Monday, 25 August 2014

प्रखर राष्ट्राभिमानी - स्वा. सावरकर



आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही. या महान माणसाने आपल नाव सार्थ करत स्वतःच्या हाताने, लेखणीने भारतवर्षाला सावरलेलं आहे.. क्रांतीची ज्योत पेटवली आहे.. फक्त भारतातच नाही तर जगभरात.. त्यांच्या कविता आपल्याला सांगत राहतात की या इथे एक उत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक होऊन गेला.. त्यांच्या कार्याला सीमा नाही, त्यांच्या क्रियाशीलतेला सीमा नाही आणि देशभक्तीला तर नाहीच नाही.. असा हा असीम भारतपुत्र "स्वा. सावरकर "
अर्थात विनायक दामोदर सावरकर.. !!
लहानपणापासून या महामानवाबद्दल आपण ऐकत आलेलो आहोत.. त्याच्या घणाघाती वक्तृत्वाची
जाज्वल्य देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली ध्वनीफित ऐकुन वेळोवेळी अंगावर रोमांच उभे राहिले आहेत..
जस आभाळाच्या विस्ताराला मर्यादा नाही, सागराच्या खोलीला पार नाही, हिमालयाच्या उत्तुंगतेला थांग नाही तसच यांच्या असामान्य प्रतिभेला काळाची, स्थळाची, वेळेची बंधन नाहीत.. 
वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र लिहिलं
"जयोस्तु ते श्रीमहन्मंगले । शिवास्पदे शुभदे  स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची स्वतंत्रते भगवती । श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी स्वतंत्रते भगवती । चांदणी चमचम लखलखशी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली  स्वतंत्रते भगवती । तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची स्वतंत्रते भगवती । अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
मोक्ष-मुक्ति  ही तुझीच रूपे तुलाच वेदांती  स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्न्त महन्मधुर तें तें  स्वतंत्रते भगवती । सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे"
भारतमातेच इतक ओजस्वी रूप शब्दात मांडण्यासाठी लेखणीमध्ये प्रचंड ताकद असावी लागते आणि मनामध्ये प्रखर देशभक्ती...
" हे अधम रक्तीरंजिते । सुजन पूजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे "
हे वाचताना आपल्या अंगात अचानक दिव्यत्वाचा संचार होतो अस वाटत..  राष्ट्रासाठी काहीतरी करायला हव अशी आस निर्माण होते...
तीव्र बुद्धिमत्ता, आक्रमी व साहसी वृत्ती, हृदयातील मानव्य अन् सर्जनशील कवित्व लाभलेले सावरकर स्वतःच्या आदर्श स्थानांबद्दल अतिशय कृतज्ञ होते.. आणि या कृताज्ञातेमधुनच शिवरायांच्या आरतीचा जन्म झाला.. शिवराय म्हणजे पाच शाहींना उध्वस्त करण्यासाठी देवी भवानीने घेतलेला मानवी अवतार.. हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार.. रामदासभक्त आणि बरच काही..
अशा शिवरायांची थोरवी गाताना ते म्हणतात,
" हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाज राजा
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा "
लोकमान्यांना स्वतःचे गुरु मानणारे सावरकर त्यांच्या क्रांतीची ज्योत आणखी तेजस्वी आणि जहाल करते झाले.. १९०६ मध्ये टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते लंडनला गेले.. आणि तिथेच भविष्यात होणार्या अमानवीय कार्याची सुरुवात झाली.. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलानेच हुतात्मा अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला. याबाबत त्यांना अटक झाली. पुढे पॅरिसहून लंडनला येताना मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी टाकून निसटण्याचा ऐतिहासिक, धाडसी प्रयत्न त्यांनी केला. जणू जल महाभूताचे भेदन केले.  दोन जन्मठेपी एकाच वेळी भोगत अंदमानच्या सेल्युलर जेलरच्या काळकोठद्यांना देखील थरथरायला लावले.. उत्स्फूर्त काव्यपंक्तिंनी रोमरोमात राष्ट्रभिमानची ज्योत चेतवली.. अंदमानात जेव्हा त्यांना काव्य स्फुरू लागले. तेव्हा जवळ कागद तर नव्हते मग त्यांनी सरळ उष:कालच्या आभाळाला विचारले, 'माझा कागद होतोस काय?' तेव्हा आभाळ उत्तरले,
"मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?
माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।।
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।
आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।।
दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली।
'मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली।" आणि मग इथेच ते ऐतिहासिक कमला काव्य रचल गेल.. भारतवर्षाच्या दुर्दैवाने ते महाकाव्य पुसून टाकण्याचे प्रयत्न झाले.. पण म्हणून त्याची थोरवी खचितच कमी होत नाही..
मातृभूमीच्या विरहामुळे व्याकूळ झालेलं मन जेव्हा काव्य रचू लागत तेव्हा ते काव्य केवळ प्रसिद्धच नाही तर अजरामर होऊन जात..
" ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
त‍इं जननीहृद्‌ विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्‌नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे, कथुनि सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला"
 जगभरात कितीही सुख असलं, कितीही ऐश-आराम असला तरी देखील मला माझ्या भारतमाते पेक्षा काहीही प्रिय नाही काहीही सुखद नाही.. तुला जसा तुझ्या प्रिय सरितेचा विरह सहन होत नाही तसाच  मलादेखील हा दुरावा सहन होत नाही, माझा प्राण तळमळत आहे' अस सांगताना ते लिहून गेले...
" नभि नक्षत्रे बहुत, एक परि प्यारा  मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता, रे बहु जिवलग गमते चित्ता, रे
तुज सरित्पते जी सरिता, रे त्वद्‍अविरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला...
अवघ काव्य म्हणजे जणू विरह अगतिकता आणि विमनस्कता यांचा उच्च कोटीचा संगम आहे.. ते वाचल्यावर आपल्याही नकळत आपण नतमस्तक होऊन जातो..
सावरकरांचं व्यक्तिमत्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पाश्र्वभूमीवर आधारित कादंबर्‍यांचा लेखक ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत..त्यांच्या अनेक वीर रसपूर्ण कविता आहेत.. आपणा सर्वांना त्या माहित आहेत.. पण काही अशा कविता आहे की ज्या वाचल्यावर हा इतका जहाल माणूस इतका प्रेममय कसा काय होऊ शकतो अस वाटत.. वानगीदाखल घ्यायचं झाल तर
"शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥
हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणात गेला । सखि हातचा सुटोनी ॥" हि  कविता त्याची आर्तता दाखवते, एका क्षणी जेव्हा विरहानंतर एकमेकांची भेट होते तेव्हा त्याची अवस्था किती घेऊ किती देऊ अशी होऊन जाते... आणि जेव्हा वाट पाहून जीव शिणून जातो तरीही सखा येत नाही तेव्हा ती म्हणते,
" समयी सखा न ये । मी जात फसुनि आतां गे ।
बघत वाट थकलें । मी दारिं बसुनि आतां गे ॥
मानि ना आता गोडी गुलाबी पुन्हा ।
सख्याशीं मांडिलें मी युद्ध रुसुनि आतां गे ॥
गांठ होतांचि त्‍या । शत्रुकंठी पाश हा ।
आलिंगनाचा । फेकीन कसुनि आतां गे ॥
दूति जा सांग । आलांत जा तसेची ।
प्रिया रडवीनची । मी हसुनि हसुनि आतां गे ॥"
या कविता वाचताना वाटत या माणसाच्या सर्वच भवता अतिशय उत्कट होत्या तरल होत्या.. कुठलाही विषय त्यांना वर्ज्य नव्हता.. या महामानावानं मागं ठेवलेल्या लखलखीत प्रकाशरेषेवरून आपण किती काळ चालत आलेलो आहोत..अगदी ‍अलगद आणि विनासायास.. आणि कदाचित म्हणूनच त्यांच्या कामगिरीला काहीस गृहीत धरल गेल.. निसर्गनियमांना आपण जसं गृहित धरतो तसं.. पण आज मला म्हणावस वाटत आहे कधी अजाणता तर कधी जाणूनबुजून अवहेलना ज्यांना अवहेलना सहन करावी लागली त्यांचे खरेखुरे अनुयायी मात्र अव्याहत क्रांतीचा झरा वाहता ठेवणाऱ्या या  महामानवाचा समृद्ध वारसा घेऊन पुढे जात आहेत.. स्वतंत्र भारतात वैचारिक श्रीमंती उपभोगत आहेत.. सावरकरांबद्दल लिहीण्यासारख खूप काही आहे, आज लिहिताना वेळोवेळी जाणीव होत आहे त्यांच्या पुढे आपण अत्यंत खुजे आहोत.. भविष्यात कधी त्यांच्या सर्व साहित्याचे रसग्रहण करण्याचा मानस आहे.. तोपर्यंत मात्र इति लेखनसीमा..  

