Sunday, 16 November 2014

समाधानाचं दान देणारा कवी - आरती प्रभू!!!



आरती प्रभू!! अर्थात चिंतामणी त्र्यंबक खानोलकर!! त्यांची सहज सुंदर अशी चित्रपट गीत वाचून वाटत कि हा कवी आपल्याला कळला पण तेव्हाच अशा काही गूढरम्य कविता समोर येतात आणि वाटत हा कवी सहजसाध्य नाही.. तर ग्रेसच्या जातकुळी मधला आहे.. आत्ता समजला अस वाटेपर्यंत हातातून निसटलेला... त्यांच्या कवितांमध्ये लहानस लवलव करणार गवताच पात आहे.. न्हाऊ घालणारा, रसपान घडवणारा मेघ आहे.. नवथर तारुण्याची चाहूल आहे.. गर्भारपणाचे कुतुहूल आहे.. कातरवेळेची हुरहूर आहे.. दुसर्याचं ओझं आयुष्यभर वाहिल्याची दुखरी जाणीव आहे.. आणि आयुष्य सरताना काहीतरी द्यायचं राहून गेल्याची खंत आहे.. नवनवीन भावलन्कारांनी नटलेली त्यांची कविता सुश्राव्य आहे.. पण तरीही कळून कळल्यासारखी आहे...
"ये रे घना, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू नकोनको म्हणताना गंध गेला रानावना
टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार नकोनको म्हणताना मनमोर भर राना
नकोनको किती म्हणू, वाजणार दूर वेणु बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना"
ही कविता म्हणजे साक्षात पृथ्वीच्या मनःस्थितीच वर्णन आहे.. ती पावसाला सांगत आहे कि हा  सोसाट्याचा वारा  माझी नाजूक फुल चुरगळून टाकत आहे.. त्यांचा गंध दशदिशांमध्ये नेत आहे.. दूरवर वेणू वाजवत आहे.. अशा सगळ्या सजलेल्या वातावरणात तू ये आणि माझ्या मनाला न्हाऊ घाल.. आणि जेव्हा तो येतो तेव्हा गवताच्या पात्यासकट सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तिचं मन आपल्यासमोर मांडतात.. पृथ्वी जणू मानवीय स्वरुपात प्रकट होते आणि  गाऊ लागते..
"लवलव करी पात डोळं नाही थार्याला
एकटक पाहु कसं लुकलूक तार्याला
चव चव गेली सारी जोर नाही वार्याला
सुटं सुटं झालं मन धरू कसं पार्याला"
हे तर झालं उत्कट परंतु अमानवी प्रेमाचं वर्णन!! पण इथे मर्त्य जगातही प्रेमाची जादू आहे..
तो आणि ती.. दोन ग्रहांवर दोघे जण.. त्याला ही  दिसत आहे आणि तो म्हणत आहे..
"तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,  तू बहरांच्या बाहूंची.
तू ऐल राधा, तू पैल संध्या, चाफेकळी प्रेमाची.
तू नवीजुनी, तू कधी कुणी, खारीच्या डोळ्यांची.
तू हिर्वीकच्ची, तू पोक् सच्ची, तू खट्टीमिठ्ठी ओठांची. "
आणि ती तिकडे तिच्या राजपुत्राचा शोधत आहे.. आणि म्हणत आहे..
"तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूल घालीन मी, मी त्याला सहजिच रानभूल
केसात पानजाळी, कंठात रानवेल तुझी रे तुझी नटून ताई, घालील त्यास माळ"
मग काय दोघांची भेट तर ठरलेली... तो तिला त्याच्या प्रेमाची कबुली देतो.. आणि तिच्या उत्तराची वाट बघत असतो.. ती जनरीतीमुळे म्हणा काहीशी बुजलेली.. सरळ होकार देता गाण्यातून आपल्या प्रेमाची कबुली देते.. आणि लग्नासाठीच सुचवते!!!
"नाही कशी म्हणू तुला.. म्हणते रे गीत परि सारे हलक्याने आड येते रीत.
नाही कशी म्हणू तुला.. येते जरा थांब परि हिरव्या वळणांनी जायचे लांब.
नाही कशी म्हणू तुला.. विडा रे दुपारी परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी."
