Sunday, 13 April 2014

शब्दप्रभू - सुधीर मोघे!!

आज जे आपल्याला भेटणार आहेत त्या अवलियाला काय म्हणावं.. गीतकार, कवी, निवेदक, कीर्तनात रमणारा साधक नक्की काय... माझ्या साठी तरी ते शब्दप्रभू आहेत.. "मुक्तछंद" मध्ये राहणारे नव्हे तर कायम "मुक्तछन्दातच" जगणारे!!! कवितेला सखी मानून काव्यरसिकांना मोहवणारे.. "फिरुनी पुन्हा नव्याने जन्मणारे", कवी असणारे आणि कवीच दिसणारे, साहित्याच्या जगातले मुशाफिर "सुधीर मोघे!!"
कीर्तनकार हा स्वधर्म असणार्या राम मोघ्यांचे हे चिरंजीव, श्रीधर मोघ्यांचे बंधुराज.. लहानपणापासूनच कीर्तांच्या माधमातून नवनवीन रचना, त्याचं सादरीकरण याचं बाळकडू मिळालेलं.. मोठ्या मोठ्या रचना मुखोद्गत असण्याच वरदान मिळालेलं.. अशात जेव्हा अलौकिक प्रतिभेची साथ मिळते तेव्हा सुंदर काव्य जन्म घेत...
"एक कृती, एक शब्द, एकच निमिष चुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला तेवढं एक निमित्त पुरतं.."
अस जोरदार काव्य सलामीला टाकून साहित्य भूमीवर आगमन करणाऱ्या मोघ्यांनी नंतर मागे वळून कधी पहिलच नाही.. खरतर निमिष म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहित आहे पण त्या निमिषाची जादू तेव्हा पसरते जेव्हा मोघे त्याला शब्दबद्ध करतात..
" सर्वागातून जणू उसळली रस-गंधांची लाट
त्या एका निमिषात
दिवेलागणीची 'ती' वेळा
माजघरातील 'तो' झोपाळा
झोपाळय़ावर झुलणारी 'तू'
ठसलीस खोल मनात
श्रावण हिरवा आद्र्र कोवळा
तुझ्याभोवती लपेटलेला
हरित कांकणांचा गजबजता घट्ट पकडला हात
मऊ मुलायम लालस ओळी
ती भाषा मी प्रथम वाचली
एक अनोखी नवखी ओळख वीज भरे गात्रांत
उलटून गेली वर्षे अगणित
अल्प उरे श्वासांचे संचित
सुखमय क्षण ते कसे परतले अवचित पाठोपाठ
त्या एका निमिषात.."
वाह क्या बात है!!!!
मोघे मुळचे किर्लोस्कर वाडीचे.. ६९-७० च्या दरम्यान पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यावरच्या भोंडे कॉलनीत आले. ७१ मध्ये "स्वरानंद"च्या "आपली आवड" साठी निवेदक म्हणून काम करू लागले..
ते चित्रपटातल्या त्या गीतांमधलं काव्य अलगदपणे उलगडून सांगायचे आणि त्याबरोबर मधूनमधून आपल्याही कवितांचा आस्वाद घडवायचे. त्यांच्या कवितांना पुणेकरांनी दिलेली ती पहिली दाद होती.. त्यावेळी त्यांच्या
"दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन येतं,
तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम होतं"
किंवा
"न्हाऊनिया उभी मी, सुकवीत केस ओले, वेडय़ा मुशाफिराने त्याचेच गीत केले" या कविता म्हणजे तरुणांसाठी "love anthem" होत्या...
काळाच्या ओघात मोघ्यांच्या आयुष्यात अनेक माध्यमं, क्षेत्रं सामोरी येत राहिली..पण त्यांचा मूळ धर्म कधीही हरवला नाही.. त्यामुळे या स्वैर भटकंतीत ते कवी-गीतकार झाले, कवी संगीतकार, कवी-गायक, कवी-सादरकर्ता झाले आणि कवी-दिग्दर्शकही.. मोघे या सगळ्यात खूप रमले पण एकाही प्रकारात गुंतून पडले नाहीत.. मुशाफिराच्या ठायी असते ती अलिप्तता त्यांच्याकडे होती कवितेशी एक बांधिलकी होती.. आपण आणि आपली कविता नावाची सखी तिच्यातच ते मग्न राहिले..
कीर्तनकार सुधीर मोघ्यांनी
"तूच मायबाप बंधू तूच प्राणसखा
दीन दुःखितांचा एक तूच पाठीराखा
सज्जनांचा कैवारी तू दुर्जनांचा वैरी
अनाथांच्या नाथा तुझी रूपे नानापरी
तुझ्याविना उभा जन्म होईल पोरका"
अस म्हणून आपल्या भक्तीला शब्दरूप दिल
तर प्रेम कवी सुधीर मोघ्यांनी
"गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं
तसं कधीचं आभाळ आलंय भरून
जळ ढगांत सांकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं"
अस म्हणून प्रीतीला भावरूप दिल.
आपल जीवन म्हणजे काय तर एक झोका, अस म्हणत त्यांनी त्याचीही कविता केली..
