Thursday, 3 October 2019

Generation Gap - Positive vibes only!!

रात्री साडेआठची वेळ. आम्ही, म्हणजे मी आणि माझी भाच्ची, आमच्याच घरासमोर उभे होतो. आमचे हे दार उघडायची वाट बघत होतो. तेवढ्यात ती आली. एका हातात भाजीची पिशवी आणि एका हातात दूध. फार दमलेली दिसत होती. तशी कपड्यांवरून वगैरे बरी वाटली म्हणा. बोलावं की नाही असा विचार करत होते. आजकालच्या मुलींचं काही सांगता येत नाही हो.परकं माणूस बोललेलं आवडेल, न आवडेल. त्यात ती हिंदीभाषिक असेल तर, आमची हिंदी म्हणजे 'तेरा नाव क्या है?' टाईपची. ओळख व्हायच्या आधीच 'काय खोचक म्हातारी आहे! ' असं वाटायचं तिला. हे असे सगळे विचार सुरु असतानाच ती म्हणाली,
'काय म्हणताय काकू?'
आवाज गोड होता पोरीचा. आणि मला आजी न म्हणता काकू म्हणाली म्हणून आवडलीच मला ती पटकन.
'तू इथे राहतेस? '
'हो ना, सहा सात महिने झाले.'
'दिसली नाहीस कधी. एक कोणीतरी दिसतो घरात अधून मधून. मला वाटलं कोणी बाप्या एकटाच राहतो की काय.'
'तो नवरा माझा.'
नवरा आहे म्हणल्यावर जरा बरं वाटलं मला. नाहीतर काही सांगता येत नाही हो. सुलु म्हणत होती परवा, 'अगं नीट, हल्ली गळ्यांत मंगळसूत्र असतं पण लग्न झालेलं असेलंच असं नाही. फक्त फॅमिलीला जागा देतात ना, मग जागेसाठी हे असं चालतं.'
'अच्छा.. इतके दिवस राहताय इथे. खरं आज दिसलीस तू. ये ना चहा प्यायला..'
'नको काकू, परत येईन कधीतरी.' असं म्हणून ती गेली.
अहोंनी दार उघडलं होतं. मीही आत गेले. थोडक्यात काय, तिची आणि माझी अशी भेट झाली. आणि नंतर होतच राहिली.
कधी 'काकू, माझं एक पार्सल येणार आहे. इथल्या पत्त्यावर. पण आम्ही तर नसतो घरी. ठेवून घ्याल?' म्हणत. किंवा
'काकू, सुरळीच्या वड्या केल्यात. आईला करताना पाहिलं होतं. स्वतःहून पहिल्यांदा केल्या. जरा चव बघता??' म्हणत
तर कधी 'एकतारी पाक करायचा आहे. साखर आणि पाणी ठेवलाय गॅसवर. जरा सांगायला येता? असं म्हणत
पोर लाघवी आहे. कधी त्यांच्या घरातून काय ते 'बद्रीकी दुल्हनिया' ऐकू येतं तर कधी 'अवघा रंग एक झाला'. नवल वाटतं या पोरांचं. एक मात्र आहे कायम हसतमुख असतात दोघं. एकंदरीत सुखी चालू आहे संसार. आमची नेत्रा ऑस्ट्रेलियाला गेली आहे तेव्हापासून घरात माणसांचं येणं जाणं कमीच झालंय. उत्साहाचा झरा आहे माझी नेत्रा. हिला पाहिलं कि नेत्राचीच आठवण येते मला. तशीच आहे ही. बरं झालं शेजारी आहेत. मध्ये ती काय बातमी वाचली ना 'आईच्या हाडांचा सापळा झाल्याचासुद्धा पोराला पत्ता नाही..' तेव्हापासून जरा अस्वस्थच वाटतंय. असो.. तुमच्याशी काय बोलत बसले. खालील गेलेले हे येतील एवढ्यात. चहा टाकते. येते बरं का!!!
---------------------------------------------------------
सहा सात महिन्यांपूर्वी शेजारी कधी नव्हे ते लवकर आले तेव्हा शेजारच्या दारात एक काकू दिसल्या. इथे राहायला आल्यापासून पहिल्यांदा कोणीतरी हसून बघितलं. तशी बरीच दमलेले मी. पण ओळख करून घ्यावी म्हणून म्हणलं,
'काय म्हणताय काकू?'
त्यांनी मग त्यांची जरा माहिती वगैरे सांगितली. निषाद एकटाच राहतो की वाटलं होतं त्यांना. त्यांची काय चूक म्हणा. जिथं एका घरात राहून आम्ही दोघं एकमेकांना वीकएंडशिवाय भेटत नाही तिथं त्यांना भेटायला कधी वेळ मिळणार? तर, असंच टाईमपास काहीतरी बोलून मी तेव्हा बाय म्हणलं. नंतर भेटत राहिलो म्हणा आम्ही तसं.