यथावकाश लग्न होतं आणि ती स्वतःला जणू नव्या नजरेने पाहू लागते.. त्याच्या स्पर्शाने तिला जणू कृष्णाची राधा बनवल आहे.. प्रेमाची नव्याने जाणीव करून दिली आहे..
"मीच मला पाहते, पाहते आजच का?
असा मुलायम असा देह तरी हा कसा?
माझा म्हणू तरी कसा? हा डोह जणू की कृष्ण सावळा, मी त्याची राधिका!
काठावरले तरू हळूच पाहते धरू
मोरपिशी पाखरू मज आज गवसली माझ्या मधली सोन्याची द्वारका!
पदर असा फडफडे नजर फिरे चहुकडे
नवल देखणे घडे हा तरंग मागे-पुढे जळावर हलतो का सारखा?"
आत्तापर्यंत आरती प्रभू वाचताना वाटत हा माणूस निसर्गकवी आहे एक प्रेमगीत लिहिणारा सच्चा माणूस आहे.. किती सरळ कविता आहेत यांच्या.. आणि तेव्हाच ही कविता समोर येते..
" ती येते आणिक जाते येताना कधि कळ्या आणिते
अन्जाताना फुले मागते येणेजाणे, देणेघेणे
असते गाणे जे कधी ती म्हणते.
येताना कधि अशी लाजते तर जाताना ती लाजविते
कळते काही उगीच तेही, नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन उगीच 'नाही', 'नाही' म्हणते.
येतानाची कसली रीत गुणगुणते ती संध्यागीत
जाताना कधि फिरून येत, जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते.
इथे आपल्याला नक्की वाटत कि "ती" म्हणजे प्रेयसीच.. जी येते आणि निघूनही जाते.. लाजते, नखरे करते.. होकार असतानाही नाही नाही म्हणते.. सगळ कळत असूनही कळल्यासारख दाखवते.. पण नंतर वाटत ही "ती" म्हणजे प्रतिभा आहे.. जी येताना कवितेची किंवा कथेची एखाद चिमुकली कळी घेऊन येते आणि जाताना त्या कळीच सुंदरसं फुल मागते.. आता त्या कळीच फुल होत असताना प्रतिभेची साथ तर हवीच.. ती, सोबत करताना मात्र कधी नाही म्हणते, कधी हुलकावणी देते, कधी सरळ येते तर कधी वळसे घेत स्वच्छंदीपणे येते!! येतानाही तिचा नखरा आहे. आत्ता आली म्हणजे परत फिरून येईलच अस नाही आणि जेव्हा जाते तेव्हा कधी गुणगुणारं संध्यागीत घेऊन जाते तर कधी विचित्र सल देऊन जाते.. अशी ही त्यांची सखी... मनस्वी तरीही प्राणप्रिय!!!
अशीच एक दुर्बोध कविता म्हणजे "समईच्या शुभ्र कळ्या"
समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायांशी पडते.
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे
मागे मागे राहिलेले माझे माहेरे बापुडे.
साचणार्या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची.
थोडी फुले माळू नये, डोळां पाणी लावू नये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन ये.
हसशील, हास मला, मला हसूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा!
आरती प्रभूंचा शब्दन्शब्द हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांत बुडलेला. आणि त्यात तो आशाताईंचा केळीच्या खोडाच्या तंतूसारखा आवाज... काही केल्या कवितेचा अर्थ लागत नाही.. मग मधेच वाटत ही नवे नवे लग्न झालेली, अजून माहेरची नाळ तुटलेली आणि संसारातल्या नवलाईची, त्याच्या  कडून असलेल्या आशाआकांक्षांची चाहूल लागलेली अर्थात स्वतःमध्ये एक जीव सामावून असणारी स्वप्नील मुलगी तर नसेल... आणि मग कविता थोडीशी उलगडल्यासारखी वाटते..
