Thursday, 3 July 2014

माणुसकीचा ताल जपणारा कवी विं. दा.करंदीकर.....



कविता समजण्यापेक्षा ती आपली एका दमात वाचून काढायची अस वाटायचं ते वय... तेव्हा यांची "घेता" वाचली होती...
"देणार्याने देत जावे  घेणार्याने घेत जावे
हिरव्या-पिवळ्या माळाकडून
हिरवी-पिवळी शाल घ्यावी
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.." नंतर उसळलेल्या दर्याकडून प्रेरणा, भीमेकडून शांती घेता घेता ते म्हणाले
"देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे!!!
त्या बाळबोध वयात मला वाटायचं काय कवी आहे, "देणारा देत आहे तर निदान त्याचे हात तरी त्याला राहूदे ते कशाला घ्यायचे.. " जेव्हा नंतर थोडी प्रगल्भता आली तेव्हा अचानक साक्षात्कार झाला.. देणार्याचे हात घ्यावे म्हणजे त्याची दानत घ्यावी.. आणि खर सांगते त्यानंतर या माणसाबद्दल असणारा आदर अनेक पटीने वाढला.. आता हा माणूस कोण हे काही वेगळ सांगायची गरजच नाही... हा म्हणजे माणुसकीला काव्याच्या कोंदणात बसवून त्याची सर्वत्र उधळण करणारा राजा माणूस "गोविंद विनायक अर्थात विं. दा.करंदीकर..."
१९४० च्या दरम्यान रसिकांना रिझवण्यासाठी आलेली त्यांची कविता वयाचे, सामाजिक, राजकीय,
सगळे सगळे पाश तोडून रसिकांच्या अन्तःकरणाला जाऊन भिडली... नव्या गोष्टींचा पुरस्कार करताना तिने कधीच संस्कृतीशी असणार नात तोडलं नाही.. बाल-गीत, प्रेम-कविता, गझल, सुनीत अशा नानाविध प्रकारातून विहरताना कायम वास्तवाशी असणारी नाळ जपून ठेवली..
बालगीत म्हणजे पाऊस, शाळा, आईचे लाड, बाबांचा मार एवढच नसत तर त्या लहान मुलाचं स्वतःच एक छानस विश्व असत त्यात उडणारी घर असतात..तिथे परीक्षा लहान मुल नाही तर म्हातारी माणस देतात.



"तिबेटाच्या जरा खाली हिमालयाच्या जरा वर!
एटू लोकांचा अद्भूत देश प्रत्येकाजवळ उडते घर!
'टींग' म्हणता येते खाली 'टंग' म्हणता जाते वर!
एटूच्या देशात सक्तीचे खेळ मुलांना नसतो शिकायला वेळ
म्हातारे देतात परीक्षा शंभर मेल्यानंतर कळतो नंबर"
सगळच कस सरळ सोप्प बालसुलभ..पण त्यांच्या काही बालकविता मात्र मनात घर करून बसतात..
मोठ्ठ झाल्यावर मी जादुगार होणार अस म्हणताना चिमुरडा म्हणतो..
"खरेच आई, तुला नवी, धडकी लुगडी दोन हवी
कमळीचा परकर सगळा, अगदी बघ फाटून गेला
भाऊला बघ लंगोटी, नकोच का याहून मोठी
बाबांना पंचाबदली, हवी धोतरे लांब भली
पडला पुढती ढीग पुरा, काय कमी जादूगारा??."
असा अगदी निरागस प्रश्न तो आपल्या आईला विचारतो.. बिच्चारी आई काय उत्तर देणार.. जे काय उत्तर द्यायचं ते नंतर परिस्थिती देतेच..
एकूणच काय तर वास्तव आणि काल्पनिकता याचं अद्भुत मिश्रण, लहानग्यांच्या विश्वाशी तादात्म्य पावण्याची कला या सगळ्यांमुळे त्यांची कविता समृध्द झाली आहे..
