Tuesday, 6 May 2014

आधुनिक वाल्मिकी -- गदिमा!!



आज जे आपल्याला भेटणार आहेत त्यांच्या कवितेने, भावगीताने स्वरांची लेणी लेऊन अनेक पिढ्यांचं आयुष्य सुमधुर केल आहे.. जन्मतःच गेयगद्याची सिद्धी घेऊन आलेला हा अजरामर कलावंत.. कवितेशी जीवाभावाचं नात सांगणारा
"ज्ञानियाचा व तुक्याचा| तोच माझा वंश आहे ||
माझिया रक्तात काही| ईश्वराचा अंश आहे||
अस म्हणून संत-परंपरेचा वारसा अभिमानाने मिरवणारा अत्यंत प्रतिभावान कवी, साक्षात आधुनिक वाल्मिकी "ग दि मा" अर्थात अण्णा माडगुळकर...
गडकरी गेल्यानंतर
"मायबोलीचा किल्ला आता द्यावा कोण करी,
तेवढे सांगा न गडकरी...
दिक्कालातुनी बघा शाहिरा, दिसतो का तो तरी,
आपुला वारस गादीवरी!!!"
असा प्रश्न विचारात व्याकूळ होणारे गदिमा स्वतःच्याही नकळत त्यांचे वारसदार बनले...
अतिशय सहजतेने त्यांनी त्या असीम कवित्वाच प्रतिनिधित्व केल...
माणदेशातील एका छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला.. आजुबाजूच वातावरण तसं निरक्षरच!! पण पोथ्या, कथा-कीर्तन, भजन यांमधून झालेले संस्कार.. आजूबाजूच्या निसर्गसौन्दर्याने आलेली रसिकता, आणि भाबड्या लोकांच्या संगतीमुळे आलेली निरागसता हे सगळ सगळ त्यांच्या कवितेमधून व्यक्त होत..
ते
"प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला !
दारी तव नामाचा चालला गजरू
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला !
दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला !
अस म्हणत प्रत्यक्ष विठ्ठलाला भूपाळी म्हणतात आणि त्याच वेळेस
" ये निद्रादेवी
तुझे सावळे हात प्रियाच्या पाठीवर ठेवी
घाव घेऊनी शोककथांचे
अंगावरती वण मुक्या व्यथांचे
वत्सलतेचे लेप मुलायम तूच हळू लावी
दु:खभागल्या या डोळ्यांवर
चंदनशीतल घालुन फुंकर
थकलेल्या या दिठिस उद्याची सुखस्वप्‍ने दावी
कृष्णे तुझिया मांडीवरती
लाभु देत या लव विश्रांती"
साद सुगंधित तुझा तूच या अंगाई गावी" अस म्हणत पालकत्व घेऊन अंगाई देखील म्हणतात...
छोटस गाव, रम्मीचा डाव, खेड्यातून लग्नानंतर होणारा 'गोंधळ', जागरण यासारखे साधे विषय सुद्धा त्यांच्या कवितेतून सुंदर होऊन येतात..
मुळातच सृजनशील असणारा पाऊस यांच्या लेखणीला नवे आयाम देतो..
वळीवाचा पाऊस आला कि गदिमा म्हणतात..
"माउलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार
भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार!!!"
पडणार्या पावसात सुद्धा त्यांना कविता दिसते, त्याला मल्हार रागाचा साज चढतो आणि एक अमीट गोडी असणार गीत तयार होत..
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा
कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा
वर्षाकालिन सायंकाळी लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा
कृष्णविरहिणी कोणी गवळण तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा"
असा हा पाऊस पडून गेला कि जमीन पेरणीसाठी तयार होते हा झाला आपला सरळ-साधा विचार.. पण गदिमा याची सुद्धा कविता करतात.. ते म्हणतात,
"स्नान झाले धरणीचे पडे सोन्याचा प्रकाश
आता बसेल माउली अन्नब्रह्माच्या पूजेस.." वाह !!!! उपमा अलंकार वापरावा तर गदिमांनीच...