मार्गशीर्षी संध्याकाळ, समईचा खोलीतला पुंजक्यात मावणारा अंधुक प्रकाश.. त्या प्रकाशात समईच्या उजळलेल्या वाती दिसायला लागतात.. त्या शुभ्र वातींमधून कळ्यांगत ज्योती उजळवायला वाकलेली ती.. रोज जाईच्या कळ्यांचा गजर माळणारी.. चंद्र वर वर येत चालला तशी जाईपण फुलत गेली. पण आज गाठी काही पक्क्या बसल्या नव्हत्या.. अशामधेच सुटलेला वारा.. समई विझू नये म्हणून ती जऽरा खाली झुकली झुकली तोच सैलसर वेणी पुढे आली खांद्यावरून..आणि त्या झटक्यानं गजऱ्यातून जाईची फुलं टपटपली खाली पडलीआधीच कातरवेळ त्यात हे अवघडलेपण.. अशात माहेरची आठवण आली नाही तरच नवल... काळीज घट्ट करून लेकीला दूर पाठवणारं बापुडवाणं माहेर. तिला आईची खूप खूप आठवण येते. डोळे टच्कन भरून येतात.. पण आज ते पाणी डोळ्यांची साथ सोडायला तयार नाही.. मग काहीसा बहाणा करून ती उठते... सखीच मन जाणणारी शेजारीण तिथेच असते.. ती हिला सल्ला देते.." अगं अशी उदास कशाला बसल्येयस? जा, जरा पाणी पुसून घे डोळ्यातलं. अशी सुटी फुलं नको माळू केसांत. नीट तयार हो बरं! ऊन दूर निघून चाललंय बघ... जरा तुझ्या पदराला धरून त्यातलं थोडं ऊन घरात घेऊन ये..घरदार हसू दे" यावर स्वतःचं हसण स्वतःलाच सोसवेल कि नाही याची भ्रांत पडलेली ती मात्र म्हणते.. "मघाची आसवं मनात खोल रुतली आहेत. त्यांना निपटून टाकून हसू कसं? आणि हसून तरी काय होणार आहे? तो चंद्र का दुप्पट तेजानं आपलं चांदणं सांडत माझ्याबरोबर हसू लागणार आहे? तो  माझ्यापसून दुणा होऊ नये एवढच मला वाटत आहे.."  इतका गहनगंभीर अर्थ आणि तितकेच सुंदर शब्द!!! वाह!! क्या बात है..!!!!
इतकं हळवं लिहिणाऱ्या आरती प्रभूंनी बर्याचदा मनाला बोचणारी विषण्णतादेखील शब्दबद्ध केली आहे.. या कोडग्या जगात निरागस असं काहीच राहील नाहीये.. भोळ्या कळ्यांनादेखील कसलस दुखः सतावत आहे.. असं असताना हसायचं तरी कस आणि कुठे असं विचारताना ते म्हणतात...
"कसे ? कसे हासायाचे ? हासायाचे आहे मला
हासतच वेड्या जिवा थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा
हासायाचे
कुठे ? कुठे आणि केव्हा? कसे ? आणि कुणापास ?
इथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास"
हसायचं कस हेच समजणाऱ्या आपल्याला जेव्हा कोणाकडून तरी वापरलं गेल्याची, कोणाच तरी ओझं आयुष्यभर वागवल्याची जाणीव होते तेव्हा खूप विफलता जाणवते.. हे सगळ का आहे... कशासाठी आहे असं वाटू लागत.. आणि त्याच वेळेस आरती प्रभू त्यांची कविता घेऊन आपल्या मदतीला येतात..
"कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक् ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे
दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे
अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे"
इतकं सगळ, प्रत्येकाच्या प्रत्येक मनःस्थितीला साजेल असं लिहिल्यावरही त्यांना असं वाटत कि काहीतरी द्यायचं राहून गेल आहे.. पण आता माझ्याकडे काहीच नाही.. काळ्या होत्या.. त्याचं निर्माल्य झालं आहे... कोवळ्या मनाचा दगड झाला आहे... आणि त्यांच्या सोबतच माझ आयुष्य चालाल आहे.. आणि अशा विश्रब्ध मनाच्या कातरवेळी ते म्हणतात..
"गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्
आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा"
असे हे आरती प्रभू!!! पोटापाण्यासाठी आकाशवाणी मध्ये काम केलेले.. काही काळ खानावळही चालवलेले.. पण त्यांना साहित्यात आपला आत्मा सापडला.. बरेच काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.. त्यापैकी "नक्षत्रांचे देणे" साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला..
"पृथ्वीची फिरती कडा चाटून कवितेची ओळ येते
आणि आयुष्यातील एक दिवस दानासारखा मागून नेते." असं म्हणणाऱ्या त्यांनी आपल्याला समाधानच दान दिल आहे.. ग्रेस आणि आरती प्रभू.. एकाच परंपरेचे अनुयायी.. म्हणूनच ग्रेस यांनी आरती प्रभुंवर लिहिलेली कविता सदर करून विराम घेते..