कधी त्यांच्याकडचा गॅससिलेंडर संपला तो बदलून द्यायला तर कधी त्यांच्या चष्म्याची काच तुटली ती दुरुस्त करून आणायला तर कधी झोपाळ्याच्या गजांना तेल पाणी करायला..
मस्त आहेत काका काकू. साठीचे असतील. पण एकदम टुकटुकीत आहेत. काकांना डायबेटीस आहे जरा. तेवढं चालायचंच.
मध्ये मी पुरण घातलं होतं. युट्युब वर 'अशी कन्सिस्टन्सी हवी.' म्हणून सांगत होती ती शेफ. तेव्हाच काकू आल्या. एकीकडे कढई, एकीकडे युट्युब असं बघून म्हणाल्या. ' बंद कर ते आधी. अगं सोपं असतं पुरण घालणं. डाव हा अस्सा उभा राहिला न की समजायचं पुरण झालं.' आईची फार आठवण आली तेव्हा. इतके वर्ष झाली घराबाहेर आहोत. आता दोन घरं आहेत पण जायला वेळ नाही. सणांचीसुद्धा कुठल्या घरी कधी अशी विभागणी झालेली आहे. या काका-काकूंना पाहिलं की आई-बाबांची आठवण येते. माझ्या आणि निषादच्यासुद्धा. शेजार चांगलं आहे दोन्हीकडे म्हणून बरं. नाहीतर कायम आम्हाला काळजी. वयं झालीत चौघांची. BP मागं लागलंय. जरा कुठे दुखलं खुपलं की आमचा जीव वर खाली होतो. जाताही येत नाही आणि राहवतही नाही असं सगळं विचित्र झालंय. बरं झालं निदान हे काका-काकू तरी आहेत. आमच्यापरीने आम्ही त्यांची काळजी घेतो. आमच्याही आई-बाबांची कोणीतरी काळजी घेतच असतं ना. झालीच त्याची परतफेड तर बरं.....
असो... गप्पा मारण्यात कसा वेळ गेला कळलंच नाही. माझ्या झुंबा क्लासची वेळ झाली. निघते मी. बाय!!!!!

आधुनिक दुर्गा - उर्मिला!!


उर्मिलेचा जन्म झाला तो एका अत्यंत कर्मठ घरात. तीन मुलींवर झालेली ती चौथी मुलगी. अर्थातच तिच्या जन्माचा आनंद वगैरे साजरा झालाच नाही. त्यांचे वडील व्यापारी होते. पैशामागून पैसा येत असतो एवढंच त्यांना माहित होतं. त्यामुळं ते सतत कामात असायचे. इतर घरात जसं कुटुंब एकत्र बांधलेलं असतं तसं त्यांच्या घरात कधी झालंच नाही. त्यांचा बायकोशी संबंध फक्त रात्रीपुरता. तेसुद्धा त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल तसा. अगदी सर्वसामान्य खेड्यांत जसं असतं तसं वातावरण होतं तिच्या घरी.
त्या चारही बहिणींवर प्रचंड बंधनं असायची. केस किती कापायचे, कपडे कुठले घालायचे इथपासून अगदी कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही इथपर्यंत. भरतपूरसारख्या छोट्या गावात पोरीची बदनामी झाली तर तिच्याशी लग्न कोण करणार हा विचार होता त्यामागे. पोरीला उजवलं म्हणजे आपली जबाबदारी संपली या अत्यंत दुर्दैवी विचारामुळे त्या सगळ्या बहिणी सज्ञान होण्याआधीच त्यांच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात झाली.
मिस्टर ननावरे बघायला आले तेव्हा उर्मिला अकरावीत होती. बँकेत बऱ्यापैकी कमावणारा मुलगा या एका निकषावर लगेच सगळं ठरलं. खरंतर खूप शिकायचं होतं तिला, छोट्या शहरात राहूनही काहीतरी करून दाखवायचं होतं. पण ती स्वप्नं पूर्ण होण्याआधीच तिचं लग्न झालं. खूप शिकणं राहिलं बाजूलाच, बारावीसुद्धा पूर्ण करू शकली नाही ती.