एखादी कल्पना सुचावी आणि तिला सगुण रूप देणारे शब्द सहज समोर उभे राहावेत अशी हातोटी होती या माणसाची..असा कुठलाही गद्य-पद्य अविष्कार नाही ज्याला यांच्या लेखणीचा परिस स्पर्श झाला नाही...
आपल अख्ख आयुष्य त्यांनी गाण्यात मांडलं 'झुक झुक आगीनगाडी' म्हणत येणार बालपण असो, किंवा 'गोरी गोरी पान फुलासारखी छान' म्हणून दादाला चिडवण..
 'हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !'म्हणणारा प्रियकर असो
किंवा 'धुंद मधुमती रात रे, नाथ रे' म्हणणारी विवाहिता..
'चला सख्यांनो हलक्या हाते नखांनखांवर रंग भरा ग, नखांनखांवर रंग भरा म्हणणारी' सौभाग्याकांक्षीणी असो
किंवा 'आठव येतो मज तातांचा मम मातेच्या मृदू हातांचा' अस म्हणून हळवी होणारी माहेरवाशीण.. आणि शेवटी 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे' म्हणत येणारी तिन्हीसांज!!
अस एकदाही झाल नाही कि 'पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक त्याचेच त्या कळले तो राजहंस एक' ऐकताना अंगावर काटा आला नाही!!! याचं नाट्यगीत ऐकताना सुरावटीबरोबरच शब्द किती प्रभावी असतात हे कळत..
अनेक बोलकी शब्दचित्रे रेखाटणाऱ्या अण्णांनी फक्त मधुर रसातच रचना केल्या अस नाही तर
"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे" यासारखी अनेक स्फूर्ती गीते लिहिली..
राष्ट्रप्रेमाची प्रेमाची शिकवण देत असतानाच त्यांनी श्रमाची महती देखील सांगितली.. "तुझ कल्याण तूच करू शकतोस, मी रिक्त हस्त होण्यासाठी तयार आहे तू फक्त कष्ट कर, तुझी झोळी मोठी कर" अस म्हणत जणू श्रम-देवताच त्यांच्या तोंडून आपल्याला सांगते,
"मज नकोत अश्रू घाम हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा !
अपार लक्ष्मी माझ्या पोटी का फिरसी मग माझ्या पाठी
एक मूठभर अन्नासाठी जगतोस तरी का भ्याड जीवा ?
मोल श्रमाचे तुला कळू दे हात मळू दे, घाम गळू दे
सुखासिनता पूर्ण जळू दे दैन्यास तुझ्या हा एक दवा !"
आणि अस करत असतानाच अहोरात्र कष्ट करणाऱ्या थकल्या भागल्या जीवांना जरा विसावा घेण्यासही सांगते,
"चला जाउ द्या पुढे काफिला
अजुनी नाही मार्ग संपला
इथेच टाका तंबू !
जाताजाता जरा विसावा
एक रात्र थांबू-
इथेच टाका तंबू !"
प्रत्यक्ष पु.ल. म्हणून गेले आहेत, "अण्णा कविता लिहायला लागले कि प्रत्यक्ष वाल्मिकी त्यांना सांगत जातात आणि हा 'गजानन' त्या आपल्यासाठी उतरत जातो..
कवितेची नक्कल करताना सुद्धा तिला अस्सल बनवण्याचं कसब गदिमांकडे होत..
म्हणूनच मीराबाईंच "माई मैने गोविंद लीनो मोल" हे भजन " बाई मी विकत घेतला श्याम " मध्ये रुपांतरीत होत 
तर "झुमका गिरा रे" च्या वळणावर "बुगडी माझी सांडली ग" तयार होत...
या सगळ्यांतून त्यांचा अफाट व्यासंग, शब्दप्रभुत्व, मात्रा आणि वृत्त बद्ध रचनेवरील हुकुमत दिसून येते.. बालगीत म्हणू नका कि प्रेमगीत, लावणी म्हणू नका कि भजन आणि सगळ्याचा कळसाध्याय म्हणजे 'गीतरामायण'.. सारे रस येथे आकळले!!!