"असा एक सूर्यास्त अंगावरी ये मला वाटते मीही भारावलो
दिवेलागणीच्या तुझ्या खिन्न वेळीच हा गाव सोडून मी चाललो"

***आजच्या लेखामध्ये internet चा वापर केलेला आहे... त्यामुळे काही श्रेय त्या अनामिकांचे देखील आहे!!

Friday, 24 October 2014

वपुर्झाकार - व.पु. काळे



" एक मनुष्यजन्म!! सगळे म्हणतात तस ८४ लक्ष फेर्यानंतर मिळालेला... अर्थात मला याच्याशी कर्तव्य नाही.. मला दिसतो तो जिताजागता माणूस.." अस म्हणून कायम माणसाभोवती साहित्य निर्माण करणारे लेखक आज आपल्याला भेटणार आहेत..  त्यांच्या कथांचा, कादंबरीचा विषय एकच - "माणूस"! कधी तो उच्चवर्गीय तर कधी मध्यम! कधी बाईलवेडा तर कधी संन्यस्त! कधी मनातली गरळ ओकून टाकणारा बडबड्या तर कधी सगळ मनात साठवून कुढत राहणारा एकलकोंडा! कधी पुरुष तर कधी स्त्री! प्रसंग साधा, सरळ, छोटासा! पण त्याची कथा करण्याच कसब यांना लाभल होत.. माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदुःख, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्न हे सगळ तर आपणही रोज बघत असतो, जगत असतो. पण आपल्याला ते सगळ शब्दबद्ध करण जमतच अस नाही.. जमलच तर ते वाचणार्याला आपलस वाटतच अस नाही.. पण यांच्या लेखणी मध्ये ती जादू आहे... वाचकाला तो जे वाचतोय ते प्रत्यक्ष जगतोय अस वाटायला लावणार कसब आहे.. आणि म्हणूनच यांच्या कथा मनाला भिडतात, आपल्याशा वाटतात.. हे आहेत कथाबीजाला फुलवत त्याच हळुवार, भावस्पर्शी कथेत रुपांतर करणारे, सहज सध्या शब्दांतून आयुष्याच तत्वज्ञान सांगणारे व.पु,!!!!
" माणसाच्या तारुण्याचा काळ... जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ... संततीच्या रूपाने माणूस परत एकदा बालपण अनुभवू शकतो.. पण वार्धक्यात तारुण्य अनुभवू शकत नाही क्वचित अनुभवत आल तरी उपभोगू शकत नाही.. जाणीव जाग्या झाल्यापासून माणूस वाट बघतो ती तारुण्याची.. " किती साधे शब्द आहेत पण त्यात किती सच्चाई आहे.. व.पुं.च्या लेखनात कधीही स्वतःबद्दल, स्वतःच्या साहित्याबद्दल अहंकार डोकावत नाही.. त्यात असतो तो मानवी भावभावनांचा कल्लोळ.. एका भावनेचा दुसर्या भावनेशी चाललेला निरंतर खेळ... आपल्याला वाटत आपण शांत आहोत.. कसलाही विचार करत नाही.. ज्यांना हि अवस्था लाभली ते भाग्यवान!! बाकी सगळे कायम एकतर भूतकाळात नाहीतर भविष्यात रमलेले.. आपल्याला कळत असत कि "सौख्याचा कुठलाही क्षण चिरंजीवी नाही.. त्याचं अमरत्व फक्त आठवणींच्या राज्यात!! आणि आठवणी कधीच सुखद नसतात.. दुःखाच्या असतील तर त्यापायी वाया गेलेला भूतकाळ आठवतो आणि आनंदाच्या असतील तर गेले ते क्षण म्हणून काहीतरी निसटून गेल्याच्या त्रासाचा असतो... " पण तरीही आपण वर्तमानात जगायचं टाळतोच...!!