लग्न झालं आणि काही काहीच दिवसातच तिला दिवस गेले. स्वतःला कसं सांभाळायचं हे शिकायच्या आधीच आणखी एका जीवाची जबाबदारी अंगावर पडली. 'आता एकदा मुलं झाली की आपण आयुष्यात काहीच साध्य करू शकणार नाही' या विचाराने ती पूर्णपणे गळून गेली. मिस्टर ननावरे दिवस दिवस घरी नसायचे. बायकोला पैशाच्या बाबतीत फार कळू देऊ नये या विचारांचा तो नवरा असल्याने ते नक्की किती कमावतात, किती खर्च होतो याबद्दल तिला कधी काही कळलंच नाही. घरी सासूबाई नव्हत्या. त्यामुळं आला गेला, पै-पाहुणा सगळं तिलाच बघावं लागे. तरीही तो सगळं खर्च भागवून ती पै पै साठवत राहिली.
या सगळ्या परिस्थितीत एक दिलासा मात्र होता. तो म्हणजे उर्मिलेचे सासरे. त्यांना तिची घालमेल समजत होती. एकदिवस ती अतिशय अस्वस्थ असताना ते म्हणाले, 'बेटा, मुलं झाली म्हणजे सगळं संपत नसतं. मी बघतोय तुला. काहीतरी करून दाखवायची धमक आहे तुझ्यात. तू बारावी पूर्ण कर म्हणजे अनेक संधी मिळतील तुला पुढे आयुष्यात.' त्यांनी प्रेरणा दिल्यामुळंच तिने बारावीकरता प्रवेश घेतला. पण बाळंतपणामुळं तेव्हाही बारावी पूर्ण झाली नाही. आणि तिला नैराश्याने ग्रासलं.
दरम्यानच्या काळात तिची मुलगी, सावरी मोठी होत गेली आणि उर्मिलेचं जग मात्र छोटं होत गेलं. सावरी सहावीत वगैरे असेल तेव्हा मिस्टर ननावरेंची नोकरी गेली आणि ते तिघं मुंबईत आले. स्वप्ननगरी, इथे आल्यावर जे पाहिजे ते मिळतं अशी ख्याती असलेली मुंबई. इथं आल्यावर उर्मिलेला मात्र गुदमरायलाच झालं. एवढी गर्दी, सतत धावपळ, बोलायला कोणी नाही अशा सगळ्या परिस्थितीत तिच्या नैराश्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली. 'आपण आयुष्यात काहीच केलं नाहीये', 'आपली कोणालाच गरज नाहीये मग जगून तरी काय फायदा?' अशा विचारांनी तिचं काळीज पोखरून निघायचं. सावरीला ते जाणवायचं. पण ती काहीच करू शकायची नाही. मिस्टर ननावरेंना त्याच्या काळजीतून उर्मिलेकडे बघायला सवडच नसायची. इतर कोणाकडे मदत मागावी तर आजूबाजूला ओळखीचं कोणीच नव्हतं. शेवटी तिने ठरवलं, 'जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे.' मग पहिली पायरी म्हणून मग तिने बारावी पूर्ण करायची ठरवलं. डॉनबॉस्कोमध्ये प्रवेश घेतला आणि अखेरीस तिची बारावी पूर्ण झाली.
मुंबईमध्ये राहून एव्हाना एक गोष्ट तिच्या लक्षात आलेली होती. इथे सगळं सेल्फ मेड आहे. सगळ्यांची आपापली स्वप्नं आहेत. लोक तुम्हाला जगायला मदत करतात, पण तुमची स्वप्नं तुमची तुम्हालाच पूर्ण करावी लागतात. तिची बारावी तर झाली होती. पण पुढे काय? हा प्रश्न मात्र कायम होता.
एकेदिवशी अशाच विमनस्क मनःस्थितीत करी रोड वरून घरी येताना तिने पाहिलं एका लहान मुलीला एक मवाली पोरांचा घोळका त्रास देत होता. सगळे दारू पिऊन तर्रर्र होते. कशाचंच भान नव्हतं त्यांना. त्या मुलीला प्रतिकार करायची संधीच नव्हती. आजूबाजूचे पुरुष नुसते बघत होते. काहींनी तर व्हिडीओदेखील काढायला सुरुवात केली. तिला प्रचंड राग आला, चालू असलेल्या प्रकारची तिडीक डोक्यात गेली आणि हातात असलेली पर्स गरागरा फिरवत ती त्या घोळक्यावर चालून गेली. तिचा तो आवेश बघून आजूबाजूच्या चार बायासुद्धा मदतीला आल्या. एवढ्या बायका अचानक अंगावर आलेल्या बघून तो घोळका पांगला आणि ती लहानगी वाचली.
