Thursday, 3 October 2019

अस्तु!!!


कालच अस्तु पाहिला. बरेच दिवस पाहायचा होता पण मुहूर्त लागत नव्हता.
अस्तु.. सो बी इट. आपल्या मराठीत असो!!
अस्तु पाहिला आणि आयुष्यभर 'अस्तु'च्या चालीवर जगलेले अण्णा आठवले. त्यांना स्मृतीभंश नव्हता. पण ते कायम वर्तमानात जगले म्हणून आठवले.
अण्णा परांजपे. त्यांना साऱ्या जगाने ओळखावं एवढं मोठं नाव असण्याचं काहीच कारण नव्हतं. अण्णांच्या हाताखालून गेलेली मुलं गणितं करताना कॅल्क्युलेटर वापरत नाहीत हीच काय ती त्यांची ख्याती. त्याला कारणही तसंच होतं म्हणा. गावात असलेल्या एकमेव शाळेत छत्तीस वर्ष गणित शिकवलं त्यांनी. वैदिक गणितापासून अबॅकसपर्यंत सगळं. अण्णांच्या वर्गात पोराला घातलं की तीसापर्यंत पाढे, वर्ग, घन, वर्गमुळं, प्रमेयं, क्लृप्त्या, सूत्रं वगैरे सगळं सगळं पोरांना येतं हे अख्या गावाला माहित होतं. त्याकाळी गावात मॅथ्स ऑलिम्पियाडचा एवढा बोलबाला नव्हता नाहीतर अण्णांची खास अकादमी निघाली असती.
मुलं सहावीत गेली की खास हुशार मुलांची म्हणून एक स्कॉलर बॅच काढली जायची शाळेत. सातवीच्या स्कॉलरशिपची तयारी म्हणून. 'अनलर्न अँड रिलर्न' वगैरे प्रकार आमच्या लहानपणी नव्हते. विषय शिकवतानाच त्याचा पाया पक्का केला जायचा. पावकी, दिडकीचा जमाना गेलेला. पण पाढे होते. त्या अखंड चौकोनांच्या वहीत दोन ते तीस पाढे लिहिले नाहीत म्हणून कित्येक मुलामुलींना वर्गाबाहेर जावं लागलेलं आहे. चुकीला माफी नाही हे तत्व होतं. फक्त अण्णांचं नाही तर त्या पिढीचंच. पालकदेखील मुलाच्या अभ्यासात 'पोरगं यत्ता पुढं जात आहे ना म्हणजे बरं चालू आहे' इतपतच लक्ष देणारे होते. तेव्हचा काळच तसा होता म्हणा.
तर, त्या खास स्कॉलर बॅचला पंढरीनाथ राण्यांचं क्लृप्त्या आणि सूत्रे घेऊन अण्णा वर्गात यायचे. वास्तविक ते सगळं पुस्तक त्यांना पाठ होतं. त्यामुळं केवळ आम्हाला गरज लागली तर नाव सांगता यावं यासाठीच ते आणलेलं असावं असंच आम्हाला वाटायचं. अण्णा शिकवायचे मात्र फार छान, मृदू आवाजात. एखाद्याच्या ऋजुतेचासुद्धा धाक असतो. म्हणजे असायचा. तसं होतं अण्णांचं. त्यांचा शांतपणा हीच त्यांची सगळ्यांत मोठी ताकद होती. ते शिकवायला लागले की पंचेचाळीस मिनिटांची तासिका कधी संपायची ते समजायचंच नाही. त्यामुळं इतरांना सगळीकडे गळके हौद, भिंत चढता न येणाऱ्या पाली आणि कामचुकार मजूर दिसत असायचे आणि आम्ही मात्र इतक्या मुद्दलाची, इतक्या टक्के दराने किती वर्षात दामदुप्पट होईल हे चुटकीसरशी सांगायचो. अण्णांमुळेच पुढे अकाउंटला त्रास झाला नाही. त्यांचे कितीतरी विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात CA झाले. अण्णांचा घोकंपट्टीवर विश्वास नव्हता. मुलांना समजेपर्यंत ते वेगवेगळ्या पद्धतीने समजवायचे. आणि मग जे समजलंय ते लिहायला सांगायचे. मध्येच एखाद्याला, 'पाठक, काय लिहिलंय ते जरा वर्गाला सांगा बरं..' म्हणत सामूहिक उजळणी करून घ्यायचे. ते म्हणायचे, 'तर्जनी आणि अंगठ्यात पेन/पेन्सिल/खडू काहीही धरून तुम्ही एखादी गोष्ट गिरवलीत की ती मेंदूत फिट्ट बसते.' परवा एका शोधनिबंधात 'सर्वेक्षणाअंती' निघालेला हाच निष्कर्ष वाचला आणि अण्णांची शिकवण्याची पद्धत अत्यंत योग्य होती याची खात्री पटली.
