाद्या गणिकेच्या कन्येला गावातल्या देवदर्शनाला येणाऱ्या स्त्रीसारखे आपल्या नवऱ्याशेजारी बसून त्या देवाची पूजा करण्याचे भाग्य लाभावे असे वाटले तर तिचे कुणी सालंकृत कन्यादान केल्याचा कुठे इतिहास आहे का? की कुत्र्याच्या जन्मकाळा पासून त्याला हाडकावरच वाढल्यामुळे, पुरणपोळी ही आपल्या खाण्याची वस्तूच नव्हे असे त्याला वाटावे, तसे त्या नर्तकींना लग्न ही आपल्या कामाचीच गोष्ट नव्हे असे आपण वाटायला लावले? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. आणि कुठलेही मोहोळ उठले, की अंगावर फक्त डंख उठवणाऱ्या माशांशी मुकाबला करुन प्रत्येक जण त्याचा तो राहतो, तशी काहीशी माझी अवस्था झाली आहे. डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? डोळयांवर आघात करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टींकडून दुसरीकडे फिरवता यायला हवेत! स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव होत असताना अपूर्णाची पूर्णावस्था शून्याच्याकडेच स्वत:ला नेताना दिसते." हे वाचताना कुठतरी आपणही अस्वस्थ होतो.. स्वतःची मानसिक अवस्था दुसर्याच्या मानसिक अवस्थेशी कशी जुळवून घ्यावी याचा मोठा
वस्तुपाठ ते देऊन जातात.. अशा या माणसाच स्मरण मला कायम कृतार्थता देत आल आहे.. त्यांच्या शब्द-रत्नांनी कधीच मनात अढळ स्थान मिळवलं आहे.. आणि म्हणूनच यांच्या बद्दल लिहिताना काळवेळेच  भान राहत नाही... तरीदेखील आता थांबायला हव.. इति लेखन सीमा!!!

Tuesday, 9 September 2014

संयुक्त महाराष्ट्राचे लाडके बाबुराव!!



आज जे आपल्याला भेटणार आहेत त्यांच्यासारखा माणूस गेल्या दहा हजार वर्षात झालेला नाही आणि इथून पुढे दहा हजार वर्षदेखील होणार नाही... प्रखर वक्तृत्व, अचाट बुद्धिमत्ता, तिखट आणि जिव्हारी लागेल अस लिहिणाऱ्या लेखणीचा स्वामी,  प्रेमाला अत्यंत नाजूक धाग्यात बांधणारा आर्द्र मनाचा कवी... किती आणि कशी ओळख करून द्यावी!!!!! मला वाटत तुम्ही सगळ्यांनी पहिल्याच वाक्यावरून यांना ओळखल असणार.. हे आहेत महाराष्ट्राचे नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राचे अत्यंत लाडके बाबुराव अर्थात आचार्य अत्रे!!!
अत्रेंना बालकवी व्हायचं होत.. कुसुमाग्रज व्हायचं होत.. पण संपूर्ण महाराष्ट्राच्या हसर्या आरोग्याचा वसा विधात्याने त्यांचा हाती दिला आणि इतर कोणासारख होण्याऐवजी अत्रे केशवकुमार झाले त्यांच्याच शब्दात सांगायचं तर "देवाच्या आळंदीला जाण्याऐवजी चोराच्या आळंदीला गेले.." अर्थात हे वाक्य फक्त त्यांच्या "झेंडूची फुले"साठीच आहे.. बाकी बाबुराव काय होते हे वेगळ सांगायची गरज नाही..
अत्रेंनी फक्त विडंबन काव्य लिहिली नाही तर अनेक नाट्यगीते, चित्रपटगीते देखील लिहिली.. आणि त्यात देखील प्रचंड विविधता आहे.. श्यामची आई मधल आशा बाईंच्या आवाजातलं "भरजरी ग पीतांबर " हे गीत भावाबहिणीच निस्सीम भक्तियुक्त प्रेम दाखवत.. एक एक शब्द तोलून घ्यावा असा आहे..
"भरजरी ग पीतांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण?
परि मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज!"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून"