जसे जसे आपण मोठे होतो तसं कष्टांच महत्व कळत जात...तेव्हा जर यांची कविता सोबत असेल तर
घामाच्या धारांची स्वेद गंगा होते.. जी खर्या-खुर्या गंगेहुनही पवित्र आहे..
"कांचनगंगेहुनही जी सुंदर
भागीरथीहूनही जी पावनतर
परमेशाहून जीवनतत्पर
त्या गंगेतील स्वेद्बिंदुनो
प्रणाम माझा तुम्हा निरंतर....!!!!
असेच कष्ट करत असताना कधी कधी मात्र जगण्यातला तोच तो पण उबग आणतो तेव्हा ते म्हणतात,
"सकाळ पासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !
माकडछाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन..
तीच गाणी तेच तराणे तेच मूर्ख तेच शहाणे..
"सकाळ पासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !" आणि मग त्याच वेळी मनाला उभारी देताना म्हणतात,
"घामामध्ये भिजव माती दगडासंगे झुंजव छाती..
आकाशावर मार मुठ उबग-बिबग सर्व झूट.."
यांची कविता नुसतीच वास्तववादी नाही तर दूरदर्शी देखील आहे. येणाऱ्या काळात यंत्र हाच जीवनाचा पाया होणार आहे हे त्यांनी कधीच ओळखल होत.. आणि म्हणून एका नादबद्धतेने यंत्राला आवाहन करताना ते म्हणतात,
ये यंत्रा!! ये यंत्रा!!
मंत्रांना सार्थ करीत स्वप्नांना स्वीकारीत 
उच्चारीत, आकारीत ये यंत्रा!! ये यंत्रा!!
संहारीत नवदानव निर्मित ये नवमानव
उद्घोषित नवमुल्ये उद्घोषित क्रांतीपाठ
ये यंत्रा!! ये यंत्रा!!
वास्तवाच सुंदर वर्णन करणारा हा कवी प्रेम देखील तेवढ्याच ताकदीने मांडतो.. तो तिच्या आठवणींमध्ये झुरत आहे, तिच्या भेटीसाठी व्याकूळ होत आहे.. पण या जन्मी त्यांची भेट नाही.. तिला भेटायचं तर त्याला एक नवीन जन्म घ्यावा लागेल.. ही सगळी अगतिकता सांगताना ते म्हणतात,

"माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी.
तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी.
होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे,
ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.
लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी."
आणि इकडे ती देखील तिच्या स्वप्नात त्याला तीच सर्वस्व देऊन जाते.. स्वप्न असलं म्हणून काय झाल.. स्वप्नांना कायम पूर्ततेची आशा असते म्हणूनच पाहिलेली स्वप्न केवळ स्वप्न न राहता काही काळासाठी हकीकत होऊन जातात..
"मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्‍न होते स्वप्‍नात पाहिलेले !
स्वप्‍नातल्या करांनी, स्वप्‍नातल्या तुला मी
होते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले ?
स्वप्‍नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले
स्वप्‍नातल्या परीला स्वप्‍नात फक्त पंख
दिवसास पाय पंगू अन्‌ हात शापिलेले
स्वप्‍नात परीला स्वप्‍नात ठेवुनी जा
हे नेत्र घेऊनि जा स्वप्‍नात नाहलेले
जा नेत्र घेऊनि जा स्वप्‍नांध पांगळीचे
आता पहावयाचे काही न राहिलेले"
उत्कट प्रेमासारख त्यांनी कौटुंबिक जीवनातले हृद्य अनुभवही ते सांगून जातात,
"असशील का आता तू  बसलीस अंगणात ?
अन हात दोन चिमणे  असतील का गळ्यात ?
असशील का आता तू  अंगाई गीत गात
घेऊन लाडकीला त्या लाघवी कुशीत..." सगळ कस तंतोतंत डोळ्यांसमोर उभ राहत!!!