त्यांच्या विपुल लेखनाबद्दल थोडक्यात लिहिण म्हणजे कसरतच आहे खर.. कारण या महान विभूती बद्दल लिहाव तेवढ कमीच!!!!
पण शेवटी काय हो,
'मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे !
या वस्त्रा ते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्याचे!'
हा असा ग.दि. माडगुळकर नावाचा अविष्कार निर्माण करणाऱ्या त्या असीम विणकर्याला माझ त्रिवार वंदन.. ____/\____

**या लेखाची प्रेरणा म्हणजे आजवर वाचलेली ग. दि. मांची, ग. दि. मांवर लिहिलेली असंख्य पुस्तकं आणि लेख.. आणि अर्थातच इंटरनेट!!

Sunday, 13 April 2014

शब्दप्रभू - सुधीर मोघे!!

आज जे आपल्याला भेटणार आहेत त्या अवलियाला काय म्हणावं.. गीतकार, कवी, निवेदक, कीर्तनात रमणारा साधक नक्की काय... माझ्या साठी तरी ते शब्दप्रभू आहेत.. "मुक्तछंद" मध्ये राहणारे नव्हे तर कायम "मुक्तछन्दातच" जगणारे!!! कवितेला सखी मानून काव्यरसिकांना मोहवणारे.. "फिरुनी पुन्हा नव्याने जन्मणारे", कवी असणारे आणि कवीच दिसणारे, साहित्याच्या जगातले मुशाफिर "सुधीर मोघे!!"
कीर्तनकार हा स्वधर्म असणार्या राम मोघ्यांचे हे चिरंजीव, श्रीधर मोघ्यांचे बंधुराज.. लहानपणापासूनच कीर्तांच्या माधमातून नवनवीन रचना, त्याचं सादरीकरण याचं बाळकडू मिळालेलं.. मोठ्या मोठ्या रचना मुखोद्गत असण्याच वरदान मिळालेलं.. अशात जेव्हा अलौकिक प्रतिभेची साथ मिळते तेव्हा सुंदर काव्य जन्म घेत...
"एक कृती, एक शब्द, एकच निमिष चुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला तेवढं एक निमित्त पुरतं.."
अस जोरदार काव्य सलामीला टाकून साहित्य भूमीवर आगमन करणाऱ्या मोघ्यांनी नंतर मागे वळून कधी पहिलच नाही.. खरतर निमिष म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहित आहे पण त्या निमिषाची जादू तेव्हा पसरते जेव्हा मोघे त्याला शब्दबद्ध करतात..
" सर्वागातून जणू उसळली रस-गंधांची लाट
त्या एका निमिषात
दिवेलागणीची 'ती' वेळा
माजघरातील 'तो' झोपाळा
झोपाळय़ावर झुलणारी 'तू'
ठसलीस खोल मनात
श्रावण हिरवा आद्र्र कोवळा
तुझ्याभोवती लपेटलेला
हरित कांकणांचा गजबजता घट्ट पकडला हात
मऊ मुलायम लालस ओळी
ती भाषा मी प्रथम वाचली
एक अनोखी नवखी ओळख वीज भरे गात्रांत
उलटून गेली वर्षे अगणित
अल्प उरे श्वासांचे संचित
सुखमय क्षण ते कसे परतले अवचित पाठोपाठ
त्या एका निमिषात.."
वाह क्या बात है!!!!
मोघे मुळचे किर्लोस्कर वाडीचे.. ६९-७० च्या दरम्यान पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यावरच्या भोंडे कॉलनीत आले. ७१ मध्ये "स्वरानंद"च्या "आपली आवड" साठी निवेदक म्हणून काम करू लागले..
ते चित्रपटातल्या त्या गीतांमधलं काव्य अलगदपणे उलगडून सांगायचे आणि त्याबरोबर मधूनमधून आपल्याही कवितांचा आस्वाद घडवायचे. त्यांच्या कवितांना पुणेकरांनी दिलेली ती पहिली दाद होती.. त्यावेळी त्यांच्या
"दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन येतं,
तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम होतं"
किंवा
"न्हाऊनिया उभी मी, सुकवीत केस ओले, वेडय़ा मुशाफिराने त्याचेच गीत केले" या कविता म्हणजे तरुणांसाठी "love anthem" होत्या...