"एक झोका,चुके काळजाचा ठोका,एक झोका
उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका
नाही कुठे थांबायचे मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका
जमिनीला ओढायचेआकाशाला जोडायचे
खूप मजा, थोडा धोका"
आणि अस म्हणताना याच झोक्याचा "रासझुला" देखील केला.. तिच्या कृष्णावरच्या प्रेमाचं गीत झाल..
"झुलतो बाई रास-झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा
प्राणहीन भासे रासाचा रंग
रंगहीन सारे नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे हरि सांवळा"
पहिल्या वहिल्या प्रेमात सगळीकडे तीच दिसत असते, पण जेव्हा ती खरचं प्रत्यक्ष भेटते तेव्हा सगळा निसर्ग जणू आपल्यासाठी खुलला आहे सगळे ऋतू फक्त आपल्यासाठीच फुलले आहेत अस वाटत..आणि तो गाऊ लागतो...
"दिसलीस तू, फुलले ॠतू उजळीत आशा हसलीस तू
उरले न आंसूं विरल्या व्यथाही सुख होऊनिया.. आलीस तू
जाळीत होते मज चांदणे जे ते अमृताचे.. केलेस तू
मौनातुनी ये गाणे दिवाणे त्याचा अनामी.. स्वरभास तू
जन्मात लाभे क्षण एकदा हा ते भाग्य माझे.. झालीस तू"
त्याच्या प्रेमाची प्रचीती आल्यावर तीदेखील त्याला आश्वासित करते आणि म्हणते
"दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
स्वप्‍नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन्‌ तृप्‍तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे ! "
त्या दोघांचा आयुष्यात नवीन अंकुर खुलण्याची चाहूल लागते, आपले कष्ट संपणार अस वाटू लागत आणि मग दोघही गाऊ लागतात
" ढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखवील, काट्यांलाबी खेळवील
समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो
असंल त्यो कुनावानी, कसा ग दिसंल
तुज्यामाज्या जीवाचा त्यो आरसा असंल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल"
सांजवेळेला आपल्या शब्दकवेत घ्याव ते मोघ्यानीच
काय लिहून गेलेत ते!!
"सांज ये गोकुळी, सांवळी सांवळी
सांवळ्याची जणू साउली
माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्‍यावरी वाहते बांसरी
अमृताच्या जणू ओंजळी" यात 'अंधार-पान्हा' हि उपमा सुचण हेच किती महान आहे!!!
" तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो
मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो
वैराण माळ उघडा बेचैन तळमळे
मी दान आसवांचे फेकीत चाललो " अस म्हणत स्वतःच्या दुखातही दुसर्यासाठी सुखाची सावली शोधणारे मोघे हे दुखः दूर होऊन सुखाचा प्रकाश पसरल्यावर गाते न होते तरच नवल...
" फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश
दंव पिऊन नवेली झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास "
मोघे विलक्षण प्रतिभावान होते.. प्रज्ञा, मेधा, प्रतिभा सगळ त्याच्यात ठासून भरल होत.. "नक्षत्रांचे देणे' , जागतिक मराठी परिषदेत गाजलेला "स्मरण यात्रा' 'माडगूळ्याचे गदिमा' किंवा "मी विश्‍वाचा' या सगळ्या गोष्टी याच्याच द्योतक आहेत...आणि यावर कडी म्हणजे "कविता पानोपानी' हा काव्य सादारीकारणाचा रंगमंचीय आविष्कार!!
असा हा रसिकांचा लाडका कवी काही दिवसांपूर्वी अनंताच्या प्रवासाला गेला.. तरीही त्यांच्या गाण्यातून, कवितेतून आणि सर्वात महत्वाच शब्दांमधून ते कायम आपल्यात राहणार आहे..कारण तेच सांगून गेले आहेत...
" सप्तस्वरांनो लयशब्दांनो जगेन तुमच्यासाठी
तुमच्यासाठी मरेनही मी, जगेन तुमच्यासाठी
तुम्हीच माझे मायतात हो तुम्हीच माझे गुरू
अनंत हस्ते अखंड दाते समूर्त कल्पतरू
तुम्हीच माझे सात सूर्य अन्‌ तुम्हीच माझी धरती
तुमच्यासाठी मरेनही मी, जगेन तुमच्यासाठी"
सलाम!!! ___/\___

Sunday, 16 March 2014

गझल सम्राट "सुरेश भट"!!!!