एकदा आई झाल कि कायम आई असणारी गृहिणी सगळ्याच जबाबदार्या लीलया पेलते... एकाच वेळेस सुवासिनी, आई आणि त्याच वेळेस बायकोसुद्धा.. तिच्या या सामार्थायची त्याला जाणीव होते आणि तो म्हणतो,
"तू घरभर भिरभिरत असतेस..
लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात..
स्वागतासाठी तू सुहासिनी असतेस..
वाढताना यक्षिणी असतेस.. भरविताना पक्षिणी असतेस...
संसाराच्या दहा फुटी खोलीत
दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया
मला अजूनही समजलेली नाही..." अस कौतुक झाल्यावर ती का खुश होणार नाही!!
त्यांच्या कवितेला सहजतेचा स्पर्श आहे.. अकृत्रिम जिव्हाळा आहे... म्हणूनच त्या आत कुठेतरी भिडतात.. हृदयाच्या तर छेडत राहतात.. कधी कधी अति वास्तवदर्शी होऊन रुक्ष सुद्धा वाटू शकतात.. माणसावरच्या, मानुसाकीवरच्या अपर प्रेमातून त्यांची कविता जन्म घेते.. सर्व रूढ संकेतांना भेदून टाकते.. तिच्या उत्कटतेने रसिकाला भारून टाकते.. हेच तीच वेगळेपण आहे!! आयुष्यभर जपून ठेवाव अस..

Tuesday, 17 June 2014

अभिजात कवयित्री बहिणाबाई !!!



ज्या काळात अर्वाचीन महाराष्ट्रामध्ये केशवसुत, रा.ग. गडकरी आपल्या प्रतिभेने रसिकांना मोहवत होते त्या काळात जळगावात एक "अडाणी" स्त्री जात्यावर दळण दळताना, चुलीवर भाकरी भाजताना, शेतात काम करताना, सुगरणीच्या घरट्याकडे पाहताना मन मोकळ करत होती.. तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटल नाही कि ह्याच कविता पुढे जाऊन ग्रामीण काव्याचा सर्वोत्तम अविष्कार ठरणार आहेत.. बालभारती- कुमारभारती मध्ये अभ्यासल्या जाणार आहेत..
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर !
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हणू नये
राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये
अरे, संसार संसार, नाही रडनं, कुढनं
येड्या, गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं !
अरे, संसार संसार, दोन जिवांचा विचार
देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार
हे वाचल्यावर वाटत खरतर आयुष्याची व्याख्या किती साधी सरळ सोप्पी आहे.. पण आपण स्वतःच ते सगळ गुंतागुंतीच करून टाकतो...वरपांगी गोष्टींना भुलून निखळ सात्विक आनंद देणाऱ्या गोष्टींपासून लांब जातो.. सुखाला होकार देऊन त्याला जवळ करण्याऐवजी दुःख कुरवाळत बसतो..
एकदा विचारांची गाडी सुरु झाली कि तिला लवकर स्टेशनमध्ये आणतच नाही.. कारण त्या सगळ्या विचारांचा नियंत्रक इतका चंचल आहे, लहरी आहे कधी कधी जहरी देखील आहे त्याचच वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात,
"मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात ?
आता होतं भुईवर  गेलं गेलं आभाळात
मन जहरी जहरी  याचं न्यारं रे तंतर
अरे, विंचू, साप बरा  त्याला उतारे मंतर !
मन एवढं एवढं  जसा खसखसचा दाना
अन्‌ मन केवढं केवढं ?  त्यात आभाळ मायेना
देवा आसं कसं मन ?  आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तुला  असं सपनं पडलं !" आणि शेवटी त्या जगतनियंत्यालाच विचारतात कि बाबारे, अस जागेपणी तुला मन निर्माण करण्याच स्वप्न कस काय पडल.. देवाला थेट प्रश्न विचारण्याएवढी त्यांच्याकडे शक्ती आहे कारण त्या शक्तीच्या मागे पांडुरंगावर असलेली अपरंपार भक्ती आहे.. म्हणूनच त्या सहज लिहून जातात,
"माझ्यासाठी पांडुरंगा  तुझ गीता-भागवत
पावसात सामावत माटीमधी उगवत.."