काळाच्या ओघात मोघ्यांच्या आयुष्यात अनेक माध्यमं, क्षेत्रं सामोरी येत राहिली..पण त्यांचा मूळ धर्म कधीही हरवला नाही.. त्यामुळे या स्वैर भटकंतीत ते कवी-गीतकार झाले, कवी संगीतकार, कवी-गायक, कवी-सादरकर्ता झाले आणि कवी-दिग्दर्शकही.. मोघे या सगळ्यात खूप रमले पण एकाही प्रकारात गुंतून पडले नाहीत.. मुशाफिराच्या ठायी असते ती अलिप्तता त्यांच्याकडे होती कवितेशी एक बांधिलकी होती.. आपण आणि आपली कविता नावाची सखी तिच्यातच ते मग्न राहिले..
कीर्तनकार सुधीर मोघ्यांनी
"तूच मायबाप बंधू तूच प्राणसखा
दीन दुःखितांचा एक तूच पाठीराखा
सज्जनांचा कैवारी तू दुर्जनांचा वैरी
अनाथांच्या नाथा तुझी रूपे नानापरी
तुझ्याविना उभा जन्म होईल पोरका"
अस म्हणून आपल्या भक्तीला शब्दरूप दिल
तर प्रेम कवी सुधीर मोघ्यांनी
"गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं
तसं कधीचं आभाळ आलंय भरून
जळ ढगांत सांकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं"
अस म्हणून प्रीतीला भावरूप दिल.
आपल जीवन म्हणजे काय तर एक झोका, अस म्हणत त्यांनी त्याचीही कविता केली..
"एक झोका,चुके काळजाचा ठोका,एक झोका
उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका
नाही कुठे थांबायचे मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका
जमिनीला ओढायचेआकाशाला जोडायचे
खूप मजा, थोडा धोका"
आणि अस म्हणताना याच झोक्याचा "रासझुला" देखील केला.. तिच्या कृष्णावरच्या प्रेमाचं गीत झाल..
"झुलतो बाई रास-झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा
प्राणहीन भासे रासाचा रंग
रंगहीन सारे नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे हरि सांवळा"
पहिल्या वहिल्या प्रेमात सगळीकडे तीच दिसत असते, पण जेव्हा ती खरचं प्रत्यक्ष भेटते तेव्हा सगळा निसर्ग जणू आपल्यासाठी खुलला आहे सगळे ऋतू फक्त आपल्यासाठीच फुलले आहेत अस वाटत..आणि तो गाऊ लागतो...
"दिसलीस तू, फुलले ॠतू उजळीत आशा हसलीस तू
उरले न आंसूं विरल्या व्यथाही सुख होऊनिया.. आलीस तू
जाळीत होते मज चांदणे जे ते अमृताचे.. केलेस तू
मौनातुनी ये गाणे दिवाणे त्याचा अनामी.. स्वरभास तू
जन्मात लाभे क्षण एकदा हा ते भाग्य माझे.. झालीस तू"
त्याच्या प्रेमाची प्रचीती आल्यावर तीदेखील त्याला आश्वासित करते आणि म्हणते
"दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
स्वप्‍नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन्‌ तृप्‍तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे ! "
त्या दोघांचा आयुष्यात नवीन अंकुर खुलण्याची चाहूल लागते, आपले कष्ट संपणार अस वाटू लागत आणि मग दोघही गाऊ लागतात
" ढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखवील, काट्यांलाबी खेळवील
समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो
असंल त्यो कुनावानी, कसा ग दिसंल
तुज्यामाज्या जीवाचा त्यो आरसा असंल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल"
सांजवेळेला आपल्या शब्दकवेत घ्याव ते मोघ्यानीच
काय लिहून गेलेत ते!!