Wednesday, 30 July 2014

साहित्यसम्राट अर्थात "कुसुमाग्रज"



श्रावण सुरु झाला आणि यांची कविता आठवली नाही असा रसिक विरळाच...
हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला
तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला
लपत, छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला
लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला
सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला
अस म्हणताना श्रावण महिना न राहता आपला सखा होऊन जातो.. त्याच्या नुसत्या येण्याने आपण सुखावून जातो.. आणि हि फक्त श्रावणाची कमाल आहे अस नाही तर त्याला आपल्या शब्द कवेत घेऊन गोड, नाजूक बनवणार्या कवीची देखील आहे... हा कवी माणुसकीने ओतप्रोत भरला आहे.. याच्यामध्ये अन्यायाविरुद्ध बंड करण्याची तयारी आहे आणि त्याच्या लेखणी मध्ये ती क्षमता देखील आहे.. उदात्त प्रेमात नाहणारी यांची कविता खूप प्रेरणादायक, आश्वासक आणि सहज सुंदर आहे.. मला वाटत या माणसाची एवढी ओळख पुरेशी आहे.. हे आहेत विविध साहित्य प्रकार अतिशय सहजतेने हाताळणारे साहित्यसम्राट अर्थात "कुसुमाग्रज"
१९३० पासून स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंतचा काळ... क्रांतीचा जयजयकार करणारा... पारतंत्र्याची शृंखला तोडण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या उर्मीचा काळ... या उर्मीला कार्याची जोड देण्यासाठी यांच्या कवितेचा जन्म झाला होता..
"गर्जा जयजयकार क्रांतिचा, गर्जा जयजयकार
अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
खळखळु द्या या अदय श्रुंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश
पिचेल मनगट परि उरांतिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार?
कधीही तारांचा संभार?"
अस म्हणत त्यांनी क्रांतीचा जागर केला...
"कशास आई, भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार
आई, खळाखळा तुटणार"
अस सांगत एक सुरेख आशावाद निर्माण केला....
नंतर जेव्हा खरंच वाटल कि आपण मुक्त होणार तेव्हा जस हरवलेल्या बोटीला जेव्हा किनारा दिसू लागता नाविक हर्षविभोर होऊन गाऊ लागतो तसाच यांचं देखील झालं आणि ते गाऊ लागले...
"निनादे नभी नाविकांनो इशारा.. आला किनारा ..
प्रकाशे दिव्यांची पहा माळ ती.. शलाका लाल निळ्या हिंदोळती
तमाला जणू ये अग्नीचा फुलोरा आला किनारा आला किनारा!!!!
स्वातंत्र्य तर मिळाल पण विषमता, पिळवणूक, अन्याय यांचा विळखा पुरता सुटला नव्हता..
सावकारी, स्त्रीची विटंबना हे प्रकार सुरूच होते.. या गोष्टींचा त्यांनी धिक्कार केला नसता तरच नवल..
गरीब बिचारा शेतकरी, सावकारीच्या दुष्टचक्रात अडकलेला.. सर्व वस्तूंचा लिलाव झाल्यानंतर एक बायकोच काय ती उरलेली..
"ऊर तिचे ते न्याहाळूनी
थोर थैलीतील वाजवीत नाणी
'आणि ही रे' पुसतसे सावकार..
उडे हास्याचा चहूकडे विखार" अस म्हणणारा तो नतद्रष्ट आपल्या मनात चीड निर्माण करतो.. हा सगळा प्रकार थांबायला हवा असा त्वेष निर्माण करतो..
" बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहांत आज या एक मनीषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते"
अशी प्रतिज्ञा करणारे कुसुमाग्रज भारतमातेची होणारी विटंबना, तिच्यावर होणारी आक्रमण यांमुळ नुसते व्यथित होत नाहीत तर "कृतीशील बना" असा संदेश देखील देतात...
वीर रसाने भरलेली त्यांची कविता प्रेमाची नजाकत पेश करण्यात देखील तेवढीच आघाडीवर आहे..
"चांद भरली रात आहे, प्रियकराची साथ आहे
मोगर्‍याच्या पाकळ्यांची मखमली बरसात आहे
मंद वाहे गंध वारा दूर चंदेरी किनारा
अमृताच्या सागरातून जीव-नौका जात आहे
ना तमा आता तमाची वादळाची वा धुक्याची
आजला हातात माझ्या साजणाचा हात आहे"
हे वाचताना संपूर्ण चित्र उभ राहत.. कवितेला जिवंत करण्याची यांची किमया वादातीत आहे!! यांची कविता इतकी आखीव रेखीव आहे कि बस!!!