आणि त्या भक्तीच्या मागे त्याच पांडुरंगाने निर्माण केलेला निसर्ग आहे.. तो निसर्गच त्या निर्गुण  रूपाचा सगुण अविष्कार आहे..कारण,
"अरे देवाचं दर्सन  झालं झालं, आपससूक
हिरिदात सूर्याबापा  दाये अरूपाचं रूप
तुझ्या पायाची चाहूल  लागे पानापानांमधी
देवा तुझं येनंजानं  वारा सांगे कानामधी"
हे अस बावनकशी सोन थेट वारकरी पंथाशी आपली ओळख सांगत..ते त्यांच्या कवितेतून दिसुनी येत..
"दारी उभे भोत्रे जीव  घरी पत्राले पाखंडी
टाय मुदर्गांची धून आली पंढरीची दिंडी.."
पांडुरंगाच्या चरणी लीन होणार त्याचं मन रोजच्या शेतीच्या कामातसुद्धा कविता करण्याची प्रेरणा देत... आता शेती म्हणाल कि नांगरणी आली, त्यासाठी बैल आले, त्यांच्या कलाकलाने वागण आल, त्यांना गोंजारण आल.. अशावेळेस प्रेमळ बहिणाबाई म्हणतात,
"पाय उचल रे बैला.. कर बापा आता घाई
चालू दे रे रगडण  तुझ्या पायाची पुण्याई!!!!"
उफणणी च्या वेळेस हनुमंताच्या बाबांना त्या हाक मारतात जणू हे सगळे त्यांच्या सात जन्मांचे सोबती आहेत...
"चल ये रे ये रे वार्या ये रे मारोतीच्या बापा
नको देऊ रे गुंगारा पुरे झाल्या तुझ्या थापा..."
त्याचं कुणबी मन त्यांच्या कवितेतून सारख डोकावत.. सगळी नाती गोती त्यांना त्या शिवारात दिसू लागतात आणि त्या गाऊ लागतात,
"धरित्रीच्या कुशीमधे बियबियाणं निजली
वर पसरली माती जशी शाल पांघरली
बीय डरारे भूमीत सर्व कोंब आले वर
गहिवरलं शेत जसं अंगावरती शहारं
ऊनवार्याशशी खेळता एका एका कोंबांतून
प्रगटली दोन पानं जशी हात ती जोडून
टाळ्या वाजवती पानं दंग देवाच्या भजनी
जशी करती करुणा होऊ दे रे आबादानी
कशी वार्यारनं डोलती दाणे आले गाडी गाडी
देव अजब गारुडी देव अजब गारुडी"
पण सगळ करताना, गाताना खोलवर आत कुठेतरी एक नाजूक धागा सतत तुटत असतो.. आणि मग त्यातूनच अकाली आलेल वैधव्य शब्दरूप घेऊन येत..
"लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली..
पुसोनिया गेल कुंकू रेखा उघडी पडली.." पण त्यातूनही त्या लगेच सावरतात आणि म्हणतात,
"रडू नको माझ्या जिवा तुला रडायची सव
रडू हासव रे जरा त्यात संसाराची चव.." 
बहिणाबाईंनी आपल्या नित्य जीवनातल्या सगळ्या गोष्टी काव्यामधून मांडल्या.. आणि तस करताना क्वचित शब्दांची गम्मतही केली.." त्यातून पीठ येत त्याला जात का म्हणतात ??" ,"जमिनीत उभा आहे त्याला आड का म्हणतात??" किंवा गुढी उभारायची त्या सणाला "पाडवा" का म्हणतात..