तेव्हा अचानक उर्मिलेच्या लक्षात आलं. हे काहीतरी नवीन घडलंय आज. कुठलंही ट्रेनिंग नसताना, म्हणावा तेवढा आत्मविश्वास नसताना फक्त अन्यायाची चीड आली म्हणून ती करू शकत असेल तर थोडं ट्रेनिंग आणि काही साधनं हातात असतील तर आपल्या पोरी-बाळींना कुठलाही त्रास सहन करावा लागणार नाही. हा विचार मनात आला आणि दुसऱ्याच दिवशी तिने त्या अनुषंगाने माहिती गोळा करायला सुरुवात केली. सर्वांत आधी कराटे क्लास लावला, स्व-संरक्षणाची वर्कशॉप्स केली. इतके वर्ष पै पै साठवून ठेवलेला पैसा या कामात खर्ची घातला. कराटे शिकत असतानाच स्वतःच्या घरात आजूबाजूच्या मुलींना स्व-संरक्षणाच्या युक्त्या सांगायला लागली. त्यासाठी नाममात्र फी घ्यायला सुरुवात केली. हे सगळं मिस्टर ननावरेंना न सांगता सुरु होतं. न जाणो ते परवानगी देतील की नाही.
बघता बघता शिकायला येणाऱ्या मुलींची संख्या एवढी वाढली की तिचं घर पुरेनासं झालं. आणि तिचे हे उपद्व्याप मिस्टर ननावरेंना समजले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी उर्मिलेला पाठिंबा दिला. आर्थिक मदतही केली. स्वतःला मुलगी असल्यामुळं कदाचित बापाच्या जीवाची काळजी तिच्या मदतीला धावून आली.
मग काय, तिने घराजवळच एक हॉल भाड्याने घेतला आणि व्यावसायिकरित्या या शिकवणीला सुरुवात झाली. आज तिच्या 'स्त्री-शक्तीच्या' तीन शाखा आहेत. हजारो मुली स्व-संरक्षणात पारंगत झालेल्या आहेत. एकेकाळी शून्यात असणारी तिची नजर आता स्वप्नं पुरं होताना बघत आहे. कोणत्याही मुलीला स्वतःला अत्याचारापासून वाचवण्यासाठी आत्महत्या करावी लागू नये, चालत्या ट्रेन मधून उडी घ्यावी लागू नये, घरात कोंडून बसावं लागू नये हे उर्मिलेच्या संस्थेचं ध्येय आहे.
संस्थेत शिकणाऱ्या मुली जेव्हा त्यांना आलेल्या वाईट अनुभवांवर त्यांनी कशी मात केली हे सांगायला उर्मिलेकडे येतात तेव्हा तिला आठ-दहा वर्षांची परकरी उर्मिला आठवते, काही कळायच्या आत तिच्याभोवती पडलेला हातांचा विळखा आठवतो. नको नको तिथे झालेले स्पर्श आठवतात. तेव्हा आपण असहाय्य होतो पण आज या मुली तशा नाहीत हे जाणवतं, त्यांना कवेत घेते, कुरवाळते आणि मनापासून आशीर्वाद देते...
-तन्मया (२७ ऑक्टोबर १७)
**कथा आणि पात्रं काल्पनिक आहेत.

शेवरीच्या काळजाची पमा आज्जी!


आठवणींचा गोफ कसा बांधला जातो आणि कधी तो अचानक सुटून सगळ्या आठवणी मोकळ्या होतात काssही सांगता येत नाही. काल सुपरमार्केट मध्ये एका बुटक्या, गुटगुटीत, हसऱ्या आजीला पाहिलं आणि पमा आजीची आठवण आली. साडेचार-पाच फुटाची उंची, मूळचा गव्हाळ पण उन्हात राबून रापलेला काळसर वर्ण, कपाळावर गोंदून घेतलेलं भलंमोठ्ठ कुंकू, बसकं नाक, त्यात एक चमकी, पांढरेशुभ्र दात आणि या सगळ्याच्या जोडीला सतत भिरभिरती नजर. पक्ष्याने श्वास घेतला तरी हिच्या नजरेतून ते सुटायचं नाही.
पमा आजीची आणि आमची गाठ पडली ती आम्ही नव्या घरी आलो तेव्हा. नववीत वगैरे असेन मी. आमचा गृहप्रवेश झाला आणि एक पन्नाशीची बाई एका हाताने डोक्यावरचा पदर सावरत शिरा घेऊन हजर. 'तुम्ही आलेले दिसलात, म्हणलं चला, मुहूर्ताला काहीतरी गोड न्यावं. त्यानिमित्ताने ओळख होते.. काय!!' पमा आजी जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा शेजार आणि सोबत हे समानार्थी शब्द होते. जग फार विस्तारलेलं नव्हतं. बरंच होतं म्हणा एका अर्थी.