अण्णांनी या शिक्षण कार्याला आयुष्य वाहून घेतलेलं. त्यांनी माझ्या आत्याला शिकवलं, बाबांना शिकवलं आणि मलाही शिकवलं. बाबांनी नाटकात वगैरे काम केलेलं होतं. ते कदाचित अण्णांना आवडलं नसावं. त्यामुळंच की काय 'त्या नाटकवाल्या वासूची ना गं तू..' असं म्हणतच आमची ओळख झाली. अत्यंत साधे राहायचे अण्णा, त्यांच्या स्वभावाला साजेसं. स्वच्छ, पांढराशुभ्र शर्ट, करड्या रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचा जाड फ्रेमचा चष्मा, बारीक कापलेले केस आणि पायात चामड्याच्या चपला. बाबांनी त्यांचं जसं वर्णन केलं होतं तसेच ते होते. बाबांच्या वेळेस सायकलने शाळेत यायचे, आमच्यावेळेस लुना आली हाच काय तो फरक.
आम्ही शाळा सोडली, काही वर्षातच मुलांच्या ज्ञानार्जनाचा उत्साह कमी झाला आणि शाळेच्या ध्येयामध्ये अर्थार्जनाचा नंबर वर लागायला लागला. तेव्हा मात्र अण्णांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि अत्यंत माफक दरात मुलांसाठी शिकवण्या सुरु केल्या. मला आठवतंय, कित्येक वर्षं अण्णांनी एखाद्या गरीब मुलाला स्वतःच्या घरी ठेवून घेतलेलं. त्याचं सगळं शिक्षण होईपर्यंत. ते म्हणायचे, 'या समाजाचं फार मोठं देणं लागतो आपण. जितक्या पद्धतीने ते चुकवता येईल तेवढं चांगलं!' अण्णा कायम वर्तमानात जगायचे. कोणी त्रास दिला तरी वैषम्य नाही, नातेवाईकांनी लुबाडलं तरी त्रागा नाही. खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ. त्यांच्या या मानसिकतेची बऱ्याचदा चेष्टा व्हायची. 'स्वतःच्या मुलांना खायची भ्रांत असताना हे विकतचं दुखणं कशाला हवंय म्हणून..' पण करत असलेल्या पुण्याची कुठेतरी नोंद होतं असावी. म्हणूनच आज त्यांच्या दोन्ही मुलांचे सांसार उत्तमरीतीने सुरु आहेत. अत्यंत गुणी सुना आहेत. तीन संसार तीन घरात पण एकाच कुटुंबात सुरु आहेत.
माझी शाळा संपून इतकी वर्षं झाली पण अजूनही गावी गेलं की अण्णांची भेट घेतल्याशिवाय मन भरत नाही. त्यांचा तो हळुवार आवाज, शांत डोळे आणि एकूणच समतोल देहबोली आश्वस्त करतात. त्याच्याकडचा तो तासभर पुढच्या भेटीपर्यंत पुरतो.
मध्ये एकदा गेलेले त्यांच्याकडे तेव्हा ते TV बघत होते. Byju's learning Appची जाहिरात लागलेली. मला बघून TV बंद करत अण्णा म्हणाले, 'बघितलंस, काय काय तंत्रज्ञान आहे. चांगलंच आहे म्हणा. पण फक्त हातचा चुकला म्हणून रडणाऱ्या पोरांना समजवायला जमलं की झालं..' माझेच डोळे पाणावले. जराजीर्ण नाही पण वार्धक्याकडे झुकणाऱ्या त्या हाडाच्या शिक्षकाला बघताना मला अभिमानही वाटत होता आणि वाईटही वाटत होतं.
अण्णांची आणि माझी आता वीसेक वर्षांची ओळख. त्यांची स्वतःपुरती एक जनरीत आहे असं मला कायम वाटत आलेलं आहे. कोणी गेलं म्हणून अण्णांनी कधी फार शोक केल्याचं आठवत नाही. ते म्हणायचे, 'येणारा जीव, जाणारच. गेला तो. त्याचा झाला भूतकाळ. येणारा जीव भविष्य घेऊन येत असतो त्याचं कौतुक करायला हवं.' मुलगी जन्माला आली तर त्यांना विशेष आनंद व्हायचा. ते म्हणायचे, 'विश्वाची कूस आहे मुलगी म्हणजे. मुलगा पोशिंदा म्हणता तर मुलगी पालनकर्ता आहे. असा विचार सगळ्यांनी केला तर काय बहार येईल.. अस्तु!!!!'
हा एक अस्तु ह्या एवढ्या आठवणींना घेऊन आला. आता पुन्हा जाईन तेव्हा इराची आणि अण्णांची गाठ घालून द्यायला हवी. तिला भेटल्यावरसुद्धा अण्णा म्हणतील, 'त्या नाटकवाल्या वासूची नात ना गं तू..?' आणि गुरु-शिष्येचं हे नातं असंच अभंग राहील. ते बघताना डोळे टिपायला एखादा रुमाल मात्र आठवणीने न्यायला हवा.. अस्तु!!!
-तन्मया..