कोणत्याही विवाहीतेसाठी माहेर म्हणजे खास जिव्हाळ्याचा विषय त्याला बहिणाबाई तरी अपवाद कशा असणार.. माहेराची थोरवी तर त्या काय सांगून गेल्या आहेत...
" अरे अरे योग्य ध्यान ऐक मी काय सांगते
लेकीच्या माहेरासाठी मे सासरी नांदते"
ही अशी माहेराची ओढ इतकी तीव्र असते कि तेव्हा मग वाटेवरची साळुंकीदेखील निरोप्याच काम करते..
"माझ्या माहेरच्या वाटे मारे सायन्की भरारी
माझ्या जायच्याच आधी सांगे निरोप माहेरी"
आपली नाती कशी असतात ना.. त्यांच्या संबोधनावर नात्यामधली जवळीक दिसून येते.. आता हेच बघा ना...
"माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ,
चुलतीले काकी म्हणता अंतर किती पडे,
जीजीले जीजी म्हणता मिळे जीभले निवारा,
सासुले सासू म्हणता गेला तोंडातुनी वारा..."
इतक सगळ मनोवेधक तरल लिहिणाऱ्या बाईंच्या सामाजिक, भावनिक जाणीव अत्यंत तरल होत्या.. नाजूक होत्या.. म्हणूनच त्याला आपोआप यमकाची जोड मिळत गेली.. गद्याच पद्य कधी झाल समजलच नाही.. एक सुंदर रचना सौंदर्य प्राप्त झाल त्याला.. हे सगळ त्यांच्या " कशाले काय म्हणू नये मध्ये सहज दिसून येत..,
"बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनू नही
हरीनामाईना बोले त्याले तोंड म्हनू नही
नही वार्‍यानं हाललं त्याले पान म्हनू नही
नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही
पाटा-येहरीवाचून त्याले मया म्हनू नही
नही देवाचं दर्सन त्याले डोया म्हनू नही
निजवते भुक्यापोटी तिले रात म्हनू नही
आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही
नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही
जीले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही"
मातृत्व.. मग ते स्त्रीच असो किंवा इतर कुणाचही.. त्यात असणारा ओलावा, काळजी, मनाची गुंतागुंत शरीर कोणाच आहे ते बघत नाही.. तिथे फक्त भावना उरते.. छोट्या बाळामध्ये जीव अडकणारी स्त्री आणि पिल्लामध्ये जीव अडकणारी सुगरण पक्षीण.. तिथे असा भेदभाव उरतच नाही..आणि त्या म्हणून जातात
"अरे खोप्यामधी खोपा
सुगडिणीचा चांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिल्लं निजती खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिल्लांमधी जीव
जीव झाडाला टांगला " वाह!!! क्या बात ...
इतक्या सहजपणे सगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या बाईंना कृतघ्नपणाची मात्र मनस्वी चीड आहे..त्याचा त्यांना अत्यंत संताप येतो.. आणि त्या म्हणून जातात..
"मानसा मानसा तुझी नियत बेकार...
तुझ्याहून बर गोठ्यातील जनावर..
मानसा मानसा कधी होशील मानूस?
लोभासाठी झाला मानसाचा कानुस..."
लौकिक अर्थाने अडाणी असणार्या बहिणाबाईंच्या कवितेतला ग्रामीण गोडवा आजही आपल्याला भुरळ घालतो.. भाषेला वैभव प्राप्त करून देतो. आपल्या या अंगभूत सामर्थ्याची त्यांना स्वतःला देखील जाणीव होती म्हणूनच त्या म्हणत,
"माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपीतं पेरली !"
स्वतःच्या कवितेतून अखंडपणे निर्मळता, उत्स्फूर्तता याचा झरा वाहत ठेवणाऱ्या बहिणाबाई मराठी साहित्य प्रांगणामधला तेजस्वी तारा आहेत...अशा या अंतर्मुख करणाऱ्या कवयित्रीला माझा मनाचा मुजरा... इति लेखनसीमा..