पमा आजीची ओळख झाल्यानंतर आजी जवळ नसल्याचा सल बराच कमी झाला. मला आठवतंय, धनत्रयोदशीच्या दिवशी पमा आजी उटणं आणि तेलाची वाटी घेऊन यायची, सकाळी सकाळी. 'पोरींनो, आज बायकांची न्हाणी. चला तेल लावून घ्या पटापट.' म्हणत आमची मालिश करून द्यायची. काय सायीसारखे मऊ हात होते तिचे. एवढं काम करूनही ते इतके मऊ कसे असायचे देवच जाणे. ती म्हणायची, 'पोरींनो, दिवाळी हा असा एकच सण असावा कदाचित ज्यात प्रत्येकाच्या वाटणीला एकेक दिवस आहे. काल गरीब गाईचा झाला, आज आपला आहे.' पमा आजीमुळं आईला सासरीच एक माहेर मिळालं होतं. आम्हा बहिणींना मालिश करून दिलं कि ती आम्हाला खोलीच्या बाहेर काढायची. 'सुधा, चल गं. वर्षभर राबतो आपण आजचा दिवस लाड करून घेऊ.' म्हणत आईलासुद्धा मालिश करून द्यायची. नवीन घरी पहिल्या दिवाळीला हे झालं तेव्हा आईला रडू आवरलं नव्हतं. पमा आजी जे काही बोलायची त्यामागे कुठेतरी, काहीतरी खुपतंय हे आम्हाला जाणवायचं पण काय ते विचारायची कधी हिम्मत व्हायची नाही.
मध्यंतरी, मी बारावीत असताना आमच्या कामवाल्या मावशीने पमा आजीची थोडीफार माहिती आम्हाला सांगितली होती. 'बाई फार धीराची. नवरा कामासाठी म्हणून कायम दुसऱ्या गावी असायचा. शनिवार-रविवार यायचा इकडे. नवरा नाही त्यामुळं सासूने मन भरेपर्यंत सासुरवास लावला तिच्यामागे. पमाचा नवरा घरापासून लांब होता, घरवालीपासून नाही. या एकाच कारणासाठी पमा सगळं सहन करायची. चौकाच्या तोंडावर तिचं किराणामालाचं छोटं दुकान होतं. दिवसभर ती तिकडे राबायची. रात्र व्हायला लागली कि बापे यायचे दारू ढोसून. त्यांना बाईच्या स्पर्शाची भूक असायची. दोन चार चाकलेटं घेऊन हात लावता आला तर बरंच म्हणून ते संधी शोधायचे. पमा गपगुमानं काम करायची. एकदा एकानं जास्तच सलगी करायचा प्रयत्न केला तेव्हा समोर जो होता तो डबा त्याच्या डोक्यावर उलटा करून आरडाओरडा केला तिनं. तेव्हा बाईच्या अब्रूची किंमत होती समाजात. लोक आले धावत आणि त्या बाप्याला बेदम मारलं त्यांनी. तेव्हापासून पमाच्या वाट्याला कोणी गेलं नाही. दुकान आणि घर सांभाळत पमानं पोराला शिकवलं, साहेब बनवलं. संतोष कितीदा बोलावतो हिला नगरला, पण ही जात नाही. म्हणते, 'नवरा कधी नव्हे ते बरोबर आहे राहायला, सासुरवाससुद्धा संपलाय. तुम्ही पोरं राहा सुखानं.' सासू-सुनेचं दुष्टचक्र तोडलं हिनं म्हणून सूनसुद्धा फार प्रेमाने वागते हिच्याशी.'
पुढे मी शिक्षणासाठी म्हणून घर सोडलं आणि पमा आजीचा व माझा संबंध फक्त जेव्हा घरी जाईन तेव्हाच यायला लागला. तिची आठवण मात्र कायम यायची. खास करून पौर्णिमेचा चंद्र बघताना. नवीन घरांत गेल्यावर काही महिन्यातच गावात लोडशेडींग सुरु झालं. अशाच एका पौर्णिमेला गावात दिवे नव्हते, चंद्र नुकता उगवत होता, चांदणं पसरायला सुरुवात झालेली. पमा आजी आली आणि सगळ्यांना अंगणात घेऊन गेली. 'पोरींनो, पौर्णिमेचं, पहिल्या पावसाचं, पानगळीचं आणि तान्ह्या बाळाचं सौंदर्य न बघण्याचं पाप करू नका.' पाप-पुण्याच्या तिच्या कल्पना फारच वेगळ्या होत्या. ती दृष्ट काढायची, मन शांत व्हावं म्हणून स्तोत्र म्हणायची, तुळशीला नमस्कार करायची पण तिने कधी भरमसाठ उपास तापास करून स्वतःला त्रास करून घेतला नाही, मारुतीला, शनीला तेल वाहिलं नाही की कुठे दुधाचा अभिषेक केला नाही. तिच्या घरात आलेल्या कोणालाही उपाशी पोटी मात्र कधीच झोपू दिलं नाही.