शिवराळ मानसिकतेचा उगम!


मुलं लहान असतात तेव्हा एक जण म्हणतो, 'मी आज खेळायला येणार नाही.. आईने काम सांगितलं आहे..'
त्याला एखादा दांडगट उत्तर देतो, 'तुझ्या आईचा घो..' पब्लिक हसतं.
लहान मुलाला वाटतं, आईचा घो' म्हणलं की लोकांना आवडतं..
पुढे मुलं मोठी होतात, शिंगं फुटतात. मुलगा म्हणतो, 'आज मला हे काम जमणार नाही, आई नाहीये घरी. त्यामुळं मला बाहेर पडता येणार नाही. '
तेव्हा उत्तर येतं, 'तुझ्या आईचा भो@&.. दरवेळेस तुझं काहीतरी कारण असतं..'
मुलगा म्हणतो, 'भो@& म्हणजे काय?'
उत्तर येतं, 'अर्थ नाही माहित..'
मुलगा विचारतो, 'अर्थ माहित नसताना बोलायचं कशाला..'
उत्तर येतं, 'अरे भारी वाटतं..'
मुलाला पटतं.. - आईचा भो@& म्हणलं की भारी वाटतं..
आणखी काही वर्षांनी मुलगा नोकरी करायला लागतो. सुट्टीचा प्लॅन बनतो. आणि अचानक ऑफिसचं काम निघतं. मुलगा म्हणतो, ' मला ट्रीपला यायला जमणार नाही.. बॉसने काम सांगितलंय. डेडलाईन प्रेशर आहे..'
तेव्हा उत्तर येतं, 'तुझ्या मॅनेजरच्या आईचा ल$&. आजच काम द्यायचं होतं त्याला.. त्या आईघा%* लाव घो&. आणि चल...' आतापर्यंत मुलाच्या मनावर ठसलेलं असतं की अशा गोष्टींचे अर्थ शब्दशः घ्यायचे नसतात. त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेलं असतं की कोणी एखाद्याचं नाव सांगून काम होत नाही म्हणलं की त्याच्या आईचा भो@&, $& म्हणलं की भारी वाटतं.. मेंदूचं क्लासिक कंडिशनिंग होत राहतं. एखाद्याचं नाव घेऊन कोणी कामं होऊ शकत नाही म्हणलं की त्याचा आईला शिव्या द्यायच्या. आपल्याला बरं वाटतं.. भारी वाटतं..
आता मला सांगा, या मानसिकतेच्या जोडीला, सत्तेचं पाठबळ, दारूचा अंमल, बेफिकिरी, मग्रुरी असेल आणि अशावेळेस कोणी म्हणलं, 'साहेब दोन दिवसांनी शिवजयंती आहे. काम होणार नाही..' अशावेळेस तो सत्तेवर असणारा काय उत्तर देईल?
जे उत्तर आलं ते आपण ऐकलंच... मग त्याने शिवरायांना शिव्या घातल्या म्हणून गदारोळ झाला. प्रत्येकाने तापल्या तव्यावर पोळी, फुलके, काय हवं ते भाजून घेतलं. महाराजांना शिव्या दिल्या म्हणून आपल्या महाराष्ट्रीय अस्मितेला धक्का पोहोचला. त्या माणसाला कठोर शिक्षा व्हायला हवी वगैरे मागण्यादेखील झाल्या. पण आपण हा विचार केलाच नाही, या सगळ्याचं मूळ कशात असावं? त्याला खरंच महाराजांना शिव्या द्यायच्या असतील का? एकूण परिस्थिती, जनमानसाच्या भावना, राजकारण लक्षात घेता अजूनतरी महाराजांना अर्वाच्य बोलावं अशी कोणाचीही हिम्मत होणार नाही. मग असं का झालं असेल? एकूणच ही अशी उठसूट शिव्या देण्याची मानसिकता का निर्माण होत असेल?
लहानपणापासून आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नाहीत तो मुलगा पुळचट आहे हे या ना त्या प्रकाराने मुलांच्या मनावर बिंबत असतं. महान व्यक्तीला शिव्या देणाऱ्या माणसाला शिक्षा देण्याची मागणी होते पण येता-जाता आई-बहिणीच्या अंग-प्रत्यंगांचा विशेष उल्लेख करून अर्वाच्य बोलणाऱ्यांना कोणीच कधीच काहीच म्हणत नाही. हे मात्र माझ्या पचनी पडत नाही.
माझा आणि शिव्यांचा संबंध सुदैवाने फार उशिरा आला. इंजिनिअरिंगला असताना आमीरचा देल्ली-बेल्ली आलेला, तेव्हा कोणीतरी सांगितल्यावर मला समजलं की यातल्या एका गाण्यात खुलेआम शिवी वापरली आहे. एवढं माझं ज्ञान अगाध होतं. यात अभिमान वाटावा असं काहीच नाही. पण न्यूनगंड वाटावा असंसुद्धा काही नाही. शिव्या देत नाही म्हणून माझं कोणी ऐकत नाही का? तर असं अजिबात नाही. गोड बोलून, सामंजस्याने घेऊन जितक्या सहजतेने कामं होतात तेवढ्या सहजतेने शिव्या देऊन होत नाहीत.
आई-बहिणीवरून शिव्या देणं, 'अगं, we don't mean it..' वगैरे म्हणून शिव्यांना पाठीशी घालणं हे तर मला कधी समजूच शकत नाही. अशातच मग Parched नावाचा सिनेमा येतो. पुरुषी अहंकाराखाली भरडल्या गेलेल्या बायका गावाबाहेर जाऊन बाप आणि भावावरून शिव्या देतात. 'तुम्ही आई-बहिणीवरून शिव्या द्या.. आम्ही बापा-भावावरून देतो..' हे उत्तर कसं असू शकतं?
गाडी चालवताना कोणी गाडी मध्ये घातली, त्याच्या आई-बहिणीचा उद्धार होतो. कुणी पैसे बुडवले, फसवलं, त्याच्या आई-बहिणीचा उद्धार होतो. फार मोठ्या गोष्टी कशाला? भारत-पाक सामन्याच्या वेळेस आफ्रिदी संघात असुदे नसूदे, त्याच्या आईचा उद्धार होतो. का? म्हणजे एखाद्याने चूक केली किंवा एखाद्याच्या एखाद्या कृतीमुळे तुम्हाला त्रास झाला तर त्याच्या आई-बहिणीला लांच्छन का?? आणि हे बोलून दाखवलं तर 'अशा शब्दांचे अर्थ जसेच्या तसे घ्यायचे नसतात गं..; किंवा 'तुमच्या मनात पाप आहे म्हणून तुम्हाला यामुळं त्रास होतो' वगैरे म्हणून विषयावर पडदा!! का??
मला कायम वाटतं. जोपर्यंत या आई-बहिणीवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या बंद होत नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही डोकी आपटा, स्त्रियांबद्दल आदर निर्माण होऊ शकत नाही. शिव्या देताना कुठे ना कुठेतरी अनादर निर्माण होत असतो. शब्दांमध्ये तेवढी ताकद नक्की असते.
आता सगळ्यांना सुधारायचा मक्ता तर आपण घेऊ शकत नाही. मुलं मोठी होत असताना त्यांच्या कानावर या शिव्या पडणार नाहीत याची हमीही देऊ शकत नाही. परंतु, आपली मुलं(मुलगा आणि मुलगीदेखील) कोणाच्याही आईवरून, बहिणीवरून, तिच्या योनीवरुन शिव्या देऊ नयेत एवढी खबरदारी नक्कीच घेऊ शकतो.
नाहीतर काय??? उत्तर द्यायला काळ समर्थ आहे...!!!
टीप-
१. त्याने महाराजांना शिव्या दिल्या हा अक्षम्य अपराध आहे. त्याचं समर्थन करण्याची दुर्बुद्धी मला झालेली नाही.
२. आजकाल फक्त मुलगेच शिव्या देतात अस नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. मुद्दा लिहायला सोपा जावा म्हणून मुलाचं प्रातिनिधिक उदाहरण घेतलं आहे.
या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पोस्ट वाचावी, उगाच तलवारी उपसून अंगावर येऊ नये!!
- तन्मया..


विरणाऱ्या नात्याची कविता!