आठवणी हा जसा जगण्याचा अविभाज्य भाग तसाच एकाकीपणादेखील.. व.पु. म्हणतात, "एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण. एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्या वर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल."  खरय!!! भरलेल्या मैफिलीमध्ये अचानक डोळे झरू लागतात.. तेव्हाचा एकाकीपणा हा आजूबाजूला असणार्या माणसांवर अवलंबून नसतोच.. कदाचित तो एकटेपणा हवा तो माणूस सोबत नसल्याच्या जाणीवेतून आलेला असतो.. असे डोळे झरू देण्याला मोठ धैर्य लागत.. बर्याचदा गळा भरून येतो पण डोळे वाहत नाहीत.. "मी कणखर आहे" या जाणीवेचा बांध ते पाणी अडवत असतो.. पण खरतर जेव्हा हा बांध नाहीसा होतो, तेव्हाच आपण मोकळे होतो, हलके होतो... मला स्वतःला मनमोकळेपणाने हसणारी माणस जेवढी आवडतात त्याहीपेक्षा मनापसून रडणारी (पण अर्थात रडकी नव्हे) माणस काकणभर जास्त आवडतात!!! एखाद पुस्तक वाचताना, सिनेमा बघताना तल्लीन झाल्यावर, पात्राशी एकरूप झाल्यावर एखाद्या हळुवार क्षणी डोळ्यातून पाणी येण हे अतिशय संवेदनशील असल्याच लक्षण आहे..
वपुंची "दोस्त" वाचली तेव्हा जाणवलं कि माणसाच्या मनात शिरण्यासाठी भव्य दिव्य अस काही लिहाव लागत नाही.. "कर्त्या पुरुषाचा नाकर्तेपणा, जगाला दाखवण्यासाठी आणलेला उसना मोठेपणा इथपासून ते अगदी घरात धाकट पिल्लू येणार या एका बातमीने तो, ती आणि त्याच पहिलं पिल्लू या सगळ्यांच्या मनावर होणारे परिणाम असा कुठलाही विषय चालतो"!! गरज आहे ती सजग वाचकाची! मोठ्या मानाने नाही तर मोकळ्या मनाने वाचणार्या संवेदनांची!!
"महोत्सव" देखील अशीच!! याच सौम्य पठडीमाधली... वडिलांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे चालणारी सद्गुणी मुलगी.. लग्न झाल्यावर सासर मिळत ते अगदी विरुद्ध चालीच!! तिच्या लवकर उठण्याची, नीटनेटकेपणाची अवहेलना करणार... अशा वेळेस जेव्हा आईवडील देखील म्हणतात, " बेटा, आता तेच तुझ घर आहे" या प्रसंगी तिचं तुटणार मन व्यक्त करायला व.पुं.चीच लेखणी हवी...
वयाने आणि अकलेने जरा शहाणे झालो तेव्हा त्याचं पार्टनर वाचल, "पार्टनर म्हणजे नक्की कोण हे समजेपर्यंत पुस्तक कळलचं नाही.. आपलाच आपल्याशी चालत असलेल्या संवादाच मूर्त रूप किंवा शब्द रूप म्हणजे पार्टनर.. त्यातली काही वाक्य म्हणजे अजरामर म्हणावीत अशी आहे..
" तुला मी कशी हक मारू? पार्टनर ह्याच नावाने.. आपल्याला खरतर नावच नसत, बारशाला नाव ठेवतात ते देहच..." हा जो पार्टनर आहे ना अगदी सहज खूप गहिरं बोलून जातो..   "आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाण हाच नरक.."                                                                   
आपल्या सगळ्या गोष्टी नाही म्हणाल तरी आत्मकेंद्रित असतात म्हणूनच हा पार्टनर म्हणतो, "लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस.." हे अस बरच काही भन्नाट बोलून वेड लावणारा पार्टनर...!!!
आयुष्याला नाहीतर अनुभवला क्षणभंगुरता असते अस सांगून ते म्हणतात,
"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते.  कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं.  म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत." म्हणूनच जगण्याचा महोत्सव करायला आपण शिकायला हव..