आज मी सुरुवात करतानाच अडखळले आहे.. कारण ज्या कवीचा परिचय करून घ्यायचा आहे त्यांच्या साहित्य प्रकारामध्ये एवढी लोकप्रियता आहे, काय निवडाव काय वगळाव कळेना झाल आहे..
कवितेला घेतलं तर गझल नाराज होईल.. त्यातही प्रेम कवितेला निवडल तर आत्म-मग्न कविता नाराज होईल... ज्यांच्या कवितेचा प्रांत थोडासा उपेक्षेमधून जात नंतर विस्तारला अशा गझल सम्राट "सुरेश भट" यांना आजची मानवंदना!!!
अमरावतीच्या कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबातल्या डॉक्टर श्रीधर भटांच हे प्रथम अपत्य!! लौकिक अर्थाने अपयशी परंतु कवितेच्या जगात इतका मान मिळवून गेले कि त्यांची
"लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी"
हि कविता आज मराठी अभिमान गीत झाल आहे..
त्यांचे तीनच कविता संग्रह त्यांना मोठ्ठ बनवून गेले आहेत..
अडीच वर्षांचे असताना पोलिओ मुळ पाय निकामी झाला तरीदेखील त्यांची इच्छाशक्ती लुळी पडली नाही. उलट वाढत राहिली आणि त्यांचा काव्यावरचा विश्वास वाढवत राहिली.. म्हणूनच ते त्यांच्या "एल्गार" मध्ये म्हणतात ''जोपर्यंत मानवजात ह्य़ा पृथ्वीतलावर शिल्लक आहे तोपर्यंत लय, ताल आणि सूर शिल्लक राहतील आणि म्हणूनच वृत्तबद्ध गेय कविता कधीही कालबाह्य़ होणार नाही. जे काव्य मूलभूत मानवी मूल्यांशी इमान राखते, जे मानवाच्या सुखदु:खांविषयी, त्याच्या स्वप्नांविषयी, त्याला हव्या असलेल्या न्यायासाठी उत्कटपणे व परिणामकारकपणे बोलते ते काव्य कधीही कालबाह्य़ होत नाही.''
त्यांना स्वतःच्या वेगळेपणाचा सार्थ अभिमान होता या अभिमानापोटीच ते म्हणतात,
"रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !"
आणि तरीही लिहितं करणाऱ्या त्या प्रतिभेच्या आणि कवितेच्या ऋणाईत राहताना म्हणतात,  "लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते." मनातल्या भावगंधाने कविता मोहरायला हवी, सुगंधित व्हायला हवी हेच तत्व ते कायम जगात राहिले..
माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या मातृभूमीशी त्याने एकनिष्ठ राहायला हव, तिचे पांग फेडायला हवेत अस सांगताना ते म्हणतात,
"गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला !
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग... काशी !
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !"
शब्दांची निवड हे भटांचं बलस्थान आहे, म्हणूनच त्यांची कविता रसिकांच्या काळजाला थेट भिडते.
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
हे वाचताना एक वीरश्री संचारते..
तर
"आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी !
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी !" हे वाचताना मधुराभक्तीचा अनुभव येतो..
भटांनी कविता लिहिल्या, पद, गवळण, भूपाळी अशा पारंपारिक रचना देखील लिहिल्या पण त्याचं मनापासून प्रेम होत ते मात्र गझलेवर!! त्यातही प्रेमाचा वेगवेगळा अविष्कार करणाऱ्या गझलेवर..
मग ती गझल कधी धीट शृंगार व्यक्त करणारी होती,
"आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याजचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ? "
तर कधी
"मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!
मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल" अस म्हणत वियोगानंतर तिच्या आठवणींमधली व्याकुळता व्यक्त करणारी होती..
कधी
"सजण दारी उभा, काय आता करू ?
घर कधी आवरू ? मज कधी सावरू ?
मी न केली सखे, अजुन वेणीफणी,
मी न पुरते मला निरखिले दर्पणी
अन्‌ सडाही न मी टाकिला अंगणी
राहिले नाहणे ! कुठुन काजळ भरू ? " अस म्हणत नवथर प्रेम व्यक्त करणारी होती..
तर कधी
"देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले
हृदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले
एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले
आला जर जवळ अंत
कां हा आला वसंत?
हाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले " अस म्हणत प्रेम करायचं वयच निघून गेल्याची खंत करणारी होती...
भटांच्या शब्द्सामर्थ्याला जेव्हा मंगेशकर कुटुंबियांच्या स्वराच, संगीतच कोंदण लाभत तेव्हा रसिक तृप्त होतात.. "उषःकाल होता होता काळरात्र झाली", "मेंदीच्या पानांवर मन अजून झुलतय ग", "चांदण्यात फिरताना माझा धरलास हात", "केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली", "तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे", "मी मज हरपुन बसले ग ", "मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे", "मालवून टाक दीप चेतवून अंग अंग", "उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे" किती नाव घ्यावीत...
भट कुणालाही न कळणारे अजब रसायन होते. आपल्याच मस्तीत एका कलंदरासारखे जगत राहिले. आयुष्याच्या काही अवघड, कठीण वाटांवर कवितेलाच सखी मानून जगात राहिले.. कधी अंतर्मुख होऊन जीवनाला प्रश्न विचारात राहिले,
"सूर मागू तुला मी कसा ?
जीवना तू तसा, मी असा !
तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझातुझा आरसा !
एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा! "
काहीसा स्पष्टवक्ता आणि त्यामुळच फटकळ वाटणारा हा शब्द-सुरांचा जादुगार, रसिकांचा लाडका कवी!!! त्यांची कविता या हृदयीचे त्या हृदयी अशी शिरते आणि तिथेच राहते अगदी कायमसाठी! अगदी रेशमाचे बंध बनून!  