दोघं भेटतात.. त्यांचं मैत्र जडतं.. आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या जातात.. मनात अगदी खोलवर असलेल्या गोष्टींची देवाणघेवाण होते.. आणि अचानक काहीतरी बिनसलं आहे असं वाटतं.. म्हणजे खटके उडून भांडणं होतात असं नाही पण कुठेतरी काहीतरी चुकतंय असं दोघांनाही जाणवतं.. विरु पाहणारं वस्त्र असतं ना तसं.. ते फाटलेलं नसतं पण त्यात कुठलीही गोष्ट धरून ठेवण्याची ताकदच नसते.. तरीही ते वस्त्र टाकवत नाही.. अशावेळेस मग सुरू होते ती असलं-नसलं नातं टिकवण्याची जीवघेणी धडपड..
दोघं भेटायचं ठरवतात.. भेटतात.. आणि त्यांच्या लक्षात येतं, आपल्याकडे बोलण्यासारखं काही राहिलंच नाहीये.. हे 'शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले' असं नाहीये तर एक रितेपणा आहे.. ज्या व्यक्तीशी बोलताना विषयांची जरूरही नव्हती त्या व्यक्तीच्या डोळ्याला डोळा भिडवता येत नाहीये.. मग कधी एकदा इथून बाहेर पडू याची असोशीने वाट पाहिली जाते.. आणि जेव्हा वाटा वेगळ्या होतात तेव्हा जाणवतं.. अजून एक प्रयत्न व्हायला हवा.. नातं टिकवण्यासाठी आणखी एकदा भेटायला हवं..
खरंतर त्या दोघांत जे होतं ते आता नाहीये हे दोघांनाही जेव्हा जाणवतं तेव्हा निमूटपणे बाजूला झालं तर दोघंही सुखी होतात.
"We love each other. But we do it better when are not together.. "
असं म्हणून बाजूला जाणं श्रेयस्कर असलं तरी तो क्षण कोणता असतो हे समजणं फार कठीण आहे.. ज्याला ते जमतं तो या नात्यांच्या गुंत्यात अडकत नाही.. निसटतं पकडून ठेवण्याची वृथा धडपड करत नाही.. असे क्षण माणसाला प्रौढ बनवतात हे मात्र खरं.. त्या क्षणांसाठी ही कविता...
बोलायला निवांत काही हॉटेलामध्ये शिरलो आपण..
आणि कुठल्या उत्साहाने मागावलेही पदार्थ खच्चून...
बोलावे तो तशी नेमकी जाणीव झाली..
कशी विसंगत..
नव्हते काहीच बोलायला..
डोळे होते डोळा चुकवीत...
न्याहाळीत मी जपानी तरुणी..
तूही काढली नोट खिशातून..
अर्धा कपही चहा न सरला..
निमुटपणाने उठलो तेथून...
नकळत वळली दूर पावले..
कशातून तरी सुटलो वाटुनि...
नकळत वळले बाजूस डोळे..
परतायची ओढ लागुनि...
-इंदिरा संत!!


घर: वस्तू नव्हे भावना!

आम्ही लहान असताना निबंधाचे ठरलेले विषय असायचे. माझी आई, किंवा माझा आदर्श किंवा माझं घर वगैरे.. तेव्हा मग त्यात ठरलेल्या कवितेच्या ठरलेल्या ओळींनीं निबंधाची सुरुवात किंवा शेवट व्हायचा. म्हणजे आईवर निबंध लिहायचा असेल तर "स्वामी तिन्ही जगाचा" हे पाहिजेच. "माझा आदर्श" मध्ये एकदातरी "दिव्यत्वाची जेथ प्रचिती.. वगैरे" यायचं. आणि माझं घर म्हणल्यावर घराचं चित्र डोळ्यांसमोर येण्याआधी "घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती.." याच ओळी यायच्या. नंतर अनेक वर्षांनी विंदा करंदीकरांची हिमयोग वाचली. घराविषयीची हे इतकी सुंदर कविता शाळेत असताना का नाही वाचली असं वाटलं तेव्हा.
तीन छोट्या कवितांची एक मोठी कविता. साठच्या दशकात लिहिलेली. आज त्याचे अनेक संदर्भ नाहीसे झालेत. पण घर जेव्हा केवळ वास्तू न राहता त्याची भावना होते त्या भावनेची ही कविता..