आपण सामान्य जन.. प्रेम म्हणजे मानवी जीवनापर्यंत सीमित अशी आपली समजूत.. पण या महान कवीने साक्षात पृथ्वीला आणि सूर्याला या नाजूक नात्यात चित्रित केल.. आणि पृथ्वीच प्रेमगीत तयार झाल.. किती विशाल आणि भव्य कल्पना आहे ही!!!!
"युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतिची याचना"
तुझी प्रतीक्षा करून आता मी थकले रे.. अस म्हणणारी ती सालांकित होऊन बसली आहे.. पण तिचा शृंगार त्याच्यावाचुन व्यर्थ आहे.. त्याच्याशिवाय तिचं आयुष्य म्हणजे फक्त अंधार आहे...
"दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकिती दिव्य उल्का-फुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचूनी देवा, मला वाटते विश्व अंधारलेले!"
दोन उत्तुंग जीवनच मिलन म्हणजे खरतर एक सोहळाच.. तो तसाच उत्तुंग असायला हवा.. तसा तो होणार नसेल तर दुरावाच बरा अस म्हणत ती गाते...
"परि भव्य ते तेज पाहून पूजून  घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे!
गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा!"
आणि सर्वात शेवटी या मिलनाची शक्यता धुसर होताना दिसू लागता तिला त्याची थोरवी आणखी स्पष्ट दिसू लागते.. आणि त्याला सर्वस्वाच दान देता देता ती म्हणते...
अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्‌  मला ज्ञात मी एक धूलीकण
अलंकारण्याला परि पाय तुझे  धुलीचेच आहे मला भूषण!"
प्रेमाला वैश्विक बनवण्याचं श्रेय बहुतांशी यांचं आहे.. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण प्रेम करू शकतो मग त्या भौतिक गोष्टी असोत वा नसोत...
" प्रेम - कुणावर करावं ? कुणावरही करावं...
प्रेम - योगावर करावं, भोगावर करावं..
आणि त्यातूनही त्यागावर करावं... " वाह!! काय कल्पना आहे!!
सुरांना आळवताना ते म्हणतात माझ मन दूर कुठेतरी हरवलं आहे.. समोर सारा अंधार आहे.. तेव्हा हे सुरांनो फक्त तुम्हीच चंद्र होऊन मला अमृतामध्ये नाहवा!!!!
"हे सुरांनो चंद्र व्हा!
चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा! "
कुसुमाग्रजांच्या कवितांचा संक्षेपाने वेध घेण खूप कठीण काम आहे.. अनेक मोती यातून निसटून जातात..  यांची कविता वाचताना आपण आपले राहत नाही...  तसाच कविता लिहिताना खुद्द ते सुद्धा स्वतःचे राहत नाहीत... सृजनाची अवस्था मांडताना ते म्हणतात,
"मी जेव्हा कवी असतो तेव्हा मी कोणाचाच नसतो!
गगनयानापारी  होतो स्फोटाने विलग मी..."
कवितेच्या प्रांतात अधिराज्य गाजवणारे कुसुमाग्रज पद्य लिहिण्यात हि अग्रेसर होते..
'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे स्वागत केले त्याला तोडच नाही. अत्यंत नाजूक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले
'मराठी माती', 'स्वागत', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्‍या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली 'वैष्णव' ही कांदबरी व 'दूरचे दिवे' हे प्रसिध्द झाले.
 ज्ञानपीठ पुरस्काराला गौरवणारे हे कायम स्वतःची वाट चालत राहिले.. जेव्हा अशी वाट मिळाली नाही तेव्हा स्वतःची वाट बनवीत राहिले सगळ्यांना मार्गदर्शन करीत राहिले... आशीर्वाद देत राहिले..
आणि म्हणत राहिले,
"असे हजारोसंगे आहे जडलेले माझे नाते "
अनेक मनांना प्रेरणा देणारे, जीवन ध्येयाचा साक्षात्कार घडवणारे कवी क्वचितच परत जन्म घेतात.. सर्वसमावेशकता असणारी त्यांची कविता मराठी साहित्याला एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवते...अशा या कवीला माझा त्यांच्याच शब्दात सलाम..
"आदित्य या तिमिरात व्हा ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता अनुदारिता दुरिता हरा
सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणाकरा ॥"

Thursday, 17 July 2014

निसर्ग उपासक कवी - बालकवी!