Tuesday, 11 February 2014

शान्ता शेळके

तुम्ही कधी चष्मा लावलेली, कानाच्यावर दोन बोट ठेवून हसतमुखान समोरच्याशी बोलणारी सरस्वती पहिली आहे??? नाही म्हणता?? अहो आपल्या शांताबाईंना नाही पाहिलत ... साक्षात सरस्वती होत्या त्या...
कथा, कादंबरी, कविता, गीते, लावण्या, व्यक्तिचित्रे, ललित लेख, अनुवाद हे जवळपास सगळे साहित्यप्रकार त्यांच्या लेखणीमधून अवतरले आहेत!! बालगीत, अंगाईगीत, प्रेमगीत, विरहगीत सार काही या एका कवयित्रीने आपल्यासमोर मांडलं आहे...
लहान असताना आपण आपला रुबाब दाखवण्यासाठी
"खोडी माझी काढाल तर
अशी मारी फाईट
घटकेमध्ये विरून जाईल
सारी तुमची ऐट" अस म्हणल आहे...
" मी डोलकर डोलकर
डोलकर दर्याचा राजा" म्हणत नाच सुद्धा केला आहे...
पहिल्या वहिल्या प्रेमाची चाहूल लागताना
"आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे !
भाव अंतरी उमलत होते
परि मनोगत मुकेच होते
शब्दांतुन साकार जाहले तुझ्यामुळे !" अशी भावावस्था देखील अनुभवली आहे....
अनेक भावविभ्रम सुरेख शब्दरचनेत साकारणाऱ्या शांताबाईंच्या शब्दांना कधी गेयता मिळते ते कळतही नाही. भावकवितेच भावगीत होत.. तरीही कविता हीच त्यांची सखी राहते,
"हर्षखेद व गुज मनिची
मूक लाजर्या मनोभावना
लपवी ज्या जगपसुनि
प्रकटविते तुजपुढति त्यांना" अस म्हणत तिच्याशी त्या बोलतात, मोकळ्या होतात..
शांताबाईंनी फक्त स्त्रियांच्याच तरल भावना व्यक्त केल्या अस नाही तर
"तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तूहि कामिनी !"
अस म्हणत आपल्या सखीची आळवणी करणाऱ्या त्याची आर्तता देखील त्यांनी चित्रित केली..
"मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश" म्हणत भक्तीभाव जपला तर
"शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला" म्हणत आतुर प्रेयसीही जपली...
त्याचं अत्यंत सहजसुंदर काव्य त्यांच्या अतिशय समृद्ध, प्रांजळ, साध्या, सरळ, सहज व्यक्तिमत्वाचा परिपाक आहे...
मुलात मुल होऊन रमणाऱ्या त्यांना "आज्जीची पैठणी" आठवते.. निसर्गाची विविध रूपे अनुभवताना त्याचं मन हळवं बनत.. एखाद्या बुडणाऱ्या संध्याकाळी घराकडे परतणाऱ्या पाखरांच्या रांगा क्षितिजावर अगम्य संदेश लिहितात, सायंकालीन वारे कुजबुजतात तो निरोप त्यांच्या पर्यंत पोहोचतो.. त्यांना थोडासा एकाकी करतो..
तेव्हा त्या म्हणतात,
"सांज आली दूरातून, क्षितिजाच्या गंधातून !
मनी नकार दाटले, हात हातीचे सुटले
मागे वळून पाहता शब्दभाव सर्व पुसले
आले जीवन काळोखे सारे समोर दाटून ! "
जात, धर्म,पंथ सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रेम हाच जगाचा पाया आहे हेच त्या सांगतात,
त्या म्हणतात,
" पंथ, जात, धर्म किंवा नाते ज्या न ठावे
ते जाणतात एक प्रेम प्रेमास द्यावे"
इतक सगळ प्रेमळ लिहिताना कधीतरी त्यांच्या हळव्या मनाला अत्यंत त्रास होतो, दुसर्यांच्या वेदनेने वेदना होते.. शब्दांचा होणारा विपर्यास मनाला घर पडतो तेव्हा त्या म्हणतात,
"काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे !
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे !
काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे !
हा स्‍नेह, वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !"
एकूणच काय तर पूर्वग्रह नसणारी अतिशय संवेदनशील वृत्ती, जगाबद्दलच उदंड कुतुहूल, आणि सरस्वतीचा वरदहस्त या सार्या त्यांच्या लिखाणाच्या प्रेरणा आहेत..माणसाच्या स्वभावाचे कंगोरे न्याहाळत, सूक्ष्म अनुभव लोकांपर्यंत पोहोचवत त्या लिहित राहतात, गात राहतात..
"जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !"
खरचं शान्ताबाई तुमच्या कविता ऐकत गीत ऐकत अनेक पिढ्या घडल्या, घडत राहतील.. तुम्ही आमच्यासाठी "आनंदाचं झाड " आहात तुमचा "लोलक" आमच्या मनात चिरंतन राहील..तुमच्या शब्द्सामर्थ्याला माझा मनापसून सलाम...._____/\_____

Sunday, 9 February 2014

बा. भ. बोरकर.