घराकडच्या आठवणी: दाराच्या कडीच्या, घातल्या न घातल्याचा..
न्हाणीतल्या साबणाच्या सवयीच्या वासाच्या. चौघांच्या श्वासाच्या..
चड्डीच्या नाडीचे टोक आत गेल्याच्या. गालफुगव्या आवळ्याच्या..
खिडकीवरील कावळ्याच्या, थर्मामीटर फुटल्याच्या, एकदाची गाठ सुटल्याचा..
भांडल्याच्या, शेजारणीच्या उखळामध्ये रेशनची करड कांडल्याच्या..
बटणे हरवल्याच्या, हरवल्यावर सापडल्याच्या, सापडून पुन्हा हरवल्याच्या..
बीटाच्या, थीटाच्या. केरसुणी बांधल्याच्या, फुटकी काच सांधल्याच्या..
आमसुलाचे साराच्या, लोणच्याच्या खाराच्या, गौरीच्या, गणपतीच्या..
आरशावर पडलेल्या तेलाच्या डागाच्या, रुसलेल्या रागाच्या..
"आम्ही-म्हणजे-अडचणी"च्या, "सगळी सोंगे" वगैरेंच्या, "पावडर-दिसते-आहे-का"च्या..
बाटलीमध्ये अडकलेले सबंध बूच काढल्याच्या, हातावर वाढल्याच्या..
आशेच्या, निराशेच्या, रद्दीमध्ये फसल्याच्या. संडास बंद असल्याच्या..
चेंडू हरवून झाल्याच्या, खिडकीपाशी काढलेल्या कानांतल्या मळाच्या..
संथखोल पाण्यामधील नियतीच्या गळाच्या एकटीच्या बळाच्या...
आमचं घर म्हणजे एक वाडा होता. तीन बिऱ्हाडकरू एकत्र राहत होते त्यात. बाहेरची खोली, मधली खोली, स्वयंपाकघर, आणि मागची खोली अशी रचना. बाहेरच्या खोलीत आई-बाबांचा दवाखाना. त्यामुळं राहायला म्हणून तीनच खोल्या मिळायच्या. त्यात मग पाहुणे आले की कोणी कुठं झोपायचं यावरून प्लॅनिंग. लहानपणी स्क्वेअर फूट वगैरे समजत नव्हतं ते बरं होतं एका अर्थी. बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या त्यामुळं..
त्या वाड्यात सगळ्यांत मिळून तीन संडास होते, आणि दोन दिवे. त्यावर काजळी जमायची, मग त्याचा प्रकाश कमी व्हायचा. सकाळी शाळेच्या वेळा, मोठ्यांच्या कामाच्या वेळा असं एकत्र आल्यावर सगळी बोंबा-बोंब. बाहेरचा कोणी माणूस आला आणि त्याला जावं लागलं तर आम्हालाच अगदी लाज गेल्यासारखं वाटायचं. सुरुवातीला पुरेसा पैसा नव्हता म्हणून आणि नंतर मुलींच्या शाळा जवळ आहेत म्हणून आम्ही ते घर बदललंच नाही. आज वाटतं आई बाबांनी कसं निभावलं असेल ते सगळं. कसं राहिलो असू आम्ही त्या घरात.
तिथे आम्ही पाढे गिरवले, प्रमेय शिकलो, स्पेलिंग्स गिरवली, अनेकवेळा घोकंपट्टीदेखील केली, क्वचित मारही खाल्ला.
तिथंच आम्ही आरत्या म्हणाल्या, मखरी सजवल्या, सत्यनारायण घातले, आकाशकंदील बनवले, पठण ऐकलं आणि अनेकदा महामृत्युंजयाचा जपही केला, तो कधी फळला, कधी नाही..
तिथंच आमची बारावीपर्यंतची शिक्षणं झाली. नंतर मात्र शिक्षणासाठी घर सोडावं लागलं. आणि आता तर काय घराचं माहेर झालं. तरीही जशी घरच्यांची आठवण येते तशी मला घराचीसुद्धा आठवण येते. आणि घर म्हणलं की मला तो वाडाच आठवतो. ते का होतं असेल याचं उत्तर देणारी ही विंदांची कविता..
तुम्ही म्हणलं पूर्वी हे सगळं होतं आता कालबाह्य झालंय. असेलही कदाचित. पण प्रचंड दमल्यानंतर "कधी एकदा घरी जाईन असं झालंय" या वाक्याची जागा दुसरं काही घेत नाही तोपर्यंत घर ही भावना कालबाह्य होणार नाही. जोपर्यंत घराविषयी, आपल्या माणसांविषयी हा हळवेपणा आपल्या मनात आहे तोपर्यंत विंदांच्या या कवितेला मरण नाही!

Tuesday, 4 April 2017

पॉंडिचेरी बस नाम ही काफ़ी है..

मी तशी लहानच होते तेव्हा. मोठ्या शाळेत येऊन काहीच महिने झालेले. आणि आईने दिवाळीत हैद्राबादला जाऊया असा प्रस्ताव मांडला. गृहमंत्र्यांचा प्रस्ताव नाकारण्याची हिम्मत आजही आमच्या कोणामध्येच नाही, तेव्हा तर सवालच नव्हता. ती आमची पहिली लॉन्ग टूर. त्यानंतर जी टूर-टूर सुरु आहे ती आजतागायत. तर, जेव्हा नवीन ठिकाणी फिरायला जायचो तेव्हा एक गोष्ट सगळीकडे कायम दिसायची ती म्हणजे पाठीवर एखादी सॅक, हातात मॅप(तेव्हा गूगल मॅप्स नव्हते) आणि गॉगल्स घातलेली परदेशी मंडळी. ही मंडळी एकेकटी एवढ्या लांब येतात, दुसऱ्या देशात राहतात, सगळं म्हणजे सगळं नवीन असूनही मस्त मजा करतात. ते बघून या अशा ट्रॅव्हलर्सबद्दल एक कुतूहल होतं. आयुष्यात एकदा तरी हे असं करायचं असं तेव्हाच कुठेतरी मनात घर करून बसलेलं. परवा त्याला मुहूर्त लागला आणि पॉंडिचेरीला जाणं झालं.

            बंगलोरमध्ये असताना माणूस पॉंडिचेरीला गेला नाही म्हणजे घाटावर राहणाऱ्या आणि फिरायची आवड असणाऱ्या माणसाने कोकणात न जाण्यासारखं आहे. इथून पूर्वेकडचा जवळचा आणि सुंदर समुद्रकिनारा असणारं शहर म्हणजे पॉंडिचेरी. इतकं साधं सोपं गणित आहे हे.

इथून निघून एखाद्या वीकेंडला संपूर्ण पॉंडिचेरी बघता येतं. शुक्रवारी रात्री निघालं कि शनिवारी पहाटे पहाटे माणूस पॉंडिचेरीमध्ये येतो. आपलं नशीब चांगलं असेल तर नुकतं तांबडं फुटत असताना आपण तिथे पोहोचतो. बसने जात असू तर बसस्टॅन्डपाशीच एखादी रिक्षा करायची (मीटरने मिळायची शक्यता कमीच)आणि सरळ बीच रोड गाठायचा. रोडच्या २०-२५ मीटर अलिकडे रिक्षा थांबते कारण संध्याकाळी पाच ते सकाळी नऊ हा रस्ता गाड्यांसाठी बंद असतो. रिक्षातून उतरत असताना आकाश उजळत असतं. थोडंसं चाललो कि एकदम मऊ मऊ वाळूत पोहोचतो आपण. आपल्या स्वभावाला साजेल अशी जागा शोधायची आणि सूर्योदय बघायचा. मधेच एखादा ढग सूर्याशी लपाछपी खेळत असतो. आयुष्यात बऱ्याचदा समुद्रावरचा सूर्यास्त बघणाऱ्या पश्चिम किनाऱ्याकडच्या आपल्यासाठी हा फार सुखद अनुभव असतो. जर आपण सप्टेंबर ते फेब्रुवारीच्या आसपास गेलो तर साडे सात-आठ वाजेपर्यंत किनाऱ्यावर बसू शकतो. चक्कर मारू शकतो. रोडच्या टोकाशी चहावाले असतात, तिथे १० रुपयांत सुंदर चहा पिऊ शकतो किंवा किनाऱ्यावर शांतपणे बसू शकतो....