कधी कधी अस होत न.. एखादी कविता वाचताना मन अगदी भरून जात.. कुठल्या-कुठल्या आठवणींच्या गावाला भेट देऊन येत.. अचानक डोळ्यात पाणी आणत तर अचानक खुदकन हसायला लावत... या सगळ्या उत्फुल्ल भावना जिवंत होतात जेव्हा त्या निसर्ग-कविते मधून आपल्या समोर येतात.. कवितांना मूर्त रूप मिळत.. यासाठी कवितेला रंग, रूप, नाद देणारा कवी अत्यंत तरल मनाचा असावा लागतो.. असेच अतिशय हळुवार मनाचे, अनेक कविता जिवंत करणारे, निसर्गाशी तादात्म्य पावलेले माझे लाडके कवी म्हणजे "बालकवी"
१९०७ सालची गोष्ट.. कविसम्मेलनामध्ये एक किशोरवयीन मुलगा व्यासपीठावर चढला आणि
" अल्पमती मी बालक, नेणे काव्यशास्त्रव्युत्पत्ती..
कविवर्यांनो, मदीय बोबडे बोल धरा परी चित्ती.. "
अस म्हणत त्याने अगदी नम्रपणे पण दिमाखात आपल्या कविता सादर केल्या..
अध्यक्षांनी मुलाला बालकवी काय म्हणाल, तेच बिरुद कायमच त्याला चिकटून बसल...
त्यांच्या कवितेमधून कायम आनंद वाहत असतो..
"आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे"
अस म्हणत म्हणत आपोआप आपण आनंदी होत जातो... त्यांच्या कवितेला एक लय आहे.. एक नाद आहे... आणि तो नाद अत्यंत मोहवणारा आहे... श्रावणात उन पावसाच्या खेळच वर्णन करताना अस वाटत आपल्या समोर तो ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे.
"श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे.."
त्यांचा औदुंबर वाचताना तर वाटत.. एखादा सन्यस्त समाधी अवस्थेत बसला आहे.. सारी सृष्टी त्याला साथ देत आहे.. बेटातून वाहणारा झरा वातावरण निर्मिती करत आहे.. काळिमा सुद्धा कसा तर गोड काळिमा... घाबरवणारा नव्हे तर मनाला शांत करणारा...
"ऐल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळयांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळया डोहाकडे
झाकळूनी जल गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकु नी जलात बसला असला औदुंबर"
अनेक उपमा, उत्प्रेक्षा अलंकारांनी नटलेली हि कविता अगदी आपलीशी वाटते..
'निर्झरास', 'तृण-पुष्प', 'हिरवी-कुरणे' हे सगळ काव्य-भांडार म्हणजे सृष्टीच्या मनाचे रंग दाखवतात..
'बालविहग' या कवितेत संध्याकाळच वर्णन करताना ते म्हणतात,
" सांज खुले सोन्यहुनि पिवळे हे पडले ऊन..
चोहीकडे लसलशीत बहरल्या हिरवळी छान..
पांघरली जरतार जांभळी वनमाला शाल...
सांध्यतेज गिरीशिखरी विखरी सम्मोहनजाल.."
हि सगळी नुसती वर्णन नाहीत तर त्यांची अभिव्यक्ती आहे.. चैतन्यदायी अस्तित्व आहे.. कवितेच्या कुन्चल्यामधून निसर्गचित्र अस काही साकारल जात कि वाचणारा थक्क होतो...
द्विरुक्ती साधून ते कवितेला गेयता प्राप्त करून देतात... लय मिळवून देतात...
"गिरिशिखरे वनमालाही दरी दरी घुमवित येई..
कड्यावरुनी घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या !!
घे लोळण खडकावरती फिर गरगर अंगाभवती..
जा हळू हळू वळसे घेत लपत लपत हिरवाळीत!!!
एक अत्यंत अल्लद प्रेमकथा अल्लड नव्हे.. ती कुमारिका! अगदी लहान, अवखळ.. आणि तो अतिशय राजबिंडा देखणा तरुण.. त्यांच्या नाजूक प्रेमाची हि गोष्ट.. ती तिच्या आई सोबत आनंदाच्या झोक्यावर झुलत आहे.. खाणाखुणांच्या प्रदेशापासून खूप लांब विहरत आहे...
"हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?"
मग असाच कधीतरी हास्य विनोद करता करता..रेशीम गाठी जुळतात.. वचनांचे आदान-प्रदान होत... आणि नंतर ती मंगल घडी येते.. दोन मने एकरूप होतात...
"गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !"