मराठी साहित्यामध्ये सौन्दर्यवाद कधी अवतरला याची नक्की माहिती नसली तरी तो बहरला मात्र यांच्याच कवितेतून..निसर्गातील सौंदर्यावर यांची निष्ठा होती.. शृंगारावर यांची श्रद्धा होती.. धारवाडला गेल्यानंतरही ' गोव्याच्या भूमीसाठी ' झुरणारा हा प्रीतीकवी - 'बाळकृष्ण भगवंत बोरकर अर्थात बाकीबाब!!!
गाथी पोथी वाचून दिवसाची सुरुवात करणार सात्विक, देवभोळ घर.. संध्याकाळी शुभंकरोती सोबत एक अभंग म्हणायचा हा घराचा शिरस्ता.. एक दिवस बा.भ. अभंग पाठ करायला विसरले मग काय म्हणता त्यांनी रचला एक स्वतः आणि 'बाकी म्हणे' अस म्हणून अभंगाचा शेवट केला.. तेव्हापासून ते सगळ्यांचे लाडके 'बाकीबाब' झाले..
गोमांतकाच्या आसमंतात त्याकाळी असणार्या भक्तीच्या सुगंधामुळे असेल कदाचित पण बोरकर अध्यात्मप्रवण होते. म्हणूनच प्रार्थनेचा अमूर्त अनुभव ते व्यक्त करू शकले..
' प्रार्थना तीच जी कवितेसारखी अचल असून स्पंदनशील
शब्दांच्या स्थावर शिल्पात बद्ध न झालेली
ती उगवते झाडासारखी प्राणाचे बीज भेदीत चढत राहते
हिरवीगार अग्निशिखा होऊन सतत सहज
असीम उर्ध्वाचा शोध घेत...'
निर्गुण, असीम, अनंत शक्तीला वंदन करताना ते म्हणतात
"अनंता तुला कोण पाहू शके ?
तुला गातसा वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे ?
तुझी रूपतृष्णा मनाला असे.
तुझा ठाव कोठे कळेना जरी,
गमे मानसा चातुरी माधुरी.
तरूवल्लरींना भुकी मी पुसे,
"तुम्हा निर्मिता देव कोठे वसे ?"
त्यांच्या कवितेत जो भक्ती, सात्विकता या भावाविष्कार मुक्त संचार होतो त्याच श्रेय ते "ज्ञानेश्वरी"ला देतात ते म्हणतात, 'ज्ञानेश्वरी अकराव्या वर्षी माझ्या हातात आली अजूनही मी ती वाचत आहे तेव्हा सारे श्रेय त्या मायमाउलीचे.' ज्ञानदेवांची भक्ती करणारे बोरकर त्यांच्या समाधीचा करून प्रसंग रंगवताना म्हणतात
"ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत
वेद झाले रानभरी गोंधळले संत
ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती
आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती
ज्ञानदेव गेला तेव्हा तडा विटे गेला
बाप रखमा देविवरु कटीत वाकला"
त्यांच्या अध्यात्माची परिभाषा जरी भारतीय असली तरी युरोपातील मानवतावादाचा, नव्या जाणिवांचा त्यांच्या मनावर पगडा होता त्यामुळेच ते तत्वज्ञान देखील अगदी सहज सांगून जातात,