पमा आजी आणि आजोबा पत्ते खेळायचे. कोणी आलं साथीला तर त्याला घेऊन नाहीतर दोघंच. २४ तास कमी पडतील असं काम करून थकलेले जीव ते. आता २४ तास खायला उठायचे त्यांना. मग रम्मी, अठ्ठीडाव, डमी खेळाडू घेऊन लॅडीस वगैरे वगैरे.. आम्ही गेलो कि हक्काने आमच्याबरोबर चॅलेंज खेळायचे. आजोबांची जीत ठरलेली. 'जन्मभर खरं बोलला नाहीत. जिंकणारच कि चॅलेंजमध्ये..' हे आजीचे टोमणेही ठरलेले असायचे. एकदा या ठरलेल्या संवादात अचानक आजोबा म्हणाले, 'थांब, आज खरं सांगतो.. 'मला फार आवडतेस तू..'' आजीला कुठं तोंड लपवू असं झालेलं..
मध्ये घरी गेले तेव्हा आई म्हणाली, 'राजा राणीचा डाव अर्ध्यावरतीच मोडला. भातुकलीच्या खेळात राणी गेली, इथे राजा सोडून गेला..' मला फार वाईट वाटलं. आयुष्यभर मधू इथे अन चंद्र तिथे असं जगलेलं जोडपं. 'चालायचं गं, त्याच्यापुढे आपलं काही चालत नसतं..' पमा आजी मलाच समजावत होती. 'आता मी ना, संतोषकडे जावं म्हणते. तो बोलावतोय कधीपासून. तिकडे जाईन, पुस्तकं वाचेन, बागकाम करेन पण इथे नाही राहू शकत. हे घर, हे अंगण, हा पत्त्यांचा कॅट खायला उठेल मला. मला भेटायला येशील ना नगरला?' फार फार आतून भरून आलं मला.
पमा आजी नगरला गेली आणि आमच्या गप्पा फोनवर सुरु झाल्या. विषय तेच. पण माझी फिरकी घ्यायला, मला 'मग, कधी करताय लग्न?' म्हणून त्रास देण्यात तिला मजा यायची. यथावकाश माझं लग्न ठरलं आणि तिला पत्रिका द्यायला मी नगरला गेले. नमस्कार करताना म्हणलं, 'आजी नक्की यायचंय लग्नाला.. तुझ्या लेकीची लेक आहे मी.' कधी नव्हे ते फार शांत आवाजात ती म्हणाली, 'पोरी, वय झालं माझं. आत्ता इथे गाठ पडली. लग्नाचं काही सांगता येत नाही बघ.' तेव्हा हा निरोप शेवटचाच असू शकतो हे जाणवलं आणि माझेच डोळे भरून आले. ते बघून पमा आजी म्हणाली, 'अगं, वेडी का काय, तुझ्या लेकीला न्हाऊ-माखू घातल्याशिवाय कुठे जात नाही मी.' सुदैवाने पमा आजी लग्नाला आली आणि मला हायसं वाटलं. तिने आम्हाला मनापासून आशीर्वाद दिला. आणि नवऱ्याला म्हणाली, 'जावईबापू,' मध्येच माझ्याकडे बघत, 'हसू नको गं, ज्याचा मान त्याला द्यायलाच हवा..' तर जावईबापू, जरा आगाऊ आहे, पण पोरगी गुणी आहे. संसार चांगला करील. फक्त घरात उंचावर काही ठेवणार असाल तर आधीच एक-दोन स्टूल्स आणून ठेवा. पोरीची साथ मात्र कधी कधी सोडू नका. सुखाने नांदा!
आज तीन वर्षं झाली पमा आजीला भेटून. सुदैवाने, तिच्या घरचा गंगाजलाचा गडू सीलबंदच आहे. तिची आणि माझी आता कधी गाठ पडेल देवच जाणे. देवसुद्धा अशा माणसाच्या फार कमी आवृत्त्या काढतो, लोकांना उगाच गोडाचं अजीर्ण नको व्हायला!
-तन्मया

अस्तु!!!


कालच अस्तु पाहिला. बरेच दिवस पाहायचा होता पण मुहूर्त लागत नव्हता.
अस्तु.. सो बी इट. आपल्या मराठीत असो!!
अस्तु पाहिला आणि आयुष्यभर 'अस्तु'च्या चालीवर जगलेले अण्णा आठवले. त्यांना स्मृतीभंश नव्हता. पण ते कायम वर्तमानात जगले म्हणून आठवले.