जीवनविषयक तत्वज्ञान हा जसा त्यांचा लाडका विषय तसाच स्त्री आणि तिचं भावविश्व हा देखील.. पुरुषाच्या नजरेतून ती - "पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही." पण त्याला तिच्या पहिल्या हास्याची, नजरेची भीती वाटते.. कारण, त्या दोन्ही गोष्टीत त्या समोरच्या व्यक्तीला ओळखतात हे कळून येत.." स्त्रीच पाहिलं हास्य, पहिली नजर लोहचुम्बकाने लोखंडाचे कण वेचून घ्यावेत त्याप्रमाणे स्त्रिया पुरूषाच मन वाचतात... आणि मग त्याच क्षणी आपल्यातल अंतर किती ठेवायचं ह्याच गणित मांडतात.. मग त्या दिलखुलास हसतात तरी किंवा 'राखून' तरी!!! किती सुंदर मांडलं आहे!!! यातला एक आणि एक शब्द खरा आहे!!!! "सखी" हाही एक गाजलेला कथासंग्रह!! स्त्रीला जवळून पारखून जन्माला घातलेल्या कथा आहेत यात!!!
पत्नी गेल्यानंतर एखदा आधार जावा तसा तो विधुर काहीसा खचून जातो.. त्यातूनच मग काहीसा हळवा, काहीसा गंभीर होऊन जातो.. तारुण्यात रोमांटीक वाटणारा चंद्र आता मात्र वेगळाच वाटू लागतो.. ". चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो! माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.  ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती? उपवास करणार्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल. पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार? त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे. समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात."!!!
त्यांच्या तात्विक कादंबर्यांपैकी माझी आवडती कादंबरी म्हणजे तू भ्रमत आहासी वाया... बरीचशी अनाकलनीय तरीही मनाच्या अंतरमनाचा ठाव घेणारी..  आपण सारे अर्जुन हि तशीच..  आपण सारे कुरुक्षेत्रातल्या अर्जुनासारखे आहोत.. ज्यांना कृष्ण भेटतो ते पैलतीरी जातात बाकीचे असतात तसेच संघर्ष करत आजचा दिवस उद्यावर ढकलणारे.. संसार चालू ठेवणारे... याच पुस्तकात ते म्हणतात,
         "संसार खरंच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवंय? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? एखाद्या मैफिलीसारखं रंगवता येणार नाही का? आपल्या जन्मापूर्वी हे जग होतंच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार हा असाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली 'एंट्री' मध्येच केव्हातरी होते आणि 'एक्झिट'ही. हे नाटक किती वर्षांचं, ते माहित नाही. चाळीशी, पन्नाशी, साठी, सत्तरी.... सगळं अज्ञात. घडधाकट भूमिका मिळणार, की जन्मांधळेपणा, अपंगत्व; बुद्धीचं वरदान लाभणार की मतिमंद? भूमिकाही माहित नाही. तरी माणसाचा गर्व, दंभ, लालसा ... किती सांगावं? कृष्णानं बासरीसहित आपल्याला पाठवलं; पण ह्या सहा छिद्रांतून संगीत बाहेर येत नाही. षड्रिपूंचेच अवतार प्रकट होतात. स्वत:ला काही कमी नाही. स्वास्थ्याला धक्का लागलेला नाही. तरी माणसं संसार समजू शकत नाहीत. "आपण सारे अर्जुनच."
जसा संसार आपल्याला नवखा, तसाच मृत्यू देखील.. या दोन्ही गोष्टी एकदाच आपल्या आयुष्यात येतात.. मृत्यू बद्दलच त्याचं मत आपल्याला थक्क करून सोडत.. ते म्हणतात, " दुःख-आनंद, जय-पराजय, हसू-आसू, विरह-मिलन सगळ तसंच असत.. प्रत्येक क्षणी मांसाच मन नवा जन्म घेतं एवढाच काय ते नवीन.. पुनःपुन्हा जन्म घेण्याची हि क्रिया थांबण हेच मरण!!किती उदात्त कल्पना आहे!!
"वपुर्झा" हे असाच उदात्त पुस्तक.. कधीही, कुठलाही पण काढून वाचा.. काही घरात अत्तराच्या बाटल्या टेबलावर मांडून ठेवलेल्या असतात.. ज्याच्या त्याच्या मूड प्रमाणे जो तो अत्तर काढून लावत असतो.. तसंच काहीस या पुस्तकाचं आहे.. आणि म्हणूनच त्याला अनुक्रमणिका, संदर्भ, क्रमांक अस काहीही नाही!!!
वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही व भावनाप्रधान आहेत पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आद्रतेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातली माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्‍या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौदर्य आहे, तोरा आहे.. म्हणूनच हे लेखन कागदांपेक्षा मनात जास्त वेळ जतन करून ठेवलं जात आहे.. आणि जात राहील....