"मार्क्सचा मज अर्थ हवा अन फ्रोईडचा मज काम हवा
या असुरांपरी राबवण्या तरी गांधीचा मज राम हवा... " गांधींवर त्याचं विशेष प्रेम! पण हे आकर्षण राजकीय नव्हत तर तो एका महामानवाच्या नैतिक सौंदर्याचा आदर होता त्यांचा गौरव करताना बाकीबाब म्हणतात ,"हरी आला हो हरी आला
भंग्या घरी हरी आला..."
अशा व्यक्तित्वाला प्रीतीकवी असण्याचा साक्षात्कार नवथर तारुण्यामधल्या एका प्रसंगाने झाला अस ते स्वतःच म्हणत.. वर्गातील एका अल्लड बालिकेने हलकेच त्यांना चुंबन दिले आणि कविता झाली,
"असा कसा मी तरुण निरंतर सांगू कैसे तुला
सहज अचानक झाकून डोळे तिने चुंबिले मला"
त्यांनी कधीच शारीर प्रेम नाकारलं नाही पण म्हणून या उत्कट भावनेला बीभत्स, उत्तान रूपही दिल नाही.. प्रेम स्पर्शातून व्यक्त होत यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच ते म्हणतात,
"फुलल्या लाख कळ्या
स्पर्शसुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या
ध्वनिकंपित तनुच्या शततंत्री
बंदी मन रतीमोहमंत्री
लय लागुनिया नाचु लागल्या स्वप्नीच्या पुतळ्या"
तारुण्यात प्रवेश करताना बोरकर सोबत असणारा माणूस कधीच अरसिक असू शकत नाही मग ती कविता
"तव नयनांचे दल हलले ग !
पानावरच्या दंवबिंदूपरी
त्रिभुवन हे डळमळले ग !" हि असो किंवा
"आयुष्याची आता झाली उजवण येतो तो तो क्षण अमृताचा.
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे.
सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्‍याचे दार उघडावे."
हि असो!!!
नावातच बाळकृष्ण असल्यामुळ प्रेमकविता हक्काची वाटत असावी त्यांना..
"स्मृती, जपानी रमलाची रात्र, श्यामा' या कविता प्रेमकाव्याची उधळण करतात...
"स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा" अस म्हणत भावनांना मोकळ करतात...
कायम अत्तराचा फाया जवळ बाळगणारा, स्वतःच आणि दुसर्याच आयुष्य सुगंधी करणारा हा कवी
"तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे
स्वप्न आहे लोचनी तोवरी पाहून घे..
अस म्हणत स्वप्न बघत, दाखवत राहिला... खरच यांची प्रतिभा, सौंदर्यपिपासा, प्रेम व्यक्त करण्याचा मोकळेपणा मनाला लोभावतो.. त्याचं दिव्यत्व दाखवतो. म्हणून त्यांच्याच शब्दात त्यांना वंदन...
" दिव्यत्वाची जेथ प्रचीती
तेथे कर माझे जुळती " _____/\_____