            पॉंडिचेरीमध्ये बघायलाच हव्यात अशा ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ऑरोविले, अरबिंदो आश्रम, पॅराडाईज बीच, सेरेनिटी बीच, Basilica of the Sacred Heart of Jesus .आणि वेळ उरलाच तर मग बोटॅनिकल गार्डन, सायंटिफिक गॅलरी, Immaculate Conception Cathedral, ऑरोविले बीच, म्युझियम्स आणि जितकी हवी तितकी मंदिरं.  स्टॅन्डजवळच टू व्हीलर्स भाड्याने मिळतात, दिवसाला चारशे रुपये.मी विजय आर्या नावाच्या दुकानामधून गाडी भाड्याने घेतली होती. आपल्या आवडीची, सोयीची गाडी घ्यायची आणि पॉंडिचेरी फिरायला निघायचं.


            पॉंडिचेरीपासून साधारण ११ किलोमीटरवर असणारी ऑरोविल ही अशी जागा आहे जिथे जवळपास पन्नास देशांतून ५०,००० लोक येऊन राहत आहेत. ही खऱ्या अर्थाने 'वसुधैव कुटुंबकम' आचरणात आणणारी जागा आहे. कुणीही या, स्वयंसेवक व्हा, राहा आणि इथलेच होऊन जा असं त्यांचं तत्व आहे. योगी अरविंदांच्या साथी मीरा अल्फासा ज्यांना सगळे माताजी किंवा मदर म्हणतात त्यांनी या अनोख्या टाऊनशिपची संकल्पना मांडली. २८ फेब्रुवारी १९६८ जवळपास ५००० लोकांनी एका वडाच्या झाडाखाली(जे अजूनही तिथे आहे) भूमिपूजन केलं आणि या जागेच्या जन्माची कथा मांडायला सुरुवात झाली. आता मात्र खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा विस्तार झालेला आहे. मातृमंदिर हे तिथे असणारं एक अनोखं ध्यानकेंद्र आहे. त्यात ध्यानासाठी १२ खोल्या आहेत. प्रत्येक खोलीचा रंग वेगळा आहे. खूप विचार करून हे केंद्र बांधण्यात आलेलं आहे. त्याची संपूर्ण माहिती बुकिंग बूथजवळ मिळते. मातृमंदिरात आतमध्ये जाण्यासाठी किमान एक दिवस आधी परवानगी घ्यावी लागते. आणि रविवारी हे केंद्र बंद असतं. त्यामुळे फक्त शनिवार-रविवार जाणाऱ्या लोकांना ते बघायला मिळत नाही. पण त्याचा विडिओ मात्र बघता येतो आणि दुरूनच ते केंद्रदेखील बघता येतं. त्यावरून साधारणपणे अंदाज येतो.

            ऑरोविल मध्ये आपल्याला पाठीवर सहा महिन्याच्या बाळाला बांधून अव्हेंजरवरून जाणारी एखादी जर्मन बाई दिसेल. पोटावर एक बाळ आणि मागे सीटवर एक असं घेऊन सायकलवरून मातृमंदिराकडे जाणारी एखादी कोरियन बाई दिसेल. किचनमध्ये ऑर्डर देणारा एखादा चिनी पुरुष दिसेल. आणि असे बरेच लोक दिसतील. एकमेकांची भाषा येत नसूनही इथे लोकांनी खूप शांत वसाहत वसवली आहे.त्यामुळेच कदाचित इथून बाहेर पडताना आपल्यालाही खूप शांत वाटल्याशिवाय राहत नाही.

            ऑरोविल मधून परत येताना तिथला बीच बघायचा. पॉंडिचेरीमध्ये एखादा बीच सोडला तर बाकीचा कुठलाही बीच खेळण्यासाठी अनुकूल नाही. त्यामुळं वेडं धाडस करू नये. मग तिथून निघून सरळ सेरेनिटी बीचवर यायचं. अथांग समुद्र, मागे मावळतीला निघालेला सूर्य आणि आपण. केवळ सुख. इथे कितीही वेळ बसलं तरी निघावंसं वाटत नाही. आजूबाजूला सुंदर कॅफे आहेत. खायची-प्यायची(प्यायची विशेष) चैन आहे. एवढं होईपर्यंत संध्याकाळ संपून जाते. फ्रेंच डिनर किंवा स्पेशल तामिळ डिनर करावा आणि बीच रोडवर येऊन बसावं. खऱ्या मुंबईकराला मरीन ड्राइव्ह म्हणल्यावर कसं वाटतं तसं आपल्याला इथे वाटतं. रोडच्या टोकाशी GMT आईस्क्रिम शॉप आहे. 'नो वन शुड मिस धिस..' नंतर मग वाटलं तर रात्रभर बीचरोडवर बसता, फिरत येतं.

            दुसऱ्यादिवशी पॅराडाईज बीच आणि अरबिंदो आश्रम बघायचा. पॅराडाईज बीचला दोन प्रकारे जाता येतं. रस्त्याने गेलो तर आपण थेट बीचवर पोहोचतो. नाहीतर मग 'चुन्नाम्बर' जवळ गाडी पार्क करायची आणि बोटीने बीचवर जायचं. दोन्ही अनुभव सुरेखच आहेत. बोटने जायचं असेल तर सकाळी ९ ची पहिली फेरी गाठायची आणि बीचवर धमाल करायची. नावाला साजेसा असा बीच आहे हा. एवढं होईपर्यंत १२ वाजून जातात. मग मस्त जेवण करायचं. म्युझिअम्स आणि चर्चेस बघायची. रविवार असेल तर 'मास' म्हणजे काय असतं तेही अनुभवता येतं. खूप देखणी आणि व्यवस्थित राखलेली चर्चेस आहेत ही. वाटलं तर बोटॅनिकल गार्डन बघायची, जिथे टॉय ट्रेनमध्ये बसता येतं. पुन्हा लहान होता येतं...

            नंतर साधारण दोनच्या आसपास अरबिंदो आश्रमात जायचं. हा आश्रम ९-१२ आणि २-६ पर्यटकांसाठी खुला असतो. तिथे कितीही वेळ बसता येतं. अट मात्र एकच. अज्जिबात आवाज करायचा नाही. योगी अरविंदांच्या कथा प्रचंड रोमहर्षक आहेत. त्याबद्दल तिथल्या लायब्ररीमध्ये विपुल साहित्य उपलब्ध आहे. आश्रमातून बाहेर पडताना खूप शांत आणि समाधानी वाटतं.