या मानलेल्या परंतु विलक्षण आणि अलौकिक प्रेमाला तोड नाही.. अमुल्य अशी मलमपट्टी झाली... अंतराची खुण पटली मग श्रीकृष्ण प्रसन्न झाले यात नवल ते काय!!!
" प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्‍ती तैसा नारायण
रक्‍ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्‍न"
अशा भावाबहिणीच्या नात्याला उलगडून सांगताना अत्रे जेवढे भावूक होतात तेवढेच ते इतरवेळेस मिश्किल आहेत.. प्रेयसी कशी हवी ते कोणीही सांगेल हो पण अत्र्यांनी बायको कशी हवी ते देखील सांगितल आहे...
"अशी, अशी बायको हवी
मला हो, अशी बायको हवी!
पोर असावी अल्लड भोळी
भाव निरागस लाजरी कळी
रुसवा-फुगवा तिचा असावा लाडिक अन्‌ लाघवी
अशी, अशी बायको हवी!
नार असावी नेक पतिव्रता
तिज लाजाव्या द्रौपदी, सीता
पतिपरायण सती असावी नेत्र न जी चाळवी
अशी, अशी बायको हवी!"
बायको होण्या आधी जेव्हा तो तिला पहिल्यांदा बघतो तेव्हा आपसूकच त्याचा मनात विचार येतात...
"ती पाहताच बाला कलिजा खलास झाला
छातीत इष्क-भाला की आरपार गेला
स्वर्गातल्या पर्‍यांना की वस्‍त्रगाळ करुनी
कमनीय देह विधीने रचिला तिचा छबेला
लावण्य काय सारे उकळोनि वा पिळोनी
त्या मस्त अत्तराचा भरला गमेचि बुधला
डौलात चालता ती, हत्ती वनात झुरती
रस्त्यात गुंड जमती तिज अन्‌ पहावयाला"
हे वाचताना सहज जाणवत कि तिच्या सौंदर्याने अनेक दिल खलास झाले आहेत.. आणि तरीही वर्णनात कुठेही हीन पातळीची तुलना नाही किंवा वाचणार्याला अवघडलेपणा यावा अस काही नाही...
हे सगळ वर्णन झाल तिच्या मागे.. जेव्हा तिला प्रत्यक्ष सांगायची वेळ येते कि " बाई ग, तुझा हा नखरा माझ्यासाठी जीवघेणा आहे तेव्हा शब्द लयकारीची कमाल करतात..
"तू सुंदर चाफेकळी । धमक ग पिवळी,
किती कांति तुझी कोवळी ।
तू नंदनवनीची चुकून अप्सरा आलिस या भूतळी ॥
स्वर्गात उमलली सूर्यफुलाची तू कळी ।
तू लावण्याची तिच्याच का पांकळी ।
वर्णिता तुला ही जीभ पडे पांगळी ।
हे काळीज माझे का चुरडुनी सदा तुझ्या पायदळी ॥"
तिच्या होकारासाठी आसुसलेल्या जीवाला जेव्हा तिच्या निरंतर सहवासाची हमी मिळते तेव्हा त्याचा आनंद एकाच काय सातही आभाळात मावत नाही.. आणि तो गाऊ लागतो,
"आज आपुल्या प्रथम प्रीतिचा संगम हा झाला
प्रेमफुलांच्या गळ्यात घालुनि हिंडुया माळा
नाचती झाडे, नाचती हो वेली
रानपाखरे वेडी झाली!
पृथ्वीवरती स्वर्ग धरेला भेटाया आला!
पहा कोयना इकडून येई
समोरून ही कृष्णामाई!
प्रीतिसंगम सखे असा हा जगामध्ये पहिला!"
अनेक भले भले लोक सांगून गेले हे प्रेमाचं दुखण औषधाने बऱ होत नाही, त्याला दुवाच हवी.. एकदा का दोघांनी प्रेमाची कबुली दिली कि मग या नाजूक जखमेला काही म्हणता काही चालत नाही..
"नाजुक ऐशा या जखमेला दवा नको पण दुवा हवा
निर्लेप अशा हृदयावरती मृदुल करांचा लेप हवा
या जखमेला तुझ्या प्रीतिचा असा मुलायम मलम हवा!
नको कुणी वेदना विशारद, नको कुणी तांत्रिक नवा
नकोच धन्वंतरी कुणी परि प्रणयाचा मांत्रिक हवा! "
हि झाली त्याची मनःस्थिती!! त्याच वेळेस ती देखील म्हणत असते,
"उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा
दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा"
हि प्रेमाची दुधारी सुरी अनेक यातना देते पण बर्याचदा त्या सुखावह असतात हेच सांगताना अत्रे म्हणतात,
"प्रीती सुरी, दुधारी!
निशिदिनी सलते जिव्हारी!
सुखवी जिवास भारी!
मधुर सुखाच्या यातना,
व्याकुळ करिती सतत मनाला!
अमृताहुनी विषारी!"
अशा या प्रेमात यशस्वी होण्याच सुख सगळ्यांना मिळताच अस नाही जेव्हा विफलता हाती येते तेव्हा जाणवत हे प्रेमळ जग फसवं आहे, त्यात राहण्यासाठी फार कठोर व्हाव लागत आणि तेव्हा देखील अत्र्यांचे शब्द आपल्यासाठी धावून येतात,
"प्रेम हे वंचिता । मोह ना मज जीवनाचा!
द्या कुणि आणून द्या प्याला विषाचा!
प्रीतिचा फसवा पसारा
भरली इथे नुसती भुते
कोणि नाही जगि कुणाचा!"
जगात कोणी कोणाच नाही हि जाणीव अत्यंत क्लेशदायक असते.. आपली इतिकर्तव्यता संपली कि या इहलोकाचा कंटाळा येतो.. मन पांडुरंगाच्या सांगावयाची वाट बघू लागत.. संध्यासमयी डोळे पैलतीराची वाट बघू लागतात..
"किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार?
लक्ष चौर्‍याऐंशींची ही नको आता येरझार
अनाथांचा नाथ तुला बोलतात संत
काकुळती आलो आता नको बघु अंत
कोठे गुंतलासी राया, कोणाला ताराया?
पंढरीच्या राया, तुझ्या दंडवत पाया!"
                अत्रे म्हणजे महाराष्ट्राचा पुरुषार्थ होते.. मराठी अस्मितेच्या राजकारणाला वेगळ वळण देणारे धोरणी होते.. महाराष्ट्राचा स्वाभिमान होते.. अत्रे कलंदर होते क्वचित बिलंदर होते.. ते अष्टपैलू होते.. ज्या ज्या क्ष्रेत्रात ते गेले तिथे तिथे त्यांनी उत्तुंगता प्राप्त केली.. अखंड ३० वर्ष हा चौधाडा दुमदुमत होता.. टाळ्यांच्या गजरात नाहत होता.. रसिकांना मार्गदर्शक ठरत होता.. बर्याचदा ती शैली बेलगाम धावली आहे पण त्यामुळेच तेव्हा अनेक रथी-महारथींच्या डोळ्यात अंजन घातलं गेल आहे..  अशी माणस शतकातून एकदाच जन्माला येतात आणि त्या कालखंडाला स्वतःच नावरूप देऊन जातात.. स्वतःचा आगळा वेगळा ठसा निर्माण करतात ज्याला मिटवण कदापि शक्य नाही...
                                    इति लेखनसीमा..