अण्णा परांजपे. त्यांना साऱ्या जगाने ओळखावं एवढं मोठं नाव असण्याचं काहीच कारण नव्हतं. अण्णांच्या हाताखालून गेलेली मुलं गणितं करताना कॅल्क्युलेटर वापरत नाहीत हीच काय ती त्यांची ख्याती. त्याला कारणही तसंच होतं म्हणा. गावात असलेल्या एकमेव शाळेत छत्तीस वर्ष गणित शिकवलं त्यांनी. वैदिक गणितापासून अबॅकसपर्यंत सगळं. अण्णांच्या वर्गात पोराला घातलं की तीसापर्यंत पाढे, वर्ग, घन, वर्गमुळं, प्रमेयं, क्लृप्त्या, सूत्रं वगैरे सगळं सगळं पोरांना येतं हे अख्या गावाला माहित होतं. त्याकाळी गावात मॅथ्स ऑलिम्पियाडचा एवढा बोलबाला नव्हता नाहीतर अण्णांची खास अकादमी निघाली असती.
मुलं सहावीत गेली की खास हुशार मुलांची म्हणून एक स्कॉलर बॅच काढली जायची शाळेत. सातवीच्या स्कॉलरशिपची तयारी म्हणून. 'अनलर्न अँड रिलर्न' वगैरे प्रकार आमच्या लहानपणी नव्हते. विषय शिकवतानाच त्याचा पाया पक्का केला जायचा. पावकी, दिडकीचा जमाना गेलेला. पण पाढे होते. त्या अखंड चौकोनांच्या वहीत दोन ते तीस पाढे लिहिले नाहीत म्हणून कित्येक मुलामुलींना वर्गाबाहेर जावं लागलेलं आहे. चुकीला माफी नाही हे तत्व होतं. फक्त अण्णांचं नाही तर त्या पिढीचंच. पालकदेखील मुलाच्या अभ्यासात 'पोरगं यत्ता पुढं जात आहे ना म्हणजे बरं चालू आहे' इतपतच लक्ष देणारे होते. तेव्हचा काळच तसा होता म्हणा.
तर, त्या खास स्कॉलर बॅचला पंढरीनाथ राण्यांचं क्लृप्त्या आणि सूत्रे घेऊन अण्णा वर्गात यायचे. वास्तविक ते सगळं पुस्तक त्यांना पाठ होतं. त्यामुळं केवळ आम्हाला गरज लागली तर नाव सांगता यावं यासाठीच ते आणलेलं असावं असंच आम्हाला वाटायचं. अण्णा शिकवायचे मात्र फार छान, मृदू आवाजात. एखाद्याच्या ऋजुतेचासुद्धा धाक असतो. म्हणजे असायचा. तसं होतं अण्णांचं. त्यांचा शांतपणा हीच त्यांची सगळ्यांत मोठी ताकद होती. ते शिकवायला लागले की पंचेचाळीस मिनिटांची तासिका कधी संपायची ते समजायचंच नाही. त्यामुळं इतरांना सगळीकडे गळके हौद, भिंत चढता न येणाऱ्या पाली आणि कामचुकार मजूर दिसत असायचे आणि आम्ही मात्र इतक्या मुद्दलाची, इतक्या टक्के दराने किती वर्षात दामदुप्पट होईल हे चुटकीसरशी सांगायचो. अण्णांमुळेच पुढे अकाउंटला त्रास झाला नाही. त्यांचे कितीतरी विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात CA झाले. अण्णांचा घोकंपट्टीवर विश्वास नव्हता. मुलांना समजेपर्यंत ते वेगवेगळ्या पद्धतीने समजवायचे. आणि मग जे समजलंय ते लिहायला सांगायचे. मध्येच एखाद्याला, 'पाठक, काय लिहिलंय ते जरा वर्गाला सांगा बरं..' म्हणत सामूहिक उजळणी करून घ्यायचे. ते म्हणायचे, 'तर्जनी आणि अंगठ्यात पेन/पेन्सिल/खडू काहीही धरून तुम्ही एखादी गोष्ट गिरवलीत की ती मेंदूत फिट्ट बसते.' परवा एका शोधनिबंधात 'सर्वेक्षणाअंती' निघालेला हाच निष्कर्ष वाचला आणि अण्णांची शिकवण्याची पद्धत अत्यंत योग्य होती याची खात्री पटली.