            मग पुन्हा एकदा बीचरोड वर जायचं. सनसेट अनुभवायचा. गार वारा खात चक्कर मारायची. अनेक महिन्यांची ऊर्जा मिळते इथे. मनसोक्त भटकून झालं कि मग गाडी परत द्यायची आणि परतीच्या प्रवासाला निघायचं..

            इथे अजूनही फ्रेंच प्रशासनाच्या खुणा आहेत. पॉंडिचेरी आणि पुदुच्चेरी मध्ये इंडिया आणि भारतात जसा फरक आहे तसा फरक जाणवतो. भाषेची थोडीफार अडचण होऊ शकते पण सगळं निभावून नेता येतं अशी जादू आहे इथे. खूप सच्ची माणसं आहेत. सगळ्यांत समाधानाची गोष्ट म्हणजे कमी कपड्यांतल्या मुली असूनही कोणी कोणाला वखवखलेल्या नजरेने बघत नाही, कुत्सित शेरे मारत नाही. त्यामुळं सगळीकडे एक आश्वासक सुरक्षितता आहे जी आजकाल क्वचितच अनुभवायला मिळते. खूप कमी ठिकाणी गेल्यावर वाटतं कि आपण इथे कितीही वेळा येऊ शकतो. तसंच काहीसं झालं इथे. फारच प्रेमात पडले मी या शहराच्या.. After all, life is great by the sea, toes in the sand and waves rolling in feeling the breeze!!!

P.S. Special thanks to google maps and headphones!

Thursday, 2 February 2017

गोष्ट तिची- प्रत्येकीची!!

अगं रश्मी, आजसुद्धा बोलणार नाहीस का तू? दुसऱ्यांदा भेटतोय आपण. पहिल्या वेळेस मला वाटलं अजिबातच ओळख नाही म्हणून बोलत नसवीस तू. पण अगं, न सांगता मनातलं ओळखता यावं तेही बायकांच्या असं कुठलंही शास्त्र अजून विकसित झालेलं नाहीये. सांग बरं काय झालंय नक्की.' रश्मीच्या डोळ्यांतली तेवढ्यापुरती आलेली चमक नाहीशी झाली. डॉ. राधाने पुन्हा एकदा सुरुवातीपासून बोलायला सुरुवात केली. 'रश्मी, मागच्या सेशनच्या वेळेस राजेश होता. आज तोही नाहीये. कसलं एवढं टेन्शन आहे तुला?' नंतर जवळपास पंधरा-वीस मिनिटे राधा रश्मीला बोलतं करायचा प्रयत्न करत होती. पण सगळं व्यर्थ. शेवटी दुसरा सेशनही लवकरच संपवून राधाने तिला जायला सांगितलं. त्या दिवशी जास्त पेशंट्स नव्हते त्यामुळे राधाकडे तसा बराच वेळ होता. तिने लगेचच रश्मीच्या केसवर विचार करायला सुरुवात केली. पहिल्या वेळेस जेव्हा राजेश आणि रश्मी आलेले तेव्हा राजेशने प्रॉब्लेम सांगितला होता, ‘मी जवळ आलो कि रश्मीला घाम फुटतो आणि ती प्रचंड बिथरून जाते. लग्नाला चार महिने होऊन गेले पण अजूनही तिची अवस्था अशीच आहे. We have not yet consummated our marriage. गायनेकोलोजीस्टकडेसुद्धा जाऊन तिच्या सगळ्या तपासण्यादेखील करून घेतल्या आहेत. शारीरिकदृष्ट्या रश्मी अत्यंत सुदृढ आहे. तरी पण हे असं का होत असावं काही कळत नाही.’ हे सगळं आठवल्यावर राधाला एकूण परिस्थितीचा जरा अंदाज आला. पुढच्या सेशनला आता डायरेक्टच काय ते विचारू असं म्हणत राधाने रश्मीची फाईल बंद केली.

पुढचा आठवडा आला आणि ठरलेल्या वेळेस राजेश-रश्मी दवाखान्यात हजर झाले. राजेशची विचारपूस करून राधाने त्याला जायला सांगितलं. आता कन्सल्टिंग रूममध्ये त्या दोघीच होत्या. रश्मीकडे बघत राधा म्हणाली, ‘आज मी तुला एक गोष्ट सांगते. मी सहावीत होते. बाबांची फिरतीची नोकरी होती. दर दोन वर्षांनी आम्हांला एका शहरातून दुसऱ्या शहरात जायला लागायचं. अर्थातच एका ठिकाणी ओळख होऊन मैत्री होईपर्यंत आम्हाला ते ठिकाण सोडावं लागायचं. मी सहावीत असताना आम्ही इथे आलो. शाळा नवीन, क्लास नवीन. सुदैवाने सगळं घराशेजारी होतं. पहिले दोन-तीन दिवस आई आली सोडायला. मग मला माहित झाल्यावर मी एकटी जायला लागले. क्लासच्या समोर एक छोटी गल्ली होती. अंधार झालं कि भीती वाटायची तिथून येताना. त्या गल्लीचं तोंड म्हणजे काही लोकांनी मुतारीच करून ठेवलेली. एकेदिवशी क्लास संपवून मी घरी येत होते. एकटीच होते. एक माणूस तिथे उभा होता. त्याने त्याचं काम आटपलं आणि प्यांटची चेन बंद न करता माझ्या दिशेने यायला लागला. सुरुवातीला मला समजलंच नाही नक्की काय होतंय ते. पण जेव्हा कळल तेव्हा उलट पावली पळत मी क्लासमध्ये गेले. बरंच वेळ तिथे बसून राहिले. नेहमीची वेळ झाली तरी मी घरी पोहोचले नाही म्हणल्यावर बाबा क्लासमध्ये आले. त्यांना बघून मला रडायलाच आलं...’ राधा बोलता बोलता थांबली. रश्मीच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. हुंदके देत देत रश्मी बोलायला लागली. राधाचा अंदाज खरा होता. रश्मी ‘सेक्शुअल अब्युझ’ची शिकार झालेली होती. तिच्या मनातलं ती कुठे बोलूच शकली नव्हती. या सगळ्याची सुरुवात झालेली ती सात वर्षाची असताना. तिच्या रिक्षेवाल्या काकांकडून. तेव्हा जे ती बिथरली ते कायमचीच. मग नंतर बसमधून जाताना छुपे स्पर्श झाले. ट्रेनमधून जाताना, तिचे आई-बाबा सोबत असताना त्यांचं लक्ष नाही हे बघून तिला नको तिथे दाबलं गेलं. आणि त्यामुळं तिला पुरुषस्पर्शाची शिसारी येऊ लागली. हे सगळं ऐकताना राधाला तिच्या अनेक पेशंट्सचे चेहरे आठवले. त्यांच्या कहाण्या आठवल्या. रश्मीच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत राधाने तिला शांत केलं. त्यांचा तिसरा सेशन संपला होता.