"सांज ये गोकुळी, सांवळी सांवळी
सांवळ्याची जणू साउली
माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्‍यावरी वाहते बांसरी
अमृताच्या जणू ओंजळी" यात 'अंधार-पान्हा' हि उपमा सुचण हेच किती महान आहे!!!
" तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो
मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो
वैराण माळ उघडा बेचैन तळमळे
मी दान आसवांचे फेकीत चाललो " अस म्हणत स्वतःच्या दुखातही दुसर्यासाठी सुखाची सावली शोधणारे मोघे हे दुखः दूर होऊन सुखाचा प्रकाश पसरल्यावर गाते न होते तरच नवल...
" फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश
दंव पिऊन नवेली झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास "
मोघे विलक्षण प्रतिभावान होते.. प्रज्ञा, मेधा, प्रतिभा सगळ त्याच्यात ठासून भरल होत.. "नक्षत्रांचे देणे' , जागतिक मराठी परिषदेत गाजलेला "स्मरण यात्रा' 'माडगूळ्याचे गदिमा' किंवा "मी विश्‍वाचा' या सगळ्या गोष्टी याच्याच द्योतक आहेत...आणि यावर कडी म्हणजे "कविता पानोपानी' हा काव्य सादारीकारणाचा रंगमंचीय आविष्कार!!
असा हा रसिकांचा लाडका कवी काही दिवसांपूर्वी अनंताच्या प्रवासाला गेला.. तरीही त्यांच्या गाण्यातून, कवितेतून आणि सर्वात महत्वाच शब्दांमधून ते कायम आपल्यात राहणार आहे..कारण तेच सांगून गेले आहेत...
" सप्तस्वरांनो लयशब्दांनो जगेन तुमच्यासाठी
तुमच्यासाठी मरेनही मी, जगेन तुमच्यासाठी
तुम्हीच माझे मायतात हो तुम्हीच माझे गुरू
अनंत हस्ते अखंड दाते समूर्त कल्पतरू
तुम्हीच माझे सात सूर्य अन्‌ तुम्हीच माझी धरती
तुमच्यासाठी मरेनही मी, जगेन तुमच्यासाठी"
सलाम!!! ___/\___

Sunday, 16 March 2014

गझल सम्राट "सुरेश भट"!!!!



आज मी सुरुवात करतानाच अडखळले आहे.. कारण ज्या कवीचा परिचय करून घ्यायचा आहे त्यांच्या साहित्य प्रकारामध्ये एवढी लोकप्रियता आहे, काय निवडाव काय वगळाव कळेना झाल आहे..
कवितेला घेतलं तर गझल नाराज होईल.. त्यातही प्रेम कवितेला निवडल तर आत्म-मग्न कविता नाराज होईल... ज्यांच्या कवितेचा प्रांत थोडासा उपेक्षेमधून जात नंतर विस्तारला अशा गझल सम्राट "सुरेश भट" यांना आजची मानवंदना!!!
अमरावतीच्या कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबातल्या डॉक्टर श्रीधर भटांच हे प्रथम अपत्य!! लौकिक अर्थाने अपयशी परंतु कवितेच्या जगात इतका मान मिळवून गेले कि त्यांची
"लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी"
हि कविता आज मराठी अभिमान गीत झाल आहे..
त्यांचे तीनच कविता संग्रह त्यांना मोठ्ठ बनवून गेले आहेत..
अडीच वर्षांचे असताना पोलिओ मुळ पाय निकामी झाला तरीदेखील त्यांची इच्छाशक्ती लुळी पडली नाही. उलट वाढत राहिली आणि त्यांचा काव्यावरचा विश्वास वाढवत राहिली.. म्हणूनच ते त्यांच्या "एल्गार" मध्ये म्हणतात ''जोपर्यंत मानवजात ह्य़ा पृथ्वीतलावर शिल्लक आहे तोपर्यंत लय, ताल आणि सूर शिल्लक राहतील आणि म्हणूनच वृत्तबद्ध गेय कविता कधीही कालबाह्य़ होणार नाही. जे काव्य मूलभूत मानवी मूल्यांशी इमान राखते, जे मानवाच्या सुखदु:खांविषयी, त्याच्या स्वप्नांविषयी, त्याला हव्या असलेल्या न्यायासाठी उत्कटपणे व परिणामकारकपणे बोलते ते काव्य कधीही कालबाह्य़ होत नाही.''