अण्णांनी या शिक्षण कार्याला आयुष्य वाहून घेतलेलं. त्यांनी माझ्या आत्याला शिकवलं, बाबांना शिकवलं आणि मलाही शिकवलं. बाबांनी नाटकात वगैरे काम केलेलं होतं. ते कदाचित अण्णांना आवडलं नसावं. त्यामुळंच की काय 'त्या नाटकवाल्या वासूची ना गं तू..' असं म्हणतच आमची ओळख झाली. अत्यंत साधे राहायचे अण्णा, त्यांच्या स्वभावाला साजेसं. स्वच्छ, पांढराशुभ्र शर्ट, करड्या रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचा जाड फ्रेमचा चष्मा, बारीक कापलेले केस आणि पायात चामड्याच्या चपला. बाबांनी त्यांचं जसं वर्णन केलं होतं तसेच ते होते. बाबांच्या वेळेस सायकलने शाळेत यायचे, आमच्यावेळेस लुना आली हाच काय तो फरक.
आम्ही शाळा सोडली, काही वर्षातच मुलांच्या ज्ञानार्जनाचा उत्साह कमी झाला आणि शाळेच्या ध्येयामध्ये अर्थार्जनाचा नंबर वर लागायला लागला. तेव्हा मात्र अण्णांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि अत्यंत माफक दरात मुलांसाठी शिकवण्या सुरु केल्या. मला आठवतंय, कित्येक वर्षं अण्णांनी एखाद्या गरीब मुलाला स्वतःच्या घरी ठेवून घेतलेलं. त्याचं सगळं शिक्षण होईपर्यंत. ते म्हणायचे, 'या समाजाचं फार मोठं देणं लागतो आपण. जितक्या पद्धतीने ते चुकवता येईल तेवढं चांगलं!' अण्णा कायम वर्तमानात जगायचे. कोणी त्रास दिला तरी वैषम्य नाही, नातेवाईकांनी लुबाडलं तरी त्रागा नाही. खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ. त्यांच्या या मानसिकतेची बऱ्याचदा चेष्टा व्हायची. 'स्वतःच्या मुलांना खायची भ्रांत असताना हे विकतचं दुखणं कशाला हवंय म्हणून..' पण करत असलेल्या पुण्याची कुठेतरी नोंद होतं असावी. म्हणूनच आज त्यांच्या दोन्ही मुलांचे सांसार उत्तमरीतीने सुरु आहेत. अत्यंत गुणी सुना आहेत. तीन संसार तीन घरात पण एकाच कुटुंबात सुरु आहेत.
माझी शाळा संपून इतकी वर्षं झाली पण अजूनही गावी गेलं की अण्णांची भेट घेतल्याशिवाय मन भरत नाही. त्यांचा तो हळुवार आवाज, शांत डोळे आणि एकूणच समतोल देहबोली आश्वस्त करतात. त्याच्याकडचा तो तासभर पुढच्या भेटीपर्यंत पुरतो.
मध्ये एकदा गेलेले त्यांच्याकडे तेव्हा ते TV बघत होते. Byju's learning Appची जाहिरात लागलेली. मला बघून TV बंद करत अण्णा म्हणाले, 'बघितलंस, काय काय तंत्रज्ञान आहे. चांगलंच आहे म्हणा. पण फक्त हातचा चुकला म्हणून रडणाऱ्या पोरांना समजवायला जमलं की झालं..' माझेच डोळे पाणावले. जराजीर्ण नाही पण वार्धक्याकडे झुकणाऱ्या त्या हाडाच्या शिक्षकाला बघताना मला अभिमानही वाटत होता आणि वाईटही वाटत होतं.
अण्णांची आणि माझी आता वीसेक वर्षांची ओळख. त्यांची स्वतःपुरती एक जनरीत आहे असं मला कायम वाटत आलेलं आहे. कोणी गेलं म्हणून अण्णांनी कधी फार शोक केल्याचं आठवत नाही. ते म्हणायचे, 'येणारा जीव, जाणारच. गेला तो. त्याचा झाला भूतकाळ. येणारा जीव भविष्य घेऊन येत असतो त्याचं कौतुक करायला हवं.' मुलगी जन्माला आली तर त्यांना विशेष आनंद व्हायचा. ते म्हणायचे, 'विश्वाची कूस आहे मुलगी म्हणजे. मुलगा पोशिंदा म्हणता तर मुलगी पालनकर्ता आहे. असा विचार सगळ्यांनी केला तर काय बहार येईल.. अस्तु!!!!'
हा एक अस्तु ह्या एवढ्या आठवणींना घेऊन आला. आता पुन्हा जाईन तेव्हा इराची आणि अण्णांची गाठ घालून द्यायला हवी. तिला भेटल्यावरसुद्धा अण्णा म्हणतील, 'त्या नाटकवाल्या वासूची नात ना गं तू..?' आणि गुरु-शिष्येचं हे नातं असंच अभंग राहील. ते बघताना डोळे टिपायला एखादा रुमाल मात्र आठवणीने न्यायला हवा.. अस्तु!!!
-तन्मया..