त्या सेशननंतर एक आठवडा संपत आला, दुसऱ्यादिवशी राजेश-रश्मीची अपोइन्ट्मेन्ट होती आणि राधाला राजेशचा फोन आला. तो सांगत होता. ‘मागच्या सेशननंतर रश्मीमध्ये बराच बदल झाला आहे.’ वीस मिनिटांच्या भेटीत ठरलेलं आणि महिन्यात झालेलं लग्न होतं त्यांचं. त्यामुळे दोघांनाही फारसं मोकळेपणाने बोलता आलं नव्हतं. तो म्हणाला, ‘काल पहिल्यांदा रश्मी माझ्याशी स्वतःहून बोलली. खूप वेळ नाही पण ठीक आहे, सुरुवात तरी छान आहे.’ राधाला बरं वाटलं. आपला पेशंट सुधारत आहे हे पाहिल्यावर ती खुश झाली. सेशनची वेळ झाली आणि रश्मी दवाखान्यात आली. आज फारशी प्रस्तावना न करता ती स्वतःच बोलायला लागली, ‘मॅडम, मागच्या वेळेस मी तुम्हाला जे सांगितलं त्यातल्या जवळपास सगळ्याच गोष्टी आई बाबांना माहित नाहीयेत त्यामुळं राजेशला माहित असायचा प्रश्नच येत नाही. माझ्याबाबतीत हे असं घडतंय यात माझीच चूक आहे असंच मला कायम वाटत राहिलं त्यामुळे मी कधीच कोणाशीच हे बोलू शकले नाही. आणि त्या दाबाखाली माझी मानसिक स्थिती विचित्र होत गेली. माझं बदललेलं वागणं आईच्या लक्षात आलेलं पण तिने ते फार मनावर घेतलं नाही. एकदा मी सांगायचा प्रयत्न केला तर ती म्हणाली, ‘प्रत्येक बाईला यातून जावंच लागतं. तू उगाच बाऊ करतेस.’ झालं. बोलणंच खुंटलं. मग यथावकाश माझं लग्न झालं. राजेश खूप चांगला मुलगा आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री मी comfortable नाही हे कळल्यावर तो खोलीत सोफ्यावर जाऊन झोपला. पण माझी घालमेल कधी कमी झालीच नाही. तो जवळ आला कि त्याच्या चेहऱ्यात मला ते सगळे चेहरे दिसतात ज्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली आहे आणि त्यामुळं......’ रश्मीला आता रडणं आवरेना. ती शांत झाल्यावर राधाने तिला काही औषधं दिली. या विचारांतून बाहेर पडण्यासाठी काय काय करता येईल ते सांगितलं. आणि रश्मी तेवढ्यापुरती सावरली.

पुढचा सेशन फक्त राजेश आणि राधामध्ये झाला. राधाने त्याला सगळी कल्पना दिली आणि धीर धरायला सांगितलं. कारण सध्या रश्मीला त्याच्या आधाराची खूप गरज होती. असेच अनेक सेशन्स होत गेले. रश्मी मात्र म्हणावी तशी प्रगती करत नव्हती.

असंच अचानक एका सेशनच्या वेळेस राजेश रश्मी दोघही आले. राजेशच्या हातात डिवोर्स पेपर्स होते. त्या दोघांनी म्युचुअल कन्सेंटने डिवोर्स फाईल केला होता. जीवापाड प्रयत्न करूनही रश्मी त्या विचित्र मानसिकतेतून बाहेर पडू शकत नव्हती. आणि ती राजेशला पत्नी म्हणून सुखही देऊ शकत नव्हती. ही कोंडी फोडायचा एकच पर्याय तिला दिसत होता. तो म्हणजे डिवोर्स. तिने राजेशला तयार केलं. स्वतःमुळे राजेशला दुःख सहन करावं लागू नये या प्रामाणिक हेतूने तिने डिवोर्स पेपर्सवर सही केली. आता ती परत लग्न करणार नव्हती. मात्र राधाशी बोलल्यामुळे तिची अपराधीपणाची भावना कमी झाली होती. आता सेशन सुरु ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. राधाचा रश्मी आणि राजेशशी असणारा व्यावसायिक संबंध संपला होता.

ती दोघं गेल्यावर राधा विचारात पडली. दिसताना जो त्रास क्षणिक दिसतो त्याचे किती दूरगामी परिणाम होत असतात. आणि रश्मी ही काही अशी तिची पहिलीच केस नव्हती. प्रत्येक केसमध्ये एक मुद्दा मात्र समान होता. आपल्या मुलाची/मुलीची बदलत जाणारी मनःस्थिती पालकांच्या लक्षात येऊनही त्यावर गांभीर्याने विचार झाला नव्हता. ‘हे असंच असतं.’ म्हणून त्याकडे दुर्लक्ष झालं होतं. काही पेशंट्स सेशन्स, ट्रीटमेंट नंतर सावरले तर काही अजूनच कोशात गेले. असे अजून किती बळी जाणार असा विचार करत अत्यंत विमनस्क अवस्थेत तिने दवाखाना बंद केला. आणि ती घरी गेली. तिच्या दवाखान्यामधल्या ड्रोवरमध्ये आतल्या बाजूला मात्र एक जुना डिवोर्स पेपर तसाच निपचित पडून होता........