अहाहा!! किती सुंदर वर्णन आहे हे..  एका कळीच सुर्यविकासी फुलामध्ये होणार रुपांतर इतकासा गाभा.. पण त्याला काय अप्रतिमपणे गुंफल आहे... वाह!! काही तोडच नाही.. हे झाल निर्व्याज, निरलस प्रेम.. पण जेव्हा एखादा राजकुमार वनात जातो.. तिथे विहरणाऱ्या रमणीला भुलतो.. तेव्हा त्यांच्या प्रेमाचा अविष्कार वेगळ्या स्वरूपाचा असतो..
"गर्द सभोंती रान साजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी ?
ती वनमाला म्हणे, "नृपाळा हे तर माझे घर.
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर."
रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी, तुला
तू वनराणी, दिसे भुवनी ना तुझिया रूपा तुला
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी
भुलले तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरी"
हे सगळ वाचताना कायम जाणवत.. बालकवींची कविता सौन्दार्यासाक्त आहे..इथे सौंदर्य हे फक्त स्त्रीच सौंदर्य एवढ संकुचित नाही तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ज्या काही मनोहारी गोष्टी होतात त्या सगळ्याचं सौंदर्य!!!
झरा हा त्याचा लाडका विषय.. त्याला ते कवीश्वर म्हणतात.. त्या झर्यालाच ते विनंती करतात,
"शिकवी रे शिकवी माते
दिव्य तुझी असली गीते!!"
त्यांना तारकांच संगीत ऐकू येत.. आकाशाची शोभा स्पर्शता येते.. एकूणच काय तर माणूस आणि निसर्ग यांचा भावबंध जोडता येतो... आणि म्हणूनच त्यांना मनाची शांतता अनुभवता येते.. कुठल्याही परिस्थिती मध्ये स्वतःच गाण गाता येत..  आणि ते गात असतानाच संपूर्ण विश्वात मांगल्य नांदावं, ऐक्य रहाव.. अशी मनःपूर्वक प्रार्थना देखील करता येते!!!
"माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे
सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले
ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला.
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली !
मंगल मंगल मद्‌गानाची गति ही शेवटली."
पण शेवटी कितीही झाल तरी हा माणूसच न.. मनाला येणारी अस्वस्थता, अशांतता त्यांना थोडीच चुकणार आहे.. फरक इतकाच आपण त्याचा गवगवा करतो आणि यांच्या सारखे महान लोक त्यांना शब्दात बांधून स्वतःपासून वेगळ करून टाकतात.. आणि म्हणूनच सृजनशील राहू शकतात..
"कोठुनी येते मला कळेना उदासीनता या हृदयाला
काय बोचते ते समजेना हृदयाच्या अन्तःहृदयाला.."
अशा कविता वाचल्या कि आपण देखील व्याकूळ होतो..
बालकवींना कुठेतरी काहीतरी खुपत होत.. आणि तेच त्याच्या काही कवितांमधून व्यक्त होत होत..
"शुन्य मनाच्या घुमटात कसले तरी घुमले गीत..
अर्थ कळेना कसलाही विश्रांती परी त्या नाही.."
या व्याकूळ करणाऱ्या गोष्टी कधीही एकेकट्या येत नाही.. आपल्यासोबत सगळे सगे सोयरे घेऊन येतात.. आणि मग आपल्या विचारांची चक्र सुरूच राहतात.. अव्याहत..!!!
अशाच काहीशा विचारचक्रात अडकले असताना, रेल्वे रूळ पार करताना त्यांचा अपघाती अंत झाला.. माणूस स्वतःच्या जीवनाची रूपरेषा आखतो.. इथे बालकवींनी मरण तर येणारच पण ते कस यायला हव ते सुद्धा सांगितल..
"सत्याची स्वप्ने व्हावी | सत्याला स्वप्ने यावी |
स्वप्नीही स्वप्ने बघत | स्वप्नातच व्हावा अंत ||
मरण्याचे स्वप्नही गोड | जगण्याचे स्वप्नही गोड |
येणेपरी सर्वही भास | अमृताचे व्हावे कोश ||
असा हा आमरण बाल्याच वरदान मिळालेला कवी! तुमच्या आमच्या पाहण्यात क्वचितच असायचा!!
बालकवींच्या कविता सार्या मराठी भाषेचा अमुल्य ठेवा आहे.. सार्या महाराष्ट्राचा मानबिंदू आहे.. त्यांचा कवितेमधील निरागस पणाचा वारसा आपल्या सर्वांना मिळावा हीच प्रार्थना..