त्यांना स्वतःच्या वेगळेपणाचा सार्थ अभिमान होता या अभिमानापोटीच ते म्हणतात,
"रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !"
आणि तरीही लिहितं करणाऱ्या त्या प्रतिभेच्या आणि कवितेच्या ऋणाईत राहताना म्हणतात,  "लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते." मनातल्या भावगंधाने कविता मोहरायला हवी, सुगंधित व्हायला हवी हेच तत्व ते कायम जगात राहिले..
माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या मातृभूमीशी त्याने एकनिष्ठ राहायला हव, तिचे पांग फेडायला हवेत अस सांगताना ते म्हणतात,
"गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला !
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग... काशी !
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !"
शब्दांची निवड हे भटांचं बलस्थान आहे, म्हणूनच त्यांची कविता रसिकांच्या काळजाला थेट भिडते.
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
हे वाचताना एक वीरश्री संचारते..
तर
"आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी !
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी !" हे वाचताना मधुराभक्तीचा अनुभव येतो..
भटांनी कविता लिहिल्या, पद, गवळण, भूपाळी अशा पारंपारिक रचना देखील लिहिल्या पण त्याचं मनापासून प्रेम होत ते मात्र गझलेवर!! त्यातही प्रेमाचा वेगवेगळा अविष्कार करणाऱ्या गझलेवर..
मग ती गझल कधी धीट शृंगार व्यक्त करणारी होती,
"आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याजचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ? "
तर कधी
"मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!
मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल" अस म्हणत वियोगानंतर तिच्या आठवणींमधली व्याकुळता व्यक्त करणारी होती..
कधी
"सजण दारी उभा, काय आता करू ?
घर कधी आवरू ? मज कधी सावरू ?
मी न केली सखे, अजुन वेणीफणी,
मी न पुरते मला निरखिले दर्पणी
अन्‌ सडाही न मी टाकिला अंगणी
राहिले नाहणे ! कुठुन काजळ भरू ? " अस म्हणत नवथर प्रेम व्यक्त करणारी होती..
तर कधी
"देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले
हृदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले
एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले
आला जर जवळ अंत
कां हा आला वसंत?
हाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले " अस म्हणत प्रेम करायचं वयच निघून गेल्याची खंत करणारी होती...
भटांच्या शब्द्सामर्थ्याला जेव्हा मंगेशकर कुटुंबियांच्या स्वराच, संगीतच कोंदण लाभत तेव्हा रसिक तृप्त होतात.. "उषःकाल होता होता काळरात्र झाली", "मेंदीच्या पानांवर मन अजून झुलतय ग", "चांदण्यात फिरताना माझा धरलास हात", "केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली", "तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे", "मी मज हरपुन बसले ग ", "मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे", "मालवून टाक दीप चेतवून अंग अंग", "उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे" किती नाव घ्यावीत...
भट कुणालाही न कळणारे अजब रसायन होते. आपल्याच मस्तीत एका कलंदरासारखे जगत राहिले. आयुष्याच्या काही अवघड, कठीण वाटांवर कवितेलाच सखी मानून जगात राहिले.. कधी अंतर्मुख होऊन जीवनाला प्रश्न विचारात राहिले,
"सूर मागू तुला मी कसा ?
जीवना तू तसा, मी असा !
तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझातुझा आरसा !
एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा! "
काहीसा स्पष्टवक्ता आणि त्यामुळच फटकळ वाटणारा हा शब्द-सुरांचा जादुगार, रसिकांचा लाडका कवी!!! त्यांची कविता या हृदयीचे त्या हृदयी अशी शिरते आणि तिथेच राहते अगदी कायमसाठी! अगदी रेशमाचे बंध बनून!